एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्याी दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या होत्या. मा.सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता. संवेदनशील मनाच्या मा.दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती.
दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता.
श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे तालीम घेतली होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते. तसेच या महोत्सवात अनेकदा त्यांनी आपली गायकी सादर केली होती. ते पुणे विद्यापीठाच्या डॉक्टसरेटसाठीच्या (संगीत विषय) प्रवेश समितीवर सन्माननीय सदस्य होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.
भारतातून अनेक संगीत परिषदांमधून श्रीकांत देशपांडे यांचे गायन झाले. तसेच रागमाला परफॉर्मिग आर्टस् ऑफ कॅनडा आणि इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनच्या वतीने अमेरिकेसह कॅनडामध्ये त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाविदेशात गायनाच्या अनेक मैफली केल्या होत्या. सवाई गंधर्वसंमेलन, तानसेन समारोह, गुणीदास संमेलन, दीनानाथ मंगेशकर संमेलन, सूरश्री केसरबाई संमेलनातही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते. श्रीकांत देशपांडे यांचे २९ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी .जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.
वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.
दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले.
लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत.
कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला.
भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट (पुरुष) पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीत शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.
मूळचे अमरावतीचे असलेले बापू लिमये यांनी गेली सहा दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरी निमित्तच ते अमरावतीहून मुंबईला आले. त्यानंतर ते कल्याणमध्ये स्थायिक झाले.
साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले. १९६० ते १९७५ ह्या काळात त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून आपला ठसा उमटवला. हा काळ मराठीतील राज्य नाट्य स्पर्धांचा बहराचा काळ होता. याच काळात हौशी रंगभूमीवर अनेकानेक प्रयोग झाले आणि प्रायोगिक रंगभूमीने बाळसे घेतले.
जेव्हा डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले. ‘गिधाडे’ या नाटकाने त्यांना नेपथ्यकार म्हणून ओळखले जावू लागले. त्यांनी ‘चक्रावर्त’, ‘गार्बो’, ‘आर्य चाणक्य’ या नाटकांना केलेले नेपथ्य असेच वेगळे ठरले. त्यांनी बाळ कोल्हटकरांच्याही नाटकांचे नेपथ्य केले. ‘सविता दामोदर परांजपे’ ह्या व्यावसायिक नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची त्यांनी दोन अंकी रंगावृत्ती तयार केली होती.
ते जिथे नोकरी करत त्या मध्य रेल्वेतील कलाकारांसाठी कल्चरल अकादमीची त्यांनी स्थापना केली. नाटककार विजय तेंडूलकर यांच्या नाटकाच्या आवडीबरोबरच त्यांनी लिखाणमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या डोक्यात कायम रंगभूमीचा विचार असायचा आणि कृतीत अखंड प्रयोगशीलतेचा ध्यास असायचा. ते हाडाचे नेपथ्यकार होते आणि त्यांनी ‘नेपथ्याची बखर’ नावाचे पुस्तकच लिहिले होते, ज्यात मराठी रंगभूमीवरील गेल्या १५० वर्षांतील नेपथ्याच्या वाटचालीचा इत्थंभूत इतिहास होता. बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले.
अनेक नाट्यप्रशिक्षण कार्यशाळांमधून त्यांनी ह्या तंत्रमंत्राचे धडे दिले. आणि शिवचरित्रकार डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातील निवडक विषयांवर समीक्षा लेखन केले. या बरोबरच बापू लिमये उवाच, हा निबंध संग्रह, समीक्षा, लेख संग्रह त्यांनी लिहिले. विद्यार्थ्यांसाठी ‘विचारसूत्र’ लिहिली. ते मध्य रेल्वेच्या कल्चरल अकादमीचे संस्थापक होते. हौशी रंगमंच संघटनेचे ते माजी अध्यक्ष, रंगमंच कलाकार संघटनेचे ते माजी अध्यक्ष, कार्यकर्ते होते. त्यांनी ९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.
आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती
हृषिकेश मुखर्जी... भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि 'आनंद', 'अभिमान', 'गोलमाल', 'बावर्ची', 'खुबसुरत' अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे.
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन 'आनंद' केला.
दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.
हृषिकेश मुकर्जी यांचे २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला. भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.
नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका मा. भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले.
पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे.
भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले. ५०च्या शतकात मरगळ आलेल्या मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणी’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला.
नाटक नुसते आणले नाहीत तर ती गाजवून दाखवली. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली.
भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली काही गीते
https://www.youtube.com/watch?v=PQwQQzUI4hw
आई तुझी आठवण येते
घनश्याम मुरली
जय जय कुंजविहारी
जय जय रमारमण श्रीरंग
तू जपून टाक पाऊल जरा
नयन तुझे जादुगार
मदनाची मंजिरी साजिरी
सप्तचसूर झंकारित बोले
Copyright © 2025 | Marathisrushti