आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.
मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.
साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. बा. ल. अंतरकर हे कोकणातले एक प्रसिद्ध शिक्षक होते. ते संस्कृत पंडित होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘सरूप शाकुंतल’, ‘मेघदूतच्छाया’ आणि (उमर खय्यामकृत) ‘रुबाया’ हे त्यांचे मराठी अनुवादग्रंथ त्या काळात गाजले होते. अशा व्यासंगी आणि साहित्यिक वडिलांच्या सहवासात अनंत अंतरकरांची साहित्यरुची जोपासली गेली. त्या काळची ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘मनोरंजन’ यांसारखी साहित्यसंपन्न मासिके त्यांच्या वाचनात होती. अभिजात संस्कृत साहित्यकृतींबरोबरच गडकरी, ह. ना. आपटे, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, कवी यशवंत, बालकवी यांची साहित्यसंपदाही त्यांनी अभ्यासली होती. वडिलांकडे विद्वज्जनांची ये-जा असल्यामुळे मराठी व इंग्रजी पुस्तकांवर साहित्यचर्चा झडत. त्या कानावर पडून इंग्रजी साहित्याचाही अंतरकरांचा अभ्यास सुरू झाला.
शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.
शिक्षणासाठी अंतरकर मुंबईत दाखल झाले. इथे त्यांना अभिनय, नाट्यदिग्दर्शन यांचा छंद जडला, पण साहित्याचे प्रेम प्रबळ ठरले. अंतरकरांनी पत्रकारिता सुरू केली. भिन्न भिन्न प्रकारच्या कथा, कविता, समीक्षापर पुस्तके, नाटके, विडंबन काव्य, विनोद आदींच्या वाचनाने आणि परिशीलनाने त्यांचा साहित्यिक पिंड घडत गेला. शेक्सपिअर, मार्लो, बर्नार्ड शॉ, ओ. हेन्री, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, अॅुगाथा ख्रिस्ती प्रभृती अभिजात साहित्यकारांपासून पी. जी. वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, ऑर्थर कॉनन डॉयल या लोकप्रिय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी वाचन केले. मराठीतल्या तत्कालीन नियतकालिकांबरोबरच ‘स्ट्रँड’, ‘व्हरायटी’, ‘अॅागासी’ यांसारख्या अभिरुचिसंपन्न पाश्चाॉत्त्य नियतकालिकेदेखील त्यांच्या नियमित वाचनात होती. जोडीला मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. त्यांचे साहित्य-कलाविषयक शिक्षण अनौपचारिकपणे बरेच पुढे गेले. यातूनच त्यांचे अभिजात संपादकीय व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच काळात त्यांनी विपुल लेखनही केले.
सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.
१९३८ साली, वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ‘सत्यकथा’ या तेव्हा अगदी गंभीर स्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले आणि पुढे गाजलेल्या अनेक लेखकांचे उत्तम साहित्य त्यात साक्षेपाने प्रसिद्ध करून त्यांनी त्या मासिकाला आघाडीचे ललित साहित्यिक मासिक बनवले. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी ‘वसंत’ या मासिकाचे संपादन समर्थपणे केले.
साहित्यक्षेत्रातील पूर्ण एक तपाच्या तपश्च्र्येनंतर अनंत अंतरकरांना ओढ लागली होती ती स्वत:च्या मालकीचे एक सर्वांगसुंदर आणि अभिरुचिसंपन्न मासिक काढण्याची. आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून थोडीशी पुंजी जमा केली आणि १९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला. याच काळात या मासिकांची कचेरी त्यांनी दुबईहून पुण्याला हलवली.
‘हंस’च्या द्वारे कलात्मक कथावाङ्मयाला प्रोत्साहन देऊन त्यांनी यशस्वीरीत्या त्याचे पोषण व संवर्धन केले. नव्याने रूढ होत असलेल्या लघुकथेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन त्यांनी एक नवेच ‘हंसयुग’ मराठी वाङ्मयात प्रस्थापित केले. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा पगडा बसू न देता स्वच्छंद कथेच्या स्वायत्त अस्तित्वाला मान्यता देणारे ‘हंस’ हे एकमेव मासिक ठरले. गेल्या काही पिढ्यांतल्या श्रेष्ठसाहित्यिकांची सुरुवात ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मासिकांमधून झाली आहे.
‘हंस’मध्ये कथांबरोबरच श्री. म. माटे, श्री. के. क्षीरसागर, वसंत शांताराम देसाई यांचे वैचारिक व समीक्षात्मक साहित्यदेखील नियमितपणे प्रसिद्ध झाले. विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रे, नाटक-चित्रपटादी कलांचा आस्वाद यांच्यासाठी ‘मोहिनी’ हे एक दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. मुखपृष्ठावरील हास्यचित्र हे मोहिनीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य बनले. विनोदलेखनाच्या विकासात ‘मोहिनी’ने केलेल्या योगदानाची महती सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितली होती. ‘नवल’मुळे रहस्यमय, भयकारी, विस्मयकारी, विज्ञानाधिष्ठित, आदी आगळ्या आणि उपेक्षित साहित्यप्रकारांना उचित आणि मानाचे प्रतिष्ठान मराठीत प्रथमच प्राप्त झाले. भारतीय साहित्यकोषात तज्ज्ञ अभ्यासकांनी विज्ञानकथेचे अस्तित्व मराठीत टिकवून धरण्याचे श्रेय केवळ ‘नवल’ला दिलेले आहे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांनी या मासिकासाठी लिहिलेल्या कथांमध्ये वैचित्र्याबरोबरच साहित्यगुणही होते. वेगळ्या प्रकारचे लेखन करणार्याठ तरुण लेखकांची पिढी ‘नवल’मधून उभी राहिली. मराठी वाङ्मयाच्या विकासाला अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीने नेमकी दिशा दिली. त्यांच्या तीनही मासिकांचे आपापले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप इतके विलोभनीय आणि सौंदर्यसंपन्न होते, की समकालीन नियतकालिकांनी त्यांचे अनुकरण केले. त्यांच्या मासिकांच्या धर्तीची बरीच मासिके पुढे सुरू झाली. केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणार्याम लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.
कथेच्या स्वायत्त स्वरूपाचे अंतरकरांनी हिरिरीने रक्षण केले. त्यामुळे जी.ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, द. पां. खांबेटे, वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या अनेक असामान्य लेखकांच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष मराठी साहित्याला संपन्न करते झाले. नवनवीन कथालेखक व कथेबाबतचे नवनवे प्रयोग पुढे आणण्याबाबत अंतरकर नेहमी प्रयत्नशील असत. लेखकांमधील प्रतिभेचा स्फुल्लिंग नेमका हेरणे, तो फुलवणे, लेखकाशी त्याचे लेखन अधिक प्रत्ययकारी कसे होऊ शकेल याबाबत विचारविनिमय करणे, त्याला आणखी कोणत्या प्रकारचे लेखन शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करणे, प्रसंगी एखाद्याचे लिखाण पूर्णपणे पुन्हा लिहिणे, कथास्पर्धा घेणे, अशा नानाविध प्रकारे नव्या लेखकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य अंतरकरांनी निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक सातत्याने केले. नव्या लेखकांना उपयुक्त ठरेल असा वाङ्मयविचारही त्यांनी आपल्या मासिकांतून- विशेषत: ‘हंस’मधून- विपुल प्रमाणात दिला.
लेखकांप्रमाणेच वाचकांनाही घडवण्याचे कार्य अंतरकरांना महत्त्वाचे वाटे. वाचकांची साहित्यविषयक दृष्टी अधिक विशाल व जाणती करण्याच्या उद्देशाने अंतरकरांनी एक महत्त्वाचा उपक्रम चालवला, तो म्हणजे श्रेष्ठ अशा परकीय साहित्यकृतींचा मूल्यमापनासहित परिचय. अनेक भारतीय आणि परकीय भाषांतील अभिजात साहित्याचे सरस अनुवादही अंतरकरांनी आपल्या मासिकांतून प्रसिद्ध केले. अनुवादित कथांची स्पर्धा ते आयोजित करीत असत. दर्जेदार जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार होण्यासाठी आणि त्याचा वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी या उपक्रमांचा निश्चिततच हातभार लागला. ‘हंस’-‘मोहिनी’मधील हास्यचित्रांचा दर्जा तत्कालीन इतर मराठी नियतकालिकांमधील हास्यचित्रांच्या तुलनेत फार वरचा होता. अंतरकरांनी अनेक विदेशी मासिकांमधल्या चित्रांची उदाहरणे दाखवून, चर्चा करून हास्यचित्रकारांचे मन:पूर्वक प्रबोधन केले. विदेशी हास्यचित्रांबद्दलचे आस्वादपर लेखही त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. त्यामुळे कमीत कमी व मार्मिक शब्दांचा आधार घेणारी, रेखासुंदर, सुबुद्ध हास्यचित्रे साकार होऊ लागली. सजावट हा अंतरकरांच्या मासिकांचा मानबिंदू होता. मुळातच तल्लख असलेल्या दृश्य सौंदर्यदृष्टीमुळे चित्रकारांच्या कलेला न्याय देणारे उत्तम ले-आऊट्स आणि तंत्राचा अधिकाधिक उपयोग करून साधलेले परिपूर्ण मुद्रण त्यांच्या मासिकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवीत असे.
स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.
अभिरुचिसंपन्न कलात्मकता हा जीवनोद्देश असलेली अंतरकरांची मासिके जाहिरातींचा आधार बाणेदारपणे नाकारूनही, कोणतेही सरकारी अनुदान वा सवलत न घेता, केवळ रसिक वाचकांमधील लोकप्रियतेच्या जोरावर यशस्वी झाली. मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणार्याक हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. अरुणा अंतरकर, हेमलता अंतरकर
आजच्या दिवशी सन १८८२ साली, अण्णासाहेब किर्लोस्करांचे 'संगीत सौभद्र' हे नाटक रंगभूमीवर आले होते.
नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’ मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी. यावर मल्लिनाथी करताना आद्य नाटककर्ते विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग पाहून ‘यात फक्त डोअरकीपरला तेवढं गाणं द्यायचं राहिलंय,’ असे उद्गार काढल्याचं सांगतात. सौभद्र’ने नट, नाटक आणि नाटककाराबरोबरच मराठी रंगभूमीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. ही बाब फक्त पहिल्यांदा सौभद्र सादर झाले तेव्हाच घडली नाही, तर जेव्हा जेव्हा नवीन संचात ‘सौभद्र’ सादर झाले, त्या त्या वेळी घडली. या निमित्ताने एकाच नाटकाने अनेक महान दिग्दर्शक, नट, संगीतकार, नेपथ्यकारच नाही तर अनेक नाटक कंपन्यांना ओळख निर्माण करून दिली.
सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमाची आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णानं रचलेल्या चालींची कहाणी ‘संगीत सौभद्र’मध्ये उलगडते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी’, ‘प्रिये पहा..’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘नच सुंदरी करू कोपा..’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पावना वामना या मना..’, ‘बलसागर वीरशिरोमणी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘किती किती सांगू तुला..’ अशा एकाहून एक सरस पदांनी या नाटकातले नाटय़पूर्ण क्षण चढत्या रंगतीनं उत्कर्षबिंदूप्रत जातात. आज महाराष्ट्रात ज्या काही संगीत नाटक करणा-या कंपन्या झाल्या आणि आहेत, त्यातली अशी एकही कंपनी नाही, ज्या कंपनीने ‘सौभद्र’ केले नाही.
किर्लोस्कर नाटक कंपनीनंतर महाराष्ट्रात कोणतीही नवीन नाटक कंपनी निघाली, मग ती ललितकलादर्श, नाट्यकलाप्रवर्तक, यशवंत, नूतन संगीत मंडळी, बलवंत, नूतन संगीत विद्यालय, राजाराम ते अगदी कालपरवाच्या नाटक संस्था असोत, ज्यांनी ज्यांनी संगीत नाटके केली, त्या सर्व संस्थांचे/कंपन्यांचे पहिले प्रयोग ‘संगीत सौभद्र’चेच असत. आजवर जवळपास शेकडोच्या वर संस्था, कंपन्या, क्लबांनी सौभद्र सादर केले आहे. जे नाटक १८८२ मध्ये लिहिले गेले, सादर झाले, ते आज २०१७ मध्येही कुठे ना कुठे, कुठल्या तरी संस्थेतर्फे सादर होत असते.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र कसे लिहिले हे पाहणे खरेच मनोरंजक आहे. किर्लोस्करांनी लिहिलेले पहिले नाटक ‘शाकुंतल’ खूप गाजले. पण कितीही झाले तरी ते होते भाषांतरित. सच्च्या लेखकाला स्वत:चे स्वतंत्र नाटक लिहिण्याची ऊर्मी अधिक तीव्र असते. त्यानुसार अण्णासाहेब किर्लोस्करांना स्वत:च्या नाटकाने पछाडले होते. त्यांच्या डोक्यात ‘अर्जुन सुभद्रा’ हा विषय घोळत होता. त्या काळानुसार नाटकांचे विषय हे प्रामुख्याने पौराणिक असत. कारण त्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असत आणि पुराणकथांतल्या नीतिमूल्यांचे, भव्यतेचे, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्वांचे, राजा-राण्यांच्या संबंधांचे समाजमनावर गारूड असणे स्वाभाविकच होते. आणखी त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य माणसाचे आयुष्य नाटक लिहिण्याएवढे, विचार करण्याएवढे त्या काळी गंभीर नव्हते. सामान्य माणूस हा प्रहसनातच असायचा. तोही असल्यास. असो.
तर अण्णासाहेबांनी ‘सौभद्र’ची कथा कल्पिली आणि पहिले तीन अंक लिहून काढले. त्या कथेचा विषय ऐकून त्या वेळच्या मुंबई हायकोर्टाचे प्रख्यात वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी किर्लोस्करांना पत्र लिहिले होते की तुमचे ‘शाकुंतल’ हे नाटक सर्व रसपरिपोषक आहे. त्यातली पदे उत्तम आहेत. लोकांना ते आवडले आहे. नवीन नाटकात तीनच रस प्रामुख्याने दिसतात, त्यानुसार येणारी पदे किती वैविध्य निर्माण करणार? आणि हा विषय लोकांना किती रुचेल याबद्दल शंका वाटते. त्यामुळे ‘सौभद्र’विषयी पुनर्विचार करावा. हे पत्र १८८२ च्या ऑक्टोबरला किर्लोस्करांना मिळाले. आणि किर्लोस्करांनी १८ नोव्हेंबर १८८२ रोजी पुण्याच्या ‘पूर्णानंद’ नाट्यगृहात पहिल्या तीन अंकांचाच प्रयोग सादर केलाही. एक तर पूर्ण नाटकाऐवजी फक्त तीन अंकांचेच नाटक ते लोक कसे काय सादर करत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. (कारण अण्णासाहेबांनी ‘शाकुंतल’चाही सुरुवातीला फक्त पहिल्या चारच अंकांचा प्रयोग सादर केला होता.) ‘सौभद्र’चा प्रयोग इतका अभूतपूर्व झाला की लोकांनी त्याचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले. सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच समाजातील मान्यवरांनी, प्रतिष्ठितांनी या नाटकाला गौरवले. त्या काळच्या या काही प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात. त्या वेळच्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात अशी समीक्षा केली होती, की ‘मराठी भाषेत निबंधमाला व संगीत सौभद्र ही दोनच काय ती नवीन व उत्कृष्ट पुस्तके आहेत.’ ना. सी. फडके लिहितात, ‘हल्लीच्या चंदेरी आणि सोनेरी ज्युबिल्यांच्या काळात सौभद्रची ज्युबिली करायची झाल्यास रेडियम ज्युबिली करावी लागेल.’
वि. स. खांडेकर म्हणाले, ‘देवांना कधीही वार्धक्य येत नाही, अशी समजूत आहे. अशा देवकोटीला पोहोचलेल्या मराठी नाटकांची यादी करू लागल्यास तिच्यात श्रीकाराच्या खाली ‘सौभद्र’चे नाव घालावे लागेल.’ या अशा आणि कित्येक प्रतिक्रिया वाचायला मिळतात. पण त्या काळी या नाटकाचा फक्त गवगवाच झाला असे नाही; तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गंगाधर गाडगीळ यांसारख्या टीकाकारांनी कठोर टीकाही केली.
किर्लोस्कर अत्यंत दृढनिश्चयी असावेत. कारण एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर ती हवी तशी केल्याशिवाय ते कधीही गप्प बसले नाहीत. संगीत नाटक असले तरी नटांना मनमुराद मुक्तपणे ताना आणि आलापी त्यांनी कधी करू दिली नाही. गाणे आवश्यक त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत ते अतिशय आग्रही असत. तसेच नाटकाच्या विषयाबद्दल, पदे किंवा त्यांच्या चालींबद्दल भलताच युक्तिवाद केलेला त्यांना खपत नसे. आपण लिहिलेल्या पदांबद्दल, शब्दांबद्दल, चालींबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास असायचा. परंपरेनुसार पडद्यातली नांदी त्यांनी स्टेजवर आणली; त्याबद्दल नाट्यशास्त्राचा नियम दाखवणा-याला ते उभे करत नसत. कदाचित महादेव आपट्यांच्या शंकेला तडकाफडकी प्रयोग करूनच त्यांनी उत्तर दिले की काय असे वाटते.
तर १८८० ला सौभद्रचे पहिले तीन अंक लिहून त्याचा प्रयोगदेखील झाला, पण पुढच्या अंकाचे गाडे काही पुढे सरकेना. अशातच एकदा ते बाजारातून येताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला; त्यांनी तो चांगलीच किंमत देऊन विकत घेतला. बाजारातून येतायेताच त्यांना सौभद्रच्या पुढच्या अंकांची कथा सुचली आणि त्यांनी दुस-याच दिवशी सगळ्यांना पूर्ण नाटकाचे कथानक ऐकवले. अशी सुरस कथा अण्णांच्या चरित्रात वाचायला मिळते. ज्या तिस-या अंकावर गाडे अडले होते, त्याच्या पुढे कथानक नेण्यास अचानक नाटकात ‘गर्गमुनी’ आल्याने अण्णासाहेबांच्या लेखी पुरेसा गुंता सुटला होता. नाटक वाचल्यास पहिल्या तीन अंकांमध्ये आणि पुढच्या अंकांमध्ये नाटकाच्या रचनेचा, पात्रांच्या संगतीचा, स्थायिभावाचा निरनिराळा परिणाम दिसून येतो. पण हे सगळे नाटक अभ्यासणा-यांसाठी. सामान्य लोकांवर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि एक वर्षानंतर पुढचे अंक लिहून १८८३ मध्ये ‘संगीत सौभद्र’च्या पाचही अंकांचे पूर्ण लांबीचे नाटक पुण्यात सादर झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट / हृषीकेश जोशी
बॉलिवूडमधील 'काश्मीर की कली' शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला.
शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. मा.शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते.
१९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली. भारताला सर्वात प्रथम नोबेल पुरस्काार मिळवून देणा-या रवींद्रनाथ टागोर यांची नातेवाईक असलेली शर्मिला टागोर आणि मन्सू र अली खान पतोडी ही एक आदर्श जोडी म्हीणून गणली जाते. मन्सूीर अली खान पतोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. जेव्हा नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली व आपल्या आईकडे शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या.
लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये मन्सूेर पतोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला टागोर यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती.
शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला टागोर यांना नवीब पतोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला टागोर यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. १९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला टागोर बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्द्यावरून रणक्रंदन झाले.
शर्मिला टागोर त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणाऱ्या त्या पहिल्या अॅक्ट्रेस बनल्या. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार. मा.राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता.
बेशरम सिनेमात अमिताभ सोबत काम केले होते. २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।
- हरिवंश राय बच्चन
प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते.
संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले. संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले.
भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील. "सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला.
घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना!
नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते.
नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले.
छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता.पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.
१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले.
नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.
१९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.
अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली.
स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली. त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली.
पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.
नानासाहेब सरपोतदार यांचे २३ एप्रिल १९४० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti