नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच त्याचे फळ चांगले मिळते. संत कबीरांनी म्हटले आहे, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल मे परलय होगी बहुरि करेगा कब ?' ' चांगल्या कामाच्या बाबतीत तर मुळीच चालढकल करून चालणार नाही, कारण ' उद्याच्या भविष्यात काय दडले आहे हे कोणीच सांगू शकत नाही. एक शेतकरी होता. त्याला एकच मुलगा होता. मुलाच्या मदतीने तो आपली शेती करायचा. आपले अनुभव अनेकदा मुलाला सांगून त्याच्याकडून योग्य ती कामे करून द्यायचा. एके वर्षी पावसाळा जवळ आला. शेतकऱ्याने मुलाच्या मदतीने शेताची नांगरणी केली. त्यानंतर चांगला पाऊसही झाला. शेतकऱ्याने पेरणी केली. त्यानंतर शेतात वेळेवर निंदणी नि खुरपणीही केली. पाऊस त्यामानाने बरा पडला होता. त्यामुळे पीक चांगले आले. शेतकरी व त्याचा मुलगा दोघेही सुखावले. काही दिवसांनी पीक काढायचे ठरविले. शेतात खळे पडले. त्या दिवशी शेतात सकाळपासूनच शेतकरी व त्याचा मुलगा राबत होते. सायंकाळपर्यंत धान्याची चांगली रास पडली. फक्त ते गोळा करून घरात ठेवायचे होते. सकाळपासून काम करत असलेला मुलगा कंटाळला. तो म्हणाला, बाबा, आता हे काम आपण उद्या करू. त्यावर शेतकरी म्हणाला, नको हेही काम आजच करू. वाटल्यास तू थोडी विश्रांती घे आणि नंतर माझ्याबरोबर कामाला ये. मुलाला ते योग्य वाटले नाही, तो शेतकऱ्याबरोबर कामाला लागला. सगळे धान्य भरून झाल्यानंतरच ते थांबले. काही वेळाने अचानक आकाशात ढग जमून आले. पाठोपाठ सोसाट्याचा वाराही सुटला. पाहता पाहता मुसळधार पाऊससुरू झाला. तेव्हा मुलगा शेतकऱ्याला म्हणाला, बाबा, आपण जर काम अर्धवट सोडून उद्यावर टाकले असते तर संपूर्ण धान्याची नासाडी होऊन आपले खूप नुकसान झाले असते. शेतकरी म्हणाला, म्हणून तर तुला सांगत होतो हे काम आजच करून टाकू. कारण उद्यावर जो कोणी विसंबून राहील त्याला कोणते फळ मिळेल याची हमी देता येत नाही.
एक गरीब विणकर होता. त्याची त्याच्या कामावर अतिशय श्रद्धा होती. अतिशय मन लावून तो त्याच्या मागावर वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे तयार करायचा. थंडीचे दिवस आले म्हणून त्या विणकराने अतिशय परिश्रम घेऊन दोन कांबळ्या ( धोंगडीचा प्रकार) तयार केल्या. त्याच गावात एक अतिशय लबाड सावकार राहत होता. तो एकदा विणकराच्या घरावरून जात असताना त्याला त्या दोन कांबळ्या दिसल्या. त्याला त्या आवडल्या म्हणून त्याने विणकराकडून त्या खरेदी केल्या. मात्र ' आता माझ्याजवळ पैसे नाहीत उद्या घरी येऊन पैसे घेऊन जा' असे त्याला सांगून तो त्या कांबळ्या घेऊन गेला.दुसरे दिवशी विणकर पैसे मागण्यासाठी सावकाराच्या घरी गेला. मात्र सावकाराला त्याचे पैसे बुडवायचे होते म्हणून सावकाराने त्याला खोटेच सांगितले. ' अरे काय सांगू, कांबळ्या ज्या खोलीत ठेवल्या होत्या तेथे अचानक आग लागली व त्या आगीत कांबळ्या जळून गेल्या ' मात्र विणकराचा त्याच्यावर विश्वास बसला नाही तो म्हणाला, ' आगीत कांबळ्या जळून जाणे शक्यच नाही. '
त्यावर लबाड सावकार म्हणाला, ' अरे त्या कांबळ्यावर रॉकेलचा डबा सांडला होता. त्यामुळे त्या जळाल्या. ' त्यांचा हा वादविवाद चालू असताना व्यापाऱ्याच्या समर झेक जमले. विणकर जातानाच आणखी एक कांबळे खांद्यावर घेऊन आला होता तो व्यापाऱ्याला म्हणाला, 'रॉकेल सांडले असते तरी माझ्या कांबळ्या जळणे शक्य नाही. तुमचा विश्वास नसेल तर माझ्या या नव्या कांबळ्यावर रॉकेल टाकून त्याला आग लावा. ' लोकांनीही व्यापाऱ्यालाच आग्रह केला त्यामुळे व्यापाऱ्याने रॉकेल आणून त्या कांबळ्यावर टाकले व काडी पेटविली. क्षणार्धात आग लागली मात्र थोड्यावेळाने आग विझली. कारण कांबळ्यावरील केरूच फक्त जळाले होते. कांबळे शाबूत राहिले होते. ते पाहून लोकांनी विणकराची बाजू घेतली व त्या लबाड सावकाराला त्या दोन कांबळ्यांचे पैसे द्यायला लावले. सावकाराने खजिल होऊन विणकराला पैसे दिले. विणकराच्या प्रामाणिकपणाचा व सत्याचा विजय झाला होता.
व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.
प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करीत असे. रत्नाकडे रोज एक साधू यायचा व प्रसाद म्हणून त्याला एक द्यायचा, परंतु ते फळ सजा स्वतः न खाता त्या सेवकाला द्यायचा.सेवकही ते फळ राजाला दिले अहे त्यावर आपला अधिकार नाही. म्हणून स्वत: न खाता राजवाड्यातल्याच एका रिकाम्या खोलीत ठेवून द्यायचा. हा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. एके दिवशी त्या साधूने राजाला असेच फळ दिले व आशीर्वाद देऊन तो निघून गेला. राजा रोजच्याप्रमाणे ते फळही त्या सेवकाला देणार तेवढ्यात तेथे एक माकडाचे पिलू आले. राजाने कुतूहल म्हणून आपल्याजवळील फळ मग त्या सेवकाला न देता त्या माकडाच्या पिलाला दिले. माकडाने लगेच ते फळ खायला सुरुवात केली. राजाही गमतीने त्याचे खाणे पहात होता. फळ अर्धवट खाक्यानंतर त्यातून एक रत्न बाहेर पडले. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या सेवकाला लगेच विचारले, की रोज तुला मी देणारे फळ तू काय करीत होतास? त्यावर त्या सेवकाने राजाला ती खोली उघडून दाखविली. ती खोली फळाने अर्धी भरली होती व त्यातील फळे सडल्यामुळे त्यातून रत्ने बाहेर आली होती. तो रत्नांचा खजिना पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला. त्या इमानी सेवकाचे त्याला कौतुक वाटले व त्याने ती सारी रत्ने त्या सेवकाला देऊ केली. मात्र त्या इमानी सेवकाने त्या रत्नावर तुमचाच अधिकार आहे, असे राजाला सांगून ती सर्व रत्ने नम्रपणे नाकारली व राजाची चाकरी करण्यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे त्याने सांगितले. त्या सेवकाचा तो इमानीपणा व राजनिष्ठा पाहून राजाही भारावून गेला होता.
मन चंगा तो बगल मे गंगा' असे म्हणतात. तुमचे मन जर शुद्ध, पवित्र असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी शुद्ध व चांगल्याच वाटतील. एखादा चांगला पदार्थ जर स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या भांड्यात ठेवला तर कोणाला देताना निश्चितच आनंद होईल.
एका मनुष्याने सत्संगतीसाठी एक चांगले गुरू केले होते. दररोज तो त्यांच्याकडे जायचा व म्हणायचा, मला चांगला उपदेश करा. परंतु त्याचे मन विकारी होते हे त्या गुरूला चांगले माहीत होते म्हणून ते रोज काही ना काही कारण सांगून त्याला टाळत असत.
एके दिवशी मात्र त्या मनुष्याने गुरूला फारच आग्रह केला. त्यामुळे गुरू म्हणाले, ठीक आहे. उद्याचा दिवस चांगला आहे. मी उद्या चांगला उपदेश करीन, मात्र येताना तू माझ्यासाठी घरून चांगली खीर करून घेऊन ये.
प्रत्यक्ष गुरूंनी सांगितल्यामुळे त्या माणसाने चांगल्या घट्ट दुधाची, काजू-किसमिस घातलेली खीर तयार केली व तो दुसऱ्या दिवशी गुरूंकडे गेला.
गुरूंनी त्याच्यापुढे एक भांडे धरले व ते म्हणाले, ती खीर यामध्ये टाक.
त्या माणसाने ते भांडे पाहताच त्याला शिसारी आली. तो गुरूंना म्हणाला, अहो, हे भांडे फारच अस्वच्छ आहे. त्यामध्ये शेण आणि माती दिसते. ही खीर त्यामध्ये टाकली तर ती खराब होईल व तुम्हाला खाता येणार नाही.
त्यावर गुरू त्याला म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चांगली खीर ठेवायला भांडेही चांगले स्वच्छ हवे, त्याचप्रमाणे चांगला उपदेश ऐकायला मनही तेवढेच स्वच्छ व शुद्ध हवे.
तो माणूस गुरूला काय म्हणायचे आहे ते समजून चुकला व त्याने आपल्या मनातील विकारीपणा घालविण्याचा निर्धार केला.
फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डोक्याला एक फार मोठी चिंता भेडसावत होती. त्या सैनिकाला एक आई व चार बहिणी होत्या. आपल्या बहिणी सुखात राहाव्यात म्हणून कर्ज काढून त्याने त्यांची लग्रे लावून दिली होती. आता हे एवढे मोठे कर्जकसे फेडायचे याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. शिवाय आपल्या मूळ गावापासून तो बराच लांब होता. त्यामुळे कर्जदार आपल्या आईला सतावतील याही भीतीने तो खूपच अस्वस्थ होता. आपल्याला कोणाकोणाचेकिती किती कर्ज आहे याची त्याने यादीच तयार केली. ती यादी त्याने पुन्हा एकदा वाचूनपाहिली व त्याखाली ' आता हे कर्ज कोण आणि कधी फेडणार ?' असे त्याने लिहून ठेवले. थोड्या वेळाने पहारा देत असतानाच त्याला गाढ झोप लागली. नेमक्या त्याच वेळेला निकोलस राजा सीमावर्ती प्रदेशात आला होता. तो त्या मार्गावरून जात असताना त्याला आपल्या या सैनिकाची छावणी दिसली म्हणून तो तेथे आला. त्याने पाहिले आपला एक सैनिक गाढ झोपी गेला आहे व शेजारी एक कागद पडला. उत्सुकता म्हणून त्याने तो कागद पाहिला. सैनिकाने लिहिलेली ती कर्जाची यादी व त्याच्या खाली 'हे कर्ज कोण आणि कधी फेडणार' हे त्याने वाचले व त्याच्याखाली 'निकोलस' असे लिहून व आपली स्वाक्षरी करून तो .आला तसाच निघून गेला. थोड्या वेळाने त्या सैनिकाला जाग आली. जवळच पडलेला कागद उचलून त्याने आपल्या कर्जाची यादी पुन्हा वाचायला सुरुवात केली व खाली जेव्हा 'निकोलस' चे नाव व स्वाक्षरी त्याने पाहिली, त्या वेळी त्याचा विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी त्याला कर्ज फेडीसाठी सरकारी खजिन्यातून रक्कम मिळाली व तो कर्जमुक्त झाला. एका कर्तव्यदक्ष राजामुळे त्याच्या मनातील मोठी चिंता दूर झाली होती.
निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे 'नको तो उन्हाळा'असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते.
निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी सहसा समतोल राखण्याचाच त्वाचा प्रयत्न असतो.
निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनातही समतोल राखण्याची नितांत गरज आहे. कारण मानवी जीवन ही तारेवरची कसरत आहे याची प्रचिती अनेकदा येते. अनेक वेळा थोडासा तरी 'तोल' गेला, की कधीही कोसळण्याची शक्यता असते.
डोंबारी लोक त्यांच्या खेळामध्ये तारेवरील संतुलन सांभाळण्यासाठी काठीचा वापर करतात. तशीच सद्सद्विवेकबुध्दीची व सारासार विचाराची काठी घेऊन त्याच्या मदतीने ही तारेवरची कसरत केली तर जीवनात कुठे खाली कोसळता येणार नाही.
'तारेवरील कसरत' करण्यात तरबेज असणाऱ्या एका डोंबाऱ्याच्या पोराला एकदा गर्व झाला, की मी काठीशिवाय तारेवरची कसरत करून दाखवितो. या खेळात अनुभवी असलेला त्याचा बाप त्याला म्हणाला, तू या खेळात जरूर तरबेज असशील, मात्र काठीशिवाय ही कसरत खेळण्याचे धाडस करू नकोस, मात्र पोराने बापाचे ऐकले नाही. तो काठीशिवाय तारेवर चढून कसरत करायला गेला. मात्र दोन-तीन पावले टाकली नाही तोच तो खाली कोसळला. त्याला बापाच्या म्हणण्याचे प्रत्यंतर आले होते.
संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.
संत तुलसीदासांनी 'तुलसीरामायण' लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.
त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.
एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, '' हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.''
साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.
रैदास साधूला म्हणाला, 'मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.'
असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.
कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.
एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे.
एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. मात्र त्या सैनिकाला उडी मारायला थोडासा वेळ लागला. ते पाहून संतप्त झालेल्या त्या आरमारप्रमुखाने त्या सैनिकाला त्याचा कोट काढण्यास सागितले. सैनिकाने कोट काढताच आरमारप्रमुखाने तो कोट समुद्रात भिरकावून दिला.
तेवढ्यात अचानक समुद्रात वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाच त्या सैनिकाने त्या वादळातही समुद्रात उडी घेतली व लाटांवर तरंगत असलेला तो कोट घेऊन पुन्हा जहाजावर आला.
आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाही त्या सैनिकाने उडी मारली होती म्हणजे एका परीने त्याने आरमारप्रमुखाचा आज्ञाभंग केला होता. हा आरमारप्रमुख कठोर शिस्तीचा भोक्ता होता. हा आज्ञाभंग तो सहन करणार नाही, असे साऱ्यांनाच वाटले. त्यामुळे इतर सैनिकांना आता आरमारप्रमुख काय करतात याबाबत कमालीची उत्सुकता वाटत होती.
आरमारप्रमुखाला मात्र उडी मारणाऱ्या त्या सैनिकाचे आश्चर्य वाटले होते म्हणून त्याने त्याला विचारले, ' 'मी नाही म्हणत असतानाही तू वादळात उडी मारण्याचे एवढे मोठे धाडस का केलेस?''
त्यावर तो सैनिक नम्रपणे म्हणाला, '' त्या कोटात माझ्या आईचा फोटो होता व मला जेव्हा जेव्हा आईची आठवण होते, तेव्हा तेव्हा मी तो फोटो पाहत असतो. ''
त्या सैनिकाची मातृभक्ती पाहून तो आरमारप्रमुखही चकित झाला व त्याने त्याला आज्ञाभंगाच्या मुख्यातून मुक्त केले.
Copyright © 2025 | Marathisrushti