नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एक जुनी आठवण
डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक
जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक - डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच त्यानी सर्वांचा निरोप घेतला. जीवनांत त्यांचे व त्यांचे पति कै. केशवराव नागापूरकर यांचे सामाजिक कार्य महान होते. मृत्युनंतर त्यांची नोंद अनेक दैनिकांनी घेत संपूर्ण बातमी वर्तमान पत्रांत दीली. त्याच प्रमाणे स्थानिक लोकसभा सदस्य माननिय श्री. चंद्रकांत खैरै ह्यानी व्यक्तीशः सांतवनपर संदेस दिला. अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती , समाजसेवक, नगरसेवक यांनी येऊन नातेवाईकांचे सांतवन केले.
कै. ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर ह्यांच्या संबंधी एक लिखान त्यांचीच लहान मुलगी, लेखक साहित्तीक, उच्य शिक्षीत सौ. सुलोचना कुलकर्णी हीने पाठवले आहे. ते येथे सामान्यासाठी देत आहे.
माझी आई लक्ष्मीबाई उर्फ ठकुताई
' स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ' आमची आई आम्हाला सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने वरील वाक्याची प्रचिती आली. आई म्हणजे प्रेम, त्याग, वात्सल्य, करुना, यांचे मुर्तीमंत रुप आहे. आज मात्र सर्व भावंडे खऱ्या अर्थाने पोरके झाले.
माझी आजी आणि आजोबाना वाटले की, आपल्याला मुलगाच होणार, पण मुलगी झाली. माझ्या आईने सर्वाना ठकविले म्हणून तिचे नांव ' ठकु ' असे ठेवण्यांत आले. अर्थात हे घरांतले. खरे नांव होते लक्ष्मीबाई. लहानपणापासून अतिशय हूशार, चाणाक्ष, आणि कर्तव्यदक्ष आशी माझी आई होती. खेड्यांत बालपण गेले. १०० वर्षा पूर्वीचा काळ होता तो. शिक्षण फक्त चौथी पर्यंत झाले. प्रकृती अतिशय उत्तम होती. लहानपणीच धावपळ, घोडदौडसुद्धा, खेड्यामधले शारिरीक खेळ व व्यायाम ह्यात प्राविण्य मिळवले. सावळा रंग परंतु अतिशय बांधेसुद शरीर यष्टी लाभली होती. घरची लाभलेली वडीलोपार्जीत श्रीमंती. सर्वांत महत्वाचे म्हणजे लक्ष्मीबाईचे अर्थात ठकुचे नशिब फार बलवत्तर होते. तीला तरुण तडफदार शिक्षीत भव्य व्यक्तीमत्वाचा सहकारी मिळाला. त्यानी पुढे शासकिय सेवेत मराठवाड्यांत प्रचंड नांव लौकीक कमविले. त्यांचे नांव होते कै. केशवराव कुलकर्णी नागापूरकर. ते डेप्युटी कमिशनर म्हणून औरंगाबाद येथे कार्यारत होते.
एक फार जुनी घटना आठवली. मी ऐकलेली. पासष्ट वर्षापूर्वीची असावी.माझे वडील बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे तहसीलदार ( मामलेदार ) म्हणून होते. गांवाच्या जवळून सिंदफना ही नदी वाहते. नदीला प्रचंड पूर आला होता. पाण्याने सर्व गावाला वेढा दिला होता. पाणी गांवात शिरले. कित्येक घरे पाण्यांत बुडू लागली. लोकांचे संसार उध्वस्त होऊ लागले. पाण्याची पातळी वाढण्याचे कांही केल्या थांबेना. आमचे घर आमच्या नशिबाने उंच टेकडीवर होते. परंतु एका स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर, प्रचंड लोकांची गर्दी मदतीची अपेक्षा करित तेथे जमा झाली. तेथील जमलेल्या अनेक स्त्रीया माझ्या आईशी परिस्थीतीची चर्चा करु लागल्या. वादळ, वारा, पाऊस आणि पूर ह्यानी सर्व रहवाशी हैरान झाले होते. कोणताच मार्ग सुचत नव्हता. अशावेळी माणस ईश्वराचा आसरा घेतात. माझी आई सर्वाना घेऊन नदी किनारी गेली.
भक्तीभावाने तिची खणा नारळाने ओटी भरुन पुजा केली. सरीता देवीस शांत होण्याची प्रर्थना केली. सारेजण तेथेच बसून होते. चार तासांत दैवी चमत्कार झालेला दिसू लागला. पाणी प्रचंड वेगाने ओसरु लागले. गावांतील मंडळीना त्याक्षणी आमच्या आईत एक दैवी शक्ती असल्याचे भासले. एक वेगळाच मान तीला मिळू लागला. सकाळी पाणी खूपच ओसरले होते.
अंबेजोगाइला माझ्या आई-वडीलांच्या प्रयत्न्याने पहीली कन्या शाळा स्थापीली गेली. शाळेच्या पायाभरणी समारंभ माझ्या आईच्याच हस्ते झाला. आजही तेथील एका सभागृहाला त्यांचे नांव दिले गेले आहे.
खूप वर्षापूर्वीची एकलेली गोष्ट आठवली. गुलबर्ग्याला भारताचे पहीले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आले होते. एका मोठ्या Project उभारणीचा पायाभरणी समारंभ होता.
तीन स्त्रीयांनी तीन रंगाच्या ( लाल-पांढरा-हीरवा ) वेगवेगळ्या नऊवारी साड्या परीधान केल्या होत्या. तीघीनी प. जवाहरलाल नेहरुना औक्षण करुन त्यांचे स्वागत केले गेले. ह्यांत माझ्या आईचा प्रमुख सहभाग होता. प. नेहरुनीही हात ऊंचावून आशिर्वाद दिले. तिच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत आनंदाचा होता.
माझे आजोबा (आईचे वडील) लवकर वारले. त्यामुळे छोट्या भावाची ( माझ्या मामांची ) सर्व जबाबदारी तिने पार पाडली. आपल्या मुलापैकी एक समजून त्याचा सांभाळ केला. बंधूप्रेम काय असते हे आम्ही तिच्याकडून शिकलो.
आमचे नागापूरकर कुटूंब हे एकत्र होते व आजही आहे. त्यामुळे घरामध्यें दीर, नणद, जावा, यांचे सर्वांचे संबंध अतिशय जीव्हाळ्याचे होते. आमच्या आईचे दोनही काकांवर खूप प्रेम होते. काकांनी मोठ्या वहीनीवर तितकेच प्रेम केले. आईला कधी अंतर दिले नाही. धाकट्या जावांवर बहीणीसारखे प्रेम होते. कंटाळा वा कामचुकारपणा हे शब्द तिच्या शब्दकोशांतच नव्हते. ती म्हणायची काम केल्यानी शरीर निरोगी राहते. त्यातूनच आपल्याला उर्जा मिळत असते. तिने तीच्या दोनही नणदेवर खूप प्रेम केले. तिच्यामते 'सासर आणि माहेर' हे तराजुचे दोन पारडे आहेत. त्याचा समतोल राखला पाहीजे.
' एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे लोकेशन '
एकंदरीत तिच्या जीवनाचा प्रवास खुपच सुखांत, एश्वर्यांत झाला. शेवटपर्यंत लक्ष्मीने तिला साथ दिली. ती नुसतीच लक्ष्मीबाई नव्हती तर ' भाग्यलक्ष्मी ' होती. तिच्या मुलांनीही तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केले. सुनानी तिचा शब्द ' प्रमाण ' मानला जाई. डॉ. भगवान व डॉ. सौ. शालिनीवहिनीने तिला विमानातून यात्रा करुन आणली. सौ. पुष्पा वहिनी व सदूभाऊनी ' पुंडलीकासारखी ' सेवा केली. नातु जीवन व नात जयश्री तिचा शब्द झेलावयास सदैव तयार असत. नुकताच एक नातु चि. रवी ( अमेरिकेत स्थायिक ) पत्नी सौ. दिप्तीसह येथे आला व त्याने दोन मुलांच्या मौंजी पणजीच्या आशिर्वाद छायेत पार पाडल्या. शेवटच्या काळांत तिची लहान बहीण अर्थात चंदामावशी हीने तिची खूप सेवा केली.
खऱ्या अर्थाने ती भाग्यवान होती. सर्व पणतु चि. सार्थक, आदित्य, आणि आकाश ह्यांचा जन्मप्रसंगी ' सुवर्ण फुले वाहण्याचा ' धार्मिक कार्यक्रम सर्व नातेसंबंधाच्या उपस्थितीत पार पडला. तिचा
' सहस्र चंद्रर्शन ' हा कार्यक्रम देखील तिच्यांत आनंद व समाधान देऊन पार पडला. तिने नुकतेच जीवनाचे शतक अर्थात शंभर वर्षे पूर्ण केले होते. निसर्गाने मानव योनीसाठी जीवनाची जी शतकपुर्ती मर्यादा देऊ केलेली आहे, तीचा तिने हिम्मत आणि कष्टाने आदर केला. ती पूर्ण करुन त्या निर्सगाचा , त्या ईश्वराचा सन्मान केला. तिने जीवन सार्थकी घातले.
आमच्या सर्व परिवारातर्फे ती. आईला श्रद्धांजली अर्पण करते. ' परमेश्र्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. '
आई तूझ्या प्रेमाची सदैव ऋणी
सौ. सुलोचना कुलकर्णी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
विस्मरणातला मोहरा.. युध्दातील छोटे प्रसंग हे कुणाला ठाऊक नसतात. यासाठी माझे लेखन
वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.
त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेले असेल. काहींनी खेळाचे मैदान नेत्रदिपकाने गाजविले असेल. कित्येकांनी आपल्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले असेल. आनंदाचा ठेवा ओंझळभरुन वाटला असेल. अशा व्यक्तीनासुद्धा ह्या काळातून जाताना बरेचसे सहन करीत जावे लागते. त्यांच्या तारुण्यातील उज्वल काळानी त्यांच्या म्हातारपणातील उणीवांवर पांघरुण घालण्याची असमर्थता दाखविली आहे.
जीवन व मृत्यु हे जेवढे सत्य आहे, तेवढेच म्हातारपण हे न टळले जाणारे एक आयुष्यातील सत्य जीवन आहे. जे सत्य असते ते ईश्वरांचे प्रतीक असून ते मान्य करताना त्याचे स्वागत झाले पाहीजे. जीवनाचा शेवट गोड व आनंदी करावयाचा असेल तर वृद्धापकाळ जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ समजला पाहीजे.
जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण. ह्यात खऱ्या अर्थाने आतिशय आनंददायक काळ म्हणजे वृद्धत्वाचा. परंतु हे केवळ त्याच वेळी शक्य आहे. जेंव्हा सुरवातीपासूनच ह्या काळाची जाणीव ठेऊन तुम्ही तुमचे आयुष्य मार्गक्रमण कराल.
मला उत्कृष्ठ खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार, वा कोणत्याही क्षेत्रामधील मान्यताप्राप्त नागरिक बनायचे आहे. हे तुम्ही बालवयांत अथवा तारुण्यांतच ठरवता वा योजता. त्यासाठी सर्व प्रकारे पोषक वातावरण निर्मिती करता. सर्व डावपेच लढून. अडचणीवर मात करुन आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करता. त्याच प्रकारे वृद्धापकाळाच्या स्वागतासाठी योजना करवी. त्याच्या स्वागतासाठीचा अभ्यास केलेला असावा. यामध्ये असेल तुमची वैयक्तीक क्षमता, झेप घेण्याची योग्यता, कौटूंबीक परिस्थीतीची जाणीव, सामाजीक धोरणांचा पूर्णपणे विचार , आणि देशहीत. सर्व बाबीवर वृद्धत्व सदैव अंतरमनाच्या स्थरावर असावे. ( In Subconscious level)
१ - प्रकृतिस्वास्थ हे नियमीत व्यायाम व योग्य आहार ह्याचीच देण असते. धावपळीच्या जीवनामध्यें त्याची हेळसांड होणे शक्य असते. हे सतत ध्यानी असावे. सुदृढ प्रकृती हीच म्हातारपणांतील प्रमुख बाब ठरते. योग्य साधा व सर्व घटक खाद्यपदार्थानी परिपूर्ण आहार नियमीत घेण्याची काळजी व सवय ठेवावी. तो सकस व समतोल असावा. प्रसंगानुसार खाण्यातले बदल चवी आवडी इत्यादी ह्या येतातच. परंतु तुम्हास सतत जागृत राहणे फार गरजेचे असते.
खाण्यापिण्यातील मौजमजा आणि सवयी ह्यातील फरक जाणण्याच्या वैचारीक पातळीवर लक्ष नेहमी केंद्रित असावे. खाद्यामधल्या विवीध पदार्थांचे पचन शरिर ठरावीक वयापर्यंत सहज करु शकते. मात्र उतार वयांत त्याचे दुष्परीणाम उभारुन येतात. ते योग्यरीतीने जाणले पाहीजे. तेलकट तुपट चमचमीत पदार्थ, जास्त गोडीचे अंबट, तुरट हे पचनास कठीण, त्यांचा उपयोग कमी व्हावा. द्रव, पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.
२ - आर्थिक स्वावलंबन
स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी बदलत्या काळानुसार आर्थिक स्वावलंबन हा आयुष्य सुखकर ठेवण्यातील महत्वाचा घटक असेल. आर्थिक बळ, त्याची जाण व त्याप्रमाणे योजना आखणे अत्यंत गरजेचे ठरते. पैशाची आवक बंद होणे वा घटणे हे तुमच्या धावपळीच्या शक्तीवर ठरते. जी वयोमानानुसार घटणारच. औषधपाणयाचा वाढता खर्च ही अत्यांत महत्वाची गोष्ट असते. भारतीय ज्येष्ठांचे वयोमान आता सत्तरीपर्यंत सहजगत्या गेलेले आहे. इतर खर्च जसे खाणे पिणे कपडालत्ता हे कदाचित् कमी होऊ शकतील. वेळ आल्यास आपले ताट इतरांना द्या. परंतु पाट केंव्हाच सोडू नका. असे कौटूंबीक जीवनाच्या अभ्यासकांचे मत आहे.
वयाची साठी येण्याच्या आधीच संसारीक चक्रातले जे सर्व सामान्य प्रश्न प्रत्येकाला सोडवावे लागतात. त्याची शक्यतो उकल करणे चांगले. जसे मुलां/मुलींचे शिक्षण, नोकरी वा उद्दोग आणि योग्यतेनुसार कमाई इत्यादी. ह्या कदाचित् मुलभूत समस्या असतील वा प्रत्येकांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्यादेखील असू शकतील. दैनंदीन, मासिक, प्रासंगिक असे नियमीत खर्च होत राहतात. त्याची पद्धतशीर व्यवस्था अथवा योजना फार पुर्वीच करावी लागते. बॅंक, पोस्ट अथवा असाच संस्था तुमच्या ठेवीवर व्याज देते. विश्वासु व योग्य असा संस्थामध्ये गुणतवणूक करावी. तुमची आर्थीक पुंजी हेच तुमचे जगण्याचे साधन व समाधानाचे बळ असते. शासकिय वा सामाजिक बदलावर नियमीत लक्ष्य ठेवावे. प्रश्न निर्माण झाल्यास, कदाचित् सुटले जातील. परंतु उतारवयांत सहनशक्ती कमी होत गेल्यामुळे, मानसिक तणाव येत जातो. शरीरास हे हानी कारक ठरते. सतत सतर्क असण्याची वृत्ती अंगी बाळगावी.
३ - छंद जोपासणे गरजेचे.
कांही छंद जसे वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला, संगीत, गायनकला, वाद्यकला, हे जोपासावे. घरगुती खेळ अथवा मन रमविणारे, कोणतेही नाद हे बालपणीच वा तरुणवयातच जोपासावे. जर तुम्हाला अंतर चेतना Inspiration असेल तर नशीबवानच. परंतु जर आवड वा रुची नसेल तरीही अशा सवयी जोपासाव्या. वृद्धापकाळांसाठी भरपूर वेळ मिळतो. धावपळीचे जीवन संपते. आणि वेळ कसा व्यतीत करावा ही सर्व साधारण समस्या उभी राहते. तुमचे असलेले छंद ह्यावेळी तुम्हास साथ देतील. मी हे त्या वयांत गरजेनुसार करील ह्या समजुतीला कोणताच अर्थ नसतो. ह्याची देखील योजना असावी. आवड निवड ह्या निर्माण करता येत नाही. त्याची बिजे पूर्व आयुष्यातच रोवावी लागतात.
ह्याच प्रकारे वृद्धत्व तर येणारच. तरी देखील, त्याची तयारी पूर्व नियोजन करुन केली जात नाही. आता मी निवृत्त झालो. म्हातारा होत आहे. ह्या विचारांनी त्याला सामोरे जाण्याचा सर्व साधारण प्रघात बनू पाहात आहे. जसे घरी अचानक आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत आणि योजना आखून आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत, ह्यांत निश्चीतच खूप तफावत असणार. दुसऱ्या प्रकारामध्ये आनंदा बरोबर योग्य स्वागताची जाणीव व समाधान असणार.
एका विद्वान व्यक्तीने एक प्रयोग सुचविला होता. मला वैयक्तिक खूप चांगला अनुभव आला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तीन गोष्टींचा विचार करावा.
१ दिवसभर मी काय केले. माझ्या हातून काय घडले. चांगले आणि वाईट वा अप्रिय गोष्टी. कांही वेळ त्यावर चिंतन करावे. त्यांत सुधारणा करणाचा संकल्प करावा. नंतर सर्व गोष्टी ईश्वराचे चरणी अर्पण कराव्यात.
२ येणारा उद्याचा दिवस चांगला जाऊन, आपल्याकडून चांगले काम व्हावे ही प्रार्थना करावी.
३ झोपण्यापूर्वी मृत्युची आठवण काढावी. मृत्यु हा तर निश्चित असतो. तो केंव्हातरी येणारच. त्याचे स्वागतपर विचार असावे. पण हे करताना त्याची भिती वा निराशेचा थोडा देखील विचार नसावा. एक आनंददायी समाधानकारक वातावरण निर्मिती व्हावी. मृत्यु येणार हे एक सत्य असले तरी माणसे त्याचा केंव्हाच विचार करीत नाही. व जे जीवन अनिश्चीत, असत्य असते, त्याचा मात्र सतत विचार होत असतो. मृत्युच्या चाहूलाची केवळ कल्पना मानसाच्या नितीमत्तेला खूप उंचावते. फक्त ती जाणीवपूर्वक असेल तर त्यातील भय भावना नष्ट झालेली असेल.
४ - समाधानी वृत्ती
व्यक्तीला जे जीवन निसर्गाकडून मिळते, त्याची जाणीव प्रत्येकाला होतच असते. हाच खरा निसर्ग होय. तो स्वतःला पूर्णपणे जाणू लागतो. ह्यामध्ये प्रमुख समज येते ती वातावरण, परिस्थीती, स्थिती, आत्मशक्ती, क्षमता, अंतरचेतना, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या सृष्टीवरील त्याची स्वतःची योग्यता. प्रत्येकने पांघरुन बघून आपले हातपाय पसरावेत म्हणतात ते याचसाठी. प्रत्येकाला दुरद्दष्टी दिलेली असते ती जगाचा आणि जगण्याचा अंदाज बांधण्यासाठी. ह्या पृथ्वीवर जन्मलो वाढलो, जगलो, सुखांचा शोध घेत घेत झगडलो, जे अंतीम मिळाले त्यामध्ये समाधानी झालो.
प्रत्येकाने ह्याच विचाराने आपली क्षमता पारखून जे निसर्गाने त्याच्या पदरांत घातले असेल त्यावर अत्यंत समाधानी राहावे.
५ - मृत्युचे स्वागत.
जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यु. हे एक अटळ सत्य आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असते. त्या सत्याला मनापासून, अंतःकरणातून मान्यता द्या. त्याची वेळ देखील अनिश्चीत असते हे जाणा. परंतु निसर्ग तुम्हाला मृत्युच्या आगमनाची खूप आधीच चाहूल देत असतो. ती निर्भयपणे जाणून घ्या. त्याच्या स्वागताची तयारी ठेवा.
मृत्युला टाळण्यासाठी आपले सर्वस्व, आपल्या जीवनांत कमावलेली पूंजी वाया घालू नका. तुमच्या कष्टावर तुमच्यानंतर कुणी अवलंबून असतील तर तशी योजना करा.
तुमचे मृत्युपत्र योग्य विचार व भावनांची कदर करणारे असावे. संपत्तीची योग्यप्रकारे वाटणी करा. ज्यांत तुमच्या इच्छे बरोबरच अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्ण कल्पना ठेवावी. कोणताही एखादा अट्टाहास, येणाऱ्या पिढीमध्ये तुफान वादळ निर्माण करु शकतो. ही समज ज्येष्ठांनी ठेवावी.
शेवटचे व महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेले जीवन फक्त एकदाच असते, ह्याची जाण असावी.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.
एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.
मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ''मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.
हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.
दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, 'बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.
त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ''मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते''.
त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.
द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.
गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज 'रामानुजाचार्य' झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.
रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.
भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की 'अर्पण' करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे... एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. तसे पाहिले तर ती स्त्री रोज मंदिरात जायची असेही नाही. कारण तिला घरातील इतकी कामे असायची की, मंदिरात जायला देखील वेळ मिळायचा नाही तरी पण कृष्णावर तिची फारच भक्ती होती आणि एकदा का तिच्या मनात आले की, ती कोणतीही गोष्ट 'कृष्णार्पण' म्हणून आपल्या लाडक्या देवाला अर्पण करीत असे. दुपारी जेवताना ती आपल्या ताटातील, चतकोर भाकरी घराबाहेर येऊन 'कृष्णार्पण' म्हणून दूर फेकत असे. इकडे त्या कृष्ण मंदिरातील पुजारी जेव्हा देवाला नेवैद्य दाखवीत असे त्यावेळी पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटात ती चतकोर भाकरीही असे. घरातील सर्वांची जेवणे झाल्यानंतर उष्टे आवरताना ती स्त्री त्यावरून शेणाचा गोळा फिरवायची व घराबाहेर येऊन ' कृष्णार्पण' म्हणून उकिरड्यावर फेकून द्यायची. इकडे तो शेणगोळा नेमका कृष्णाच्या मूर्तीवर येऊन पडायचा. सुरुवातीला पुजाऱ्याला हा व तो नेवैद्याचा प्रकार 'चमत्कार' वाटायचा. मात्र जेव्हा त्याला त्या स्त्रीच्या भक्तीचा महिमा दिसला तेव्हा त्याचाही नाईलाज झाला. असे बरेच दिवस गेले. ती स्त्री एकदा आजारी पडली. आजार खूपच गंभीर झाला. मरण जवळ आले तेव्हा त्या स्त्रीने आपले मरणही 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी इकडे मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीचे तुकडे झाले व मूर्ती भंगून खाली पडली. ती स्त्री पुण्यवान होती म्हणून तिला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी विमान आले मात्र ते विमानही तिने 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी ते विमान त्या कृष्ण मंदिराला जाऊन धडकले व त्याचेही तुकडे झाले. हा सगळा चमत्कार पुजाऱ्याबरोबर गावकरीही पाहात होते. भक्तीचा महिमा किती अगाध असतो हे त्या स्त्रीने त्या सर्वांना दाखवून दिले होते.
बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
हे सारे मी संग्रहीत केलेल आहे.
स्टीव जॉब्स
" मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं ...भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.
त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.
दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.
मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अॅपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अॅपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अॅपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले.
२
माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अॅपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती.
यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.
पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अॅपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अॅपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.
चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.
माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. - मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा... त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.
वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.
नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश...’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो "
संग्राहक
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे.
पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली.
पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील दोघेही चीनमध्ये अमेरिकी मिशनरींचे काम करीत होते. त्यामुळे पाच महिन्यांची असतानाच पर्ल त्यांच्याबरोबर चीनमध्ये गेली. यांगत्सी नदीवरील चिकियांग शहरात तिचे बालपण गेले. लहानपणापासूनच तिला साहित्याची फार आवड होती. वयाच्या सातव्या वर्षी तिने चार्ल्स डिकिन्सच्या रचना वाचायला सुरुवात केली. तिला सांभाळण्यासाठी ठेवलेल्या चिनी महिलेने तिला अनेक चिनी कथा सांगितल्या, त्यामुळे चिनी संस्कृतीबद्दल तिला साहजिकच ओढ निर्माण झाली होती. शांघाय येथील एका दैनिकात तिने लिहायला सुरुवात केली व वाचकांना तिचे लेखन आवडू लागले.
वयाच्या सतराव्या वर्षी पर्ल बक पुन्हा अमेरिकेत गेली, मात्र अमेरिकेतील अति मोकळे वातावरण तिला आवडले नाही. चीनची ओढ होतीच, त्यामुळे ती पुन्हा चीनमध्ये गेली. आपल्या आजारी आईची सेवा करीत असताना तिने उत्तर चीनमधील मका जनजीवनाचा अभ्यास केला व ' इन चायना टू ' हा लेख प्रसिद्ध केला. तो अतिशय गाजला. १९२६ साली पर्ल बकने ' ईस्ट विन्ड, वेस्ट विन्ड' ही आपली पहिली कादंबरी लिहिली. ती १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर लिहिलेल्या 'द गुड अर्थ' कादंबरीला 'पुलित्झर ' पुरस्कार मिळाल्यामुळे तिला आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पर्ल बकने एकूण १८ कादंबऱ्या व लहान मुलांसाठी २३ कथांची पुस्तके लिहिली.
१९३८ मध्ये तिला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयुष्याच्या अखेरीस आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात तिने निराधार मुला-मुलींसाठी आश्रम सुरू केला व तेथे आलेल्या मुला-मुलींच्या आयुष्याला वेगळे वळण दिले.
वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.
मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.
प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो. वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.
संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता. आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.
״ आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״ हे पालूपद सर्वानी लावले.
वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.
वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.
रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो. माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले. किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण करणारा हा शुशूखेळ होता.
हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.
" गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली " आणि आम्ही सर्वजण उठलो.
आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״ चला बाबा बाहेर पटांगणात ״ सर्वजण जमा झाले आहेत.
״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.
״ काय ? ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले
״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״
वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.
दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.
वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई. शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.
आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.
दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man's show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.
जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो. नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.
ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो. येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.
सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.
वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti