हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी - गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकुळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या जुगलबंदीसाठी, देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.
‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!
‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन! नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली.
मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते, आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.
जन्म : २५ डिसेंबर १९१९
मृत्यू : ५ मे २००६
-- अनिल सांबरे
भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे.
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते.
बॉलीवूड अभिनेत्री बिंदू यांचा जन्म १७ एप्रिल १९५१ रोजी झाला. बिंदू यांचे वडील नानूभाई देसाई हे चित्रपट निर्माता होते.
बिंदू या चारहून अधिक दशके बॉलीवूड मध्ये काम करत आहेत. बिंदू यांनी आपली करीयरची सुरवात १९६९ मध्ये आलेल्या इत्तेफाक व दो रास्ते या चित्रपटापासून केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कटीपतंग मधील शबनमच्या अभिनयासाठी व मेरा नाम शबनम या गाण्यासाठी अजूनही लोक बिंदू यांची आठवण काढतात.
बिंदू यांनी आपल्या इम्हतीहान व हावस या चित्रपटातील कामाने हिंदी चित्रपट उद्योगात वेगळे नाव कमवले. त्यानी व्हॅम्प रोल करण्यास सुरवात केली. या सोबतच त्यांनी अभिमान, अर्जुन पंडित या चित्रपटातील केलेले अभिनय गाजले. जंजीर मधील त्याच्यावरील मोना डार्लिंग डायलॉग प्रसिद्ध झाला.
बिंदू यांनी आपले बालपणीचे मित्र चंपकलाल झवेरी यांच्याशी लग्न केले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल.
श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले.
मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले.
संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते. संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले.
संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे मा.प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता.
मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील.
"सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली.
प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी).
राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.
अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.
वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले.
वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली.
१९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. www.vasntdesai.com या वेब साईटवर वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.
वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti