(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • नामस्मरणातील ताकद

    जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.

    तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

    कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’

    त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’

    त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
    यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.

    मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’

    आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
    आता कबीरजी चकित झाले होते.

    सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.

    कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’

    जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

    कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.

    जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
    गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.

    जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’

    कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

    एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

  • हृदय परिवर्तन

    क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी तेथे येऊन भिक्षा मागितली. त्वामुळे ती बाई त्यांच्यावरच भडकली व त्यांना उद्देशून म्हणाली, हे गोसावड्या, भिक्षा मागायला तुला लाज कशी नाही वाटत, असे म्हणत तिने आपल्या हातातील शेणाचे पोतेरे समर्थांच्या अंगावर फेकले. त्यामुळे समर्थांचे अंग खराब झाले. मात्र ते त्या बाईवर मुळीच रागावले नाहीत. उलट ते तिला म्हणाले, माई हीच भिक्षा समजून मी ती आनंदाने स्वीकारेन. असे म्हणून ते पोतेरे घेऊन नदीवर गेले आणि नदीच्या खडकावर ते पोतेरे त्यानी स्वच्छ धुवायला सुरुवात केली. जसजसे ते पोतेरे स्वच्छ होऊ लागले. तसतसे इकडे त्या बाईच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. म्हणून ती स्वतःच समर्थांची माफी मागण्यासाठी बाहेर पडली. समर्थांना शोधत शोधत ती नदीवर गेली. तोपर्यंत समर्थांनी ते पोतेरे -स्वच्छ धुऊन वाळत घाललेले होते व वाळल्यानंतर त्यांनी त्या कापडाच्या वाती करायला सुरुवात केली होती. समर्थांना पाहताच त्या बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले व आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. मात्र समर्थांनी तिला केव्हाच माफ केले होते. ते तिला म्हणाले तुझी 'भिक्षा' खरोखरच मोठी होती, कारण त्याच वातीने श्रीराम व मारुतीरायाची मूर्ती उजळणार आहे. समर्थांचे बोल ऐकून ती बाई धन्य झाली.

  • माना न माना !

    हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्याचा हा सत्य शोध सुरु आहे.

    यातूनच प्रश्नांची एक मालिका निर्माण झाली. तो कोण ? मी कोण ? अर्थात कर्ता कोण व माझी भूमिका कोणती? हे महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. अभ्यासक आले. चिंतन झाले. भाष्य झाले. अनेक विचारवंत निर्माण झाले. बघून जाणून अनूभवून वेगवेगळी सुत्रे निर्माण झाली. चौकटी आखल्या. ज्यांत त्यांचे तत्वज्ञान काठोकाठ भरविण्याचा प्रयत्न झाला. कित्येकजण साक्षात्कारी होते. त्यांच्या मुखातून पडलेले सर्व हेच सत्य वाटून कित्येकाना ते पटत गेले. एक महान व्यक्ती म्हणून त्यांची लोकानी पाठपूरवणी केली. त्यांना मान्यता दिली. ही विद्वत्तेची किमया अनेक जणाना प्राप्त होत गेली. तसे त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आपणासही कांही मिळेल कां ह्या कल्पनेने बराच वर्ग त्याचा पाठ पुरावा करीत गेला.

    प्रत्येक साक्षात्कारी व्यक्तीमध्ये सत्य व त्याची जागृती तीच होती. साध्य कोणते ध्येय कोणते याला सर्वानी मान्यता दिली. ते एक सत् चित् व आनंदा याचे स्रोत आहे. मात्र त्यांने ती जाणून घेण्याचा मार्ग, रचना मात्र भिन्न होत्या. येथेच एका संभ्रमी अवस्थेचा जन्म झाला. प्रत्येकाला दोन टोके दिसू लागली. जे मिळवायचे ते एक. व ते कसे मिळवायचे ते दुसरे. मात्र भिन्नतेने जो जन्म दिला तो ते साध्य करण्यासाठी जो मार्ग आहे त्याचा. भिन्नता ही असणारच. उंच शिखरावर एक तेजस्वी मनोहर ठिकाण दिसत असेल, तर तेथे जाण्याचे निश्चितच अनेक मार्ग असणारच. ह्यांत शंकाच नाही.परंतु त्याच अनेक मार्गाच्या भिन्नतेमुळेच सर्वांच्या विचारांमध्ये विखुरता निर्माण केली गेली. कुणाचा योग्य मार्ग, चांगला, सुलभ व ध्येया जवळ त्वरित नेणारा असेल ह्यावर आपापली बुद्धी प्रगल्भतेनुसार टिपणी होऊ लागली. सर्व खेळांची हीच गोम बनली. लोकांच्या संभ्रमामुळे प्रत्येकजण साध्याला तर नजरेसमोर ठेवीत होता. सारी शक्ती ही साधनेमध्येच घालू लागले. तेथेच घाण्याच्या बैलाप्रमाणे गोल गोल फिरु लागला. त्याचा प्रवास तर बराच झालेला परंतु त्याला कळले नाही की साध्य कोठे आहे.

    आपण जे करतो ते प्रत्येकाला योग्यच वाटत असते. मग ते लहान मूल का असेना. त्याला वाटते माझेच बरोबर आहे. वरिष्ठ जाणकार हे मग कसे मागे राहतील. त्याना त्याच्या प्रत्येक कृतीचे योग्य म्हणूनच समर्थन करणे मनास उचित वाटते. जर प्रेरणेचा स्रोत हा अंतर्यामी असेल तर त्याचा उगम देखील सत्य आनंद ह्या ब्रह्मा निर्मीत शक्तीमधूनच होत असतो. म्हणूनच प्रत्येकाला आपली कृती योग्य व निश्चित व्हावी वाटत असते. त्याचे हे वाटणे एका हद्दीपर्यंत बरोबर असते.

    येथे एक जाणीव व्हावी.

    गंगा जेंव्हां गंगोत्री मुखातून उत्पन्न होते, ह्या भूतलावर येण्यासाठी झेप घेते, तेंव्हां ती अत्यंत पवित्र निर्मळ व पर्यावरणरहीत असते. चांगुलपणांची सारी महान तत्वे त्यांत निगडीत झालेली असतात. परंतु जेव्हां ती आपला मार्ग सागराच्या दिशेने जाऊ लागते. तेंव्हां तीचा संबंध अनपेक्षीत मुल्यांबरोबर येतो. ज्यांत इतर नद्या, पर्वतावरचे वाहून आलेले पाणी, नाले इतकेच काय नदीकाठी वसलेले गांव वसत्यांचे नको असलेले सांडपाणी, एक नव्हे अनेक दूषित पाण्याचे साठे हे त्या प्रवाहामध्ये मिसळले जातात. गंगेच्या उगमस्थानाचे जल व महासागरामध्ये विलीन होण्यासाठी गंगासागर किनारी आलेले जल ह्यांत प्रचंड भिन्नता असणारच. कदाचित् धार्मिक पावित्र्याची संकल्पना एकच हे मान्य केले तरी वैज्ञानिक समर्थन हे मान्य करील काय? जर जल चाचणी केली गेली तरी पाण्याच्या गुणधर्मांत खूपच तफावत असेल.

    विचार आत्मिक तेजा पासून चेतावले जातात. त्यांत मुळ स्रोत म्हणून सत्याचा, तपाचा, भाग उत्पन्न झालेला असतो. त्या विचारांचा प्रवाह उगमस्थाना पासून मेंदूपर्यंत, तेथून स्वर यंत्र, जीभ इत्यादी साधनांमधून पार करीत ते बाहेर पडून इच्छीत स्थळापर्यंत पोहचतांत. त्यांत प्रचंड प्रमाणात मिश्रण होणारच. तो व्यक्त होत असतांना आजू बाजूचे, परिस्थीतीचे, संस्काराचे, दृश्य अदृष्य कल्पनांचे अनेक पैलू, अनेक अघात त्या उत्पतीत सामील होतात. त्याचे रुप हे देखील प्राथमिक सत्यापासून खूपच अंतरावर असणार. जसे गंगेच्या धार्मिक पावित्र्या बद्दलच्या कल्पना, तिचा उगम व तिचा शेवट ह्यामध्ये एकच कल्पिला गेला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपला विचारच योग्य आहे. हा जो अट्टाहास त्याच्या मनी येतो, त्याचेपण मुळ हेच आहे. कुणीही ह्यावर चिंतन करीत नाही, की माझ्या विचार शक्तीची उत्पत्ती व शेवट यांचे रुप कोणते.

    जर खूप आत्मचिंतन केले, सभोवतालचे अवलोकन केले, तर प्रत्येकाच्या आग्रही मुळ स्वभावांत सुधारणा होऊं शकेल. अनेक व्यक्ति ह्या असले चिंतन करीत नाहीत. व त्याना पटेल तेच कार्य हाती घेतात. त्यांत झोकून देतात. उत्पन्न होताना जी चेतना असते तीचे रुप व्यक्त होताना व त्याहून भिन्न दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहंचतना जाणवते. हे एक सत्य. परमेश्वरी संकेतापासून मानवी गुणधर्मामध्ये त्याचे रुपांतर होत जाते. मुळ दया क्षमा शांती प्रेम आनंद अशा बहूरुपी चक्रामधून त्यावर राग लोभ अहंकार याचा प्रभाव पडतो.

    उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रामधील दोनच भाग - उत्पत्ती व लय हेच सत्य आहेत. स्थिती अर्थात जीवन हे सारे विचारावर, कल्पनेवर आधारलेले आहे. त्यामुळे ते सतत सुख दुःखाच्या गुंत्यात अडकलेले असते. तेच जीवन प्रवाहाचा खेळ खेळते. रोज बदलते. वेगळे होते. सभोवतालच्या परिस्थितीच्या लाटेवर आरुढ असते. आपले सारे प्रयत्न तपश्चर्या ही केवळ ह्या मार्गावरच केंद्रीत झालेली असते. कारण हा काळ प्रत्येकजण जाणतो, अनुभवतो, सत्य आहे हे समजतो.

    आपणाला स्वतःला केव्हांच उत्पत्तीचा व लयाचा अनुभव येत नाही. तो येणार देखील नाही. दुसरे जे केवळ बघतात, जाणतात आणि ते एक ज्ञान म्हणून व्यक्त केले जात असते. तेच आपण फक्त मानतो. ते अनुभवने शक्यच नाही. आपल्या जीवनाशी फक्त स्थितींचा संबंध येतो. उत्पत्ती व लय हे दोन भाग आपण घेण्याच्या पलीकडे म्हणूनच आपल्यासाठी काल्पनिक ठरतात. जे खऱ्या अर्थाने सत्य असते. त्यापासून आपण दूर राहतो. स्थिती हे तत्व असत्य,भौतिक, नाशवंत ठरविले, तेच आपण अनुभवतो.

    आपला प्रत्यक्ष संबध, जो सत्य भाग म्हणजे उत्पत्ती व लय आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या संबध असतो कारण ही तुमच्या जीवनाची सुरवात व शेवट असते. मान्य. परंतु ते म्हणजे तुम्हाला समज नसता व समज पूर्ण गेली असता. ज्याचा तुमचा जाणत्या काळाचा संबंध येतो तो स्थितीचा काळ फक्त सत्य सोडून असत्याचाच पाठपुराव्याशी येतो.

    सत्य हे ईश्वराचे प्रतिक bवा अंशात्मक ईश्वरी चेतना आहे. ती बाजूस रहाते. तुम्ही ती घेतलेली. स्वतः असलेली नाही. केवळ चालू राहण्यसाठी ( Carry on ) बाळगलेली शक्ती आयुष्याची पाऊलवाट चालतात. सारे आयुष्य असत्याच्या संपर्कांमध्ये. कसे मिळणार सत्य त्यातून ?

    तुम्ही जे अंशात्मक सत्य बाळगता त्याच्या स्फुरलेल्या लाटा ( Spiritual Waves ) जेव्हां बाहेर येण्याचा प्रयत्न होतो, त्याच क्षणी ते असत्य ह्या वातावरणाशी स्पर्श करुं लागतात. भौतिक वातावरणामध्ये त्यांचा स्पर्श होतो. कसे जाल तुम्ही त्या सत्याकडे. एक जबरदस्त कोंडी निर्माण झालेली आहे. सत्य ह्या आत्मिक केंद्र बिंदूला थोडे देखील सोडले की असत्यामध्ये गुंडाळले जातात. बाह्य स्थिती हे सर्व सत्य होऊंच शकत नाही. सत्य फक्त एकच आणि ते म्हणजे तुमचा अंतरात्मा. ह्याच केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. हेच एक असे सत्य जवळ आहे जे तुम्ही बाळगल्यामुळे अनुभवतां येणे शक्य आहे. ध्यान अवस्था प्राप्त करा हे म्हणतात. विचाररहीत मनाची स्थिती हेच ध्यान. अत्यंत अवघड गोष्ट आहे. सुक्ष्मात सूक्ष्म अशा चेतनेने मनाला उद्युक्त केले जाते. मनाएवढे चंचल आज पर्यंत तरी ह्या सृष्टीवर दुसरे माध्यम निर्माण झाले नाही. ही ज्ञानमार्गातील संकल्पना आहे.

    मनाचे शांत होणे म्हणजेच त्या सत्याजवळ जाणे. हा साधा हिशोब केलेला आहे. याचा अर्थच असा की त्या ईश्वराला बघण्यासाठीस फक्त एकच मार्ग शांत मन. हेच त्याला बघू शकते. भेटू शकते. कां ? फक्त शांत मनच कां ? कारण त्याच्यातला थोडासा देखील चंचलपणा हा त्या सत्याच्या केंद्र बिंदूपासून त्वरीत खूप दूर नेऊन सोडतो. किती कोंडी केलेली आहे ह्या मार्गानी. ज्ञानानी त्याला जाणा म्हणजे काय ? आत्मचिंतन करा हेच ना. हे करीत असताना मनाभोवतालची सारी वैचारीक झाकणे Covers of the Mind बाजूस करावयाची असतात.

    भक्ती करा म्हणतात. येथेही भावनांची अशीच गर्दी केली जाते. मनावर एक वेगळीच छटा निर्माण होते. सत्य हे त्यानेही झाकोळते. विचाराने, ज्ञानाने, भक्तीने त्या ईश्वराजवळ गेलो. एक मात्र सत्य आहे की अनेक व्यक्तीमधून, एखादाच त्या आत्मतत्वाजवळ जाऊ शकतो.- परंतु फक्त जवळ- एकरुप होऊंच शकत नाही.

    शिवाय ज्ञानीजनांना, भक्ताना देखील अहंकाराच्या भिंती उभारुन अडचणी केल्याच आहे. ईश्वर एकच असून शक्तिमान, अनंत, अविनाशी, निर्गुण, निराकार आहे. तो उत्पत्ती, स्थिती लय ह्या त्रिगुणात्मक शक्तीच्या बाहेर आहे. अनेक महान गुणधर्मानी परिपूर्ण असलेला. ही धारणा जगातल्या सर्व मार्गदर्शकानी अर्थात् धर्म संस्थापकांनी, विद्वान पंडीतांनी मान्य केलेली संकल्पना. जे पिंडी ते ब्रह्माडी समजले गेले. त्याच तत्वज्ञानाने प्ररित होऊन प्रत्येकामधल्या आत्म्याला अंशात्मक त्या ईश्वरी रुपाचे स्थान मिळाले आहे. तो प्रत्यक्ष ईश्वर मात्र आपल्या वैचारिक झेपेपासून अनंत योजने दुर आहे ह्यात शंका नाही. परंतु त्यानेच ही प्रत्येकासाठी सोय करुन ठेवलेली आहे. की त्याच्यापर्यंतचा मार्ग हा जरी केवळ अशक्य असला तरी प्रत्येकजण त्याला आत्मकेंद्रात जाणऊ शकतो. त्याच्या संपूर्ण शक्तीची, अस्तित्वाची न सुटणाऱ्या कोड्याचे प्रतिबिंब समजू शकेल. प्रखर सुर्याला उघड्या नजरेने कुणीच बघूं शकणार नसलो तरी रंगीत काचा. पाण्यातील प्रतिबिंब ह्या माध्यमातून अवलोकन करणे सुसह्य ठरते. तसेच हे आत्मचिंतन त्याच्या सान्निध्याजवळ, प्रतिबिंबाजवळ घेऊन जाऊं शकते. परंतु हा मार्ग अत्यंत खडतर असतो. ज्ञान, भक्ती, कर्म मार्ग भगवतगीतेमधले मार्गदर्शन व तसा अनुभव घेण्यास मदत करील.

    कित्येकजण हिमालयांत जाऊन गंगोत्री अर्थात गंगेच्या उगमस्थानी जाऊन पवित्र जलाची साठवणूक करतात. देव्हाऱ्यांत ठेवतात ह्यामागची तात्विक बैठक समजली पाहीजे. आत्मचिंतनातून अर्थात ईश्वरी प्रतिकात्मक केंद्रातून उत्पन्न झालेल्या विचारांची देखील इतक्याच तात्विक बैठकीवर स्थापना झाली पाहीजे. हे केंव्हां शक्य होइल जेव्हां सारी माध्यमे पावित्र्याचाच आधार घेतील. मन पवित्र, देह पवित्र वाणी पवित्र आणि सारा सभोवताल देखील पवित्र. हेच सत्य आणि आनंदाचे मुळ असेल. पावित्र्याची व्याख्या काय व कोणती हे अर्थात तुमचा अन्तरात्माच सांगेल. दुसऱ्याचे ऐकून होणार नाही.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • प्रशंसेला दूरच ठेवा

    आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? उलट सर्वांनी सदासर्वकाळ आपली प्रशंसाच करावी असेच अनेकांना वाटत असते. परंतु अशा प्रशंसेमुळे गर्व निर्माण झाल्यास कधी कधी आपल्या कार्यात तो व्यत्यय आणू शकतो. म्हणून प्रशंसेला सहसा भुलून जाऊ नये. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे यांचे एक उदाहरण खूपच बोलके आहे. महात्मा गांधी यांची विचारसरणी प्रमाण मानून आचार्य विनोबा भावे यांनी पवनारला आपला आश्रम सुरू केला. त्या वेळी तेथे जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज हे काही काळ शिकण्यासाठी म्हणून आले होते. एकदा विनोबाजी चरख्यावर सूत कातत बसले असता तेथे त्यांना कोणीतरी पोस्टाने आलेली काही पत्रे आणून दिली. त्यातील एक पत्र महात्मा गांधी यांचे होते. विनोबाजींनी ते पत्र वाचले व लगेच ते फाडून फेकून दिले. या वेळी कमलनयन बजाज तेथेच होते. त्यांना विनोबाजींच्या कृत्याचे आश्चर्य वाटले. विनोबाजींच्या माघारी त्यांनी त्या पत्राचे फाडलेले तुकडे गोळा केले व एकत्र करून वाचले. त्या पत्रात महात्माजींनी विनोबांना लिहिले होते, 'तुमच्याइतकी महान व्यक्ती अजून तरी माझ्या पाहण्यात नाही'. खरे तर महात्माजींचे हे प्रशंसापत्र विनोबाजींनी ज्याला त्याला दाखवायला पाहिजे होते. परंतु ते त्यांनी फाडून टाकले होते. म्हणून कमलनयन बजाज यांनी विनोबाजींना त्यासंबंधी विचारणा केली असता ते म्हणाले की, अशी पत्रे जपून ठेवणे हा मोह आहे. कारण त्यामुळे मला गर्व उत्पन्न होईल व गर्वाने फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे ते पत्र जवळ बाळगणे म्हणजे माझे एका परीने नुकसानच होते. अर्थात, त्या महात्मा गांधीजींनी मजविषयीच्या ज्या प्रेमाने ते पत्र लिहिले होते तो प्रेमाचा भाग मी आधीच काढून घेतलेला आहे. बाकींचे नष्ट करण्यातच माझा फायदा होता व म्हणून ते पत्र मी फाडून टाकले. विनोबाजींचे हे तर्कशुद्ध विवेचन ऐकून कमलनयन बजाज यांचे अर्थातच समाधान झाले.

  • जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार

    वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

    मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.

    प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो. वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.

    संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता. आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.

    ״ आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״ हे पालूपद सर्वानी लावले.

    वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.

    वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.

    रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो. माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले. किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण करणारा हा शुशूखेळ होता.

    हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.

    " गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली " आणि आम्ही सर्वजण उठलो.

    आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״ चला बाबा बाहेर पटांगणात ״ सर्वजण जमा झाले आहेत.

    ״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.

    ״ काय ? ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले

    ״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״

    वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.

    दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.

    वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई. शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.

    आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.

    दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man's show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.

    जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो. नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.

    ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो. येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.

    सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.

    वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोलीडोस्कोप

    नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • डॉक्टर संशोधिका गर्टी थेरेसा कोरी

    कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले. तिच्या संशोधनाबद्दल तिला १९४७ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. गर्टी थेरेसा कोरी (Gerty Theresa Cori) हे तिचे नाव. हा नोबेल पुरस्कार तिचे पती कार्ल कोरी तसेच अर्जेंटिनाचे वैज्ञानिक बर्नार्डो ए हाऊसे यांच्यासह तिला विभागून देण्यात आला होता.

    गर्टी थेरेसाचा जन्म १५ ऑगस्ट १८९६ रोजी ऑस्ट्रियातील प्राग शहरात झाला. तिचे वडील एका चिनी कारखान्यात व्यवस्थापक होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. गर्टीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले व वयाच्या दहाव्या वर्षी तिला पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले व पूर्ण करून दाखविले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच तिची व कार्ल कोरीची ओळख झाली व नंतर दोघेही एकमेकांचे जीवनसाथी बनले. पहिल्या महायुद्धाच्या काळात केवळ ऑस्ट्रियन असल्यामुळे कोरी दाम्पत्याला प्राग शहर सोडावे लागले व दोघेही व्हिएन्नामध्ये आले. एका बालरुग्णालयात दोघांनीही काम सुरू केले. मात्र वैद्यकीय संशोधनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून दोघेही अमेरिकेत आले व त्यांनी विविध रोगांसंबंधी संशोधन सुरू केले. रक्तामधील साखरेबाबत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळेच मधुमेहावरचे उपाय सुलभ झाले. या संशोधनाला 'कोरीचक्र' असे आजही संबोधले जाते. या संशोधनाबद्दलच त्यांना डॉ. बर्नार्डो हाऊसे यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार लाभला. त्यानंतर कोरी दाम्पत्याने सेंट सुई येथे स्वतःची प्रयोगशाळा काढून संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. या प्रयोगशाळेचा अनेक संशोधकांनी लाभ घेतला. दुर्देवाने गर्टी कोरीला एका असाध्य रोगाने पछाडले. तब्बल दहा वर्षे तिने या रोगाशी झुंज दिली,परंतु २६ ऑक्टोबर १९५७ रोजी तिचे निधन झाले.

  • उधळण

    परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणधर्म आहेत व तो फक्त एकच आहे. खरे बघतां त्याचे गुणवर्णन केंव्हांच पूर्ण होऊ शकत नाही. कारण तो जेवढा अमर्याद समजला गेला. तेवढेच आम्ही त्याचे वर्णन करणारे एकदम मर्यादीत असतो. एका मर्यादीत ज्ञानशक्तीने अमर्याद तत्वाचे वर्णन करताना आम्ही तोकडे पडतो.

    त्या परमेश्वरानी कांही गुणधर्मांची उधळण ह्या जगांत, विश्वांत केलेली दिसते. उधळण ह्यासाठी म्हणतो की ते गुण बिंदू सर्वत्र पसरले गेलेले, विखूरलेले जाणवतात. त्यांत आहे प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. ह्या सर्वांचा सांघीक, एकत्र परिणाम म्हणजे जीवसृष्टी. भिन्न दिसणारी परंतु एकाच मुळ संकल्पनेतून निर्माण झालेली. प्रत्येकाचे कार्य, उद्देश, व जीवनचक्र ह्याची रुपरेखा आसून ते चालत असते. अनेक पदार्थांची निर्मीती करताना प्रत्येकाचे आपापले मुळ गुणधर्म हे देखील निश्चीत करुन ठेवलेले आहेत. याचा अर्थ निसर्गाने त्याचे आपले नियम केलेले आहेत. त्यामध्ये केव्हांच फरक पडत नसतो. सर्व नियम निश्चीत व ठरलेले आहेत. जसे दाहकता, उष्णता हा अग्नीचा गुणधर्म. तो ज्यांच्या संपर्कांत आला त्याला जाळून टाकणारा. पाण्यांत राहणारे प्राणी याना जलचर प्राणी म्हणतात. ते पाण्यांतच जगू शकतात. वा जमिनीवरील प्राणी, जमीनीवरच राहू शकतात. ज्याना जे माध्यम जगण्यासाठी दिले ते त्याच माध्यमांत आपले जीवन व्यतीत करतात. वेगळ्या माध्यमांत जगणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य.

    थोडक्यांत अशाच प्रकारचे अनेक अनेक नैसर्गिक नियम केले आहेत. जगाची सर्व दैनंदिन कार्ये त्याच्याच आधाराणे चालतात. उंचावरुन पडलेले फळ खालतीच येणार. परंतु पडलेले फळ आपोआप केव्हांच आकाशाकडे जाणार नाही. निसर्गाच्या नियमांमध्ये केव्हांही बदल होत नसतो. जेव्हां काहीं विपरीत घडले असे भासते, ते ही निसर्गाच्या कोणत्यातरी चौकटी नियमानुसार होत असते. कदाचित् मानवाला ते ज्ञात होत नसावे. किंवा त्याची उकल ही त्याच्या लक्षांत आली नसेल. येथेच माणसाची अवस्था संभ्रमी होते. साशंक होते. मग त्या घटनेवर अनेक तर्क वितर्क केले जातात. येथेच जन्म होतो श्रद्धा वा अंधश्रद्धा ह्या स्वभाव गुणधर्मांचा. काहींजण याला चमत्कार असे संबोधतात.

    परमेश्वर जसा वर सांगीतल्या प्रमाणे अनेक गुणधर्मानी भरलेला असतो, तसाच तो

    " प्रेम- दया- कृपा " ह्या गुणानी व्याप्त असतो. आणि हे सर्व गुण सतत बरसत असतात. जेव्हां ही ईश्वरी कृपा वा दया म्हटली जाते, त्याचा अर्थ तो सतत कृपा वा दया यांची उधळण करीत असतो. हे सत्य आहे.

    मात्र तो कुणावर वैयक्तीक वा प्रासंगीक उधळण केव्हांच करीत नसतो. " ईश्वर कृपावंत आहे, दयावान आहे, वा दयाळू आहे " असे म्हणने सत्य असते. परंतु " ईश्वराने माझ्यावर कृपा केली वा मला दया दाखविली" हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. ईश्वर कृपावंत आहे हे म्हणने जेवढे योग्य तेवढेच त्याने मजवर कृपा केली हे सांगणे चुकीचे. हां त्याच्या कृपेच्या सागरांत तुम्ही ती कृपा प्राप्त केली हे शक्य असेल.

    पाऊस सर्वत्र पडतो. हे सत्य. तो बरसला. हा तसाच एक प्रकार. त्या पावसाची जाणीव येऊन तुम्ही घराबाहेर पडणे व पावसांत ओले होणे हे महत्वाचे असते. पाऊस तुमच्या अंगावर येऊन केव्हांच पडत नसतो. पावसाचा आनंद घेण्यासाठी त्या बरसणाऱ्या पावसांत तुम्हास जाणे जरुरी असते. त्याचे असेच महान गुणधर्म प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. इत्यादी आपल्या अंगावर झेलून ते ग्रहन करावे लागते, आनंद लुटावा लागतो. घरांत राहून, बंद खोलीत राहून, दारे खिडक्या बंद करुन ते सारे तुम्हास कसे मिळणार ?

    त्याच प्रमाणे ईश्वर कृपावंत आहे, दयाळू आहे हे सत्य. मात्र त्याची कृपा, त्याची दया ही तुम्हास आपल्या कर्तृत्वाने वा क्षमतेने झेलावी लागते. असे न करता जर तुम्ही " ईश्वराची मजवर कृपा झाली " हा शब्दप्रयोग तरीत असाल तर तुम्ही एक अर्थाने त्या ईश्वराला दोष देणारे वाक्य उच्चारता, हे लक्षांत घ्या. उदाहरणार्थ दहा व्यक्तींनी एक गोष्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. एकाला ती मिळाली. त्यामुळे जेव्हां ती तुम्हाला मिळते, त्यांत अनेक कारणे असतात. जसे तुमचा प्रयत्न, इच्छा, आन्तरीक चेतना, योग्यता, धडपड, हिम्मत, आणि आणखी बरेच कांही. त्यापैकी कदाचित् ईश्वराची कृपा हेही एक त्यांत असू शकेल. परंतु तो कृपाभाग हा तर सर्वावर सारखाच बरसत असणारा असेल. जेव्हां तुम्ही

    " ईश्वराची मजवर कृपा झाली " ही उपाधी लावतां, तेव्हां त्याने इतर नऊ लोकावर अन्याय केला असे होणार नाही कां ? तो भेदभाव करतो असे त्यातून कुणाला वाटणार नाही कां ? Partiality करण्याचा ठपका त्यावर लागणार नाही कां ? तो तर सर्वासाठी न्यायी असतो. जे तुम्हाला मिळाले त्यांत ईश्वरी कृपा असेलही परंतु ती फक्त तुम्हास मिळाली असे नव्हे. तो कृपाळू, दयाळू सर्वासाठी सारखाच असतो. परंतु तो कधीही कुणावर वैयक्तीक कृपा करीत नसतो. ही समज जाणणे जरुरी असते. तो फक्त गुणांची उधळण करतो. तुम्हाला ती वेचायची असतात. तुमची क्षमता, जीद्द, प्रयत्न, आंतरीक इच्छा असे गुणधर्म त्या कृपेला हस्तगत करु शकतात. जे महान झाले असे अनेक विषयांत, प्रांतात चमकले. कांहीतरी मिळवायचे ह्या घ्येयानी ते झपाटले गेले होते. परमेश्वरी गुणघर्म ते टिपत जातात, त्याला आदर देतात, परंतु त्याच वेळी निवडलेल्या कार्यांत पूर्णपणे झोकून देता.

    * जे महान झाले ते फक्त स्वकर्तत्वाने, स्वबळाने. हिमतीने, प्रयत्न्याने.

    * ते फक्त गोळा करीत गेले सारे विखुरलेले ईश्वरी सद्गुणांचे मोती

    * त्यानी अमोल, अप्रतीम असा मोत्यांचा हार बनवून जगाला अर्पण केला.

    * हे सारे करीत असताना त्यांचा आन्तरात्मा त्या सर्वज्ञ, सर्वव्यापी सर्वशक्तीमान ईश्वराला

    सतत साक्षी ठेऊन होता.

    हां ! परमेश्वरा विषयी प्रेम, आदर व्यक्त करताना तो कृपावंत दयाळू ही विशेषणे लावणे चांगले. परंतु त्याची माझ्यावर कृपा झाली हा फार मोठा गैरसमज असेल. त्याची कृपा होते ही भावना तुम्हास अशक्त करेल. तुमच्या प्रयत्नामध्ये बाधा अणेल. कसेही झाले तरी तो मला दया दाखवील हा बाब केंव्हांही नसावी. ईश्वरा विषयी श्रद्धा गोष्ट वेगळी. परंतु अवलंबाची भावना, मुळीच नसावी. बरेचजण देवाची व्याख्या, त्याला मानवातील वरच्या दर्जाचा असे करतात. Some treat God as SUPERHUMAN. हे अत्यंत चुकीचे आसते. त्यांत मानवी मनाच्या आवडी, भावना, ईच्छा हे विचार त्याच्यावर थोपवले जातात. मग मला जे आवडते, भावते, ते त्याला तसेच आवडणारे समजून आपण त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचे आहे.

    परमेश्वराशी मैत्री अर्थात सख्य हा भाव वेगळा. तो तसा असावा. अर्जून सुद्धा श्रीकृष्णाला सखा समजत होता. परंतु ही भावना येताना त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची, जाणीव सतत असणे गरजेचे वाटते. तो कृपा करतो, दया करतो, हे गृहीत धरु नका. तो फक्त तुमच्या योग्य प्रयत्नाना साथ देतो. हे एकदम खरे. स्वतःच्या मनाचा, विचारांचा सतत चांगला विकास करीत रहा. यश निश्चित मिळते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते याजसाठी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे केव्हांच घडत नसते. तो अत्यंत न्यायप्रिय असतो. निसर्गाच्या नियमांना समजून घ्या. तेथे कोणतीही चुक होणार नसते. वा मेहेरनजर नसते.

    करा-मिळवा- अथवा भोगा हेच एक महान तत्वज्ञान त्या ईश्वराचे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ध्येयवादी कार्यकर्ती एमिली ग्रीन बालय

    शांती आणि सद्‌भावना जगात सर्वत्र नांदावी असे तिला लहानपणापासूनच वाटायचे कारण तिच्यावर तिच्या वडिलांचा फार प्रभाव होता आणि वडील होते याच तत्त्वांचे कट्टर पुरस्कर्ते. वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठेपणी समाजकार्य सुरू केले व १९४६ मध्ये शांतीसाठी तिला नोबेल पुरस्कारही मिळाला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या या महिलेचे नाव होते एमिली ग्रीन बालय.

    वायएमसीए के लीडर जॉन आरमांट यांच्याबरोबर तिला संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला. मात्र या पुरस्काराची रक्कम एमिलीने आपल्याच संस्थेला देऊन आपण खरीखुरी सामाजिक कार्यकर्ती असल्याचे साऱ्या जगाला दाखवून दिले. अमेरिकेतील जमैका येथे ८ जानेवारी १८६७ साली एमिलीचा जन्म झाला. तिचे वडील वकील होते व शांतता व सद्‌भावनेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळे एमिलीला लहानपणापासून शांततेचे खास आकर्षण होते. खासगी शाळेत शिक्षण घेऊन एमिलीने समाजशास्त्र व अर्थशास्त्रात पदवी घेतली. पुढे अर्थशास्त्रात तिने संशोधनही केले. १८९१ मध्ये बोस्टन येथे 'चिल्ड्रन एड सोसायटी' ही संस्था स्थापन करून तिने समाजसेवेला प्रारंभ केला. कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठीही तिने आणखी दोन संस्था स्थापन केल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या तळागाळातील लोकांच्या समस्याही तिने समजून घेतल्या. अमेरिकेतील त्या वेळी अशा काही शिक्षण संस्था होत्या, की तेथे फक्त 'गोऱ्या' विद्यार्थ्यानाच प्रवेश मिळत असे. एमिलीने त्याविरुद्ध आवाज उठवून अशा शिक्षण संस्थांमध्ये 'काळ्या' विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यास भाग पाडले. प्रसिद्ध सामाजिक - कार्यकर्ती जेन एडन्स हिने स्थापन केलेल्या 'वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम' या संस्थेची ती महासचिव झाली व जेन एकच्या मृत्यूनंतर ती संस्थेची अध्यक्षा झाली. या संस्थेच्या शांतीच्या कार्याबद्दलच तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिलला. आपल्या आयुष्याच्या अखेरीस एमिलीला दय्याच्या विकाराने ग्रासले होते.

    त्यातच तिचा ७ जून १९६१ रोजी अंत झाला. अखेरच्या क्षणी तिच्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले ते होते 'विश्वशांती.'

  • आनंदाची किंमत

    मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे नऊ दिवस या न्यायाने त्या चित्राचे कौतुक होईल व नंतर कदाचित त्याकडे दुर्लक्षही होईल, म्हणून फार मोठी किंमत मिळत असूनही त्याने त्या श्रीमंत माणसाला चित्र देण्याचे नाकारले. त्यानंतर एकदा मायकेल अँजेलो हा असाच रस्त्यावरून भटकत असताना रस्त्यावर काही तरी विकत बसलेल्या एका मुलाने त्याला पाहिले. त्या मुलाला अँजेलोबद्दल चांगली माहिती होती. अँजेलोला पाहताच तो मुलगा एक कागद घेऊन त्याच्याकडे पळत आला व म्हणाला, 'अंकल, मला या कागदावर छानसे चित्र काढून द्याल?' त्या निरागस मुलाच्या मनातील भाव ओळखून अँजेलो तेथेच रस्ताच्या कडेला बसला व त्याने त्या कागदावर लगेच एक सुरेख चित्र काढून त्या मुलाला दिले. ते चित्र पाहून त्या मुलाला विलक्षण आनंद झाला. मात्र अँजेलोला द्यायला त्या मुलाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अपराधीपणाची भावना दिसली. त्यावर अँजेलो त्याला म्हणाला, या चित्राबद्दल मला तुझ्याकडून काहीही नको आहे. हे चित्र पाहून तुला जो आनंद झाला त्यातच माझ्या चित्राची किंमत वसूल झाली आहे. असे म्हणून त्या मुलाची पाठ थोपटून तो तेथून निघून गेला.