(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक – प्रदीप ताम्हाणे

    अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!!

  • ट्रिक फोटोग्राफी व स्पेशल ईफेक्ट्सचे जनक बाबूभाई मिस्त्री

    आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.

  • मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट श्रीपाद नेवरेकर

    श्रीपाद नेवरेकर यांनी इनायत हुसेनखॉं व खादिम हुसेनखाँ यांच्याकडे अनेक वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म ३ जुलै १९१२ रोजी झाला. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडसांसारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या. त्यांपैकी स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन, सौभद्रातील कृष्ण, एकच प्यालातील रामलाल, मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळमधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.

    गंधर्व नाटक मंडळी बंद झाल्यानंतर ठेकेदारांनी आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगात ते त्यांच्या लोकप्रिय भूमिका वारंवार करीत असत; परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते पुढे नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. १९७३ साली गोव्याच्या संगीत अकादमीत सुगम संगीताचे शिक्षण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यामुळे ते पणजी येथे स्थायिक झाले व सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांनी १९७६ सालापर्यंत काम केले. श्रीपाद नेवरेकर यांचे १६ जून १९७७ यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आपल्या अभिनय आणि नृत्याने पन्नास-साठचे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर

    जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक कलाकार म्हणून जयश्री गडकर यांनी सुरवात केली. १९५५ साली रशियन नेते कुश्चेव्ह आणि बुल्गानिन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यातील पुणे भेटीवेळी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी नृत्य केले. ते नृत्य पाहूनच दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांना "दिसतं तसं नसतं' चित्रपटात लावणी नर्तिका म्हणून भूमिका दिली. भालजी पेंढारकर यांनी "गाठ पडली ठका ठका' या चित्रपटात त्यांना प्रथम नायिकेची संधी दिली. सूर्यकांत त्यांच्या नायकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. त्यातल्या "बुगडी माझी सांडली गं' या गाण्याला आणि नृत्याला लोकांनी डोक्यावर घेतलं.

    तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश्नाना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. १९५९ साली आलेल्या अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावरील "सांगत्ये ऐका' या चित्रपटाने इतिहास घडवला. ‘"सांगत्ये ऐका'पासून दिग्दर्शक अनंत माने आणि नायिका जयश्री गडकर असे यशस्वी चित्रपटाचे समीकरण तयार झाले.

    तमासगिरीणीची भूमिका साकारणाऱ्या जयश्री गडकर यांनी त्याच ताकदीने "मानिनी'मधली सालस, सात्त्विक, सोशीक पण जिद्दी मालती साकारली. "साधी माणसं' चित्रपटात त्यांनी मेकअप न करता लोहाराच्या पत्नीची भूमिका साकारली. "मोहित्यांची मंजुळा', "पवनाकाठचा धोंडी', "एक गाव बारा भानगडी', "मल्हारी मार्तंड', "अशीच एक रात्र होती', "लाखात अशी देखणी', "सुगंधी कट्टा' हे त्यांचे चित्रपट ग्रामीण आणि शहरी भागात तुफान गाजले."जिव्हाळा' चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले "या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या' हे आर्त गाणे आणि त्यावेळचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे. "घरकुल' चित्रपटातील "पप्पा सांगा कुणाचे' हे अरुण सरनाईक यांच्यासोबतचे त्यांचे गाणेही खूप प्रसिद्ध झाले.

    मराठी, हिंदी, पौराणिक अशा २५० चित्रपटांत त्यांनी काम केले. रामानंद सागर यांच्या "रामायण' मालिकेत त्यांनी कौसल्येची भूमिका केली. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पाच वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, २००३ साली व्ही. शांताराम पुरस्कार आणि २००८ साली "चित्रभूषण' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो.

    जयश्री गडकर यांनी "सासर-माहेर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर "अशी असावी सासू' या चित्रपटाची निर्मिती, कथा, लेखन, दिग्दर्शन केले होते. अभिनेते बाळ धुरी हे त्यांचे पती. जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जयश्री गडकर यांचा जीवनपट
    https://www.youtube.com/watch?v=O2TB0JM5N54
    जयश्री गडकर यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=CeG2tvGeAiI
    https://www.youtube.com/watch?v=Ux154gVQE6Q&list=PLrw5tGo-hU-v_Vm7TnEyN0Dme7V4X4ZeG

  • मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस

    गणपतराव बोडस यांचे संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस; पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला. संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली.

    गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले.

    रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय

    साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले.

  • ब्रिटिश अभिनेता पीटर सेलर्स

    पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.

  • लेखक मुन्शी प्रेमचंद

    साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.

  • जेष्ठ कलाकार नयना आपटे

    त्यांची आई शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. 'आयुष्यात कुठलाही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही,' हे तत्त्व आयुष्यभर अमलात आणलेल्या शांताताईंनी ते छोट्या नयनाच्याही मनात उतरवलं. शिक्षणाबरोबर गाण्याचा रियाज आणि शरीरसौष्ठव जपण्यासाठी पोहणे, बॅडमिंटन, नृत्य इ. क्षेत्रांत त्याना आवड होती. बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा सर्व सुखसोयींनी सज्ज असंच घर होतं. त्यामुळे बाहेरच्या जगाशी, वातावरणाशी नयनाचा फारसा संबंधच येत नसे. त्यामुळे मित्र-मैत्रिणीही नव्हत्या.

    नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं. १९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम मा.नयना आपटे यांनी केले होते. २४ फेब्रुवारी १९६४ ला मा.शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा. अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत तिच्या मालकीचं काहीच होणार नव्हतं. त्यामुळे राहता बंगला, खूप मोठी मालमत्ता याची मालकीण असूनही बंगल्याला सील ठोकण्यात आलं. त्याही स्थितीत एस्.एस्.सी.ला ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती. आई गेल्यावर ती काही महिने पुण्याला जाऊन राहिली. पण स्वत:च्या पायांवर उभं राहाण्याची जिद्द, अभिनय, महाविद्यालयीन शिक्षण, शास्त्रीय संगीताच्या जोरावर त्या पुन्हा मुंबईत परत आल्या. अशातच १९६५ मध्ये दत्ता धर्माधिकारींच्या 'दैवे लागला चिंतामणी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली 'अंमलदार' या मराठी नाटकात राजा गोसावींबरोबर नायिका रंगवल्यावर नयना आपटेंची पुढे १५ वर्षं राजा गोसावींबरोबर जोडी जमली. साठ विनोदी नाटकांतून या जोडीने कामं केली. या नाट्यप्रवासात त्यांना चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे, दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्याकडून गद्य नाटकातील भूमिकांमधले बारकावे अभ्यासता आले. मा.नयना आपटे यांनी आजवर ६५ मराठी नाटकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. गुजराथी नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. 'मिली', 'चुपके चुपके' या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. सहा गुजराथी चित्रपट, दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मिळून १६ मालिका त्यांच्या नावांवर आहेत. एवढी कामगिरी बजावूनसुद्धा त्या कधीच थकल्या नाही. महाराष्ट्राची शान ठरलेल्या संगीत रंगभूमीसाठी कोणी नुसता आवाज दिला तरी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्या सेवेला हजर राहीन, असं म्हणणा-या नयना आपटेंचा उत्साह आजही केल्यानंतरही तितकाच अदम्य आहे. तरुणांनाही लाजवणारा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता

    माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९३० रोजी साली रंगून, बर्मा येथे झाला. ब्रिटीश नौकेदाराकडून ते माउथ ऑर्गन वाजवण्यास शिकले. जपानी भाषा लिहिता आणि लिहिता यावे म्हणून भानू यांनी १२ व्या वर्षी जपानी सैन्यात इंग्लिश दुभाषी म्हणून काम केले. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब रंगून हून कोलकता येथे आले. कोलकातामध्ये त्यांनी तेल तंत्रज्ञान अभ्यास केला आणि नंतर काल्टेक्स कंपनीमध्ये नोकरीही केली. कोलकात्यात असताना भानू नाईटक्लब मध्ये माउथ ऑर्गन वाजवत असत. अखेरीस १९५९ साली मध्ये नऊ वर्ष कोलकाता येथे राहल्यानंतर भानू मुंबईसाठी रवाना झाले.

    संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या पैगाम चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. लवकरच त्यांनी बिपीन दत्ता आणि सलील चौधरी यांच्या बरोबर काम करण्यास सुरवात केली. व लोकप्रिय हिंदू माउथ ऑर्गन वादक अशी ओळख मिळवली. (त्या काळात ख्रिश्चन माउथ ऑर्गन वादक खूप होते.) पुढे ते गिटार पण शिकले, व त्यांनी आर.डी. बर्मन यांच्या कडे गिटारवादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यांनी अनु मलिक, नदीम श्रवण आणि बप्पी लाहिरी यांच्यासाठी माउथ ऑर्गन वादक व गिटारवादक म्हणून काम केले होते.

    भानू गुप्ता हे आर, डी,बर्मन यांचे जिवलग मित्र व सहकारी होते. त्यांनी शोले चित्रपटातील माऊथ ऑर्गन ची थीम वाजवली होती. भानू गुप्ता यांचे २८ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    https://www.youtube.com/watch?v=g6RDGEIY9Yo