घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले.
मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे.
शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील 'ती येते', 'कैद' या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ' घाशीराम कोतवाल ' मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ' महापूर ' हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच 'मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.
मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ' कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ' बेबी' , 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , ' नरू आणि जान्हवी ' ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या 'बन्या -बापू' मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला.
'श्वेतांबरा' या मालिकेने मोहन गोखले यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'मिस्टर योगी' मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी 'हिरो हिरालाल',' मोहन जोशी हाजीर हो' या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या.
समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ' मिर्च मसाला' , सई परांजपेंचा “ स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' , मीरा नायरच्या ' मिसिसीपी मसाला' या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.
शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी व सखी गोखले ही कन्या. शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी 'आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मराठी मालिका आणि 'लापतागंज' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
कमल हसनाच्या ' हे राम ' च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.मोहन गोखले यांची कारकीर्द
नाटके
कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार, गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट.
दूरदर्शन मालिका
श्वेतांबरा, देखो मगर प्यारसे, यात्रा,भारत एक खोज, लेखू, दोपहर का ठहराव, जंजीरें, अल्पविराम, मिस्टर योगी, भंवर, सी आय डी, करमचंद, जमीर, जुनून, आशीर्वाद, उजाले की अौर, शक्तीमान, बायबल, आहट, देखो मगर प्यारसे, दुनिया रंग रंगीली.
एकांकिका
मात, कैद, लिफ्ट, ती येते, बदाम राणी चौकट गुलाम, स्वराज्याचा कानमंत्र, झुलता पूल, खलित्यांची लढाई, डियर पिनाक, कदाचित, एका म्हाताऱ्याचा खून.
मराठी चित्रपट
बन्याबापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, संसार पाखरांचा, माफीचा साक्षीदार, अरे संसार संसार, आज झाले मुक्त मी, जगावेगळी प्रेमकहाणी, धाकटी जाऊ, अंगार, राजाने वाजवला बाजा, ध्यासपर्व, कैरी.
हिंदी चित्रपट
स्पर्श ,हिरो हिरालाल,मिर्च मसाला,अंधेरनगरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,हंगामा बॉंम्बे स्टाईल ,मोहन जोशी हाजिर हो,कल का आदमी,मिसिसिपी मसाला(English)आदि मिमांसा(अोरिया)भवनी भवाई(गुजराथी)हंसी हंसलाल (गुजराथी)हे राम (अपूर्ण)
दिग्दर्शन
महापूर,बीज,भाऊ मुरारराव,फरारी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .
प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़.
बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत.
पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
१९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी 'फॅशन आयकॉन' म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला.
साधना यांचे नाव घेतले तरी कित्येकांच्या नजरेसमोर ‘मेरे मेहबूब’ चित्रपटातील नायक राजेंद्रकुमारकडे बुरख्याआडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात. या चित्रपटात पहिल्यांदाच नायक राजेंद्रकुमार यांची नायिकेशी गाठ पडते तेव्हा साधना यांचे बोलके डोळे त्यांचा आणि पर्यायाने प्रेक्षकांच्याही काळजाचा ठाव घेतात. हेच बोलके डोळे साधना यांचे अस्त्र होते.
प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधना यांना महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली.
१९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता. त्याआधी १९५५ साली त्यांनी राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.
नितांतसुंदर वैदूर्यी डोळे, मोहक आणि मोनालिसासारखं गूढ हास्य हे साधना यांचे वैशिष्टय़. त्यात भर पडली ती तिच्या आगळ्यावेगळ्या केशरचनेची. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नप्रमाणे केसांच्या बटा कपाळावर रुळवण्याची फॅशन साधना यांनी आपलीशी केली व 'लव्ह इन सिमला' या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने रूढ झाली, इतकी की बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, दीपिका पडुकोन आदी नव्या जमान्यातील नायिकांनाही या कटची भुरळ पडली व कधी ना कधी त्याचे अनुकरण करावेसे वाटले. नायिकांसाठी घट्ट चुडीदार-कुर्ता हीसुध्दा साधना यांनीच रुढ केलेली फॅशन मानली जाते. या फॅशन रूपेरी पडद्यावरून नंतर समाजातही सहजतेने पाझरल्या.
'लव्ह इन सिमला' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. १९९५ मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.
मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या "वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. त्यांच्या वाट्याला अनेक सुंदर गाणीही आली. ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. "झुमका गिरा रे, बरेली के बाजार में‘, "आजा आई बहार, दिल है बेकरार‘, "लग जा गले‘ यांसारखी अनेक अजरामर गाणीही त्यांच्यावर चित्रित करण्यात आली.
साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
साधना यांचा जीवनपट
https://www.youtube.com/watch?v=z0UzgpHwLlo
साधना यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=gpTtZYmp3So
https://www.youtube.com/watch?v=LcrT5wZ4Tz8
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६९ साली पॉल लेनर्ड न्यूमन हे २५ लाख डॉलर्स हे एका सिनेमाचे मानधन घेत असत, आणि निर्माते एक एक वर्ष आधी ते देऊन त्यांना आरक्षित करत असत.
भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती.
” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.
स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात.
शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे.
कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे.
विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉसलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतंय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉठलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्य ही येते. तर खरच आपणच आपण भविष्य घडवायला हवे, कोणावरही अवलंबून राहणे हे योग्य नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे. हेरंब जोगळेकर यांनी सुंदर मी होणार या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यात गायक कलाकाराची भूमिका साकारली होती.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘चित्रपट संगीता’ला सुरुवात केली तेव्हा शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, रोशन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, सलिल चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी यांचा विलक्षण दबदबा होता. साधा शिरकाव करणे अवघड होते, पण यांनी तर आपली जागा निर्माण केली. पहिल्याच ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. अशा फॅण्टसी चित्रपटाला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे संगीतकाराला नाव ते काय मिळणार? हरिश्चंद्र तारामती, संत ज्ञानेश्वर अशा चित्रपटांना संगीत देऊन फार काही साध्य होणारे नव्हते. ‘संत ज्ञानेश्वर’मधील ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ हे गाणे गाजले.
१९६४ साली ‘फिल्म फेअर’च्या स्पर्धेत ‘संगम’च्या शंकर-जयकिशनवर मात करून ‘दोस्ती’साठी लक्ष्मीकांत-प्यारेलालनी बाजी मारली आणि चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यमे या तिन्ही घटकांचे या जोडीकडे लक्ष गेले व ते बराच काळ राहिले. ‘दोस्ती’तील ‘मेरा ज्यो भी कदम है’, ‘राही मनवा दुख की चिंता’, ‘तेरी दोस्ती मेरा प्यार’ अशी सगळीच गाणी हिट ठरली. सिनेमाच्या जगात यशासारखे सुख नाही, पारितोषिकासारखे टॉनिक नाही व वाढत्या मागणीसारखा आनंद नाही. लक्ष्मी-प्यारे यांचा चौफेर संचार सुरू झाला, त्याचे साम्राज्यात कधी रूपांतर झाले हेदेखील समजले नाही. प्यार बाटते चलो, अजनबी तुम जाने पहचाने यह दर्द, भरा अफसाना कैसे रहू चूप की मैने दिल खिल प्यार ब्यार असे करीत करीत मिलन, दो रास्ते, मेरे नसीब अशा चित्रपटांच्या वेळी त्यांनी खूपच मोठी मजल मारली. त्या काळातील त्यांच्या चित्रपटात आये दिन बहार के, कर्ज, पत्थर के सनम, तकदीर, इज्जत, मेरे हमदम, मेरे दोस्त, राजा और रंक, अंजाना, आया सावन झुमके खूप महत्त्वाचे. भारतीय संगीत व विदेशी संगीत यांची युती करताना त्यांनी बऱ्याचदा लोकसंगीतावर भर दिला, तर अनेकदा चित्रपटाचे स्वरूप अर्थात मागणी पाहून ‘चाली’ बांधल्या.
राज कपूर, मनोजकुमार, राज खोसला, मोहनकुमार, चेतन आनंद, विजय आनंद, मोहन सैगल, मनमोहन देसाई, राजकुमार कोहली, जे. ओम प्रकाश, सुभाष घई, के. बालचंदर, बी. आर. चोप्रा, रवी टंडन, दुलाल गुहा, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती, शक्ती सामंता अशा कितीतरी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत देत आपले आसन बळकट केले, सुभाष घईच्या ‘वैभवा’त लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा वाटा खूप मोठा आहे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (इडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणाऱ्या) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली होती. या जोडीने बॉलीवुड मध्ये ३५ यशस्वी वर्ष काम केले, ६३५ चित्रपटातील ३५०० च्या वर गाण्यांना संगीत दिले. व तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली. संगीतकार मा. मा.लक्ष्मीकांत यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले.
मराठी भाषेतील ज्येष्ठ विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा ऊर्फ वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६ रोजी झाला.
वि. आ. बुवा यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ १९५० मध्ये केला. मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. तंत्र महाविद्यालयात बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा अभ्यास होता. सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर त्यांनी १९५० मध्ये इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्याचा अंक प्रकाशित केला होता. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर आणि द. मा. मिरासदार असे गाजलेले साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत.
पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५० पुस्तके प्रसिद्ध झाली होती. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ.बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जात. हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळी अंक अशा कितीतरी मासिके व दिवाळी अंकांतून मा.बुवा यांनी लेखन केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आकाशवाणीवर त्यांचे ६०० हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले.
त्या काळच्या "पुन्हा प्रपंच" या लोकप्रिय मालिकेसाठी ४०० हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले.
वि. आ. बुवा यांचे १७ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti