(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • एका कलाकाराची छबी

    मिशी ठेवणार्‍या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला.  तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या  हॉलीवुडपटात  उत्कृष्ट  दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द  नटासोबत  काम  करून त्याने  आपली  भूमिका  अजरामर  केली.  हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.

  • ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकार स्नेहल भाटकर

    स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
    केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.
    नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. मा. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- प्रमोद देव

  • संगीतकार व गायक शंकर महादेवन

    प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.

    भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.

    केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.

    १९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ नाट्यकर्मी व नाटककार सत्यदेव दुबे

    सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. लहानपणी त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. ते उत्तर आयुष्यातही स्वत:ला संघाचे खंदे समर्थक होते. केवळ रंगभूमीचा ध्यास घेतलेले सत्यदेव दुबे हे कडवा हिंदुत्ववादी होते. ते १९५२ साली मुंबईला आले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे मुंबईतील आणि भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. दुबे यांनी रंगभूमीवरील फार मोठा काळ बघितला. त्यांनी सुरुवातीची वर्षे अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये काढली. त्यांना या संस्थेत विजय आनंद घेऊन गेला होता.

    दुबेंना रंगभूमीवरील जादू आवडली आणि बघता बघता ते नाटय़कर्मी झाले. त्यांनी काही काळ लिंटास या तेव्हाच्या प्रख्यात जाहिरात संस्थेत नोकरी केली होती. हा छोटासा काळ सोडला तर ते नेहमी रंगभूमीशी संबंधित राहिले. धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ हे नभोनाटय़ दुबे यांनी १९६२ साली रंगभूमीवर आणले. या नाटकाने त्यांना भरपूर नाव मिळवून दिले. दुसरे प्रकरण सुरू होते ते दुबे यांनी या नाटकाबद्दल लिहिलेल्या लेखाने. दुबे यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की हे नाटक १९६२ साली रंगभूमीवर येणे याला महत्त्व होते. देशावर चीनचे आक्रमण झालेले होते. दुबेंच्या प्रयत्नांमुळे हे नाटक जगभर गेले. विनोद दोशी या उद्योगपतींनी दुबेंना ताडदेव येथील वालचंद टेरेस या इमारतीचा तळमजला नाटके करण्यासाठी दिला. यामुळे दुबेंच्या आयुष्याची दिशा पक्की झाली. येथे दुबेंनी सुमारे चार वर्षे नाटके केली. १९८० च्या दशकात छबिलदास चळवळ जोरात होती. त्यात दुबेंचा सिंहाचा वाटा होता.

    या काळातील दुबेंचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘हयवदन’. पौल यांना दिलेल्या मुलाखतीत दुबे नमूद करतात की, त्या काळी स्त्रीच्या भावविश्वाबद्दल लिहिण्याची एक लाट आली होती. ‘हयवदन’च्या आगेमागे ‘आधेअधुरे’ आले, त्याचप्रमाणे सुरेंद्र वर्माचे ‘द्रौपदी’ आले. दुबेंच्या मते ‘हयवदन’मध्ये स्त्रीच्या वासनेबद्दल जी भूमिका घेतली, ती खूप वेगळी होती. दुबेंचे १९९० च्या दशकातील बरेचसे काम पृथ्वी थिएटरमध्ये झाले. सुमारे पन्नास वर्षे दुबे भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. या दरम्यान त्यांनी सुमारे पन्नास नाटके सादर केली. या दरम्यान ते पूर्ण वेळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन केले, नाटकांची भाषांतरे केली, प्रसंगी नाटकात भूमिका केल्या. मुख्य म्हणजे तरुण रंगकर्मीसाठी वेळोवेळी कार्यशाळा घेतल्या. आज भारतीय रंगभूमीवर कदाचित असा एकही महत्त्वाचा नट नसेल, जो कधी ना कधी दुबेंजींच्या सहवासात आला नसेल. ते अविवाहित होते. त्यांचे असंख्य शिष्यगण हेच त्यांचे गणगोत होते. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, अमरीश पुरी, यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. मराठीत अमरिश भंडारी, मोहन भंडारी, चेतन दातार, किशोर कदम, सचित पाटील, ऋषिकेश जोशी या अभिनेत्यांबरोबरच महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, राजीव नाईक, शफाअत खान, चेतन दातार, संदेश कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी आदी नाटककारांना त्यांनी घडविले.

    त्यांनी मराठी-हिंदी-गुजराती रंगभूमीबरोबरच बंगाली रंगभूमीसाठीही काम केले. श्याम बेनेगल यांच्या 'भूमिका','निशांत', 'अंकुर', 'कलयुग' चित्रपटाचे पटकथा व संवादलेखनही त्यांनी केले होते. १९७८ साली सत्यदेव दुबे यांना भूमिका चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व १९८० साली जुनून चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘अंधा युग’, ‘आधे अधुरे’, ‘ययाती’, ‘संभोग से सन्यास तक’, ‘एवम् इंद्रजित’, ‘अंधारयात्रा’, ‘हयवदन’, ‘पगला घोडा’, ‘रस्ते’, ‘गिधाडे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘नाणेफेक’ यासारख्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले होते.

    निर्मिती करण्याबरोबरच चेतन दातारकडून ‘सावल्या’ हे नाटक लिहून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्यदेव दुबे यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९७२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९९९ साली कालिदास सन्मान, २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संगीत नाटक अकादमीनेही गौरवले. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा ‘सत्यदेव दुबे : ए फिफ्टी इअर्स जर्नी थ्रू थिएटर’ हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो. शांता गोखले यांनी या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिल्या भागात १९६० च्या दशकाची चर्चा आहे. यालाच ‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ुटचा काळ ’असे म्हणतात.

    त्यानंतर दुसरा भाग आहे १९७० च्या दशकाबद्दल. याला ‘वालचंद टेरेसचा काळ’ असे म्हणतात. तिसरा भाग ‘छबीलदास चळवळी’चा, जी १९८० च्या दशकात बहरून आली होती. चौथ्या भागात, १९९० च्या दशकात पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंजी केलेल्या कामाची चर्चा आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंच्या कामाचे प्रदर्शन व चर्चासत्रे असा कार्यक्रम आयोजित केला होता. याची चर्चा पाचव्या भागात आहे. या प्रकारे या पुस्तकात दुबेजींच्या पन्नास वर्षाच्या कामाचा आढावा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चिकित्सा, त्यांच्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल टीका असा भरगच्च मजकूर आणि निवडक छायाचित्रे आहेत. सत्यदेव दुबे यांचे २५ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • कवी अरुण म्हात्रे

    अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य.

  • सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावणारे ओटो विक्टरले

    ओटो हे स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.

  • भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

    ५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.

  • सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय

    साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले.

  • लेखक आणि पटकथालेखक य. गो. जोशी

    जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती.

  • मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

    सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील 'गझल सम्राट' सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात.

    सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. विदर्भातील अमरावती या शहरात सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

    हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे सुरेश भट असे वर्णन सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

    सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश भट नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8
    रंग माझा वेगळा
    https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
    https://www.youtube.com/watch…