(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • भारताचे विख्यात ऑफस्पिनर श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन

    रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (६३७) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी ५३० विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (१५६०) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी १३९० विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते.

  • ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर

    नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले.

  • भयकथा लेखक नारायण गोपाळ धारप

    अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे नारायण धारपांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.

  • महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल

    देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

  • नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले.

  • जेष्ठ कलाकार बलराज साहनी

    त्यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी. त्यांचा जन्म १ मे १९१३ रोजी पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा येथे एका पंजाबी खत्री कुटूंबात झाला होता. बलराज साहनी यांनी लाहोरच्या लाहोर विद्यापीठामध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबीक व्यवसायात व्यतित केला. पुढे १९३० साली ते पत्नी दमयंती सह रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. मा.बलराज साहनी हे काही काळ ‘शांतिनिकेतन’मध्ये प्राध्यापक होते. शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या ‘आर्म्स अँड मॅन’ मध्ये काम केले. 'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते. १९३८ साली महात्मा गांधींसोबत कार्य केल्यानंतर ते लंडन येथील बी.बी.सी. च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बी.बी.सी मध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले. बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली. बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे.

    देव आनंद अभिनीत ‘बाजी’ चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या ‘हकीकत’ मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या ‘हम लोग’ च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगीत्नाने आठवणीत राहीला. ‘काबुलीवाला’ मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. बलराज साहनी यांचे अजूनही ‘वक्त’ मधील गाणे ‘ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां.’ लक्षात आहे.. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत.

    बलराज साहनी यांचे ‘गरम कोट’, ‘सट्टा बाजार’, ‘सीमा’, ‘लाजवंती’, आणि ‘गर्म हवा’ अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा ‘गर्म हवा’ फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता. मा.बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत. पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन‘, अमिया चक्रवर्ती यांचा "सीमा‘, राजेंद्रसिंह बेदी यांच्या "गरम कोट‘ या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा "काबुलीवाला‘, यश चोप्रा यांचा "वक्त‘ यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा "गरम हवा‘ या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक ‘क्या यह सच है बापू’ लिहिले. मात्र हे ‘अर्श-फर्श’ च्या नावाने सादर करण्यात आले. बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • साहित्यिक बाबूराव रामजी बागुल

    बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं.

  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

    आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.

    अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.

    नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.

    महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

    ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    त्यांची गाजलेली नाटके
    रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.

    गाजलेले चित्रपट
    एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.

  • प्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी

    जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम यांच्या बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारा...साहिर लुधियानवी हे आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.

    साहिर लुधियानवी यांचे अब्दुल हयी हे मूळ नांव. ‘लुधियाना येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात त्यांचा ८ मार्च १९२१ रोजी जन्म झाला. त्यांची मातृभाषा पंजाबी; त्यांनी ' साहिर लुधियानवी/ या टोपणनावाने उर्दू व हिंदी भाषांत गीतलेखन केले. त्यांचे वडील फाझल मुहम्मद हे इंग्रज राज्यकर्त्यांशी पूर्ण निष्ठा बाळगून होते; त्यांचा स्वभाव विलासी व स्वछंदी होता. साहिरांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. ती अत्यंत स्वाभिमानी होती. आपल्या पतीची जीवनशैली तिला मान्य नव्हती.

    पतिपत्नीमधील ताणतणाव अखेर विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. ह्या घटनांचा व तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणाचा साहिरांच्या मनावर खोल विपरीत परिणाम झाला आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिला. आर्थिक विवंचना, सततचे भय व दु:ख अशा वातावरणात साहिरांची जडणघडण झाली. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिर यांनी स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.

    साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग साहिर मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेकडो गीते त्यांनी लिहिली. त्यांपैकी प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो(१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. ताजमहाल चित्रपटातील ‘जो वादा किया’ या गीतासाठी १९६४ मध्ये आणि कभी कभी चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गीतासाठी १९७७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दोन वेळा ‘फिल्मफेअर’चे पुरस्कार मिळाले.

    गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर! अमृता प्रीतम 'साहिरने ओढलेल्या' सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की 'आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार'!

    गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. भारत सरकारने साहिर यांना पद्मश्री देऊन सन्मान केला. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. मा.साहिर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी लेखक, कोशकार लक्ष्मण शास्त्री जोशी

    लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार' अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली `तर्कतीर्थ' ही पदवी!

    हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले. त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत, त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या २९व्या वर्षी, म्हणजे १९३२ साली त्यांना तुरुंगात जावं लागलं. या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. चारही वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते, तेव्हा तर्कतीर्थांचा विनोबाजींबरोबरचा सहवास वाढला. विनोबाजींनी त्यांना इंग्रजी शिकविले. त्याच दरम्यान एक घटना घडली. महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा सी. राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल) यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता. पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध होता. हा पेच सोडविण्यासाठी तर्कतीर्थांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुणूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले. त्यामुळे गांधीजींनी खूश होऊन त्यांनाच लठाचे विधी करण्याचा मान दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.

    १९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला. १९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी `विश्वकोषा'ची निर्मिती, तर दुसरा `धर्मकोषा'ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. `विश्वकोष' आणि `धर्मकोष' यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.

    `शुद्धिसर्वस्वम्' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी `धर्ममोक्ष' या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. `हिंदू धर्माची समीक्षा', `वैदिक संस्कृतीचा विकास', `आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा', इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली `पद्मभूषण', तर १९९२ साली `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट