आई रिटायर होतेय', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'जाऊ बाई जोरात', 'श्यामची मम्मी', 'एक चावट संध्याकाळ' ही गाजलेली नाटकं, 'हसरतें', 'श्रीमान श्रीमती' या सुपरहिट मालिका आणि 'चौकट राजा', 'झपाटलेला' यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला.
कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुणे येथे झाला.
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला.
गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूगार रघुवीर यांनी आपल्या हयातीमध्ये ७ हजार २३ प्रयोग केले.
त्यांचे चिरंजीव विजय रघुवीर यांनी ६ हजार ३३० प्रयोग केले आहेत. जितेंद्र रघुवीर हे विजय रघुवीर यांचे चिरंजीव. बालपण व शिक्षण नुमवी प्रशालेत शिक्षण स.प. महाविद्यालय पुढे B.E. production engineering भारती विद्यापीठ पुणे पुण्यात झाले. नंतर उच्च शिक्षण अमेरिका येथे जाऊन एम.एस केले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या शालेय शिक्षणा बरोबर वयाच्या ५ व्या वर्षांपासून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली. जितेंद्र रघुवीर यांनी एम.एस करूनही नोकरी न करता आपला पिढीजात व्यवसाय पुढे नेला व त्याला ग्लॅमर दिले. जितेंद्र रघुवीर यांनी आपले आजोबा जादूगार रघुवीर यांच्या सारखेच २७ देशात प्रयोग केले आहेत.
जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲकाडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे.
जितेंद्र रघुवीर यांच्या पत्नी अश्विनी देशपांडे भोपळे यांनी एच आर मध्ये एम.बी.ए केले असून त्या स्वत: भरतनाट्यम डान्सर आहेत. त्यांचा मुलगा ईशान व मुलगी आणि तनिशा यांनी आपल्या वडीलांच्या कडून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली आहे. जितेंद्र रघुवीर हे आपला मुलगा ईशानला जादूच्या प्रयोग स्टेजवर सामील करून घेतात.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
देशातील एकमेव जलतरंग वादनासाठीची CCRTC स्कॉलरशिप सिद्धेशला मिळाली आहे.
व्हायोलिन हे मूळचे भारतीय वाद्य नसले, तरी आज ते देशातील मैफलींच्या मध्यभागी विराजमान झाले आहे. त्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कलावंतांमध्ये प्रामुख्याने लालगुडी जयरामन यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी झाला. दाक्षिणात्य संत परंपरेतील महान संगीतकार त्यागराज यांच्या वंशात जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने घराण्याची परंपरा वेगळ्या उंचीवर नेली, त्याचबरोबर जगभरातील संगीत क्षेत्रात भारताचाही सन्मान वाढवला. व्ही. आर. गोपाल अय्यर या कर्नाटक संगीतातील दिग्गज कलावंताच्या पोटी जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनवादक म्हणून आपली संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. तीव्र आकलनशक्ती, अवतीभवतीचे संवेदनशीलतेने टिपण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी कर्नाटक संगीतातील बारकावे आत्मसात केले आणि स्वतःची शैली विकसित केली. प्रचंड मेहनत आणि संगीतावरील निष्ठेमुळे अल्पावधीत ते नामवंत व्हायोलिनवादक म्हणून नावारूपाला आले. व्हायोलिनच्या आत्म्याशी तादात्म्य पावून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त ठरणारे तंत्र निर्माण केले, जे 'लालगुडी वाणी' म्हणून ओळखले जाते. राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्याचे अद्भुत मिश्रण असलेल्या त्यांच्या संगीताने जगभर चाहतावर्ग निर्माण केला. काव्यात्म तरलतेने रसिकांसमोर येणारी वाद्यप्रतिभा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळेच नामवंत गायकांना साथ-संगतीसाठी लालगुडी जयरामनच हवे असत. कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिन वादनाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे ते पहिले कलावंत होते. वीणा आणि बासरीशी व्हायोलिनला जोडण्याचा अलौकिक प्रयोग त्यांनी १९९६ मध्ये केला आणि त्याला विशेष दादही मिळाली. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम झाले. १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवात प्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेनूहिन हे लालगुडी यांच्या तंत्राने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपले इटालियन व्हायोलिन त्यांना सप्रेम भेट दिले. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांचा उल्लेख करावा लागेल. लालगुडी जयरामन यांचे २२ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे.
‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
दामू-गोविंदा जोड रे...
राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.
नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
तात्या अभ्यंकर.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस, ही तबला नवाज झाकीर हुसेन यांची रसिकजनांच्या मनांवर ठसलेली प्रतिमा. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रजी झाला. त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहरा व त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान कितीतरी अमूल्य. भारतातील सर्वात प्रसिद्ध तबला वादक अशी ओळख असणारे मा. झाकिर हुसेन हे मा.अल्लाराखा खां यांचे सुपुत्र आहे. मा.झाकिर हुसेन यांचे बालपण मुंबई मध्ये गेले. झाकिर हुसेन संगीत जगात वयाच्या बाराव्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली मा.झाकिर हुसेन हे एक व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार ते तितक्यानच तन्मयतेने व उत्तमरीत्या करतात. भारतीयांसाठी मा.झाकीर हुसेन हे सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात मा. झाकीर हुसेन यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे. मा.झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग तो मा.गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; तो मा.भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा मा.जसराजजी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे. इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. मा.झाकीर हुसेन स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय मा. रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो मा.झाकीर हुसेन यांनी! वीस वर्षांचे असताना झाकीर हुसेन अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला. त्या काळातील अमेरिका हा उर्वरित जगासाठी एक ‘कल्चरल मेल्टिंग पॉट’ होता. यातूनच साहित्य-कला प्रांतात रूढी-परंपरा नाकारणारी प्रतिचळवळ म्हणजेच काऊंटर कल्चर मुव्हमेंट जन्माला आली. विशेषतः पूर्वेकडील संस्कृती, संगीत आणि अध्यात्म या सर्वांचे आकर्षण सामान्य अमेरिकी लोकांमध्ये वाढले. पं. रविशंकर, अली अकबर खां, उस्ताद अल्लाराखा खां अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होत गेले. याच काळात अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या मा.झाकीर हुसेन यांनी जगातील वेगवेगळ्या सांगीतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांबरोबर सांगीतिक वार्तालाप केला. त्यांनी आपली थोर परंपरा, आपले संगीत सर्वश्रेष्ठ असे काहीही मनात न आणता अगदी खुल्या मनाने या साऱ्या भिन्न परंपरा आत्मसात केल्या. त्या सर्वांमध्ये तबला या वाद्याला एक मानाचे स्थान मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर मा.झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. मा. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. म्हणूनच नव्वदच्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली, तेव्हा मा.झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संगीतकार म्हणून ध्रुवस्थान प्राप्त झालेले नाव बनले! याचाच प्रभाव म्हणून १९९६ च्या अॅटलांटा ऑलिंपिकच्या उद्घाणटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिले, त्यातील एक नाव मा.झाकीर हुसेन हे होते. मास्टर्स ऑफ पर्कशन या संकल्पनेद्वारे ते भारतातल्या लोकसंगीत वादकांना दरवर्षी आपल्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत. अनेक गुणी ज्युनियर कलाकारांबरोबर तबल्याची साथ करून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या कलाकारांमध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरासिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या वर्षी पुण्याला जेव्हा त्यांनी राहुल देशपांडे यांच्या सोबत तबला वाजवला, तीस वर्षांपूर्वी याच मा.झाकीर हुसेन यांनी देशपांडे यांचे आजोबा पं.वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर पुण्याला तबल्याची साथ केली होती. मा. झाकिर हुसेन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, देऊन गौरवले आहे. त्यांना ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल मा.झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटीव अवॉर्ड' नुकतेच मिळाले आहे. मा.झाकीर हुसेन यांचे वास्तव्य पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्निया येथे असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
झाकिर हुसेन यांचे तबला वादन.
http://www.youtube.com/watch?v=wOUM8K0-Wkc&list=RDEMX5Bz5WHsWxd4Xz_V2LK_Xw
https://www.youtube.com/shared?ci=rBMTQl_JG70
https://www.youtube.com/shared?ci=ia22SQ-W40g
ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात.
ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली. ‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. १९२९ मध्ये लिहिलेला ''शीळ'' या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली '' शीळ '' या नावाने त्यांचा काव्यसग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली ‘अभिसार’. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने.. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते.
ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले. नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १० मे २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ना.घ. देशपांडे यांची काही गाणी
अंतरीच्या गूढ गर्भी,काळ्या गढीच्या जुन्या ,घरदिव्यांत मंद तरी ,डाव मांडून भांडून ,तुझ्याचसाठी कितीदां ,नदीकिनारीं नदीकिनारीं,फार नको वाकू जरी,बकुळफुला कधीची तुला,मन पिसाट माझे अडले रे,रानारानांत गेली बाई.
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.
Copyright © 2025 | Marathisrushti