संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.'दस लाख','एक फूल दो माली','इंतकाम','उपासना','मेला','नागिन'' सोना चांदी','काला धंधा गोरे लोग'हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे. अभिनयाबरोबरच संजय खान यांनी दिग्दर्शक,निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली.'महा काव्य महाभारत 1','जय हनुमान','द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान' या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान'ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली. संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2018
सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
September 13, 2017
अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला.
नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची अंग्री यंग मॅन ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच 'सुपरस्टार' पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.
विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2017
त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.
January 29, 2022
शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुरी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी जबलपुर, मध्य प्रदेश येथे झाला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया भादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.
जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी 'महानगर' या चित्रपटात संधी दिली.
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या 'गुड्डी' या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया भादुरी यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार' या चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते गुड्डीच्या सेटवर भेटले. बंगाली संस्कृतीनुसार ३ जून १९७३ मध्ये दोघांचा विवाह पार पडला होता. अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे 'चुपके चुपके', 'अभिमान,' 'सिलसिला' आणि 'जंजीर', 'एक नजर' 'कभी खूशी कभी गम' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया भादुरी बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जया भादुरी यांची गाणी व चित्रपट
https://youtu.be/neCQg_V765U
https://youtu.be/kkTj4kyfhN8
https://youtu.be/YBhs0DBcDYs
April 9, 2017
हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पी.एच.डी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते.
अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले.
‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते. भूपेन हजारिका हे .एस. डी. बर्मन यांच्यानंतर आसामी लोकसंगीताचा इतका वापर करणारे संगीतकार होते. हजारिका यांची ओळख संगीतकार व गायक म्हणून असली, तरी ते उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक व निर्माते होते आणि त्यांच्या तीन चित्रपटांना राष्ट्रपतींचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते.
१९९२ साली भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रुदाली, गजगामिनी, दमन, एक पल, साज, दरमियां, पपिहा ही काही भूपेन हजारिका यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाची नावे.
भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भूपेन हजारिका यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=MioGuA3sRig
https://www.youtube.com/watch?v=jkNy7uPmxUA&list=PLEAB90B2AFFCC6499
September 8, 2017
पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर व उर्मिला सियाल. आपले आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचा ऋषी कपूर यांचा लहानपणाचा एक किस्सा एका पुस्तकातील.
‘लहानपणीच चित्रपटसृष्टीशी माझी ओळख झाल्याबद्दल मी खरोखरच खूप ऋणी आहे. हिंदी सिनेमातल्या काही ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदारही आहे. त्यावेळी मी साधारण सहा वर्षांचा होतो. आजोबांनी (पृथ्वीराज कपूर) डब्बू (रणधीर कपूर), रितू (रितू नंदा) आणि मी.. असं आम्हा तिघांना गोळा केलं, अक्षरश: आम्हा तिघांचं गाठोडं करून त्यांच्या छोट्याशा ओपेल कारमध्ये घातलं आणि असीफसाब (के. असीफ) दिग्दर्शित करीत असलेल्या मुगल-ए-आझम या ऐतिहासिक चित्रपटाच्या भव्यदिव्य अशा सेटवर ते आम्हाला घेऊन गेले. मला मात्र खुद्द ‘अकबर बादशहा’नंच आपलं बोट धरून या चित्रपटाच्या सेटवर नेल्याच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आलं. माझ्या आयुष्यातली ती रणरणती दुपार म्हणजे एक अमूल्य असा ठेवा आहे. त्या दिवसाचा क्षण अन् क्षण आजही माझ्या मनात अगदी आज, आत्ता घडल्यासारखा ताजा, रसरशीत आणि जिवंत आहे.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांनी कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आणि हिंदी सिनेसृष्टीला मोलाचे योगदान दिले. पृथ्वीराज कपूर यांचे निधन २९ मे १९७२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर परांजपे
May 29, 2017
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
April 19, 2022
चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
June 2, 2021
गिरीश कर्नाड म्हटलं की 'तुघलक' आणि 'हयवदन' ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. कर्नाड कुटुंबिय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली.
गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्. एल्. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे. कर्नाड यांची १९६१ नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.
कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते. गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गिरीश कर्नाड यांनी १९७४-७५ मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषिवले आहे. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.
गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. 'युनेस्कोअ' तर्फे जागतिक रंगभूमीच्याश राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti