(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • पॉप गायिका नाझिया हसन

    नाझिया हसन यांनी वयाच्या १५व्या वर्षीचं ‘आप जैसा कोई’ हे गाणं, १६ व्या वर्षीचा ‘डिस्को दिवाने’, १८ व्या वर्षीचं ‘बुम बुम’, २० व्या वर्षीचं ‘यंग तरंग’, २२ व्या वर्षीचं ‘हॉटलाइन’ आणि शेवटी ‘कॅमेरा कॅमेरा’ आणि ‘टूनाइट’. पाच अल्बम मधून त्यांनी क्रांती निर्माण केली. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६५ रोजी झाला. संपूर्ण दक्षिण आशिया तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या डिस्को दिवान्यांत ब्राझीलसारखे लॅटिन देशही सामील झाले. त्यांनी निर्माण केलेल्या पॉप वातावरणानंतर भारत आणि पाकिस्तान कायमचे बदलून गेले. नाझिया हसन यांनी स्वरांचं नवं दालन उघडून दिलं. १९८० सुमारास, ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए, तो बात बन जाए..’ हे गाणं सतत वाजू लागलं होतं. ते गाणं होतं फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील होते आणि गाणारी नाझिया हसन ही पाकिस्तानी मुलगी. संगीत बिड्डू याचं आहे. हेही समजलं की ते गाणं वेगळं वाटण्याचं कारण होते त्याला बिड्डूचं संगीत आणि लंडनमध्ये झालेलं गाण्याचं रेकॉर्डिंग. ते २४ ट्रॅकवर रेकॉर्ड केलेलं पहिलं भारतीय गाणं होतं. नाझिया यांचा आवाज दोनदा रेकॉर्ड करून त्यात एको म्हणजे प्रतिध्वनीचा परिणाम साधला होता. याच वर्षी ‘डिस्को दिवाने’ नावाचा एक म्युझिक अल्बम आला. त्यातील सगळी गाणी नाझिया हसन यांची होती. आणि एक दिवस व्हिडीओ अल्बमवर नाझिया हसन कोण हेही दिसलं. उजव्या हातात मायक्रोफोन आणि डाव्या हातात त्याची वायर धरलेली.. खांद्यावर ओघळेलेले तिचे लांब केस, तिचं गाणं जसं जगावर पसरलं तसे.

    नाझिया हसन यांच्या ‘डिस्को दिवाने’ या पहिल्या अल्बमच्या जगभर सहा कोटी प्रती खपल्या. या अल्बमच्या माध्यमातून ती चिरंतन झाली पण तिचा शेवट खूप क्लेशकारक झाला. हे एवढंच नव्हतं. तिच्या असण्याचे काही ऐतिहासिक आणि अर्थातच सांस्कृतिक पैलू होते. तिने केवळ संगीत क्षेत्रात वादळ निर्माण केलं नव्हतं, तर एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली होती. नाझिया हसन आणि त्यांचा भाऊ झोहेब हसन यांनी एकत्रितपणे अनेक गाणी गायली. नाझिया हसन जगभरात इतकी लोकप्रिय होत होत्या की, असे म्हणतात तिला तिच्या देशात गाणं म्हणताना टीव्हीवर बघता येऊ नये, अशी व्यवस्था करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा व्हिडीओ, कमरेपासून वरचाच भाग शूट करून तयार करण्यात आला. कारण इतकंच की, तिचे नाचणारे पाय दिसू नयेत.
    ‘वायटल साइन्स’, ‘स्ट्रिंग्स’, ‘जुनून’ हे नंतर भारतात लोकिप्रय बनलेले बँड सुरू झाले होते. त्यांच्यासाठी नाझियाच्या संगीताने त्यांच्या संगीताला रुजण्यासाठीची जमीन तयार केलेली होती.

    नाझिया यांना कर्करोग झाला होता त्यावर त्वरित उपचार सुरू झाले. त्या त्यातून बरी झाल्या आणि नाझिया यांचे लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र लाखो हृदयांत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या पॉप क्वीनचा फुप्फुसाचा कर्करोग पुन्हा उफाळून आल्याचं उघडकीस आलं.

    नाझिया हसन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींतून सांगितलं होतं की, गाणं हे तिच्यासाठी कायम छंद होता आणि आहे. त्यांनी स्वत:साठी वेगळं करिअर उभं केलं होतं. नाझिया हसन यांनी लंडनच्या विद्यापीठातून बिझनेस अॅंडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागातील आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होती. त्या वेळी तरुणांची पिढी नष्ट करणाऱ्या अमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी तिने संस्था काढली होती. कराचीतील ल्यारी या सर्वाधिक गरीब वस्तीत तिने त्यासाठी मोबाइल क्लिनिक सेवा सुरू केली होती. नाझिया हसन यांचे निधन १३ ऑगस्ट २००० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / इब्राहिम अफगाण

    नाझिया हसन यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=mWzTZE-B1fM
    https://www.youtube.com/watch?v=mZqawa_lmSo

  • सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे

    लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

    नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले. त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला.

    वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.

    मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर

    केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे नानासाहेबांसाठी खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागत. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकं वर काढत.

  • आंतरराष्ट्रीय पंच रोशन महानामा

    रोशन महानामा यांनी १९९७-९८ मध्ये कोलंबो येथे सनथ जयसूर्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५७६ धावांची भागीदारी रचली. कसोटीत आजही हा विक्रम कायम आहे. दोन दिवस फलंदाजी करणारी ही पहिली जोडी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेने ६ बाद ९५२ धावा केल्या. हाही एक विक्रम ठरला होता.

  • कथालेखक, कादंबरीकार नागनाथ कोत्तापल्ले

    ‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले.

  • विद्या वाचस्पती अर्थात डॉक्टर शंकर अभ्यंकर

    एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे.

    त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी प्रथम श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला ऐकली ती हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात.त्यानंतर मी त्यांची अनेक प्रवचने ऐकली. त्यांच्या आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकार झाले असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.

    तुम्हाला जर घरी वाचन करायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या कार मध्ये श्री शंकर अभ्यंकर यांच्या सी डि , एम पी ३ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले व्याख्यान तुम्ही जर ऐकलेत तर मंत्रमुग्ध व्हाल .शिवरायांच्या आधीच्या अनेक पिढ्यांचा, सूर्यवंशी शिसोदिया राजपूत घराण्याचा इतिहास ऐकताना खूप आनंद होतो. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानात ऐकलेला इतिहास पुन्हा शंकर अभ्यंकर यांच्या तोंडून ऐकताना इतिहासातील अनेक बारकावे लक्षात येतात. तुमच्या कार मध्ये त्यांची "छत्रपती शिवाजी महाराज "हि एम पी ३ जरूर ठेवा.तुमचा लांबचा प्रवास अत्यंत सुखकारक करण्याची क्षमता या एम पी ३ मध्ये आहे.

    कोल्हापूरला श्री महालक्ष्मी च्या दर्शनाला जाताना मी कार मध्ये त्यांचे श्रीसूक्ता वरील प्रवचन ऐकतो. श्री सूक्त ऐकले कि मनातील गोंधळ कमी होण्यास खूप मदत होते. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान न होणारे त्यांचे विचार प्रत्तेक तरुणानी ऐकले पाहिजेत .

    संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास Analytical analysis करणारा आहे.समर्थ रामदास स्वामींवर बोलणारे श्री अभ्यंकर तुम्हाला त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्ते समोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

    त्यांच्या प्रत्तेक भाषणात देशप्रेम तुम्ही अनुभवाल. भारत देशाबद्दल त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या "भारतीय संस्कृती" वरील भाषणात तुम्हाला अंतर्मुख करतील .त्यांनी लिहिलेल्या भक्ति कोश या ५ प्रचंड ग्रंथात तुम्हाला भारतीय आचार्य , भारतीय सांप्रदाय ,भारतीय संत , भारतीय तीर्थ क्षेत्रे व मंदिरे आणि भारतीय उपासना या संबंधात प्रचंड माहिती मिळेल. त्यांचा प्रत्तेक ग्रंथ शेकडो पानांचा आहे.सुदैवाने माझ्या संग्रहात हे पाचही खंड आहेत.

    त्यांचे विचार ऐकल्यावर मला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले कि काय असे वाटत राहते. गेली ४ वर्षे मी त्यांचे विचार वाचतो आणि ऐकतो आहे. वयाचा विचार न करता ज्यांच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावे अशी त्यांची योग्यता आहे. या नव्या वर्षात माझ्या या पोस्ट मुळे एका व्यक्तीने जरी त्यांचे साहित्य अनुभवले तरी मला खूप आनंद होईल .

    चिंतामणी कारखानीस -

  • प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे

    साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले.

  • रोशन – कलात्मक संगीतकार

    हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.

    सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.

    रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.

    मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.

    "मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.

    एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.

    रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.

    आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.

    "कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.

    आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
    "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"

    अनिल गोविलकर
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठी अभिनेते राम नगरकर

    कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. यात राम नगरकर केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं ‘हल्ल्या थिर्र’ हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं.

  • लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

    सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले.

    लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.

    सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत.

    पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले होते. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट