(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई स्मृतिदिन

    १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.

  • दिग्दर्शक सुनील सुकथनकर

    २०१४मध्ये आलेला ‘अस्तु’ हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. ‘अस्तु’ चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. पुढं त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी ‘क्राउड फंडिंग’ करून तो पुन्हा प्रदर्शित केला.

  • गंधर्वभूषण जयराम शिलेदार

    चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली.

    गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या.

    राम जोशी या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या जयराम शिलेदार जयमाला शिलेदार यांच्याशी विवाह केला. या दोघांनी मराठी संगीत रंगभूमीवर आपल्याच कर्तृत्वाने नवे युग सुरू केले. जयराम यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले.

    संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली, तेव्हा जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी "संगीत मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही.

    संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. तेव्हा विदर्भ, मराठवाड्यातून आणि कर्नाटकातूनही संगीत नाट्य रसिक आवर्जून ही सारी नाटके पहायसाठी त्या शहरात मुक्काम ठोकून असत.

    ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन जयमाला शिलेदार यांनी केली. २०१२ मध्ये जयराम शिलेदार यांचे आत्मचरित्र, "फोटो बायोग्रॉफी‘मधून लोकांसमोर आले.

    जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री राजेश्वरी खरात

    मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांच्या गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात.

  • अभिनेत्री शांता हुबलीकर

    भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या.

  • रत्नागिरीतील प्रसिद्ध तबला वादक हेरंब जोगळेकर

    त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे. हेरंब जोगळेकर यांनी सुंदर मी होणार या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यात गायक कलाकाराची भूमिका साकारली होती.

  • डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी

    बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते.

  • नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर.

    मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले.

    साहित्य हा त्यांचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. अखेर जमलं या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर फिल्मिस्तान या संस्थेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली.

    त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला इ. अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

    चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. १९६३ साली दिल्या घरी तू सुखी रहा हे रंगभूमीवर आलेले नाटक खुपच गाजले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली बरीच नाटकं यशस्वी झालीत. शंभराच्यावर त्यांचे प्रयोग झाले.

    स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले उद्याचे जग हे कालेलकरांचे पहिले नाटक. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा. अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. सहज भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे ही नाटकं चित्ताकर्षक ठरली.

    मधुसूदन कालेलकर यांचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • `कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले जयंत साळगावकर

    जयंत साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी मालवण येथे झाला. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून `कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयच्या खपाचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी आपल्यातील कल्पक उद्योजकाचे कौशल्य सिद्ध केले. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते. ते मुंबईतील प्रसिध्द श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी व आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणार्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. मुंबई मराठी साहित्य संघ व इतिहास संशोधन मंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते. १९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. तसेच मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाटय़संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. `सुंदरमठ, देवा तूचि गणेशु’ ही पुस्तके व धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथाचे संपादन व लेखन त्यांनी केले. जयंत साळगावकर यांचे २० ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये.

    पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली. माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं.

    बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''
    काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
    आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट