आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट मा. राजा गोसावी पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये मा.राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. मा.राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. राजा गोसावींचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के! आपल्या सहजसुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्यावर वावरत असत. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखणा नायक, मध्यमवर्गीय नायिका, तिचे आई-वडील, चित्रपटाचे सुंदर शांत संगीत, गाणी हे सारे काही विलक्षणच असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली. अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटांतून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली. मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील ‘रंगतरंग’ या कार्यक्रमात बोलताना मा.राजा गोसावी म्हणाले होते,‘‘माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी ‘टाळ्या व हशे’ जमा आहेत. म्हणूनच आडनाव ‘गोसावी’असले तरी रसिक मला विनोदाचा ‘राजा’ म्हणतात!’’ चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. मा.विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या मा.राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स मा.राजा गोसावींच्या नावावर आहेत. १९९५ ला झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत. मा.राजा गोसावी यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य केले. मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजा गोसावीयांनी अभिनय केलेल्या चित्रपट व गाण्याची लिंक
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला https://www.youtube.com/watch?v=qmXHU1m-5SA
अशी निशा पुन्हा दिसेल का https://www.youtube.com/watch?v=601Fy9v3DVk
मानसीचा चित्रकार तो https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ
‘लाखाची गोष्ट’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=AAXcdz0vg9c
‘चिमण्यांची शाळा’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=Yg4f1d87_2s
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.
ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या.
सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले.
सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.
सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती. २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात सध्या धडाकेबाज काम करत आहेत.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा…
कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने अन् गोड गळ्याने गाऊन सादर करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर.
‘लावणी’ या विषयावर फोटो डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मी सुरू केलं. या कामाची गरज म्हणून तेव्हा आघाडीच्या कलाकारांना, कलावतींना भेटण्याची, त्यांची कला समजून घेऊन ही माहिती सचित्र टिपण्याची मोहीमच मी सुरू केली. यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालत असतानाच गावागावांत रात्री उशिरापर्यंत, किंबहुना रात्री उशिरा सुरू होणाऱया तमाशा आणि लावण्या कॅमेराबद्ध करण्याचं वेड मला लागलं होतं. हे सुरू असतानाच या कलेला आपला श्वास मानणाऱया सुरेखाची ओळख मला अप्रत्यक्ष होती. मात्र प्रत्यक्ष झाली ते पुण्यातल्या बालगंधर्व नाटय़गृहातल्या एका लावणी शोच्या निमित्तानं. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी सादर करणाऱया कलावतीचा एक शृंगार असतो. या शृंगारात स्त्रीने नेसलेलं रूपड़ं साडीचं वस्त्र, अंगावर भरजरी दागिने, कपाळावर असलेली टिकली, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने आणि कलावंताचं देखणं रूपडं या साऱयाचा उल्लेख करता येईल. हाच शृंगार कॅमेराबद्ध करण्याविषयी मी सुरेखाबरोबर फोनवर बोललो.
थोडय़ाच वेळात आतून आवाज आला आणि सुरेखाची नि माझी भेट झाली. सुरेखाची मूलभूत तयारी झाली होती. आता तिचा शृंगार सुरू होता. हा शृंगार टिपण्यासाठीची माझी लगबग सुरू झाली. शो सुरू व्हायला थोडासा अवधी होता. वरवरच्या गप्पा झाल्या आणि थोडय़ाच वेळात सुरेखा खुलली. मेकअप रूममध्ये काही मोजके फोटो टिपून मी स्टेजवरचं सुरेखाचं नृत्य, तिची अदा अन् गायन टिपण्यासाठी स्टेजसमोर गेलो. यावेळी मला सुरेखाचे अनेक कॅण्डिड टिपता आले.
काही दिवसांनंतर पुन्हा सुरेखाचे फोटो टिपण्यासाठी मी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला गेलो. शोला बराच वेळ होता. मी मेकअप रूममध्ये फोटो टिपत होतो अन् सुरेखा तिचा जीवन प्रवास हळूहळू उलगडून सांगत होती. सुरेखाचे वडील सोंगाडय़ाचं काम करत, तर कधी तमाशात गायन, नृत्य सादर करत. त्या काळी तमाशात वा लावणीच्या फडात स्त्रिया नृत्य सादर करीत नसत आणि म्हणूनच सुरेखाची आई तमाशात गायन, अभिनय सादर करत असे, तर आईचे आईवडील हेदेखील नृत्य, गायन आणि अभिनयात पारंगत असल्याचं सुरेखा सांगते. आईचं घर स्मशानभूमीजवळ होतं. वडिलांकडची परिस्थितीही जेमतेम. वडील पुणे रेल्वे स्टेशनवर दिवसा हमालीच काम करत अन् रात्री कला सादर करण्यासाठी लावणी अन् तमाशाच्या फडात जात. नंतर तिच्या आईवडिलांनी तमाशाचा फड सुरू केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून सुरेखाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेची पायरी ती कधीच चढली नाही. ‘‘माझ्या पाच पोरींपैकी एकीचा तरी तमाशाचा फड असेल अन् ती त्याची मालकीण होईल’’ हे तिच्या बाबांनी लहानपणी रंगवलेलं स्वप्न अखेर १९८६ साली पूर्ण झालं. तिच्या बहिणीसोबत ‘लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला. पुढे चार वर्षे तो चालला.
त्यानंतर १९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘तुम्हा बघूनी डावा डोळा’ या सुरेखाच्या दिलखेच अदाकारीने रसिकमन जिकलं. त्यानंतर सुरेखाला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली अन् आर्थिक मानधनही. या शोसाठी दोन लाखांचं मानधन मिळालं. यापूर्वी एकहाती एवढा पैसा बघितलाही नसल्याचं सुरेखाने कबूल केलं. पोटाची खळगी भागवण्यासाठी सुरेखाच्या बैलगाडीतून गावोगाव हिंडण्याच्या प्रवासाला आता खऱया अर्थानं गती मिळाली अन् पुढे बैलगाडी ते विमान आणि नारायणगाव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा तिचा प्रवास केवळ लावणीमुळेच शक्य झाल्याचं सांगताना ती भावुक झाली. इतक्यात शोसाठीची घंटा वाजली अन् आपल्या भावनांना आवर घालत सुरेखा पायात घुंगरू बांधण्यात गुंतली. यावेळी मला तिचे उत्तम कॅण्डिड टिपता आले. कॅमेऱयात मी सुरेखाच्या अनेक भावमुद्रा टिपल्या होत्या, परंतु एकदा रंग चेहऱयावर लागला की, कलाकार त्याच्या भावना, वेदना विसरून त्याच्या कलेत कसा एकरूप होतो अन् क्षणार्धात चेहऱयावर एक वेगळं तेज घेऊन हसऱया चेहऱयानं आपली कला सादर करण्यासाठी कसा सरसावतो याचं जिवंत उदाहरण माझ्या मनाच्या कॅमेऱयात कायमचं बंदिस्त झालं.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
गदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
जनरल अरुणकुमार वैद्य यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे, व कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी अलिबाग येथे झाला. त्याचप्रमाणे ४ वर्षे पुण्यात रमणबागेतही शिक्षण झाले. शिक्षण चालू असताना मिलिटरीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती. १९४४ साली त्यांनी इमरजन्सी कमिशन मिळवले व ३० जानेवारी १९४५ ला त्यांना कायम कमिशन मिळाले. त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले. जनरल वैद्य ही एक अशी असामी होती ज्यांनी १९६५ व १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवुन सन्मान मिळवले होते. ते भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते.
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्रपुरस्कार मिळाला. नंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम्४७ व एस् ४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्या काळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या वैद्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या “शेरमन” रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले. ६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले.
त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले. १९७१ साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी घनघोर लढाई झाली आणी पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारली.
१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे जनरल म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. “जनरल” म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्या सारखी होती. २०,००० फूटांवर अतिशित, जिथे तापमान उणे ४०° असते अशा “सियाचीन” प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदुस्थानी सेना तळ ठोकुन बसली होती. रशियन बनावटीच्या टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. त्याचे सूत्र त्यांनी आखून दिले. अरुणकुमार वैद्य यांना संगीताची आवड होती. त्यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी होता. भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचे घटनास्थळीच निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.
१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली.
आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यसंपदा, रंजन कला मंदिर या नाट्यसंस्थांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. रंगमंच, मुंबई या संस्थेच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच दुर्वांची जुडीमधील त्यांच्या ‘बाळू आपटे’ या पात्राला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
प्रा. नरहर कुरुंदकर यांचे ‘इसापनीती’ हे भाषण आणीबाणीच्या काळात खूप गाजले. मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात मा. नरहर कुरुंदकर लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात. सुभाषबाबूंचे आकलन करताना मा.कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी. जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होते. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी होती.
बाबा आमटे यांनी मा.कुरुंदकरांवर लिहिलेल्या ओळी वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा. काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द; नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत. त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा; कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी, तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. या प्रतिष्ठानने २०१० साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मा. ऩरहर कुरुंदकर यांचे निधन १० फेब्रुवारी १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti