प्री -डिग्री ला शाम्या माझ्या सोबत होता . बी . एस सी . पर्यंत कॉलेजात हुंदडून एम .एस . सी साठी . औरंगाबाद ला गेला . त्यानंतर म्हणजे बारा पंधरा वर्षा नंतर भेटत आहे . माझा फोन नम्बर कसा मिळवला कोणास ठाऊक ? पण श्याम्या असले चमत्कार करू शकतो !
माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.
धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जाते आणि गुरू म्हणूनही ज्यांची कारकीर्द भरीव आहे, त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला.वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मदानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले. १९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जातो. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणतात्त, 'आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. 'इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.' मा.गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करतात. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची आहे. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात. ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ आहे. लय-तालाचा जाणीवपूर्वक वापर आहे. बोलबनावात खेचकाम आहे. बोल-बाँटची बांधणी वैविध्यपूर्ण आहे. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असते- संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेतात. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजते. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करतात. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गातात.
पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या आहेत, अजूनही गातात. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या आहेत. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटते, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले आहे. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलतात. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणतात की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही. गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. आजही त्या शिकवतात. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले आहे. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करताहेत. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जातो. आपल्या शिष्यांना त्या सांगतात घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे. त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या मा. शुभा जोशी, मा. धनश्री पंडित राय, मा.अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा जन्म ३ जानेवारी १८५३ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला. तथापि त्यांना चित्रकलेची आवड असल्यामुळे पाच वर्षानंतर शिक्षकाचा पेशा सोडून देऊन ते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आले व तेथे त्यांनी तैलचित्रकलेचे विशेष ज्ञान संपादन केले. पुढे बडोद्यास असताना बडोदे संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी अनेक तैलचित्रे तयार केली. त्यानंतर कोचीन येथे ते जवळजवळ २० वर्षे होते. तेथील वास्तव्यात त्यांनी केरळ कोकिळ हे मासिक काढले व २५ वर्षे ते चालवून तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली. पहिली पाच वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे. त्यातील पुस्तक-परीक्षणे, लोकोत्तर चमत्कारांचे कथन, कविता, कलमबहादुरांना शेला-पागोटे, कूटप्रश्न इ. आकर्षक सदरांमुळे ते त्या काळात फार लोकप्रिय होते.
भगवत गीते वर विविध वृत्तांत त्यांनी लिहिले. गीतापद्यमुक्ताहार (१८८४) हे आठल्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर तिसांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ या विषयांवरील लेखनाचे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. ते काव्यरचनाही करीत असत. सासरची पाठवणी (१९२३) आणि माहेरचे मूळ (१९२३) ही त्यांची काव्ये त्यांच्या काळात त्यातील प्रासंदिक रचनेमुळे लोकप्रिय झाली होती. त्यांची भाषाशैली आकर्षक व आलंकारिक होती. ‘महाराष्ट्रभाषा-चित्र-मयूर’ ही पदवी त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली होती.
‘केरळ कोकीळ’च्या जून १९००च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय. कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कृष्णाजी नारायण आठल्ये यांची प्रमाण ही कविता.
अतीकोपता कर्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.
त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला.
रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.
नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.
पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल विषेश गौरव करण्यात आला.
दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री
https://youtu.be/4wePRfs_uqU
https://youtu.be/u4Jp5nUbQQc
https://youtu.be/QPAT236XS5k
पं.यशवंत महाले नावाचं चैतन्यानं सळसळणारं झाड लखनौच्या विद्यानगरीत संपन्न झालं. १९७४ साली अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ गुरुबंधू पं. गिंडे यांचीही खास तालीम त्यांना मिळाली. गिंडे आणि पं.यशवंत महाले यांना अण्णासाहेबांच्या हृदयात मानसपुत्राचं स्थान होतं. अण्णासाहेब आणि नातू यांच्याकडून महालेंनी बंदिशी रचण्याची प्रेरणा घेतली. सुजनदास या टोपण नावानं त्यांनी विविध भावरंग चित्रित करणाऱ्या १४० बंदिशी बांधल्या.
संगीतकार म्ह्णून त्यांची कामगिरी महत्वाची म्हणावी लागेल कारण त्यांनी मराठी,कन्नड,हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील अनेक नाटकांना संगीत दिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘ घाशीराम कोतवाल ‘ या नाटकाला संगीत दिले त्याप्रकारच्या संगीताचा वापर आजही मराठी रंगभूमीवर केला जात आहे.
हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.
बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तर ची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला. दिल चाहता है या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरूणाईला वेड लावले.त्यातील गाणी, तरूणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरूणाईला तोंडपाठ झाले. वेग व वेळेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरूणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप. हे सगळं टिपून ते फरहानने दिल चाहता है मध्ये दाखवलं.तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणले.
चाळीशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरूण ही एरवी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता.पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या 'लक्ष्य' या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरूणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला 'डॉन' या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti