जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ ट्रायपॉस ‘ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते .
हृदयशारदा, अश्विनी, आकाशगंगा, युधिष्ठिर, स्त्री जीवनविषयक काही प्रश्न, स्त्री जीवनाची नवी क्षितिजे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
पहिली मराठमोळी स्वीमसुट गर्ल असे सुद्धा मीनाक्षी शिरोडकर यांना म्हणता येईल. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता? असं म्हणत जलक्रीडा करणारी अभिनेत्री आठवते ना? मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती आहेत. मीनाक्षी शिरोडकर यांचे ३ जून १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात.
प्रिय हेमंत
मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की मेळघाटातल्या एखाद्या कुपोषित बालकात आणि त्याच्या शरीरयष्टीत ‘काडी’चाही फरक नव्हता. अगदी आवर्जून त्याच्याशी बोलावं, त्याची मुद्दाम ओळख करून घ्यावी आणि मैत्री करावी असं त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीही नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो अदखलपात्रच होता. माझ्या आक्रमक व बऱ्यापैकी भांडखोर स्वभावाला त्याच्या शांत स्वभावाचं प्रचंड आश्चर्य वाटत असे. माणसात कितीही वैगुण्ये असली तरी निसर्गाने त्यांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भरपाई केलेली असते. त्याच्या बाबतीत ती भरपाई त्याच्या पाणीदार डोळ्यांच्या रूपाने झाली होती.
मी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे समोरच्या व्यक्तीवर जरब बसवणारे तेजस्वी डोळे मला क्षणात नामोहरम करीत असत. माझ्यासकट सर्व मित्र मैदानावर खेळत असताना तो वर्गात एकटाच बसून काय करतो हे बघण्यासाठी मी एक दिवस हळूच वर्गात शिरलो तेव्हा चांदोबा नावाचं मासिक वाचण्यात तो एवढा तल्लीन झाला होता की मी त्याच्या शेजारी येऊन बसलो आहे हे त्याला कळलंही नाही. पण त्या क्षणी मला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव झाली की आम्ही दोघेही समानधर्मी व अत्यंत व्यसनी आहोत. आम्हा दोघांनाही वाचनाचं जबरदस्त व्यसन होतं व त्या व्यसनामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालो. त्या मैत्रीतून वयाच्या अकराव्या वर्षी आमच्या दोघांच्याही घरात छोट्याशा ग्रंथालयांचा जन्म झाला. चांदोबाचे जुने अंक व चोरबाजारातून आणलेली कॉमिक्स ही आमच्या ग्रंथालयांची ग्रंथसंपदा होती व त्यांचा फडशा पाडण्यासाठी ती एक्सचेंज करणं हे आमचे नित्यकर्म झाले होते.
दहावीच्या परीक्षेनंतर भेटी दुर्मिळ झाल्या. तो आयपीएस झाल्याची बातमी माझ्यासाठी केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीय होती. शिव्याच काय, पण साधे अबे-काबे हे शब्दही ज्याच्या तोंडातून कधी बाहेर पडले नाहीत असा खाली मान घालून सर्वत्र वावरणारा माझा एक सरळमार्गी मित्र चक्क पोलिस दलात काम करणार? मध्य प्रदेशात मी एका जर्मन कंपनीचा अधिकारी म्हणून कार्यरत असताना पोलिस दलातील त्याच्या प्रगतीच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर मी महाराष्ट्रात परत आलो व आमच्या बॅचच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने खूप वर्षांनंतर आमची भेट झाली. त्या कार्यक्रमात त्याचं आगमन झालं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल बघून पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नंदा प्रधान’ साक्षात माझ्यासमोर अवतरल्याचा मला भास झाला. दीर्घ कालावधीनंतर आमची भेट झाल्यावर त्याचा पहिला प्रश्न होता - ‘काय म्हणते तुझी लायब्ररी?’ इतक्या वर्षांनंतर भेट झाल्यावरही त्याला उत्सुकता होती ती चांदोबा मासिकाच्या एका अंकापासून सुरू झालेल्या लायब्ररीच्या प्रगतीची ! त्याच्याजवळ असलेल्या सर्व पुस्तकांची विषयानुसार कशी मांडणी केली आहे याची माहिती एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहाने मला पुरवून त्याच्या त्या कौतुकाच्या लायब्ररीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं आमंत्रण त्याने मला दिलं, पण आम्हा दोघांच्याही व्यग्रतेमुळे आमची प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी झालीच नाही.
पोलिस खात्यात एका मोठ्या व अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर मला आनंद होण्याऐवजी माझ्या काळजाचा ठोका चुकला. केवळ दहशतवादाचेच नव्हे, तर शक्य तितक्या सर्व गोष्टींचे अत्यंत निर्लज्जपणे राजकारण करणाऱ्यांच्या या देशात राजकारण्यांच्या इशाऱ्यांवर नाचण्याची वेळ जर त्याच्यावर आली तर त्याच्यासारख्या प्रामाणिक व सरळमार्गी माणसाचा कसा काय निभाव लागणार या विचाराने माझी अस्वस्थता वाढू लागली. बॉम्बस्फोटांच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवर जवळपास रोज होणाऱ्या त्याच्या दर्शनाने माझ्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली आणि मी त्याला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सावध करण्यासाठी धडपड करत असतानाच २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका मित्राने मला फोन करून एक हादरवून टाकणारी बातमी दिली -‘आपला मित्र हेमंत करकरे या जगात नाही. त्याला थोड्या वेळापूर्वी अतिरेक्यांनी ठार केलं.’ तो ज्या खुर्चीवर बसला होता तिचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी अगदी जवळून संबंध येणार आहे याची पूर्ण जाणीव असूनही त्या बातमीचा अर्थ समजून घेण्याचा मी आजही निष्फळ प्रयत्न करतो आहे.
कोणासाठी तू स्वत:ला मृत्यूच्या दाढेत झोकून दिलंस मित्रा? लोकल्सच्या डब्यांना लटकून रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या मुंबईच्या असहाय्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी की निवडून आल्यानंतर कधीही पूर्ण न होणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मतदारांवर पाऊस पाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानणाऱ्या पराकोटीच्या स्वार्थी लोकप्रतिनिधींसाठी? संसद भवनातील अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुसंख्येने अनुपस्थित राहिलेल्या कृतघ्न नेत्यांसाठी की दहशतवाद्यांचा पूर्ण बीमोड होण्याआधीच जाळपोळीच्या धगीने व गोळीबाराने तापलेल्या तव्यांवर अत्यंत गलिच्छ राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी गिधाडालाही लाजवणाऱ्या वेगाने तुटून पडलेल्या निर्लज्ज राजकारण्यांसाठी? तू या जगात असताना तुझ्या प्रामाणिकपणावर शंका घेऊन ज्या माकडांनी स्वत:च्या वैचारिक दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन केलं त्याच माकडांच्या हाती तू या जगाचा निरोप घेताना कोलीत दिलं याची तुला कल्पना आहे?
समवयस्क असूनही प्रत्येक भेटीत वडीलकीच्या नात्याने प्रत्येक मित्राची अत्यंत आस्थेने चौकशी करणारा तुझ्यासारखा मित्र आम्हा सर्व मित्रांना पोरकं करून गेला. दगड-विटांनी तयार होतात त्या साध्या इमारती, घरं नव्हेत. त्या निर्जीव इमारतींमध्ये राहणारी आपल्या सर्वांसारखी हाडामांसाची जिवंत माणसं खरी घरं जन्माला घालत असतात ! अशाच एका जिवंत घरात राहणाऱ्या सर्वांचा तू कर्तृत्वाच्या शिखरावर असताना अचानक कायमचा निरोप घेतलास. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तुझ्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांमधून मी अश्रूंना अजूनही बाहेर पडू दिलेलं नाही. तुझ्यासारख्या धीरोदात्त मित्राच्या मृत्यूवर अश्रू ढाळणं हा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेल्या व स्वार्थी राजकारणाने पूर्णत: सडवून टाकलेल्या आपल्या देशाने तुझ्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने जर कात टाकली तर तू खऱ्या अर्थाने अजरामर होशील, अन्यथा दहशतवाद्यांपासून असंख्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला मृत्यूच्या खाईत झोकून देणारा तू केवळ आमचाच नव्हे, तर आपल्या देशाचा शेवटचा मित्र ठरशील!
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बीए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता.लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.
दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅतक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला.
'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे आज म्हणजेच ५ जानेवारी रोजी साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. राम-लीला' या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते.
त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. 'बाजीराव-मस्तानी'या चित्रपटानंतर जणू त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरच्या पार्टीत दीपिकाने रणवीरचा 'बॉयफ्रेण्ड' असा उल्लेख केला होता. इतकेच नाही तर रणवीर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबतही अनेकदा दिसला आहे. 'पद्मावती'या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटात हे दोघे दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते.
राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन त्यांनी जागृती नावाचे हस्तलिखित सुरू केले. त्याचे संपादन माडखोलकर करीत असत. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला.
१९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.
बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. मा.गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
“१९६० च्या दशकात मराठी माध्यम आणि वृत्तपत्रांची संख्या मर्यादित होती त्यावेळी स्वाभाविकच या क्षेत्रात काम करणार्या मंडळीही कमी असणारच. त्याशिवाय पुरूषप्रधान क्षेत्र असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येती इतकं स्त्रीयांचा प्रमाण होतं. निला उपाध्ये हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील असंच एक नाव जिनं आपल्या अजोड कामगिरीने माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली व भावी पिढीसमोर आदर्श पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष पदभार सांभाळला आहे.
छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रकारिता सुरू केली. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यरचना केली. त्यानंतर या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.
त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले. या नाटकाच्या माध्यमातून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे हे कलावंत पुढे आले. दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशिने पाळला. मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता.
नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती. त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली. प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याआ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. बाळासाहेबांनी तर त्यांना कॅमेराही दिला होता. रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले. दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो 'वाघांचे फोटो' म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना 'हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती.
मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई. मोहन वाघ यांचे निधन २४ मार्च २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज हार्मोनियम वादक,अभिनेते व संगीतकार,पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,गोविंदराव टेंबे यांची पुण्यतिथी.
जन्म :- ५ जून १८८१
मा.गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक, होते. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका करून ते भारतभर गाजलेले नट होते. संगीत नाटकांचे लेखक, ‘मानापमान’ नाटकाचे संगीतकार व त्याच नाटकात धैर्यधराच्या भूमिकेने मराठी रंगभूमि गाजवणारे गायक नट, ‘माझा संगीत विहार’ व ‘माझा जीवन विहार’ या आत्मचरित्रपर रसाळ ग्रंथांचे लेखक अशीही मा. गोविंदराव टेंबे यांची ओळख सांगता येईल. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पेटीचे सूर महाराष्ट्रात कायमचे उमटून ठेवणारे मा.गोविंदराव टेंबे यांची यांची खूप माहिती इंटरनेट वर नाही.
‘माझा जीवन विहार’ या ग्रंथात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची ; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. मा.गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गोविंदराव टेंबेयांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- स. ह. मोडक
Copyright © 2025 | Marathisrushti