(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

    नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

    अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे.

    'नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद' असं समीकरणच होऊन बसलं. रंगभूमीवर ३००० पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले यांनी केलेला होता. १९३९ साली न.चि.केळकर अनंत दामले यांचे 'कृष्णार्जुन युद्ध' या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते. त्यांना मनापासून असे वाटले की अनंत बापू पेंढारकरांसारखाच बोलतो व गातो. बापू पेंढारकर हे अनंत दामले यांचे गुरू होते.

    १९४० ला ऑपेरा हाऊसला 'सत्तेचे गुलाम' या नाटकाचा प्रयोग एका संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. या प्रयोगाच्या वेळी अ.ह.गद्रे यानी स्वा.सावरकरांच्या हस्ते अनंत दामले यांना "नूतन पेंढारकर"ही पदवी देऊ केली आणि सावरकर अनंत दामले यांच्या कानात हळूच म्हणालेही, "पदवी मिळविणे सोपे असते पण टिकविणे कठीण असते बर!". पुण्यातील 'भारत गायन समाज' हे अनंत दामले यांचे श्रद्धास्थान होते.

    अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. अनंत दामले यांचे ९ ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • विनोदी अभिनेत्री सुप्रिया पाठारे

    ‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.

  • नाद करायचा नाय – माया खुटेगावकर

    माया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली…
    अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं.

    लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.

    छाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.

    छाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.

    पारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

    मायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’

    माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

  • गझल गायिका पिनाज मसानी

    डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.

    'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मोहम्मद अझिज यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
    https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA

  • मजरुह सुलतानपुरी

    आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्याात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्या. आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्यां कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याय शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’

    (हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम),
    ‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी.

    आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली.अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता) मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. प्रत्यक्ष आयुष्यात ते नौशाद यांचे व्याही होते, पण सिनेमाच्या सुवर्णयुगात या दोघांनी एकत्र काम केलेच नाही. अंदाज (१९९४) नंतर तब्बल २० वर्षांनी साथी (१९६९) मध्ये ते एकत्र आले. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणार्याब मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे पहिला गीतकार! मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मजरुह सुलतानपुरी यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=-I30pxUvaX0
    https://www.youtube.com/watch?v=due-RD_qP9o

  • शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर

    करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील ‘करमरकर शिल्पालया’ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते.

  • रति अग्निहोत्री

    रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा"एक दुजे के लिए'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला. रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली.

    रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती.

    अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड मध्ये प्रवेश केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सॅल्युलाईड मॅनचे जनक दिग्दर्शक पी. के. नायर

    चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि 'सॅल्युलाईड मॅन' अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला.

    परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर यांचे तिरूअनंतपुरम येथेच शालेय आणि उच्च शिक्षण देखील झाले. मोठे होत असताना, त्यांच्यावर तमिळ भाषेमधील पौराणिक चित्रपटांचा विशेष पगडा होता आणि तेंव्हापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी केरळ विद्यापीठातून पदवी मिळवली, पण त्यांचे सर्व लक्ष मात्र चित्रपटांकडे होते आणि शेवटी १९५३ साली, ते केरळमधील सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि त्यांचा एक अनोखा प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे नायर यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून, त्या काळी काम केले आहे. नावेच घ्यायची झाली, तर बिमल रॉय किंवा मेहबूब खान, तसेच ऋषिकेश मुखर्जी आणि अजून अनेक मान्यवर दिग्दर्शक. पण त्यांना चित्रपट बनवण्याची कला शिकताना हे उमजले, की ते चांगले दिग्दर्शक कदाचित होऊ शकणार नाही. त्यासाठी लागणारे कौशल्य किंवा प्रतिभा त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच १९६१ साली त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय) येथे रिसर्च असिस्टंट हे पद स्वीकारले. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया संग्रहालयाची सुरुवात देखील याच संस्थेतून झाली. १९६४ साली संग्रहालयाची स्थापना झाली आणि त्यानंतरच नायर यांची नेमणूक असिस्टंट क्युरेटर म्हणून तिथे करण्यात आली. नायर यांना ‘प्रभात फिल्म कंपनी’, ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि ‘जेमिनी स्टुडियो’ने बनविलेल्या चित्रपटांच्या संग्रहाचा खूप अभिमान होता. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक, हे त्यांचे खास मित्र होते आणि त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट आज चित्रपट संग्रहालयात शाबूत आहेत. ऋत्विक घटकांची ‘मेघे ढाका तारा’ त्यांना नायर यांना खूप आवडायची.

    नायर यांनी शून्यातून हे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी जवळपास १२००० चित्रपट संग्रहित केले आणि त्यामधील तब्बल ८००० चित्रपट भारतीय आहेत. जुन्या चित्रफिती, भारताच्या काना कोपऱ्यातून शोधणे आणि त्यांचे संवर्धन करून त्या कायमच्या संग्रहित करणे, या कामाने नायर झपाटलेले होते. त्यांनी अनेक जुने, हरवलेले असे चित्रपट मिळविले आणि शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संवर्धन केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.

    २०१२ साली शिवेंद्रसिंग डुंगरपुर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने नायर यांच्या आयुष्यावर एक माहितीपट बनविला आणि तो म्हणजे ‘सेल्युलॉईड मॅन’. या माहितीपटाने नायर यांचे आयुष्य पूर्णतः उलगडले आणि त्यांच्या कामाचे महत्व लोकांसमोर आणले. या माहितीपटाला २ राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हा माहितीपट बनवला गेला नसता, तर खूपच कमी जणांना नायर यांच्या कामाची माहिती आणि महत्व कळाले असते. ‘सेल्युलॉईड मॅन’ने नायर यांचे आयुष्यच संग्रहित केले आहे. नायर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. पी. के. नायर हे पुण्यातील आशय फिल्म क्लबचे अध्यक्षही राहिले होते.

    पी. के. नायर यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

    चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

    हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे.

    मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती.

    या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.
    "रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं.

    पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.

    संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

    हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मंदार जोशी