(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ

    इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.

    शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.

    शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वॉल्टर एलिआस डिस्नी

    अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

    ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

    ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

    मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

    वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

    मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

    वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

    लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
    वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री मृणाल दुसानिस

    तिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.

  • रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

    चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

    हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.

    "रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.

    संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
    हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मंदार जोशी /विकिपिडीया

  • विनय आपटे

    आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.

    अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.

    विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.

    ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    त्यांची गाजलेली नाटके
    रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.

    गाजलेले चित्रपट
    एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.

  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

  • लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

    शरद पिळगावकर यांचे गाव 'पिळगाव'. शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं.

    'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,'अपराध मीच केला' हे नाटक शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता 'कमांडर नानावटी खटला'.

    सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट. सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संशोधक, समीक्षक डॉ. सखाराम गंगाधर मालशे

    एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणार्‍या डॉ.मालशे यांनी फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते.

  • लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे

    गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील "आरवली" हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली.... गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात.... एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा एक "मोदक" या गावात जन्माला आला.... आता गरम पाण्यात अंघोळ न करता आपल्या अजोड सुरेल गळ्यांने सुरांची बरसात करुन रसिकांना न्हाऊ घालणारा प्रथमेश उमेश लघाटे याच गावात २९ सप्टेंबर १९९४ साली जन्माला आला.....!!

    सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पुर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने ऊपलब्ध नव्हती.... तेंव्हा या गावातील ब्राह्मण वाडीतील ३०/३५ घरातील मंडळी रात्री गप्पा मारणे, पत्ते खेळण्यासाठी एकत्र जमा व्हायचे. या एकत्र येण्यातुनच कै. विष्णू विनायक लघाटे यांनी भजनाची संकल्पना मांडली.... आणि दर गुरुवारची भजन परंपरा सुरु झाली. साल होते १९२५!!! आजपर्यंत हि परंपरा यशस्वीपणे सुरु आहे. ह्या भजन परंपरेतुनच महाराष्ट्राला एक ऊमदा गायक मिळेल ह्याची ह्या भजनी मंडळींना स्वप्नात देखील कल्पना आली नसेल. ह्या परंपरेतुन प्रथमेशला बालपणीच गायनाची गोडी लागली. प्रथमेशच्या घरच्यांनी मग त्याच्या गायनाची आवड लक्षात घेऊन त्याला श्री सतिश कुंटे यांच्याकडे गायन वर्गासाठी पाठवले. प्रथमेशचा कल शास्त्रीय गायनाकडे होताच. त्यामुळे त्याला शिक्षण घेताना फार अडथळे आले नाहीत. पुढे २००८/०९ साली झी मराठी ह्या वाहिनीवर "सारेगमप" ची घोषणा झाली... आणि प्रथमेश पाय आपोआप तिकडे वळले.... त्यांने पहिल्या भागापासुनच आपलं स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

    बाबुजी आणि गदिमांचे गीतरामायण पुर्वी घरी थांबुन रेडिओ ला कान लाऊन ऐकायचे, पुढे दुरदर्शनच्या काळात रामायण, महाभारत या मालिकांच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य असायचे.... झी सारेगमप (लिटल चॅम्प्स) च्या वेळी हा अनुभव पुन्हा आला..... यात सिंहाचा वाटा होता तो प्रथमेशचा!!! तोच या पर्वाचा विजेता ठरेल अशी रसिक वर्गाला अपेक्षा होती... निकाल मात्र वेगळाच लागला(त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच) परंतु रसिकांची मनं जिंकुन खरा विजेता ठरला तो प्रथमेशच!!!

    आपल्या गावावर निस्सिम प्रेम करणारा प्रथमेश सध्या पुण्यात राहुन संगीत विषयात MA करतोय. मात्र त्याची गावची ओढ, गावावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. तो गावात असेल त्या दिवशी योगायोगाने गुरुवार असेल तर तो भजनाला हमखास हजर असतो.

    प्रथमेशचा गळा हि त्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परमेश्वराकडुन मिळालेली एक विलक्षण भेट आहे. या गळ्यातून सुरांची अखंड बरसात होत राहो. प्रथमेशला अमाप यश, किर्ती, सन्मान मिळो हिच आजच्या शुभदिनी परमेशाकडे प्रार्थना!!!

    WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरुन..

  • हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर

    हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म १ जानेवारी १९११ रोजी झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं. मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत.

    मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्यां महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो.

    उदा., त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडत. मा.मन्सूर यांचे गाणे म्हणजे विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन असे. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.

    मध्य प्रदेश सरकारने १९८१ पासून सुरू केलेला, एक लाख रूपायांचा कालिदास सन्मान प्रशस्ती पुरस्कार सर्वप्रथम मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. तद्वतच कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभाग सुरू करून त्या विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले आहे. आपली संगीतविद्या मुक्तपणे मन्सूर तेथे देत असतात. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरूप्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट