(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • अष्टपैलू अभिनेते निळू फुले

    आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.

    निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.

    १९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

    राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.

    पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.

    बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.

    वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.

    सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...

    एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.

    त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.

    जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.

    निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.

    निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.

    निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.

    निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    निळू फुले यांची कारकीर्द

    गाजलेली लोकनाट्ये

    कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

    गाजलेले मराठी चित्रपट

    अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.

    गाजलेले हिंदी चित्रपट

    कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
    गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

    करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या.

  • समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे

    लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.

  • बॉलीवूडचा फिट अभिनेता जॉन अब्राहम

    आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

  • अभिनेता हॅरिसन फोर्ड

    इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं.

  • सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर

    वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.

  • बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा

    साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी 'नरसी भगत' आणि 'शारदा' मध्ये अभिनय केला आहे. किशोरवयात 'अंगुलीमाल' मध्येही काम केले आहे. विनोद मेहरा यांचा प्रथम चित्रपट १९७१ साली रीटा हा होता, सोबत होती तनुजा ते १९७१ मध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी याचा बरोबर 'लाल पत्थर' मध्ये युवा नायकाच्या रूपात सादर झाले. विनोद मेहरा यांच्या फिल्म करियर ला मौसमी चटर्जी ने हात दिला, शक्ती सामंत यांची फिल्म अनुराग (१९७२) मध्ये मौसमी-विनोद प्रथम एकत्र आले. मौसमी चटर्जी यांनी एक दृष्टिहीन युवती चा रोल अतिशय उत्तम केला होता. विनोद मेहरा यांनी एक आदर्शवादी नायकाची भूमिका केली होती. नायकाला आपल्या पित्याच्या इच्छे विरुद्ध मौसमी बरोबर लग्न करावयाचे असते.

    या नंतर त्यांनी उस पार (बसु चटर्जी), दो झूठ स्वर्ग नरक या चित्रपटात मौसमी बरोबर नायक म्हणून काम केले. तो काळ मल्टीस्टार फिल्म चा होता. विनोद खन्ना, राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेन्द्र, जीतेन्द्र, अमिताभ असताना विनोद मेहरा यांना जादा सिनेमे मिळाले नाहीत. त्यांनी दक्षिण भारतीय फिल्म डायरेक्टर्स कृष्णन्‌ पंजू , आर.कृष्णमूर्ति, एस. रामानाथन्‌ तथा दसारी नारायण राव बरोबर काम केले. विनोद मेहरा व रेखा याची जवळीक व रोमांस याची चर्चा बॉलीवुड खूप दिवस चालू होती. त्यांनी लग्न केल्याची चर्चा होती. खर खोटे काय ते विनोद व रेखा यांनाच माहीत.... तसे यांनी विनोद मेहरा तीन लग्ने केली होती. मीना ब्रोका पहली पत्नी, बिंदिया गोस्वामी दुसरी, तिसरी किरण. विनोद मेहरा यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    विनोद मेहरा यांचे काही चित्रपट
    लाल पत्थर (१९७२), अनुराग (१९७२), सबसे बड़ा रुपैया (१९७६), नागिन (१९७६), अनुरोध (१९७७), साजन बिना सुहागन (१९७८), घर (१९७८), दादा (१९७९), कर्तव्य (१९७९), अमर दीप (१९७९), जानी दुश्र्मन (१९७९), बिन फेरे हम तेरे (१९७९), द बर्निंग ट्रेन (१९८०), टक्कर (१९८०), ज्योति बने ज्वाला (१९८०), प्यारा दुश्र्मन (१९८०), ज्वालामुखी (१९८०), साजन की सहेली (१९८१), बेमिसाल (१९८२), स्वीकार किया मैंने (१९८३) लॉकेट (१९८६) प्यार की जीत (१९८७)

  • ‘जनकवी’ पी. सावळाराम

    ‘जनकवी’ पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम हे वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले हे नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले.

  • मराठी लेखिका डॉ.सरोजिनी बाबर

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले.

    "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.

    अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
    खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
    गालात हासून, ओठात बोलून...
    हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
    जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
    सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
    रांगत रांगत, हअम डौलात...
    गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
    फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
    कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
    झेप झेपावून, तोल सावरून...
    नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
    काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
    माझ्या जीवाचं, सुख दाटलं...

  • मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे

    मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या.

    पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून कुसुमावती १९२९ला भारतात परतल्या. त्याच वर्षी त्यांचा आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्याशी विवाह झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये केवळ मुलगे शिकत असल्याने त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी स्त्री म्हणून नाकारली गेली. शेवटी गव्हर्नरपर्यंत जाऊन, भांडून कुसुमावतींनी ती नोकरी मिळविली.

    त्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणी केंद्रात आणि नंतर दिल्लीच्या केंद्रात त्यांनी कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. कुसुमावती देशपांडे यांचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट