(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे

    प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता. शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.

    पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस"मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.

    शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात. मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत.

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका, धुंद आज डोळे". त्याचबरोबर "घन घन माला नभी " ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बांबू"हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.

    मन्ना डे यांच्या गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शास्त्रीय पाया. शास्त्रीय ढंगाची गाणी ते अशी काही खुलवत की काही विचारू नका. याबाबतीत ते एकमेवाद्वितीयच म्हणावे लागतील. लोकसंगीताचा बाज असणारी गाणीही ते तितक्याेच सहजतेनं, लीलया गात असत. फुलवत असत. मन्ना डे यांच्या आपल्या "ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीहरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता.

    व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्या च्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्नल माझ्यापुढे उपस्थित राहिला. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून चाहत्याने तत्काळ व्यासपीठावर येत त्याने मला आपली टोपी भेट दिली. चाहत्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो. थंडी पळून गेली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. मा.मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मन्ना डे यांची गाजलेली काही गाणी
    प्यार हुआ..., दिल का हाल सुने... (श्री ४२०)
    तू प्यार का सागर है (सीमा)
    ना तो कारवॉं की तलाश है (बरसात की रात)
    लागा चुनरी में दाग (दिल ही तो है)
    ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
    जिंदगी कैसी है पहेली (आनंद)
    घन घन माला नभी दाटल्या (वरदक्षिणा, मराठी)
    अ आ आई (एक धागा सुखाचा, मराठी)
    यारी है ईमान मेरा (जंजीर)
    ए मेरी जोहराजबी (वक्त)
    यशोमती मैया से (सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌)
    पुछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
    ए भाय जरा देख के चलो (मेरा नाम जोकर)
    कसमे वादें प्यार वफा सब (उपकार)
    ये दोस्ती (शोले)
    चलत मुसाफिर मोह लियो रे (तिसरी कसम)
    चुनरी संभाल गोरी (बहारों के सपने)

  • काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु

    काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. कवी सुधांशु यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. कवी सुधांशु यांच्या गीत दत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले.

    भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती. कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी तंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.

    औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९ पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात, व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता. कवी सुधांशु यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. आर. एन. पराडकर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली त्यांची गाणी अजून लोकांच्या मनात आहेत. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी कवी सुधांशुच. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट

  • पुण्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ ह. वि. सरदेसाई

    एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले.

  • ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

    आज तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर.....

    श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे. मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही.

    एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले. पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते.

    अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.

    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.

    अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.

    अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
    https://www.youtube.com/watch?v=j0cZearkZss
    https://www.youtube.com/watch?v=fXvijeN-m-w
    https://www.youtube.com/watch?v=Qi26eVirOhw

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रसिद्ध संगीतकार सुनिल शामराव प्रभूदेसाई

    रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार आंनद उर्फ सुनिल शामराव प्रभूदेसाई यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली होती. त्यांना संगीत तज्ज्ञ डॉ. भारती वैशंपायन व अरूण तसचे मुंबईतील डॉ. अशोक रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर नाट्यसंगीत अभिनयाबाबत जयमाला शिलेदार-पुणे यांच्याकडून त्यांना धडे मिळाले होते.

  • खैय्याम

    काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
    संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.

    "शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.

    काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.

    एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.

    खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.

    मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.

    - अनिल गोविलकर

  • मिनाक्षी शेषाद्री

    शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झारखंड येथे झाला. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मीनाक्षी एक सक्षम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. मीनाक्षीने बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केले आहे.

    अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर या बड्या स्टार्सबरोबर मीनाक्षी झळकली आहे. 'जुर्म' आणि 'दामिनी' या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीच्या अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे. 'घातक' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. मीनाक्षी व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरबरोबर विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती आपल्या पती आणि कुटुंबीयांबरोबर अमेरिकेतील टेक्सास शहरात स्थायिक झाली. मीनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे.

    टेक्सासमध्ये स्थायिक झालेली मीनाक्षी तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकी पिडीया

  • इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ

    इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.

    शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.

    शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

    जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता.

  • कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण

    कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला.

    रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. मा.रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की कॉमन मॅन पुतळाचा एक पूर्णाकृती पुतळाही पुण्यात "सिंबायोसिस' कॉलेजमध्ये बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच 'मालगुडी डेज' या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले.

    “यू सेड इट” नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नव्हती. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच मराठावाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती. आर. के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याच पुस्तकाचे ’लक्ष्मणरेषा’ नावाने मराठीत अनुवाद करण्यात आला आहे.

    आर. के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
    आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
    आत्मचरित्र
    आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.