(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोल्डन व्हॉइसच्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले

    नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.

      September 26, 2019


  • ज्येष्ठ उद्योगपती व महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा

    आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली होती. 

      April 30, 2022


  • जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास

    भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वामस या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. त्यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बंगालमधील बरिसाल येथे झाला.

    अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वाास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. ते स्वतः उत्तम गायक होते, संगीतकार तर होतेच, पण एक अभिनयाची जाण असलेले उत्तम अभिनेताही होते. तसंच ते तबला अतिशय उत्कृष्ट वाजवत.

    अनिल विश्वास यांच्यामध्ये संगीताची गोडी त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. वयाच्या चवथ्या वर्षांपासून ते गायला लागले. त्यांची आई यामिनीदेवीचा आवाज खूपच सुरेल होता. ती स्वतः संगीतरचनाही करत असे. अनिल विश्वास यांचे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला संगीत शिकण्याची मोकळीक दिली होती. याच कारणानं घरात नेहमी संगीतमय वातावरण असे. अशा वातावरणात अनिल विश्वास संगीताकडे ओढले जाणार नाहीत तर नवलच! आईनं लावलेला हाच संगीताचा वेलु पुढे बहरणार होता. एखादी रचना एकदा कानावर पडली, की ती जशीच्या तशी त्यांना पुन्हा गाता येत असे. त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. कुठलीही गोष्ट ते क्षणात आत्मसात करत. त्यामुळे आसपासचे लोक अवाक् होत आणि त्यांना ‘श्रुतीधर’ म्हणत.

    संगीत शिकताना पुढे आईशिवाय अनिल विश्वास यांना कालीप्रसन्न नट आणि लालमोहन गोस्वामी हे दोन गुरू मिळाले. पुढे त्यांनी महफिलींमध्ये गायला सुरुवात केली. पण गायकापेक्षा त्यांची ओळख संगीतकार म्हणून होत गेली. अनिल विश्वास यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. संगीताची समग्र समज त्यांना होती. बरिसालमध्ये त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि कलकत्यामध्ये ती अधिक परिपक्व होत गेली. बरिसालप्रमाणेच कलकत्यातल्या महफिलींमध्ये अनिल विश्वास नसतील, तर ती महफिल अधुरी वाटे.

    अनिल विश्वास यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाएकाचं शिष्यत्व त्यांनी कधीच पत्करलं नाही. एका साच्यात त्यांनी स्वतःला कधी ठेवलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. ज्या कोणाकडून शिकायला मिळेल, तिथून ते शिकत. अगदी वेश्या, नाचणार्यां च्या कोठ्यावर देखील त्यांची पावलं संगीत ऐकण्यासाठी वळली. संगीतक्षेत्रातल्या संधी त्यांच्यासमोर येत गेल्या आणि ते स्वीकारत गेले. अनिल विश्र्वास कविताही करत. वयाच्या १४ व्या वर्षापासून ते संगीत समारोहात गात असत.

    वयाच्या १६ व्या वर्षी त्या वेळचे कलकत्त्यामधले थोर बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडे आश्रय घेतला. पन्नालाल घोष यांचा विवाह अनिल विश्वास यांची बहीण पारोल घोष हिच्यासोबत झाला होता. अनेक दिवस त्यांनी शिकवण्या घेतल्या. तसंच मेगा फोन रेकॉर्ड कंपनीत त्यांनी काम केलं. १९३० मध्ये अनिल विश्वादस कलकत्यातल्या रंगमहल थिएटरबरोबर अभिनेता, गायक सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला लागले. रंगमहल थिएटर हे कलकत्यामधलं सर्वश्रेष्ठ असं थिएटर होतं. कलकत्यामध्ये एक निहार नावाची वेश्या होती, तिला ते बहीण मानत. ती त्यांना रंगमहल थिएटरमध्ये घेऊन गेली आणि इथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. इथूनच त्यांच्यातला गायक, संगीतकार, कवी, अभिनेता बहरत गेला आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.

    संगीतक्षेत्रात लोक त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेऊ लागले. त्याच वेळी ते हिंदूस्थान रेकॉर्डिंग कंपनीबरोबरही जोडले गेले. तिथेच त्यांची कुंदनलाल सहगल आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर भेट झाली. अनिल विश्वास व लता मंगेशकर हे एक समीकरणच होतं. १९४७ नंतर, लता मंगेशकर यांच्या आवाजाने अनिल विश्वास यांच्या संगीतात मुक्त संचार केला. ‘प्रीतम तेरा मेरा प्यार’ (गजरे), ‘याद रखना चाँद तारो’ (अनोखा प्यार), ‘मन में किसी की प्रीत बसले’ (आराम, ‘आए थे धडकन लेकर दिल में’ व ‘इस हंसती गाती दुनिया में’ (लाजवाब), ‘हंसले गाले ओ चाँद मेरे’ व ‘मस्त पवन है चंचल धारा’ (जीत), ‘क ैसे कह दूँ बजरिया के बीच’ (लाडली), ‘मोसे रूठ गयो मेरा सांवरिया,’ व ‘बेईमान तोरे नैनवा (तराना), ‘जा मैं तोसे नाही बोलूं’ (सौतेला भाई) इत्यादींसारखी अनेक हृदयस्पश्री गीतं अनिल विश्र्वास श्रेष्ठत्व ठरविण्यास पुरेशी ठरतात.

    भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा अतिशय कुशल प्रयोग त्यांनी चित्रपटसंगीतात केला आणि भारतीय चित्रपटसंगीताला एक दर्जेदार संगीताचा मान मिळवून दिला. त्यांना ऑकेस्ट्राचं जे वेड होतं, त्यामुळेच त्यांनी बॅले संगीतावर उल्लेखनीय काम केलं. त्यांनी उर्दु गजलांचा अनुवाद बंगाली भाषेत केला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीताच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९३१ बोलपटांचा जमाना सुरू झाल्यानंतर, चित्रपट संगीताला नवी दिशा देणार्‍या त्यातही, शास्त्रीय व लोकसंगीताचा सुरेख वापर वेळोवेळी करणार्‍या अनिल विश्वास यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीत जवळपास ९५ चित्रपटांना उत्तम संगीत दिलं.

    मिलन, ज्वारभाटा, लाडली, अरमान, अनोखा प्यार, आरजू, छोटी छोटी बाते, सौतेला भाई या चित्रपटांचं संगीत अजरामर आहे. अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुकेश, तलत महेमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मीना कपूर आणि अमीरबाई कर्नाटकीसारख्या एकूण ७६ गायकांनी गाणी गायली. नाट्यसंगीत आणि भक्तीसंगीताचीच त्या वेळी मक्तेदारी होती, अशा वातावरणात ती चौकट भेदून अनिल विश्वास यांनी संगीताला खरं भारतीय व्यक्तित्व दिलं. अखिल भारतीय स्तरावर संगीताला वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातून निवृत्ती घेउन अनिल विश्वास दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. तिथे त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत काम केलं. १९८६ साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवलं गेलं. या काळात एक नॅशनल ऑर्केस्ट्रा बनवण्याच्या विचारानं त्यांना झपाटलं होतं. पण थंड सरकारी यंत्रणेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं ती योजना तशीच बारगळली.

    दिल्ली आकाशवाणी वर अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मां यांच्या रचना मन्नाडेंच्या आवाजात गाऊन घेतल्या. त्यातली ‘नाच रे मयुरा’ ही शास्त्रीय बंदिश इतकी श्रवणीय आहे की त्या काळी ती खूपच गाजली होती. ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातही संगीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी संगीताचे वर्गही चालवले. हम लोग’, बैसाखी’, ‘फिर वही तलाश’ सारख्या उत्कृष्ट टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं.

    ‘हम लोग’चं शीर्षक गीत आजही सगळ्यांना आठवत असेल, आईए हाथ उठाये हम भी’ या ओळींची रचना केली होती फैज यांनी. या एक ओळीला दिलेलं संगीत आणि त्यामागचा कोरस आजही विसरता येत नाही. तसंच अनिल विश्वास यांनी ‘गजलेर रंग’ हे गजलवर आधारित बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिलं.

    ‘गजल’ या विषयावरचं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. अनिल विश्वांस यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना सन्मानित केलंच, पण मध्यप्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं. अनिल विश्वास यांचे ३१ मे २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 1, 2018


  • गायक महेश काळे

    शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.

    वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.

    दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले.

    लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत.

    कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला.

    भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट (पुरुष) पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 12, 2018


  • गीतकार शांताराम नांदगावकर

    "हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.

    मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

    शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती.

    अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.

    एक आठवण नांदगावकरांची.
    १९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.

    ‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले.

    क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया

    शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
    पहिले ना मी तुला
    रजनीगंधा
    रुपेळी वाळूत
    हरी नाम मुखी रंगते
    श्रीरंग सावळा तु

      November 1, 2017


  • ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस

    रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.

    नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.

    मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.

    ४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 6, 2017


  • जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन

    सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.

      July 4, 2021


  • पटकथाकार ग. रा. कामत

    ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

      March 13, 2022


  • मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

    कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा!

    महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.

    यशवंतांनी म्हटले होते : 'एज डजंट मॅटर. नो. यू आर नॉट टू यंग; पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ' पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.

    हे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, 'दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ' असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.
    कवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता.
    कवी दत्त म्हटले की आठवते ती 'बा नीज गडे' ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.

    कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत. मा.दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप कुलकर्णी

    दत्त यांची कविता
    .......................................
    निज नीज माझ्या बाळा (ही रचना १८९७ मधील आहे.)
    .......................................
    बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
    निज नीज माझ्या बाळा

    रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
    अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
    बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।ध्रृ।।
    खडबड हे उंदिर करिती ।
    कण शोधायाते फिरती ।
    परी अंती निराश होती ।
    लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। ध्रृ ।।
    बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
    त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
    हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
    हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
    वाहतो फटींतून वारा ।
    सुकवीतो अश्रूधारा ।
    तुज नीज म्हण सुकुमारा ।
    हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
    जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
    तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
    तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
    दारिद्य्र चोरिल कोण? ।
    आकाशा पाडिल कोण? ।
    दिग्वसना फाडिल कोण? ।
    त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
    तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
    तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
    या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
    तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
    तरी सोडुं नको सत्याला ।
    धन अक्षय तेच जिवाला ।
    भावें मज दीनदयाळा ।
    मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।

      June 27, 2017


  • मराठी चित्रपट-अभिनेते विष्णूपंत जोग

    चि. वि. जोशी यांच्या गुंड्याभाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिध्द नट विष्णूपंत जोग चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती.

    दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. पहिली मंगळागौर (लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट), सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा, हे चित्रपट व नाटक झाले जन्माचे हे नाटक ह्या मा.विष्णूपंत जोग यांच्या गाजलेल्या कलाकृती होत.

    'मी गुंड्याभाऊ हे विष्णूपंत जोग यांचे आत्मचरित्र डॉ. मंदा खांडगे यांनी शब्दांकित केले आहे.

    विष्णूपंत जोग यांचे २२ जून १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      June 27, 2017