(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रख्यात अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

    साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली.

    स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.

    हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी.

    वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच.

    नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’.

    १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते.

    माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.

    वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
    ‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
    http://erasik.com/productdetails/PROD150300028501

  • ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका

    भेटी लागी जीवा...' सारख्या आर्त अभंगापासून 'कळीदार कपुरी पान...' सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' सारख्या चिमखड्या बालगीतापासून 'जय जय महाराष्ट्र माझा...' सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचे कोंदण देणारे श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांना अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडूनही संगीताची तालीम मिळाली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून त्यांनी नोकरी धरली पण त्यांचे आणि संगीताचेही भाग्य मुंबईत होते.

    शांताराम रांगणेकर या बालपणीच्या मित्राच्या मदतीने मा.श्रीनिवास खळे मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संगीतक्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी धडपड सुरू झाली; रांगणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. नवलकर चाळीत राहणाऱ्या रांगणेकर यांच्या कुटुंबात सतरा जणांचा समावेश होता; त्यात खळे यांची भर पडली. रांगणेकरांनी खळेंना आपल्या कुटुंबात सामावून घेतले; एवढेच नाही, तर आपल्या खिशातील आठ आण्यांतील सहा आणे ते खळे यांना जेवणाचा डबा आणि रेल्वेच्या पासासाठी देत असत. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात खळे तेव्हाचे विख्यात संगीतकार डी. पी. कोरगावकर म्हणजेच के. दत्ता यांच्याकडे सहायक म्हणून काम करू लागले. स्वरांच्या सान्निध्यातच जीवनाचा आनंद घेण्याची आंतरिक इच्छा आणि स्वप्न पूर्तीसाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्यातून त्यांना "लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी बोलावण्यात आले. त्या चित्रपटातील गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. पण मुंबईत आल्यानंतर खळे यांनी केलेली पहिली स्वररचना गुजराती गाण्यासाठी होती; या गीताला स्वर दिला होता तलत मेहमूद यांनी.

    खळे यांनी "लक्ष्मीपूजन' या चित्रपटानंतर "यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटाला संगीत दिले. त्यातील "गोरी गोरी पान' हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यानंतर "जिव्हाळा', "बोलकी बाहुली', "पळसाला पाने तीन', "सोबती' या चित्रपटांना खळे यांचे संगीत लाभले. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकीच राहिली. पण आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. "निळा सावळा नाथ', "कळीदार कपुरी पान', "सहज सख्या एकटाच' ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि "शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचे स्वर लाभलेले हे गाणे पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीच्या "भावसरगम' कार्यक्रमातून रसिकांपुढे आले. या भावगीतानेच अरुण दाते या सुरेल गायकाची ओळख मराठी श्रोत्यांना झाली. मा.पु. ल. देशपांडे, केशवराव भोळे, मंगेश पाडगावकर, वा. रा. कांत, यशवंत देव असे दिग्गज आकाशवाणीत श्रीनिवास खळे यांचे सहकारी होते.

    आकाशवाणीत असताना त्यांनी "विदूषक', "पाणिग्रहण' आणि "देवाचे पाय' या नाटकांना संगीत दिले. ते १९६८ मध्ये "एच.एम.व्ही.'च्या (हिज मास्टर्स व्हॉईस) मराठी विभागाचे संचालक झाले. त्यांच्या चाली अवघड असतात असे म्हटले जाते; परंतु त्यावर खळे यांचे उत्तर असे असायचे, ""माझ्या चाली गायला अवघड असल्याची तक्रार मला मान्य आहे. पण माझी प्रत्येक चाल ही सर्वस्वी माझीच असली पाहिजे. माझ्यानंतर किमान १०० वर्षे तरी या चाली रसिकाला आवडल्या पाहिजेत, यासाठी माझा प्रयत्न असतो.'' "एचएमव्ही'मध्ये असताना त्यांनी विविध प्रकारच्या कॅसेट काढल्या. "अभंग तुकयाचे', "राम शाम गुण गान', "अभंगवाणी' असे त्यांचे "अल्बम' अत्यंत लोकप्रिय ठरले. भेटी लागी जीवा...' सारख्या आर्त अभंगापासून 'कळीदार कपुरी पान...' सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' सारख्या चिमखड्या बालगीतापासून 'जय जय महाराष्ट्र माझा...' सारख्या रांगड्या शब्दांना त्यांच्या अतिशय चपखल चालीचे कोंदण लाभले होते.

    खळे यांच्या संगीत रचनांना अनेक गायकांनी स्वर दिला आहे. मा.खळे यांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिले, त्याचे कारण म्हणजे स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत. यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. खळे यांनी अनेक वर्षांनंतर "कळी' या मराठी चित्रपटाला संगीत दिले होते. खळे यांना आपल्या प्रदीर्घ, स्वरमय कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान लाभले होते. श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. श्रीनिवास खळे यांचे २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    श्रीनिवास खळे नक्षत्राचे देणे.
    https://www.youtube.com/watch?v=KCWhc4XgRE4
    https://www.youtube.com/watch?v=Q9mVK0BLUgA
    https://www.youtube.com/watch?v=duI_pIz9SlM
    https://www.youtube.com/watch?v=BfOKjCLHVZw
    https://www.youtube.com/watch?v=O-tcQdcNZoY
    https://www.youtube.com/watch?v=tBA-8FKXmrQ
    https://www.youtube.com/watch?v=PDjfG6zBKZc&list=PLB81B18245264CEF7&index=7
    https://www.youtube.com/watch?v=L5jfG1Nja1U&list=PLB81B18245264CEF7&index=8
    https://www.youtube.com/watch?v=C1Q9-BfNxmU&list=PLB81B18245264CEF7&index=9
    https://www.youtube.com/watch?v=PveG3siOos0&index=10&list=PLB81B18245264CEF7
    https://www.youtube.com/watch?v=Um87jA1RU4s&list=PLB81B18245264CEF7&index=11
    https://www.youtube.com/watch?v=nY3_LvxHtKQ&list=PLB81B18245264CEF7&index=12

  • बॉलीवुड कलाकार, फरान अख्तर

    सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तर ची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला. दिल चाहता है या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरूणाईला वेड लावले.त्यातील गाणी, तरूणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरूणाईला तोंडपाठ झाले. वेग व वेळेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरूणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप. हे सगळं टिपून ते फरहानने दिल चाहता है मध्ये दाखवलं.तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणले.

    चाळीशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरूण ही एरवी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता.पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या 'लक्ष्य' या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरूणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला 'डॉन' या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लेखिका प्रा. यास्मिन शेख

    ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अंतर्नाद’ या वाङमयीन मासिकाच्या त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ‘व्याकरण सल्लागार’ आहेत. ‘अंतर्नाद’ची मुद्रितं त्या अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही तपासतात. त्या ‘अंतर्नाद’च्या केवळ मुद्रित तपासनीस नाहीत, तर ‘व्याकरण-सल्लागार’ आहेत.

  • बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय

    सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा.

  • अमेरिकन कादंबरीकार डॅन ब्राऊन

    डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अ‍ॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. यातील ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या.

  • ज्येष्ठ मराठी नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली.

  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

  • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट

    स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८
    भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.

    मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्याहमुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.

    या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.

    त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
    आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.
    मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना "बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" अशी जबरदस्त आहे...
    हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे...
    मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छ.शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.

    १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक".हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली.

    नंतर आपल्या लोकांनी 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर

    शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.

    शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

    शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.

    शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे.

    शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट