(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • व्यक्ती आणि समाज

    व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.

  • इमानी सेवक

    प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करीत असे. रत्नाकडे रोज एक साधू यायचा व प्रसाद म्हणून त्याला एक द्यायचा, परंतु ते फळ सजा स्वतः न खाता त्या सेवकाला द्यायचा.सेवकही ते फळ राजाला दिले अहे त्यावर आपला अधिकार नाही. म्हणून स्वत: न खाता राजवाड्यातल्याच एका रिकाम्या खोलीत ठेवून द्यायचा. हा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. एके दिवशी त्या साधूने राजाला असेच फळ दिले व आशीर्वाद देऊन तो निघून गेला. राजा रोजच्याप्रमाणे ते फळही त्या सेवकाला देणार तेवढ्यात तेथे एक माकडाचे पिलू आले. राजाने कुतूहल म्हणून आपल्याजवळील फळ मग त्या सेवकाला न देता त्या माकडाच्या पिलाला दिले. माकडाने लगेच ते फळ खायला सुरुवात केली. राजाही गमतीने त्याचे खाणे पहात होता. फळ अर्धवट खाक्यानंतर त्यातून एक रत्न बाहेर पडले. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या सेवकाला लगेच विचारले, की रोज तुला मी देणारे फळ तू काय करीत होतास? त्यावर त्या सेवकाने राजाला ती खोली उघडून दाखविली. ती खोली फळाने अर्धी भरली होती व त्यातील फळे सडल्यामुळे त्यातून रत्ने बाहेर आली होती. तो रत्नांचा खजिना पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला. त्या इमानी सेवकाचे त्याला कौतुक वाटले व त्याने ती सारी रत्ने त्या सेवकाला देऊ केली. मात्र त्या इमानी सेवकाने त्या रत्नावर तुमचाच अधिकार आहे, असे राजाला सांगून ती सर्व रत्ने नम्रपणे नाकारली व राजाची चाकरी करण्यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे त्याने सांगितले. त्या सेवकाचा तो इमानीपणा व राजनिष्ठा पाहून राजाही भारावून गेला होता.

  • मन चंगा तो…

    मन चंगा तो बगल मे गंगा' असे म्हणतात. तुमचे मन जर शुद्ध, पवित्र असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी शुद्ध व चांगल्याच वाटतील. एखादा चांगला पदार्थ जर स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या भांड्यात ठेवला तर कोणाला देताना निश्चितच आनंद होईल.

    एका मनुष्याने सत्संगतीसाठी एक चांगले गुरू केले होते. दररोज तो त्यांच्याकडे जायचा व म्हणायचा, मला चांगला उपदेश करा. परंतु त्याचे मन विकारी होते हे त्या गुरूला चांगले माहीत होते म्हणून ते रोज काही ना काही कारण सांगून त्याला टाळत असत.

    एके दिवशी मात्र त्या मनुष्याने गुरूला फारच आग्रह केला. त्यामुळे गुरू म्हणाले, ठीक आहे. उद्याचा दिवस चांगला आहे. मी उद्या चांगला उपदेश करीन, मात्र येताना तू माझ्यासाठी घरून चांगली खीर करून घेऊन ये.

    प्रत्यक्ष गुरूंनी सांगितल्यामुळे त्या माणसाने चांगल्या घट्ट दुधाची, काजू-किसमिस घातलेली खीर तयार केली व तो दुसऱ्या दिवशी गुरूंकडे गेला.

    गुरूंनी त्याच्यापुढे एक भांडे धरले व ते म्हणाले, ती खीर यामध्ये टाक.

    त्या माणसाने ते भांडे पाहताच त्याला शिसारी आली. तो गुरूंना म्हणाला, अहो, हे भांडे फारच अस्वच्छ आहे. त्यामध्ये शेण आणि माती दिसते. ही खीर त्यामध्ये टाकली तर ती खराब होईल व तुम्हाला खाता येणार नाही.

    त्यावर गुरू त्याला म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चांगली खीर ठेवायला भांडेही चांगले स्वच्छ हवे, त्याचप्रमाणे चांगला उपदेश ऐकायला मनही तेवढेच स्वच्छ व शुद्ध हवे.

    तो माणूस गुरूला काय म्हणायचे आहे ते समजून चुकला व त्याने आपल्या मनातील विकारीपणा घालविण्याचा निर्धार केला.

  • कर्तव्यदक्ष राजा

    फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डोक्याला एक फार मोठी चिंता भेडसावत होती. त्या सैनिकाला एक आई व चार बहिणी होत्या. आपल्या बहिणी सुखात राहाव्यात म्हणून कर्ज काढून त्याने त्यांची लग्रे लावून दिली होती. आता हे एवढे मोठे कर्जकसे फेडायचे याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. शिवाय आपल्या मूळ गावापासून तो बराच लांब होता. त्यामुळे कर्जदार आपल्या आईला सतावतील याही भीतीने तो खूपच अस्वस्थ होता. आपल्याला कोणाकोणाचेकिती किती कर्ज आहे याची त्याने यादीच तयार केली. ती यादी त्याने पुन्हा एकदा वाचूनपाहिली व त्याखाली ' आता हे कर्ज कोण आणि कधी फेडणार ?' असे त्याने लिहून ठेवले. थोड्या वेळाने पहारा देत असतानाच त्याला गाढ झोप लागली. नेमक्या त्याच वेळेला निकोलस राजा सीमावर्ती प्रदेशात आला होता. तो त्या मार्गावरून जात असताना त्याला आपल्या या सैनिकाची छावणी दिसली म्हणून तो तेथे आला. त्याने पाहिले आपला एक सैनिक गाढ झोपी गेला आहे व शेजारी एक कागद पडला. उत्सुकता म्हणून त्याने तो कागद पाहिला. सैनिकाने लिहिलेली ती कर्जाची यादी व त्याच्या खाली 'हे कर्ज कोण आणि कधी फेडणार' हे त्याने वाचले व त्याच्याखाली 'निकोलस' असे लिहून व आपली स्वाक्षरी करून तो .आला तसाच निघून गेला. थोड्या वेळाने त्या सैनिकाला जाग आली. जवळच पडलेला कागद उचलून त्याने आपल्या कर्जाची यादी पुन्हा वाचायला सुरुवात केली व खाली जेव्हा 'निकोलस' चे नाव व स्वाक्षरी त्याने पाहिली, त्या वेळी त्याचा विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी त्याला कर्ज फेडीसाठी सरकारी खजिन्यातून रक्कम मिळाली व तो कर्जमुक्त झाला. एका कर्तव्यदक्ष राजामुळे त्याच्या मनातील मोठी चिंता दूर झाली होती.

  • १९७१ च्या युद्धातील एक ‘मसी’

    विस्मरणातला मोहरा.. युध्दातील छोटे प्रसंग हे कुणाला ठाऊक नसतात. यासाठी माझे लेखन

  • उतारवयांत जगतांना!

    वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.

    त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेले असेल. काहींनी खेळाचे मैदान नेत्रदिपकाने गाजविले असेल. कित्येकांनी आपल्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले असेल. आनंदाचा ठेवा ओंझळभरुन वाटला असेल. अशा व्यक्तीनासुद्धा ह्या काळातून जाताना बरेचसे सहन करीत जावे लागते. त्यांच्या तारुण्यातील उज्वल काळानी त्यांच्या म्हातारपणातील उणीवांवर पांघरुण घालण्याची असमर्थता दाखविली आहे.

    जीवन व मृत्यु हे जेवढे सत्य आहे, तेवढेच म्हातारपण हे न टळले जाणारे एक आयुष्यातील सत्य जीवन आहे. जे सत्य असते ते ईश्वरांचे प्रतीक असून ते मान्य करताना त्याचे स्वागत झाले पाहीजे. जीवनाचा शेवट गोड व आनंदी करावयाचा असेल तर वृद्धापकाळ जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ समजला पाहीजे.

    जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण. ह्यात खऱ्या अर्थाने आतिशय आनंददायक काळ म्हणजे वृद्धत्वाचा. परंतु हे केवळ त्याच वेळी शक्य आहे. जेंव्हा सुरवातीपासूनच ह्या काळाची जाणीव ठेऊन तुम्ही तुमचे आयुष्य मार्गक्रमण कराल.

    मला उत्कृष्ठ खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार, वा कोणत्याही क्षेत्रामधील मान्यताप्राप्त नागरिक बनायचे आहे. हे तुम्ही बालवयांत अथवा तारुण्यांतच ठरवता वा योजता. त्यासाठी सर्व प्रकारे पोषक वातावरण निर्मिती करता. सर्व डावपेच लढून. अडचणीवर मात करुन आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करता. त्याच प्रकारे वृद्धापकाळाच्या स्वागतासाठी योजना करवी. त्याच्या स्वागतासाठीचा अभ्यास केलेला असावा. यामध्ये असेल तुमची वैयक्तीक क्षमता, झेप घेण्याची योग्यता, कौटूंबीक परिस्थीतीची जाणीव, सामाजीक धोरणांचा पूर्णपणे विचार , आणि देशहीत. सर्व बाबीवर वृद्धत्व सदैव अंतरमनाच्या स्थरावर असावे. ( In Subconscious level)

    १ - प्रकृतिस्वास्थ हे नियमीत व्यायाम व योग्य आहार ह्याचीच देण असते. धावपळीच्या जीवनामध्यें त्याची हेळसांड होणे शक्य असते. हे सतत ध्यानी असावे. सुदृढ प्रकृती हीच म्हातारपणांतील प्रमुख बाब ठरते. योग्य साधा व सर्व घटक खाद्यपदार्थानी परिपूर्ण आहार नियमीत घेण्याची काळजी व सवय ठेवावी. तो सकस व समतोल असावा. प्रसंगानुसार खाण्यातले बदल चवी आवडी इत्यादी ह्या येतातच. परंतु तुम्हास सतत जागृत राहणे फार गरजेचे असते.

    खाण्यापिण्यातील मौजमजा आणि सवयी ह्यातील फरक जाणण्याच्या वैचारीक पातळीवर लक्ष नेहमी केंद्रित असावे. खाद्यामधल्या विवीध पदार्थांचे पचन शरिर ठरावीक वयापर्यंत सहज करु शकते. मात्र उतार वयांत त्याचे दुष्परीणाम उभारुन येतात. ते योग्यरीतीने जाणले पाहीजे. तेलकट तुपट चमचमीत पदार्थ, जास्त गोडीचे अंबट, तुरट हे पचनास कठीण, त्यांचा उपयोग कमी व्हावा. द्रव, पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.

    २ - आर्थिक स्वावलंबन

    स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी बदलत्या काळानुसार आर्थिक स्वावलंबन हा आयुष्य सुखकर ठेवण्यातील महत्वाचा घटक असेल. आर्थिक बळ, त्याची जाण व त्याप्रमाणे योजना आखणे अत्यंत गरजेचे ठरते. पैशाची आवक बंद होणे वा घटणे हे तुमच्या धावपळीच्या शक्तीवर ठरते. जी वयोमानानुसार घटणारच. औषधपाणयाचा वाढता खर्च ही अत्यांत महत्वाची गोष्ट असते. भारतीय ज्येष्ठांचे वयोमान आता सत्तरीपर्यंत सहजगत्या गेलेले आहे. इतर खर्च जसे खाणे पिणे कपडालत्ता हे कदाचित् कमी होऊ शकतील. वेळ आल्यास आपले ताट इतरांना द्या. परंतु पाट केंव्हाच सोडू नका. असे कौटूंबीक जीवनाच्या अभ्यासकांचे मत आहे.

    वयाची साठी येण्याच्या आधीच संसारीक चक्रातले जे सर्व सामान्य प्रश्न प्रत्येकाला सोडवावे लागतात. त्याची शक्यतो उकल करणे चांगले. जसे मुलां/मुलींचे शिक्षण, नोकरी वा उद्दोग आणि योग्यतेनुसार कमाई इत्यादी. ह्या कदाचित् मुलभूत समस्या असतील वा प्रत्येकांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्यादेखील असू शकतील. दैनंदीन, मासिक, प्रासंगिक असे नियमीत खर्च होत राहतात. त्याची पद्धतशीर व्यवस्था अथवा योजना फार पुर्वीच करावी लागते. बॅंक, पोस्ट अथवा असाच संस्था तुमच्या ठेवीवर व्याज देते. विश्वासु व योग्य असा संस्थामध्ये गुणतवणूक करावी. तुमची आर्थीक पुंजी हेच तुमचे जगण्याचे साधन व समाधानाचे बळ असते. शासकिय वा सामाजिक बदलावर नियमीत लक्ष्य ठेवावे. प्रश्न निर्माण झाल्यास, कदाचित् सुटले जातील. परंतु उतारवयांत सहनशक्ती कमी होत गेल्यामुळे, मानसिक तणाव येत जातो. शरीरास हे हानी कारक ठरते. सतत सतर्क असण्याची वृत्ती अंगी बाळगावी.

    ३ - छंद जोपासणे गरजेचे.

    कांही छंद जसे वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला, संगीत, गायनकला, वाद्यकला, हे जोपासावे. घरगुती खेळ अथवा मन रमविणारे, कोणतेही नाद हे बालपणीच वा तरुणवयातच जोपासावे. जर तुम्हाला अंतर चेतना Inspiration असेल तर नशीबवानच. परंतु जर आवड वा रुची नसेल तरीही अशा सवयी जोपासाव्या. वृद्धापकाळांसाठी भरपूर वेळ मिळतो. धावपळीचे जीवन संपते. आणि वेळ कसा व्यतीत करावा ही सर्व साधारण समस्या उभी राहते. तुमचे असलेले छंद ह्यावेळी तुम्हास साथ देतील. मी हे त्या वयांत गरजेनुसार करील ह्या समजुतीला कोणताच अर्थ नसतो. ह्याची देखील योजना असावी. आवड निवड ह्या निर्माण करता येत नाही. त्याची बिजे पूर्व आयुष्यातच रोवावी लागतात.

    ह्याच प्रकारे वृद्धत्व तर येणारच. तरी देखील, त्याची तयारी पूर्व नियोजन करुन केली जात नाही. आता मी निवृत्त झालो. म्हातारा होत आहे. ह्या विचारांनी त्याला सामोरे जाण्याचा सर्व साधारण प्रघात बनू पाहात आहे. जसे घरी अचानक आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत आणि योजना आखून आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत, ह्यांत निश्चीतच खूप तफावत असणार. दुसऱ्या प्रकारामध्ये आनंदा बरोबर योग्य स्वागताची जाणीव व समाधान असणार.

    एका विद्वान व्यक्तीने एक प्रयोग सुचविला होता. मला वैयक्तिक खूप चांगला अनुभव आला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तीन गोष्टींचा विचार करावा.

    १ दिवसभर मी काय केले. माझ्या हातून काय घडले. चांगले आणि वाईट वा अप्रिय गोष्टी. कांही वेळ त्यावर चिंतन करावे. त्यांत सुधारणा करणाचा संकल्प करावा. नंतर सर्व गोष्टी ईश्वराचे चरणी अर्पण कराव्यात.

    २ येणारा उद्याचा दिवस चांगला जाऊन, आपल्याकडून चांगले काम व्हावे ही प्रार्थना करावी.

    ३ झोपण्यापूर्वी मृत्युची आठवण काढावी. मृत्यु हा तर निश्चित असतो. तो केंव्हातरी येणारच. त्याचे स्वागतपर विचार असावे. पण हे करताना त्याची भिती वा निराशेचा थोडा देखील विचार नसावा. एक आनंददायी समाधानकारक वातावरण निर्मिती व्हावी. मृत्यु येणार हे एक सत्य असले तरी माणसे त्याचा केंव्हाच विचार करीत नाही. व जे जीवन अनिश्चीत, असत्य असते, त्याचा मात्र सतत विचार होत असतो. मृत्युच्या चाहूलाची केवळ कल्पना मानसाच्या नितीमत्तेला खूप उंचावते. फक्त ती जाणीवपूर्वक असेल तर त्यातील भय भावना नष्ट झालेली असेल.

    ४ - समाधानी वृत्ती

    व्यक्तीला जे जीवन निसर्गाकडून मिळते, त्याची जाणीव प्रत्येकाला होतच असते. हाच खरा निसर्ग होय. तो स्वतःला पूर्णपणे जाणू लागतो. ह्यामध्ये प्रमुख समज येते ती वातावरण, परिस्थीती, स्थिती, आत्मशक्ती, क्षमता, अंतरचेतना, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या सृष्टीवरील त्याची स्वतःची योग्यता. प्रत्येकने पांघरुन बघून आपले हातपाय पसरावेत म्हणतात ते याचसाठी. प्रत्येकाला दुरद्दष्टी दिलेली असते ती जगाचा आणि जगण्याचा अंदाज बांधण्यासाठी. ह्या पृथ्वीवर जन्मलो वाढलो, जगलो, सुखांचा शोध घेत घेत झगडलो, जे अंतीम मिळाले त्यामध्ये समाधानी झालो.

    प्रत्येकाने ह्याच विचाराने आपली क्षमता पारखून जे निसर्गाने त्याच्या पदरांत घातले असेल त्यावर अत्यंत समाधानी राहावे.

    ५ - मृत्युचे स्वागत.

    जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यु. हे एक अटळ सत्य आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असते. त्या सत्याला मनापासून, अंतःकरणातून मान्यता द्या. त्याची वेळ देखील अनिश्चीत असते हे जाणा. परंतु निसर्ग तुम्हाला मृत्युच्या आगमनाची खूप आधीच चाहूल देत असतो. ती निर्भयपणे जाणून घ्या. त्याच्या स्वागताची तयारी ठेवा.

    मृत्युला टाळण्यासाठी आपले सर्वस्व, आपल्या जीवनांत कमावलेली पूंजी वाया घालू नका. तुमच्या कष्टावर तुमच्यानंतर कुणी अवलंबून असतील तर तशी योजना करा.

    तुमचे मृत्युपत्र योग्य विचार व भावनांची कदर करणारे असावे. संपत्तीची योग्यप्रकारे वाटणी करा. ज्यांत तुमच्या इच्छे बरोबरच अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्ण कल्पना ठेवावी. कोणताही एखादा अट्टाहास, येणाऱ्या पिढीमध्ये तुफान वादळ निर्माण करु शकतो. ही समज ज्येष्ठांनी ठेवावी.

    शेवटचे व महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेले जीवन फक्त एकदाच असते, ह्याची जाण असावी.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निष्काम कर्माचे महत्त्व

    प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.

    एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.

    मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ''मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.

    हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.

    दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, 'बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.

    त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ''मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते''.

    त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.

  • मुक्तीचा मंत्र

    द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.

    गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज 'रामानुजाचार्य' झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.

    रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.

  • भक्तीचा महिमा

    भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की 'अर्पण' करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे... एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. तसे पाहिले तर ती स्त्री रोज मंदिरात जायची असेही नाही. कारण तिला घरातील इतकी कामे असायची की, मंदिरात जायला देखील वेळ मिळायचा नाही तरी पण कृष्णावर तिची फारच भक्ती होती आणि एकदा का तिच्या मनात आले की, ती कोणतीही गोष्ट 'कृष्णार्पण' म्हणून आपल्या लाडक्या देवाला अर्पण करीत असे. दुपारी जेवताना ती आपल्या ताटातील, चतकोर भाकरी घराबाहेर येऊन 'कृष्णार्पण' म्हणून दूर फेकत असे. इकडे त्या कृष्ण मंदिरातील पुजारी जेव्हा देवाला नेवैद्य दाखवीत असे त्यावेळी पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटात ती चतकोर भाकरीही असे. घरातील सर्वांची जेवणे झाल्यानंतर उष्टे आवरताना ती स्त्री त्यावरून शेणाचा गोळा फिरवायची व घराबाहेर येऊन ' कृष्णार्पण' म्हणून उकिरड्यावर फेकून द्यायची. इकडे तो शेणगोळा नेमका कृष्णाच्या मूर्तीवर येऊन पडायचा. सुरुवातीला पुजाऱ्याला हा व तो नेवैद्याचा प्रकार 'चमत्कार' वाटायचा. मात्र जेव्हा त्याला त्या स्त्रीच्या भक्तीचा महिमा दिसला तेव्हा त्याचाही नाईलाज झाला. असे बरेच दिवस गेले. ती स्त्री एकदा आजारी पडली. आजार खूपच गंभीर झाला. मरण जवळ आले तेव्हा त्या स्त्रीने आपले मरणही 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी इकडे मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीचे तुकडे झाले व मूर्ती भंगून खाली पडली. ती स्त्री पुण्यवान होती म्हणून तिला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी विमान आले मात्र ते विमानही तिने 'कृष्णार्पण' केले. त्यासरशी ते विमान त्या कृष्ण मंदिराला जाऊन धडकले व त्याचेही तुकडे झाले. हा सगळा चमत्कार पुजाऱ्याबरोबर गावकरीही पाहात होते. भक्तीचा महिमा किती अगाध असतो हे त्या स्त्रीने त्या सर्वांना दाखवून दिले होते.

  • मला भाराऊन टाकल याने

    बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.

    हे सारे मी संग्रहीत केलेल आहे.

    स्टीव जॉब्स

    " मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं ...भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.

    त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

    दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

    मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अ‍ॅपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अ‍ॅपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अ‍ॅपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले.

    माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अ‍ॅपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती.

    यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.

    पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अ‍ॅपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अ‍ॅपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

    चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.

    माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. - मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा... त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

    वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.

    नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश...’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो "

    संग्राहक
    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com