(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • यंदाचा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर

    भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे.
    त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी पांढरकवडा नागपूर येथे झाला.

    पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

    उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.
    त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • क्षितिज झारापकर

    लेखक दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

    दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी 'गोळाबेरीज' या सिनेमात पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधील ३२ व्यक्तिरेखा एकत्र आणल्या असून, त्यात 'म्हैस'चाही समावेश आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चंद्रकांत रघुनाथ गोखले

    चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन,राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. मा.चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा.चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

    मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. मा.गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.

    गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मा.मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्या् चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस

    संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. मा. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • साहित्यिक भाऊ पाध्ये

    पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.

  • लेखक,राजकारी,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

    काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे 'प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे' हे काकासाहेब गाडगीळ यांचे वाक्य प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या अनेक शिबीरातून सांगायचे. पुण्यातील एन.डी.ए. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी ही सुरुवातीला दक्षिण भारतात उभारण्याची कल्पना होती. पण असे म्हणतात की, काकासाहेब गाडगीळ यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पंडित नेहरूंपुढे हुशारीने मांडला व अखेरीस मंत्रिमंडळाने एन.डी.ए. पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुळे एन.डी.ए. पुण्यात आले, ही बाब अनेकांना ठाऊक नसेल.

    पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार हाही काकांमुळेच घडला. लेखक या बरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची राजकिय कारकिर्द मोठी होती. भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. काकासाहेब गाडगीळ यांचे १२ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान

    रईस खान यांच्या मातोश्री उत्तम गायिका होत्या व वडील उत्कृष्ट बीनवादक होते.त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला.मामा इनायत खान मेवात घराण्याचे पट्टीचे गायक होते. रईस खान यांनी तर अगदी बालवयात सूर आणि स्वर यावर इतके प्रभुत्व मिळविले होते की, मुंबईच्या सुंदराबाई हॉल मध्ये त्यांनी, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर महाराज सिंह यांच्या समोर आपल्या कलेचे पहिले जाहीर सादरीकरण केले तेव्हा ते केवळ आणि केवळ पाच वर्षांचे होते. १९५५ साली पोलंड देशातील ' वॉर्सा ' या राजधानीच्या शहरात संपन्न झालेल्या यूथ फेस्टिव्हल साठी त्यांची निवड होऊन त्यांनी तिथे आलेल्या देशोदेशीच्या शंभराहून अधिक तंतु-वादकांमध्ये सर्वोत्तम वादन करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तेव्हाही ते फक्त आणि फक्त सोळा वर्षांचे होते. ते उत्तम रागदारी गात असत परंतु ते जगभर विख्यात झाले ते त्यांच्या सतार वादनामुळे. त्यांनी आपल्या सतारवादनाची साथ अनेक दिग्गज हिंदुस्थानी गायकांना केली होती. बिस्मिल्ला खान, हरिप्रसाद चौरसिया, एल. सुब्रह्मण्यम यांच्या बरोबर त्यांची जुगलबंदी गाजलेली होती.

    पाकिस्तानी गायिका, बिल्किस खातूम, यांच्याशी लग्न केल्याने ते पाकिस्तानातील कराची शहरात राहत असत. तेथे त्यांनी आपली मूळची इंदौरी मेवात घराण्याची गायकी जपली होती व हिदुस्थानी रागदारी पाकिस्तान मध्ये पोहचवण्याचे काम केले. पाकिस्तानात वास्तव्य असतानाही ते भारतीय चित्रपट -संगीताशी समरस झालेले होते. संगीतकार मदन मोहन हे त्यांचे खास मित्र होते. मा.मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटातल्या गाण्याना रईस खान यांनी सतारीचा स्वरसाज चढविला आहे. १९६४ च्या " पूजा के फूल " या चित्रपटातले लता मंगेशकर यांच्या आवाजातले गाणे, " मेरी आँखों से कोई नीन्द लिये जाता है " या गाण्याला रईस खान यांच्या सतारीची साथ आहे. अगदी अलीकडचा, " गॉड तूसी ग्रेट हो " असो अथवा आणि साजिद -वाजिद या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेला " पार्टनर " चित्रपट असो, रईस खान यांच्या सतारीचे स्वर त्यातल्या गीताना होते. उस्ताद रईस खान यांचे काल ६ मे २०१७ रोजी कराचीतच निधन झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान

    एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात करियरबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्या काळात पेसी खंडवाला यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आणि नंतर दोघांनी एकत्र काम करून अनेक नाटके केले.

  • मन्ना डे

    मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

    मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

    मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट