(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • राजू भाई

    २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला.

  • बासरीचा बादशहा पंडित हरिप्रसाद चौरसिया

    बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे.

  • गानसरस्वती किशोरी आमोणकर

    घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वुगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टवर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. “जाईन विचारीत रानफुला’ हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.

  • मनोहर प्रभु पर्रीकर

    मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.

  • अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’

    आजच्या दिवशी सन १८८२ साली, अण्णासाहेब किर्लोस्करांचे 'संगीत सौभद्र' हे नाटक रंगभूमीवर आले होते.
    नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’ मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी. यावर मल्लिनाथी करताना आद्य नाटककर्ते विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग पाहून ‘यात फक्त डोअरकीपरला तेवढं गाणं द्यायचं राहिलंय,’ असे उद्गार काढल्याचं सांगतात. सौभद्र’ने नट, नाटक आणि नाटककाराबरोबरच मराठी रंगभूमीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. ही बाब फक्त पहिल्यांदा सौभद्र सादर झाले तेव्हाच घडली नाही, तर जेव्हा जेव्हा नवीन संचात ‘सौभद्र’ सादर झाले, त्या त्या वेळी घडली. या निमित्ताने एकाच नाटकाने अनेक महान दिग्दर्शक, नट, संगीतकार, नेपथ्यकारच नाही तर अनेक नाटक कंपन्यांना ओळख निर्माण करून दिली.

    सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमाची आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णानं रचलेल्या चालींची कहाणी ‘संगीत सौभद्र’मध्ये उलगडते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी’, ‘प्रिये पहा..’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘नच सुंदरी करू कोपा..’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पावना वामना या मना..’, ‘बलसागर वीरशिरोमणी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘किती किती सांगू तुला..’ अशा एकाहून एक सरस पदांनी या नाटकातले नाटय़पूर्ण क्षण चढत्या रंगतीनं उत्कर्षबिंदूप्रत जातात. आज महाराष्ट्रात ज्या काही संगीत नाटक करणा-या कंपन्या झाल्या आणि आहेत, त्यातली अशी एकही कंपनी नाही, ज्या कंपनीने ‘सौभद्र’ केले नाही.

    किर्लोस्कर नाटक कंपनीनंतर महाराष्ट्रात कोणतीही नवीन नाटक कंपनी निघाली, मग ती ललितकलादर्श, नाट्यकलाप्रवर्तक, यशवंत, नूतन संगीत मंडळी, बलवंत, नूतन संगीत विद्यालय, राजाराम ते अगदी कालपरवाच्या नाटक संस्था असोत, ज्यांनी ज्यांनी संगीत नाटके केली, त्या सर्व संस्थांचे/कंपन्यांचे पहिले प्रयोग ‘संगीत सौभद्र’चेच असत. आजवर जवळपास शेकडोच्या वर संस्था, कंपन्या, क्लबांनी सौभद्र सादर केले आहे. जे नाटक १८८२ मध्ये लिहिले गेले, सादर झाले, ते आज २०१७ मध्येही कुठे ना कुठे, कुठल्या तरी संस्थेतर्फे सादर होत असते.
    अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र कसे लिहिले हे पाहणे खरेच मनोरंजक आहे. किर्लोस्करांनी लिहिलेले पहिले नाटक ‘शाकुंतल’ खूप गाजले. पण कितीही झाले तरी ते होते भाषांतरित. सच्च्या लेखकाला स्वत:चे स्वतंत्र नाटक लिहिण्याची ऊर्मी अधिक तीव्र असते. त्यानुसार अण्णासाहेब किर्लोस्करांना स्वत:च्या नाटकाने पछाडले होते. त्यांच्या डोक्यात ‘अर्जुन सुभद्रा’ हा विषय घोळत होता. त्या काळानुसार नाटकांचे विषय हे प्रामुख्याने पौराणिक असत. कारण त्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असत आणि पुराणकथांतल्या नीतिमूल्यांचे, भव्यतेचे, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्वांचे, राजा-राण्यांच्या संबंधांचे समाजमनावर गारूड असणे स्वाभाविकच होते. आणखी त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य माणसाचे आयुष्य नाटक लिहिण्याएवढे, विचार करण्याएवढे त्या काळी गंभीर नव्हते. सामान्य माणूस हा प्रहसनातच असायचा. तोही असल्यास. असो.

    तर अण्णासाहेबांनी ‘सौभद्र’ची कथा कल्पिली आणि पहिले तीन अंक लिहून काढले. त्या कथेचा विषय ऐकून त्या वेळच्या मुंबई हायकोर्टाचे प्रख्यात वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी किर्लोस्करांना पत्र लिहिले होते की तुमचे ‘शाकुंतल’ हे नाटक सर्व रसपरिपोषक आहे. त्यातली पदे उत्तम आहेत. लोकांना ते आवडले आहे. नवीन नाटकात तीनच रस प्रामुख्याने दिसतात, त्यानुसार येणारी पदे किती वैविध्य निर्माण करणार? आणि हा विषय लोकांना किती रुचेल याबद्दल शंका वाटते. त्यामुळे ‘सौभद्र’विषयी पुनर्विचार करावा. हे पत्र १८८२ च्या ऑक्टोबरला किर्लोस्करांना मिळाले. आणि किर्लोस्करांनी १८ नोव्हेंबर १८८२ रोजी पुण्याच्या ‘पूर्णानंद’ नाट्यगृहात पहिल्या तीन अंकांचाच प्रयोग सादर केलाही. एक तर पूर्ण नाटकाऐवजी फक्त तीन अंकांचेच नाटक ते लोक कसे काय सादर करत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. (कारण अण्णासाहेबांनी ‘शाकुंतल’चाही सुरुवातीला फक्त पहिल्या चारच अंकांचा प्रयोग सादर केला होता.) ‘सौभद्र’चा प्रयोग इतका अभूतपूर्व झाला की लोकांनी त्याचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले. सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच समाजातील मान्यवरांनी, प्रतिष्ठितांनी या नाटकाला गौरवले. त्या काळच्या या काही प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात. त्या वेळच्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात अशी समीक्षा केली होती, की ‘मराठी भाषेत निबंधमाला व संगीत सौभद्र ही दोनच काय ती नवीन व उत्कृष्ट पुस्तके आहेत.’ ना. सी. फडके लिहितात, ‘हल्लीच्या चंदेरी आणि सोनेरी ज्युबिल्यांच्या काळात सौभद्रची ज्युबिली करायची झाल्यास रेडियम ज्युबिली करावी लागेल.’

    वि. स. खांडेकर म्हणाले, ‘देवांना कधीही वार्धक्य येत नाही, अशी समजूत आहे. अशा देवकोटीला पोहोचलेल्या मराठी नाटकांची यादी करू लागल्यास तिच्यात श्रीकाराच्या खाली ‘सौभद्र’चे नाव घालावे लागेल.’ या अशा आणि कित्येक प्रतिक्रिया वाचायला मिळतात. पण त्या काळी या नाटकाचा फक्त गवगवाच झाला असे नाही; तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गंगाधर गाडगीळ यांसारख्या टीकाकारांनी कठोर टीकाही केली.

    किर्लोस्कर अत्यंत दृढनिश्चयी असावेत. कारण एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर ती हवी तशी केल्याशिवाय ते कधीही गप्प बसले नाहीत. संगीत नाटक असले तरी नटांना मनमुराद मुक्तपणे ताना आणि आलापी त्यांनी कधी करू दिली नाही. गाणे आवश्यक त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत ते अतिशय आग्रही असत. तसेच नाटकाच्या विषयाबद्दल, पदे किंवा त्यांच्या चालींबद्दल भलताच युक्तिवाद केलेला त्यांना खपत नसे. आपण लिहिलेल्या पदांबद्दल, शब्दांबद्दल, चालींबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास असायचा. परंपरेनुसार पडद्यातली नांदी त्यांनी स्टेजवर आणली; त्याबद्दल नाट्यशास्त्राचा नियम दाखवणा-याला ते उभे करत नसत. कदाचित महादेव आपट्यांच्या शंकेला तडकाफडकी प्रयोग करूनच त्यांनी उत्तर दिले की काय असे वाटते.

    तर १८८० ला सौभद्रचे पहिले तीन अंक लिहून त्याचा प्रयोगदेखील झाला, पण पुढच्या अंकाचे गाडे काही पुढे सरकेना. अशातच एकदा ते बाजारातून येताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला; त्यांनी तो चांगलीच किंमत देऊन विकत घेतला. बाजारातून येतायेताच त्यांना सौभद्रच्या पुढच्या अंकांची कथा सुचली आणि त्यांनी दुस-याच दिवशी सगळ्यांना पूर्ण नाटकाचे कथानक ऐकवले. अशी सुरस कथा अण्णांच्या चरित्रात वाचायला मिळते. ज्या तिस-या अंकावर गाडे अडले होते, त्याच्या पुढे कथानक नेण्यास अचानक नाटकात ‘गर्गमुनी’ आल्याने अण्णासाहेबांच्या लेखी पुरेसा गुंता सुटला होता. नाटक वाचल्यास पहिल्या तीन अंकांमध्ये आणि पुढच्या अंकांमध्ये नाटकाच्या रचनेचा, पात्रांच्या संगतीचा, स्थायिभावाचा निरनिराळा परिणाम दिसून येतो. पण हे सगळे नाटक अभ्यासणा-यांसाठी. सामान्य लोकांवर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि एक वर्षानंतर पुढचे अंक लिहून १८८३ मध्ये ‘संगीत सौभद्र’च्या पाचही अंकांचे पूर्ण लांबीचे नाटक पुण्यात सादर झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट / हृषीकेश जोशी

  • स्विस अभिनेत्री उर्सुला एंड्रेस

    उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत.

  • पहिल्या आयपीएस महिला अधिकारी डॉ. किरण बेदी

    एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्रे स्वीकारण्याची हिंमत किरण बेदींनी दाखवली आहे. किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी

  • रहस्यकथा लेखक श्रीकांत सिनकर

    हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हियर, होटेल हेरिटेज मर्डर केस, आरामनगर पोलिस ठाणे, यातील खुनी हात कोणता, इ. वाकडकर हियर, बोलकी डायरी, अपुरे स्वप्न, अलविदा, आयपीएस, कावेबाज, मरिच, मी हा असा!!!, युद्ध, वाँटेड, सिनिक, स्मगलर, सैली, ३ सप्टेंबर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

  • मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले

    बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

    शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
    त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही.

    १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.

    भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६ मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो. चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते. पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते. भास्करबुवा बखले यांचे ८ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

  • अर्नेस्ट हेमिंग्वे

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले.