(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ

    विलायत खाँ यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे गायकांचे, त्यामुळे आजोबा उस्ताद बंदे हसन आणि आई बशीरन बेगम कडून विलायत खॉंसाहेबांना गायकीची तालीम मिळायला लागली. एक वेळ अशी आली की सतारवादनाकडचे त्यांचे लक्ष कमी होत गेले आणि गायकीकडचा ओढा विलक्षण वाढला. आपल्या मुलाचे सतारवादनाकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यावर बशीरन बेगमना आपल्या मुलाला स्पष्टपणे तुला संगीतक्षेत्रात जर नाव करायचे असेल, तर ते सतारवादक होऊनच करावे लागेल.

    सतार वादनातल्या मर्यादा खाँ साहेबांमधल्या सतत अतृप्त असणाऱ्या कलावंताला, पट्टीच्या गायकाला अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यावर मात करण्यासाठी खाँसाहेबांनी सतारीच्या रचनेत मूलभूत बदल करायला सुरुवात केली. 'तब्ली, 'जवारी' या सारख्या भागांची रचना बदलत आणि पडदे मिळवण्याच्या पद्धतीचा तसेच चिकारीच्या तारेवर सातत्याने आघात करण्याच्या पद्धतीचा नव्या रचनेशी ताळमेळ साधत खाँसाहेबांनी सतारीतल्या मींड, गमक वाजवताना येणार्याण मर्यादांवर मात केली. डाव्या हाताने तारा खेचण्याचे नवे तंत्र विकसीत करत ख्याल गायकीतली आलापचारी, तानक्रिया तिच्या सगळ्या बारकाव्यांसकट सतारीवर उतरवायला सुरुवात केली. विलायत खाँसाहेबांची रियाजाची पद्धतही अफलातून होती.

    एक मेणबत्ती पेटवायची, ती विझेपर्यंत एक पलटा घोटून काढायचा. मेणबत्ती विझली की छोटीशी विश्रांती, थोडेसे धूम्रपान आणि मग पुढची मेणबत्ती पेटवायची आणि दुसरा पलटा सुरू! सिगारेटचा माझ्याइतका विधायक उपयोग कुणीच केला नसेल असे पुढे खाँसाहेब गमतीने म्हणायचे. गायकीतल्या निरनिराळ्या घराण्यांचा अभ्यास करत, त्यातली सौंदर्यस्थळे सतारीवर सही सही वाजवून काढत सतारीला चक्क 'गाता गळा' दिला. सतारीवर वाजवल्या जाणाऱ्या 'गायकी अंग' या नव्या बाजाचे विलायत खाँसाहेबच जनक आहेत, 'आर्किटेक्ट' आहेत असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही. विलायत खाँ यांचे १३ मार्च २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे

    प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.

    इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्‌. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

    ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्‌.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.

    १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.

    ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.

    संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.

    इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.

    समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.

    ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.

    ’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

    मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर

    सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली.

  • प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

    प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. मा.गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही.

    मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.

    गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मा.मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता.

    पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
    काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
    दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
    नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
    ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
    हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
    हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और

  • रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

    चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

    हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे.

    मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती.

    या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.
    "रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं.

    पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.

    संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

    हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मंदार जोशी

  • ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना

    गो. नि. दांडेकरांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगितिक वाटली. १९७९ सालचा ‘सिंहासन’ हा अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवरून काढलेला राजकीय विषयावरचा पहिला मराठी चित्रपट होता. राजकारणातल्या सशक्तांमधले सत्तेसाठी होणारे आपापसातले छुपे व उघड संघर्ष त्याचप्रमाणे त्यांनी अशक्तांचा टूल म्हणून केलेल्या खेळी हा सर्व भाग त्यात अतिशय समर्थपणे दाखवला होता.

  • धर्मवीर आनंद दिघे

    बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आनंद दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हते.

  • अभियंता अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफेल

    आयफेल टॉवर आपल्या निवासी इमारतीच्या ८१ मजल्या एवढा उंच (1,063 फूट, 324 मीटर) उंच आहे फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.त्यासाठी ७३०० टन लोखंडाचा वापर करण्यात आला.

  • नाट्य आणि संगीतातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व फय्याज शेख

    सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या मा.फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख.

    फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या सूरपूरवरून फय्याज यांचं कुटूंब सोलापूरला आलं. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्मल्या, वाढल्या. फय्याज यांचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकिरण प्रशालेत झालं. खरं तर लहानपणी फय्याजना गायिका किंवा अभिनेत्री असं काही बनायचं नव्हतं. सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न वगैरे करून संसार करायचा, असंच त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बाराव्या-तेराव्या वर्षी त्यांना मेळ्यात-कलापथकात काम करावं लागलं. गाण्याची-नृत्याचीआवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालीहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम गाण्यासाठी लावली; तर नृत्यासाठी मास्टर हसन (कथ्थक) आणि कट्टीबंधू (भरतनाटयम) यांच्याकडे पाठवलं.

    नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फय्याज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कुणाची सोलापुरात मैफल असली की, फय्याज यांचा जीव तुटायचा, पण तिकीटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत. एकदा शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानमळ हायस्कूलमध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफल मात्र दुरून का होईना, ऐकता आली. त्यांच्या जादूई सुरांनी फय्याज भारावून गेल्या. बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या बारा-तेराच्या वर्षीच त्या स्वत:लाच विचारू लागल्या.

    मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कलाराधना थांबवली; पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत, हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकले होते. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचे आणि मुंबईला जायचे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. फय्याज १९६५ साली मुंबईत आल्या तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल, असा होरा तर होताच; पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. मात्र, काम करायचे ते मनाला पटले तरच, हा पीळ मात्र फार लहानपणापासूनच त्यांच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना "गीत गायिले आसवांनी' या नाटकात पहिले काम मिळाले. त्यात फय्याज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. खरं तर मुस्लिम धर्मातील एक मुलगी नाटकात काम करते, हे तेव्हा फारसं रुचणारं नव्हतं, पण फय्याज यांनी मागे एका मुलाखतीत बोलताना संगितलं होतं की, त्यांना प्रवाहाविरुद्ध जायला आवडतं.

    म्हणूनच अनेक मर्यादा असूनही त्या अभिनायाच्या क्षेत्रात उतरल्या. ‘गीत गायले आसवांनी’ मध्ये त्यांनी मंझरची भूमिका केली होती. आपल्यात पहिल्याच नाटकात त्यांनी आपल्या आवाजाची अशी काही जादू दाखवली की, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं. फय्याज यांचे हे पहिलेच नाटक खूप गाजले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ आवाज यामुळे पहिल्याच नाटकात त्यांची विशेष दखल घेतली गेली. नाट्यसृष्टीत फय्याज यांचा प्रवेश झाला आणि पहिल्याच नाटकात हे वेगळे पाणी आहे, हेदेखील जणू त्यांच्या क्षेत्रातील मंडळींच्या लक्षात आले. त्याच वर्षीची मा.मोहन वाघ आणि मा.प्रभाकर पणशीकर यांनी एकत्रितपणे "मदनाची मंजिरी' या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातील मंजिरीची भूमिका फय्याज यांनी साकारली आणि मग हा यशाचा सिलसिला सुरू झाला. "अश्रूंची झाली फुले' मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या.

    याशिवाय "वीज म्हणाली धरतीला'मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. "तो मी नव्हेच', "मी मालक या देहाचा', "अंधार माझा सोबती', "कट्यार काळजात घुसली'ही "नाट्यसंपदे'ची आणि "पंडितराज जगन्नाथ', "मत्स्यगंधा', "संत गोरा कुंभार', "बावनखणी', "गुंतता हृदय हे', "सूर राहू दे' ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात "तो मी नव्हेच'चे हजार प्रयोग झाले होते. "अश्रूंची झाली फुले'चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर "कट्यार'चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. "कट्यार' हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता. "या नाटकाने आणि त्यातील दिग्गजांनी मला खूप काही शिकवले,' असे फय्याज सांगतात. ""गाणे किती गावे आणि कुठे संपवावे, हे अभिषेकीबुवांनी आम्हाला शिकवले. गाण्यातील भावना गळ्यात आणण्यासाठी ती भावना आठवायची आणि मग ते गळ्यातून व्यक्त करायचे, अशी बुवांची शिकवण होती. ती अंगीकारण्याचा मी कायमच जिवापाड प्रयत्न करायचे.''

    कोणतीही नवी गोष्ट शिकायची आणि ती स्वतःच्या शैलीत उतरवायची, अशी सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली. आज फय्याज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वेगळेपण रसिकांना जाणवते ते बहुधा त्यामुळेच. "वेट अंटिल डार्क' या चित्रपटावर बेतलेल्या "अंधार माझा सोबती' या नाटकात ज्योती या अंध मुलीची भूमिका फय्याज यांनी केली होती. फय्याज यांच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका. अभिनेत्री म्हणून या भूमिकेने त्यांना एक वेगळा आयाम दिला. या भूमिकेत फय्याज यांनी अक्षरशः जीव ओतला. भूमिका जगणे म्हणजे काय ते फय्याज यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आंधळ्या मुलीचे नेमके बेअरिंग यावे, तिचे जगणे कळावे यासाठी दिग्दर्शक कांती मडिया त्यांना रोज अंधशाळेत घेऊन जात. मग तिथून परतल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून अभिनय करवून घेत. ""हा सराव करत असताना मी कितीतरी वेळा धडपडले. मार लागला, गुडघे फुटले; पण त्यामुळेच ती भूमिका मी समरसून साकारू शकले,'' फय्याज सांगतात.

    "तो मी नव्हेच'मध्ये फय्याज यांनी साकारलेली चन्नक्का बघून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना "वटवट'मध्ये भूमिका दिली. ""या नाटकात नाट्यसंगीत होते, लावणी होती आणि पुलंबरोबर एक द्वंद्वगीतही होते. पुलंमुळेही "पॉझ' कसे घ्यायचे, "पंचेस' कसे घ्यायचे, अशा अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, त्यांची भर मी माझ्या पुढच्या प्रत्येक कामामध्ये घालत राहिले,'' असे फय्याज नोंदवतात. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मास्तर या उत्तुंग माणसांनी फय्याज यांना घडवले. वसंतराव त्यांना कौतुकाने आपली लाडकी शिष्याच म्हणत असत. इतरही अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मात्र कोणाचेही थेट अनुकरण करण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही.

    नाटयगीतांबरोबर गझल, ठुमरी, लावणी असा प्रवास केला. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' किंवा "चार होत्या पक्षिणी त्या' किंवा माडगूळकरांची "जोगिया' ही फय्याज यांची गाणी इतर दिग्गज गायिकांइतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशोक रानडे यांच्याबरोबर बैठकीची लावणी साजरा करण्यात त्यांचा सहभाग होता. प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते. बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकता आलं नाही, तरी ब-याच जणांकडून बरंच काही शिकल्याची कबुली त्या आजही न विसरता देतात.

    नृत्यकलाही जणू फय्याज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या "संत तुकाराम' आणि "होनाजी बाळा' या दोन नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते. त्यात फय्याज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, "ही मुलगी एवढे चांगले नृत्य करू शकते, तर ते सोडून ती गाण्यातच का गुंतून पडली आहे?' प्रत्येक काम त्या इतके जीव ओतून करायच्या, की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचे की फय्याज यांनी याच क्षेत्राला वाहून घेतले पाहिजे. दादा कोंडकेंबरोबर त्यांनी ‘विच्छा माझी पूर्ण करा’चे अडीचशे प्रयोग केले, तर ‘मित्र’मध्ये डॉ. श्रीराम लागूंबरोबर भूमिका केली. मा.फय्याज यांनी "महानंदा', "पैंजण', "एक उनाड दिवस', "वजीर' अशा काही वेगळ्या चित्रपटांमधूनही अभिनय केला.

    ऋषिकेश मुखर्जींच्या "सबसे बडा सुख' या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय "धरतीपुत्र', "चॉंद का टुकडा' अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. "शेष रात्री' या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम केले. इंग्रजीत स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ही भूमिका साकारली होती. "बावर्ची', "प्रेमपर्बत', "आलाप', "रंगबिरंगी' या हिंदी चित्रपटांसाठी मा.फय्याज यांनी पार्श्वगायनही केले. फय्याज यांना बोरीवली नाटय परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, ‘चंद्रलेखा’तर्फे दिला जाणारा शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, माणूस पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    श्री.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    फय्याज यांनी केलेली नाटकं आणि त्यातील त्यांच्या भूमिका
    गीत गायिले आसवांनी (मंझर), अंधार माझा सोबती (ज्योती), अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा), कटयार काळजात घुसली (झरीना), किनारा (जीजी), गुंतता हृदय हे (कल्याणी), संत गोरा कुंभार (संता), तो मी नव्हेच (चनक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार), पंडितराज जगन्नाथ (लवंगिका), पेइंग गेस्ट (सुनंदा), प्रीत राजहंसी (मेहजबीन), बावनखणी (चंद्रा), भटाला दिली ओसरी (नटी), मत्स्यगंधा (सत्यवती), मदनाची मंजिरी, मित्र (नर्स), मी मालक या देहाचा (सिस्टर), वटवट (अनेक भूमिका), वादळवारं (अम्मी), वीज म्हणाली धरतीला (जुलेखा), वेडयाचं घर उन्हात, संत तुकाराम (रंभा), सूर राहू दे, होनाजी बाळा (गुणवती).

  • जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान

    जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती.

    फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.

    ‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’ ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते.

    पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती.

    फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट