शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.
१९६८ साली मा.पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, मा.गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा मा.गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल. मा.शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (मा.शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. मा.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पटल साठी प्रसिद्ध होते (सध्या ते पुण्यात आहे! ),कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले!
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना प्रकारचा मजकूर लिहिणे, व्यवस्थापक म्हणून जाहिराती मिळवणे, साप्ताहिकाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधणे यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नावीन्यपूर्ण, आकर्षक लेख असावेत यासाठी त्यांची धडपड असे. साप्ताहिकांसाठी बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून नाटक कंपनी काढण्याचा विचार पक्का केला आणि ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली.
१९४० साली पहिले नाटक लिहिले त्याचे नाव ‘आशीर्वाद’. या नाटकाच्या निर्मितीच्या वेळी केशवराव दाते यांच्याशी मतभेद झाल्याने रांगणेकर नाटककाराबरोबर दिग्दर्शक म्हणूनही मान्यता पावले. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एके काळी, मोहर इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘सीमोल्लंघन’ आणि ‘कलंकशोभा’ या कादंबऱ्याही लिहिल्या. ‘औटघटकेचा राजा’ या चित्रपटाची कथा लिहिली. ‘सुवर्णमंदिर’ हा संगीत बोलपट तयार केला. ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. ते उत्तम चित्रकारही होते. चित्रकार हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी चित्ता फाइट म्हणून काढलेले चित्र पूर्वीच्या काड्यापेटीवर येत असे.
रांगणेकरांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. नाट्यनिकेतन या संस्थेलाही नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते. नट निर्माण करण्याचे एक पीठ अशी नाट्यनिकेतनची ख्याती होती. नाट्यनिकेतनच्या नाटकात काम करून अनेक नटनट्यांनी लौकिक संपादन केला होता. सध्या लोकप्रिय असलेला एकांकिका हा नाट्यप्रकार १९४७ सालीच रांगणेकरांनी नाट्यनिकेतनतर्फे प्रेक्षकांची अभिरुची वाढविण्यासाठी तीन एकांकिका सादर करून केला. १९६८ साली ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते. मो. ग. रांगणेकर यांचे १ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शुभदा दादरकर
‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले. गजानन वाटवे, जी. एन. जोशी व जे. एल. रानडे या तिघांच्या गाजलेल्या गाण्यांत- म्हणजे ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘वारा फोफावला’ व ‘गोड गोड ललकारी’ यांत वायु(तत्त्व) समान होते.
प्रा. रमेश तेंडुलकर हे माणूस म्ह्णून खूप साधे आणि मनाने खूप मोठे होते. अत्यंत साधी रहाणी आणि आपल्या घरी येणारा माणूस कितीही साधा असला तरी त्याचे त्यांच्या घरी अगत्याने स्वागत होत असे. त्याचे चिरंजीव नितीन तेंडुलकर उत्तम कवी, लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा सचिन तेंडुलकर हा भारताचा गाजलेला क्रिकेटपटू आहे. तर त्यांचे दुसरे चिरंजिव नितीन तेंडुलकर हे देखील वडिलांप्रमाणे लेखन करतात, कविता करतात.
किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत.
आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार मा.पुलंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. मा.बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.
बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर मा.ना. ग. गोरे व मा.पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.
तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.
झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.
म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.
त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.
आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.
गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.
हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.
मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.
१९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.
हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.
सतीश नाईक यांनी 'गायतोंडे' हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या 'गायतोंडे' या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक 'सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे
भैरोसिंग शेखावत हे भारताचे ११ वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ या कालावधीत हे पद भूषवले होते. तब्बल तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.
बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते दादामुनी उर्फ अशोक कुमार यांचा जन्म. १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला.
१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैया, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणाऱ्या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हिरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती.
सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=FvXTWi2YED8
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
आज ११ नोव्हेंबर..आज यशवंत दत्त यांची पुण्यतिथी.
आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त या माणसाने मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती. यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली. दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. मा.यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti