(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • प्रख्यात अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

    साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली.

    स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.

    हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी.

    वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच.

    नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’.

    १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते.

    माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.

    वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
    ‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
    http://erasik.com/productdetails/PROD150300028501

  • मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे

    वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’ प्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते.

    साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने मा. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खर्याी अर्थाने सुरू झाला.

    वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची ‘यशस्वी कारकीर्द’ दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!

    ‘ग्वालियर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. मा.पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, मा.पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणार्या. या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाईल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!

    वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं’ या बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खॉं’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले. १९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकौंटस’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व २ हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले.

    पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला. १९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखॉं देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच.

    ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या या त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे. १९८३ मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ नितीन देशपांडे

    वसंतराव देशपांडे यांचे गायन.
    https://youtu.be/qI7jSLNBnrs
    https://www.youtube.com/watch?v=qI7jSLNBnrs&feature=youtu.be
    https://www.youtube.com/watch?v=TcfyGLSYjRw&feature=youtu.be
    https://www.youtube.com/watch?v=27T21Vy9zTY
    https://www.youtube.com/watch?v=tUcXQ39yD5c&t=818s

  • बोला अमृत बोला – ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांच्या सहवासातील आठवणी

    मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात !

    त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे विद्यार्थी होते. माझे वडील सुहास भोळे ह्यांची शिकवणी घ्यायला स्वरवंदनामध्ये जायचे. त्या अनेक आठवणी ज्योत्स्नाबाई ह्यांच्या मनात शेवटपर्यंत जाग्या होत्या. गप्पांच्या ओघात, त्या मला सगळ्या आठवणी सांगायच्या. मुलाच्या शिकवणीच्या वेळी, घरात, गाणं, नाटक, ह्याविषयी कसलीही चर्चा चालायची नाही, तंबोरा, पेटी ह्याचे आवाजही नसायचे. त्यां नेहेमी म्हणायच्या, "उपेंद्र, तुझे वडील, चिंचोरे गुरुजी पक्के हाडाचे शिक्षक होते, त्याकाळी आमचे कुलवधू नाटक खूप जोरात होते, खूप दौरे व्हायचे. पुण्यातल्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही गुरुजींना आमंत्रण द्यायचो, पण ते म्हणायचे, "अहो, मी शिक्षक आहे, शिकवणे एवढेच माझे काम आहे, नाटकाला कसा येऊ?" हं, एकदा मात्र, नगरला आमचा प्रयोग होता, तेव्हां चिंचोरे गुरुजी, त्यांचे गावी नगरमध्ये होते, त्यादिवशी मात्र, गुरुजी प्रयोगाला आवर्जून आले, इतकंच काय, प्रयोग संपल्यावर, विंगेत येऊन चिंचोरे गुरुजींनी आमचं कौतुकही केलं" !

    मी त्यांना एकदा म्हणालो, "अहो, आपले चिरंजीव सुहास, स्कॉलरशिप परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, आपण माझ्या वडिलांना चांदीच्या भांड्यातून पेढे दिले होते, ते चांदीचे भांडे आजही आमच्या घरी उपयोगात येते, विशेष म्हणजे दरवर्षी गुढी उभारतांना काठीवर आपण दिलेले ते चांदीचे भांडे ठेवले जाते आणि त्याभोवती रेशमी वस्त्र नेसवले जाते"! मी सांगितलेली ती आठवण ऐकून ज्योत्स्नाबाई पुन्हा जुन्या आठवणीत शिरल्या !

    ज्योत्स्नाबाई ह्यांचे जावई ब्रिगेडियर विजय खांडेकर हे सुद्धा माझ्या वडिलांचे विद्यार्थी, मला त्यांचाही सहवास मिळाला होता, हे माझे अहोभाग्य !
    मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार ज्योत्स्नाबाई ह्यांना जाहीर झाला, त्यादिवशीही आमची गप्पांची मैफल त्यांचे घरी वरच्या मजल्यावरजमली होती !

    आज अकरा मे, वंदनीय ज्योत्स्नाबाईंची आज जयंती आहे, त्यांचे पवित्र स्मरण कायम मनात आहे, "बोला अमृत बोला" गाणं म्हणणाऱ्या ज्योत्स्नाबाई नेहेमीच अमृतमय बोलायच्या,

    -- उपेंद्र चिंचोरे

  • भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

    स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला.

  • भावकवी कृ. ब. निकुंब

    कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.

  • कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

  • अभिनेता व दिग्दर्शक अभिराम भडकमकर

    नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला. नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच... कारण तो अभिनयसुद्धा करतो... आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर... चुड़ैल हा कथासंग्रह असो किंवा बालगंधर्व'सारखी एका अवलिया कलावंताचा विशाल जीवनपट असलेली कादंबरी असो किंवा आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागल्या वास्तवाचं भीषण दर्शन घडवणारी 'एट एनी कॉस्ट' ही कादंबरी.... भडकमकर यानी लेखक म्हणून एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे.

    राष्ट्रीय नाट्य विद्यालायाचे स्नातक असलेले भडकमकर सतत कुठल्या ना कुठल्या 'लेखन' प्रयोगात व्यस्त असतात. पछाडलेला या चित्रपटा मध्ये "समीर" ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटाना अभिराम भडकमकरची पटकथा आहे. अभिराम भडकमकर यांनी आम्ही असू लाडके हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट
    http://www.abhirambhadkamkar.com/

  • विनोदी अभिनेता देवेन वर्मा

    अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. मा.देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे

    अश्विनी भावे यांनी १४व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी झाला.अश्विनी भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन त्यांनी आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणापासून ’ऋषी कपूर’ ची फॅन होत्या आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. ’हिना’ हा खूप गाजला. अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर बरोबर ’हनिमून’ व ’मुहब्बत की आरझू’ सारखे अजूनही काही चित्रपट केले. त्यांचे ’अशान्ते’, ’सैनिक’, ’जखमी दिल’ हे चित्रपट अक्षय कुमार सोबतचे आहेत. अश्विनी भावे यांनी मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानून, चौराह, इक्का राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, श्रीधर बरोबरचा ’भैरवी’ (१९९६) आणि जॅकी श्रॉफ बरोबरचा ’बंधन’ (१९९८). २००७ साली त्यांनी ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले. कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना त्यांनी अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. त्यामुळे चित्रपटांत काम करणे, बंद केले. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी चार वर्षाचा ‘अॅपकॅडमी ऑफ आर्ट्स युनिव्हर्सिटी’ हा कोर्स पूर्ण केला. बऱ्या वर्षांनंतर २०१७ त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ संगीतकार शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर

    दादा चांदेकर या नावाने प्रसिद्ध असलेले मराठी संगीत दिग्दर्शक. त्यांचा जन्म १९ मार्च १८९७ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. १९३१ नंतर दादांनी साताऱ्याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. १९३५ साली भालजी पेंढारकरदिग्दर्शित कालियामर्दन या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. १९३७ मधील प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सच्या स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे संगीतही दादांचेच होते; परंतु त्यांचे खरे नाव झाले ते हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रह्यचारी या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. 'यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या' या मीनाक्षीने गायिलेल्या गाण्याने तर त्या काळी (१९३८) चित्रपट-रसिकांना वेडच लावले होते. यानंतर दादांनी लपंडाव, अर्धांगी, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, छाया, अमृत, सासरमाहेर इ. चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांत बहुतेक मराठी व काही हिंदी चित्रपटही होते. 'नटली चैत्राची नवलाई' हे पहिली मंगळागौरमधील लता मंगेशकरने गायिलेले त्यांचे आणखी एक लोकप्रिय गीत; परंतु ज्या जयमल्हार (१९४७) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीतही दादा चांदेकरांचेच होते.

    काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीतनियोजन त्यांनीच केले. ते उत्तम हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून बरेच दिवस त्यांनी काम केले. मा.दादा चांदेकर यांचे २७ जानेवारी १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश