नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
……आणि तात्याला काय झालं असतं तर मग त्या डॉक्टरचं काय खरं नव्हतं
वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ' जीवमय ( प्राणमय ) live cells ' अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ' मृत dead cells ' संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.
नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते.
अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी भरभराट केली होती. त्याच्या गुणग्राहकतेची ख्याती सर्वत्र होती. एकदा त्याला कोणीतरी विचारले, की चांगली माणसे तुम्ही शोधता तरी कधी आणि केव्हा? त्यासाठी तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतले आहे काय?
त्यावर कार्नेगी यांनी त्याला फार समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, चांगली माणसे शोधणे म्हणजे मातीतून सोने मिळविण्यासारखे आहे.. जर तुम्हाला मातीतून एक किलो सोने मिळवायचे आहे, तर त्यासाठी हजारो टन माती उकरावी लागेल. अर्थात तुम्ही त्या वेळी केवळ माती उकरायला नाही तर त्यातील सोने शोधायला गेला असाल तरच तुम्हाला थोडे फार सोने मिळू शकेल. चांगली मासे याच पद्धतीने शोधायची असतात. कार्नेगी यांचे हे उत्तर ऐकून प्रश्नकर्त्यांचे साहजिकच समाधान झाले.
रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.
आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिळणारा आनंद, ह्याची आमच्या मनावर प्रचंड पकड घेतली गेली. ती इतके वर्षे झाली, तरी आजतागायत कायमच आहे.
वाल्मिकी रामायण हे मूळ समजले गेले. त्यानी सांगीतलेले कथासार हे अजरामर झाले. सर्वानी त्यांत रुची व्यक्त केली. कांही त्याला कवीची कथा रम्यता समजले. कांही म्हणतात तो इतिहास होता. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्याप्रमाणे सर्वांनी आपआपल्या समजानुसार त्याला मान्यता दिली. मात्र मुळ कथेच्या गाभ्याला कुणीच धक्का पोहोंचविला नाही. निरनीराळे विचार व वर्णने निर्माण झाली. ती फक्त त्यातील व्यक्तीरेखा वर्णन करताना. त्यांच्या स्वभावांत त्याना जे दिसून आले ते सांगीतले गेले. घटना मात्र कायम ठेवल्या गेल्या.
हेच बघना. जर रामाला परमेश्वरी रुप दिले गेले तर त्यांच्यामध्ये सारे दिव्यत्वाचे, भव्यतेचे, उत्तमातील उत्तम गुणघर्म असणारच. शेवटी महानतेची सर्व पैलू वेगवेगळ्या दिशानी रामांत असणारच. व ती होतीही. त्याचमूळे श्री रामप्रभू हे सर्वांचे आदरणीय ठरले. त्यांना वनांत पाठवण्याचे दुष्कृत्य राणी कैकयीनेच केले, हे सर्वानी मान्य केले आहे. आणि त्याच क्षणी आरोप प्रत्यारोप, वाईटपणा, दुष्टतां, स्वार्थीपणा, हट्टीपणा, इत्यादी दुर्गुण कैकयीच्या माथी मारले गेले. कथानकाच्या ओघांत व प्रसंगाच्या गुंतागुतीमध्ये हे सारे योग्य वाटू लागले. प्रत्येकजण स्वतःच्या विचार टिपणीला समाधानाची चादर घालू बघत होता. कैकयीला तिच्या कृत्याबद्दल कोणती तरी, कांही तरी शिक्षा व्हावी ही सर्व सामान्याची मानसिकता. परंतु ती खूप जुन्या काळातील घटना. आज केवळ कैकयीला दुषणे देत, कांहीजण त्यांत समाधान बघतात.
रामाच्या काळांत व त्याच्या कथेत दिव्यत्वाला फार महत्व होते. रामाचा जन्म हाच मुळी दुष्टांचा संहार करण्यासाठी होता. रावण व त्याच्याप्रमाणे जे अनेक राक्षसी वा असूरी वृत्तीचे होते, त्याना नष्ट करणे गरजेचे होते. प्रजेला सामान्य जनाना सुख देणे हे महत्वाचे. जे रामाने केले. रावण तसा रामाच्या खूप आधीचा राजा होता. त्याचे दशरथाबरोबर देखाल युद्ध झाले होते. त्यामुळे रावणाविषयी संपुर्ण ज्ञान राणी कैकयीला होतेच. तीच फक्त राजा दशरथाला त्याच्या राजकारणांत सक्षमतेने मदत करीत असे. युद्धभूमिवर देखील अनेक प्रसंगी तीने हाती शस्त्र घेऊन लढा दिल्याचा ऊल्लेख आहे. एकदा राजा दशरथाबरोबर एका प्रसंगांत अतुलनीय शौर्य व चतुरता कैकयीने दाखविली. युद्धांत जन्म मरणाचा – मान सन्मानाचा महान प्रसंग. योग्य आणि प्रासंगीक साहस कैकयीने केले. दशरथाला यश मिळाले. राजाने खुश होऊन राणी कैकयीला दोन वरदान देऊं केले.
तीच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले गेले. शब्दांना जीवापेक्षा जास्त जपण्याचा तो काळ होता. "ज्यान जाये पर वचन न जाये" म्हणतात ते यालाच. पण राणी फार चतूर होती. ते वरदान त्याच क्षणी घेण्याची ती वेळ अयोग्य होती. दुर दृष्टीने परीपूर्ण व जबरदस्त महत्वाकांक्षी कैकयी हीने नम्रतापूर्वक ती जणू दोन ब्रह्मास्त्रे भावी आयुष्य व योग्य प्रसंगाचा आराखडा घेत ठेवणीत ठेऊन दिली.
कैकयी ही राज कुमारी होती. एका राजाची मुलगी. नंतर राजा दशरथाबरोबर विवाहीत झाली. तीच्या रक्तांत- स्वभावांत राजकारण, चातूर्य, दुरदृष्टी, ही मुरलेली होती. निजी स्वार्थ, त्वरीत स्वार्थ, वैयक्तीक स्वार्थ असल्या क्षुद्र गोष्टींचा ती केव्हांच विचार करु शकणार नव्हती. आज पेक्षा उद्याचे भव्य दिव्य व टिकणारे सत्य बघण्याची, जाणण्याची तीची दूरदृष्टी क्षमता होती.
लंकेचा राजा रावण लंकेत दक्षिणेत होता. त्याच वेळी राम आयोध्येत उत्तरेत होते. इतक्या दुर अंतरावर रामाला पाठविणे ही फार मोठी कामगीरी होती. रामाच्या क्षमतेचा प्रश्नच नव्हता. सदा विजयी होणारी ती शक्ती होती. यश आणि विजय रामाच्या ललाटी विधात्यानेच कोरलेले होते. फक्त त्याला त्या कार्यांत जाण्यासाठी उद्युक्त करणे, चेतना देणे हे महत्वाचे होते. त्या काळी पायीं चालणे वा घोडा गाडी हीच संपर्काची साधने होती. त्यामुळे हजारो मैलांचा प्रवास करुन, दक्षिणेकडे जाऊन परत सर्वांनी येणे हे काम १२ ते १४ वर्षाचा काळ घेणारे असणारच. हा हिशोब आपण आजही करु शकतो. त्यामुळे राणी कैकयीने रामासाठी वनी जाण्याचा काळ जो सुचविला तो अत्यंत चतुरपणाने व तर्काला साजेल असाच वाटतो. रामाला वनांत अर्थात दक्षिणेकडे पाठविण्याचा हट्ट, हाच संपूर्ण कथानकातील प्रमुख गाभा वाटतो. बाकीच्या घटना ह्या फक्त प्रसंगाची जोड करणाऱ्या वाटतात. त्यांत कैकयीची इच्छा विशेष वाटत नाही.
कैकयीने रामाच्या राज्याभिषेकांचा अत्यंत महत्वाचा क्षण साधला. हा संपूर्ण रामायण जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तिच्या दुरदृष्टीने रामाने राज्यावर बसून राज्य कारभार संभाळणे हे ध्येय तीला न पटणारे होते. रावण व इतर दक्षिणेतील असूर यांचा पाडाव करणे ह्याने कैकयी पछाडली होती. हे सारे वाटेल ती किमत देऊन. वेळ पडल्यास जीव धोक्यात घालून वा नष्ट होऊन करण्यास ती प्रेरीत झाली होती. रामाला अशा राज्याभिषेकाच्या भव्य दिव्य आनंदी प्रसंगी रोकणे, सिंहासना पासून त्याला दुर सारणे आणि त्याला वनांत जाण्यास भाग पडणे, हे सारे केवळ कल्पनेच्या बाहेरचे होते. अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. राम सर्वांचा अत्यंत आवडता, प्रेमळ. कैकयीचा देखील आदरयुक्त प्रिय असा.
भरत जो कैकयीचा आपला मुलगा, तो देखील रामावर जीवापार प्रेम करीत असे. तो कदाचित् आईच्या रामास वनांत पाठविण्याच्या संकल्पनेस कडाडून विरोध करील. ऐकणार नाही. कांहीतरी विपरीत घडेल याचा तीला अंदाज होता. म्हणूनच तीने भरताला त्या महत्वाच्या समयी त्याच्या मामाकडे पाठवण्याची चाल खेळली. यांत ती त्या क्षणी तरी यशस्वी झाली. सर्व कौटूंबीक वातावरण जणू राममय झालेले होते. ह्यावर ब्रह्मास्त्र टाकून ते वातावरण उध्वस्त करावयाचे म्हणजे केवळ अशक्य होते.
कैकयीने रामप्रेमानी ओतप्रोत भरलेल्या ह्रदयावर, दगड ठेऊन अघात केला. राजा दशरथाला पूर्वी दिलेल्या वरदानाची आठवण देत कैकयीने पहीली मागणी केली.
" रामाला चौवदा वर्षे वनांत धाडा" हा तीचा अट्टाहासी परंतु दुरदृष्टीचा जबरदस्त वार होता. दुसरी मागणी होती, जी की पहील्या मागणीसाठी पुरक होती. निर्माण होत असलेल्या प्रसंगाला मदत करणारी होती. राज सिंहासन हे रिकामे राहूच शकत नाही. त्याची अशा प्रसंगी तात्पूरती योजना करावी लागते. ती होती रामाच्या गैरहजेरीत भरताला त्या सिंहासनावर स्थानापन्न करण्याची. ही योजना व रचना तात्पुरती होती. कारण शास्त्र धर्माप्रमाणे असलेल्या राज्याचे कुळच ती राजगादी चालवावी असे असते. राजा व त्याचा प्रथम पुत्र, त्यानंतर त्याचाही पुत्र ही संकल्पना होती. हे राजमान्य व जनमान्यही होते. आयोध्येची गादी त्यामुळे दशरथानंतर रामासाठीच होती. व त्याच वंशावळीत जाणारी. प्रसंगोचीत कांही काळासाठी भरत जरी त्यावर आरुढ झाला, तरी त्यावर काळाचे बंधन असणारचय. हे कैकयी जाणून होती. जरी हा फेरफार राजा दशरथाच्या इच्छेने, आज्ञाने होत असला तरी ते शास्त्र संमत नव्हते. त्याला म्हणता येइल प्रासंगीक बदल. एका योजनेने बांधलेला.
घटना घडत गेल्या. इच्छीत अपेक्षीत आणि योजलेले वेगवेगळ्या मार्गानी होत गेले. कैकयीला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागले. परंतु ती अचल होती. धीर होती. सशक्त होती. गंभीर होती. प्रासंगीक भावनेने व निरनिराळ्या विचाराच्या दबावाने हदरुन जाणारी नव्हती. तीने सारे आरोप पचविले. सारा क्रोध सहन केला.
तीने प्रथम राजा दशरथाला सर्व दृष्टीकोणातून सत्य व परिस्थीतीची जाणीव करुन दिली. रावणाचे दुषकृत्य आणि जुलमी राजवट, सामान्य प्रजेला सहन करावा लागणारा अत्याच्यार ह्या गोष्टी दशरथाला संपूर्णपणे माहीत होत्या. त्याचा नायनाट करणे हे देखील दशरथ जाणून होता. आणि त्याच वेळी त्याला रामाच्या शक्तीची दिव्यत्वाची पूर्ण जाणीव होती. विश्वास होता. थोडीशीही शंका नव्हती. राणी कैकयीची योजना दुरदृष्टीकोण हे सारे तर्काला धरुनच असल्याची खात्री राजाला पटलेली होती. दिलेल्या शब्दाचा मान राखणे हे जरी असले, तरी तत्वतः दशरथाने कैकयीचे विचार त्या क्षणी मानले होते. अत्यंत कठीण असा निर्णय त्याला घ्यावा लागला. ह्यावेळी मात्र घटनेची तिवृता भयंकर होती. दुर्दैवाने रामपुत्र प्रेमामुळे दशरथाला रामवियोगाचे दुःख सहन झाले नाही. भावनेच्या चक्रांत तो अडकला. त्यांतच त्याचा अंत झाला.
पूर्वी असाच एक प्रसंग झाला होता. बालक राम-लक्ष्मण नुकतेच धनुर्विद्या शिकून गुरुकुलातून आयोध्येस परत आलेले होते. बाल वय त्यांच. खेळण्या उड्या मारण्याचे. त्याच वेळी अचानक श्रेष्ठ महर्शी विश्वामित्र राजदरबारी आले. दशरथानी त्यांचे स्वागत केले. परंतु राजाला त्यांच्या एक धक्कादायक विनंतीची सोडवणूक करावी लागली.
" राजा तुझे दोन शुर वीर पराक्रमी पुत्र राम व लक्ष्मण यांना माझ्या नियोजीत यज्ञाच्या सुरक्षतेसाठी पाठव " राजा दशरथ हादरुन गेला. प्रथम राजाने सारे सैन्य यज्ञ रक्षणासाठी देण्याचे सुचवीले. परंतु महर्शी विश्वामित्रानी ते अमान्य केले. कठोर अंतःकरणानी राम लक्ष्मणाला वनी पाठवले गेले.
रामराज्याभिषेकाच्या ऐन वेळी निर्माण केले गेलेले तुफान रामकथेला वा इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. माता राणी कैकयीची केवळ राजकीय दुरदृष्टी. अर्थात दुर्दैवाने त्याघटनेत राजा दशरथाचे प्राण गमावले गेले.
कैकयीच्या दुरदृष्टीचा इतिहास येथेच थांबला नाही. तीच्या चाणाक्य दृष्टीने रामायण कथासारमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोविला. राम रावण युद्ध संपले. रावण मारला गेला. रामाला विजय मिळाला. देवी सिता हीचा वनवास व बंधन संपले. रामाने तीला आणले. रावणाचा लहान बंधू बिभीषण ह्याला लंकेच्या राज सिंहासनावर बसविले. एक आनंदी व उल्हासीत विजय वातावरण निर्माण झाले होते. रामाने वीर हनुमानाला आज्ञा केली.
" हनुमंता तू आत्ताच आयोध्येला जा. राजा भरत आणि माता कैकयी ह्याना येथील यशाचा सर्व वृतांत सांग. आम्ही वचना प्रमाणे १४ वर्षे पूर्ण केलेले आहेत. आमची तेथील सर्वांची भेट घेण्याची तीवृ ईच्छा झालेली आहे. त्यांची मान्यता घेऊन, तो निरोप मला सांग. त्यानंतरच आम्ही परतीच्या प्रवासाला निघूत "
रामाची आज्ञा घेऊन, वीर हनुमानानी राम-सिता व लक्ष्मण याना अभिवादन करीत आकाशांत झेप घेतली. हनुमान थोड्या वेळांतच तो आयोध्यानगरी पोंहोचला. तो भरत राज्याच्या दरबारी आला. त्याचे राजा व इतरांनी प्रचंड स्वागत केले. हनुमानानी आदराने भरताला सारी यशोगाथा सांगीतली. राम व देवी सिता हे येथे परत येण्याची आपली अनुमती मागत असल्याचे सांगीतले. भरताच्या डोळ्यांत राम प्रेमाने अश्रु आले होते. गळा दाटून आला होता. त्यानी त्वरीत सहमती व्यक्त केली. सर्वानी लवकर आयोध्येस यावे ही आशा व्यक्त केली. सभागृहामध्ये गंभीर शांतता पसरली होती. एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजमातेच्या दालनांत माता कैकयी देखील होती. ती अचानक पुढे आली. हनुमानाशी ती बोलू लागली. " हे वीर हनुमंता, तुम्हा सर्वांच्या यशासाठी अभिनंद आणि आशिर्वाद देते. माझा एक मार्गदर्शक संदेश तू माझ्या रामाला पोहोंचता करशील कां ? "
" राम सर्वांसह परत येत आहे त्यांच स्वागत. परंतु माझी एक इच्छा आहे. रामाने परतीच्या प्रवासांत नागपावा ह्या प्रदेशामधून यावे " सर्व सभा स्तंभित झाली. राजा भरत तर फारच चकीत झाला. कारण कैकयीने सुचविलेला प्रस्ताव परतीच्या प्रवासाला हानीकारक होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर बरेच वाढणारे असून कित्तेक दिवस घेणारे होते. आणि नागपावा ह्या प्रदेशांत राज्य होते ते कुलतुरा ह्या असूराचे. हा रावणाचाच नातेवाईक होता. तो शूर असून अहंकारी होता. ऋषीमुनी व सामान्य जनाचा छळ करीत असे. राम जर त्या प्रदेशातून जाण्याचा प्रयत्न करील, तर त्याला विरोध होईल. कदाचित् युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निराशजनक वातावरण, परंतु माता कैकयीचा स्वतःचा हा प्रस्ताव. सर्वजन हातबल झाले.
" जशी माता कैकयीची आज्ञा " म्हणत हनुमंताने तीला अभिवादन केले. तसेच इतर मातांना, राजा भरताला आणि इतर राजदरबारातील व्यक्तीना अभिवादन केले. हनुमानाने सर्वांचा निरोप घेत आकाशांत छलांग मारली.
जसे अपेक्षिले तसेच घडले.
माता कैकयीचे आज्ञा रुपी मार्गदर्शन, रामाने आदरयुक्त मानले. राम व त्याच्या सैनाला नागपावा प्रदेशांतून जाण्यास राजा कुलतुरा याने प्रचंड विरोध केला. शेवटी त्याची परिणीती युद्धांत झाली. त्यांत राजा कुलतुरा मारला गेला. रामाने त्याच्या गादीवर तेथीलच एका योग्य व चांगल्या व्यक्तीला राज्याभिषेक करुन स्थानापन्न केले. आनंदाचा जल्लोश करीत राम आपल्या सर्व साथीदार व सैन्यासह आयोध्येस परतला.
जीवनाच्या नैसर्गिक चक्रांमध्ये अनेक घटना घडत असतात. त्यांचे परिणाम अभ्यासले जातात. सर्वांचे संकलन बनत असते. चांगल्या वाईटावर भाष्य होते, आणि इतिहास बनत असतो. कित्येकदा सक्षम व्यक्ती घटनाना वेगळीच कलाटनी देतात. ही ऐतिहासीक मंडळी समजली जातात. ती एक वेगळाच इतिहास बनवितात. कैकयीने इतिहास घडविला. रामकथेतील अत्यंत प्रभावी पात्र म्हणून तीची गणना होते. कथानकाप्रमाणे ज्या कार्यपुर्तीसाठी राम आवतार झाला ते पूर्ण करुन घेण्याचे महत्वाचे श्रेय कैकयीकडेच जाते.
रावण व इतर असुरांचा नाश करणे, हे ध्येय तीने मनांत बाळगले होते. त्यांतही कैकयीने कल्पलता दाखवली. रावणानंतर त्याच्या सहकारी, नातेसंबंधी, असूर प्रवृतीचा आणि सर्वांत महत्वाचे शेवटचा व्यक्ती राजा कुलतुरा याचा नायनाट करण्याची योजना केली. तीला संपूर्ण जाणीव होती की तो हटवादी, अहंकारी आहे. कुणालाही त्याच्या प्रदेशामधून जाऊ देणार नाही. राज्यात हस्तक्षेप करु देणार नाही. त्याच वेळी कैकयीला संपूर्ण विश्वास होता की राम अत्यंत शक्तीशाली, पराक्रमी सक्षम योद्धा आहे. जो रावणासारख्या बलाढ्य राजाचा नाश करु शकतो, तो इतर कुणाही असूर प्रवृतीचा नाश करणार. हीच माता कैकयीची यशस्वी योजना. ज्यांत आहे चतुरपणा आणि दुरदृष्टीचे आवाहन. ज्यात मुरले आहे राजकारण.
सामान्य व्यक्तीजन कोणत्याही घटनेकडे भावनीक दृष्टीने प्रथम बघत असतो. तो प्रासंगिकता व समयआधारीत मत व्यक्त करतो. त्यावेळी विचारांची प्रगल्भता तेथे नसते. कैकयीने आपल्या मुलाला भरताला आयोध्येचे राजसिंहासन मिळण्यासाठी प्रयत्न करावा. परिस्थीती तशी निर्माण करावी, शब्दवचनांचा खेळ करावा, आणि त्या सर्वांमधून वैयक्तीक स्वार्थ साधावा हे घडले. बऱ्याच जणानी रामाच्या प्रेमापोटी कैकयीला खूप नांवे ठेवली. निरनीराळी अपशब्द भाषा वापरली. कैकयी ही स्वार्थी होती असे एकदम ठरवून टाकले. हे सारे वेळेनुसार होते हे सत्य. आशाही भावनांची कदर केली जाते. परंतु कालांतरानंतर घटनांची उकल होते. शेवटचे परिणाम हाती येऊ लागतात. इतिहास उलगडू लागतो. तो बनू लागतो. त्याच वेळी वेगळे सत्य समोर येते. अप्रतीम असे प्रसंग, घटनांची गुंतागुंत व सोडवणूक. प्रत्येक व्यक्तीची भव्य रेखा आनंदी करते. रामायण हे त्याचमुळे महाकाव्य वा भव्य इतिहास समजला जातो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडली पाहीजे.रामाला आपला उत्तराधीकारी करण्याचे राजा दशरथाने ठरविले. मुहूर्त निघाला. बातमी सर्व संबंधी व प्रजाजन याना कळली. आनंद व उल्हास याचे वातावरण पसरले.
स्वर्गांत सर्व देव जरी आनंदीत झाले, तरी त्यांच्यात चिंता निर्माण झाली होती.
देवांचा संभ्रम होता की
" रामाच्या अवताराच प्रयोजन हेच मुळी रावण व त्याच्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होत. जर रामाचा राज्याभिषेक जर झाला तर तो आयोध्येचा राजा होईल. मग रावणा बरोबरच्या त्याच्या युद्धाची कल्पना बाजूस पडेल. राम हा आक्रमक नव्हता. तो इतर राजाशीं अकारण युद्ध करणार नाही. कोणाची खोडी करुन त्याचे राज्य घेणारा नव्हता. रावण भले दुष्ट असूर प्रवृत्तीचा असला, तरी राम त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावाचा होता. आपला राजधर्म तो अत्यंत सत्यबुद्धीने व विवेकाने पाळणारा होता.
जर कांही घडायचे असेल तर राम राजा बनण्यापूर्वीच होणे शक्य आहे. राम हा एक पराक्रमी योद्धा व उत्कृष्ठ धनुर्धर होता. योद्धा आणि राजा ह्या दोन भूमिका वेगळ्या होत्या. योद्धा म्हणून घडलेल्या अन्यायाविरुद्ध लढणे, व अन्याय करणाऱ्याला तसेच त्याच वेळी शासन करणे ही संकल्पना येते. योद्धा हा प्रत्यक्ष बघतो. व त्याच क्षणी योग्य ती शिक्षा अमलांत अणतो. राजा म्हणून त्याला घटनांचे सर्व पैलू, कार्यकारणभाव, याच्या खोलांत जाऊन विचार करावा लागेल. कारण अन्याय करणारा विरुद्ध , न्याय झाला पाहीजे ही प्रथम समज. नंतर भाग येतो तो शिक्षेचा. त्यामुळे राम राजा म्हणून होण्यापूर्वीच हे घडणे जरुरीचे होते. "
राज्याभिषेकासमयी कांहीतरी विपरीत घडणार ह्याची त्याना चाहूल होती. ते आपली शंका घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्याना विनंम्र अभिवादन केले.
सर्वांची शंका व व्यथा जाणून ब्रह्मदेव म्हणाले " मी काळ व वेळेला आज्ञा केलेली आहे. घटनांचे सुसुत्रीकरण त्यांच्या हाती दिलेले आहे. हे सारे करण्यास ते सक्षम असतात. माझ्या योजना विधीलिखीत म्हणून अचुक होत असतात. आपण जा व निश्चींत रहा. "
सर्व देव जाताच ब्रह्मदेवानी " विकल्प ह्याची " आठवण केली. तत्क्षणी विकल्प प्रकट झाला. "जा तू पृथ्वीवर जा व योग्य ती कार्यपुर्ती कर.".
ब्रह्मदेवाला अभिवादन करुन विकल्प अन्तर्धान पावला.
आयोध्येमधील राजवाड्यांत आनंदाचे वातावरण होते. जल्लोश चालू होता. माता कैकयी सुद्धा आनंदमग्न होती. " माझा राम हा राजा होणार. प्रजेच्या कल्यानासाठी झटणार. एक आनंदी पर्व सुरु होणार ".
तीने तीची वैयक्तीक सेवा करणारी दासी मंथरा हीला हाक दिली. " जा बागेंत जाऊन उमललेली ताजी सुंदर टपोरी फुले काढून आण. आज मी स्वतः हार करुन माझ्या रामाच्या गळ्यांत घालणार आहे. त्याच्या भाग्योदयासाठी आशिर्वाद देणार आहे. " दासी मंथरा जी कैकयीसाठी प्रिय व अत्यंत विश्वासू होती. ती लगेच फुले काढण्यासाठी बागेत गेली.
बागेत आधीच विकल्प फुलझाडावर बसला होता. तो अदृष्य परंतु प्रतापी होता. मंथरेने एक टपोरे फुल बघीतले. ते तोडले. फुलाचा आनंद घेण्यासाठी ती फार उत्सुक झाली. तीने त्या फुलाचा स्वाद घेत प्रदिर्घ गंध टिपला. विकल्प हा त्याच फुलांत विराजमान होता. त्याने दासी मंथरेच्या स्वासाबरोबर तीच्या शरीरांत प्रवेश मिळविला. मंथरा फुले तोडण्यास सुरवांत करणार, इतक्यांत तीच्या डोक्यांत एक भावनिक कल्पना आली.
" राम हा राजा होणार. हे ठीक आहे. परंतु माझ्या राणी कैकयीच्या, स्वतःच्या मुलाचे, भरताचे काय होणार? " भरत हा सुद्धा राजाचाच मुलगा आहे. वंशाचा तोही दिवा आहे. राजसिंहासन हा त्याचा पण हक्क आहे. भरत फक्त थोड्याशाच अंतराने जन्मलेला. राजा दशरथाचे सर्व पुत्र यज्ञ देवतेच्या आशिर्वादाने, कृपेने, झालेले होते. तीन्ही राण्यानी यज्ञाचे पवित्र पायस ग्रहण करुन त्याना पुत्रप्राप्ती झालेली होती. कां म्हणून मग भरत राजसिंहासना पासून वंच्छीत रहावा? "
विचारांची मालिका, मार्ग नेहमी एका दिशेने जात असतात. व्यक्तीच्या भावना विचारांना सतत वेगवेगळ्या मार्गने नेण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा एका दिशेने चाललेला विचार भावनेच्या प्रभावाने एकदम विरुद्ध दिशेला पण जाऊ शकतो. आवडणारे क्षणात नावडते होते, वा नावडणारे आवडते बनू शकते. हे सामान्य मानसिक तत्वज्ञान आहे.
रामाविषयी प्रेम व आदर हा दासी मंथरेमध्ये भरलेलाच होता. म्हणूनच ती प्रथम आनंदी झाली होती. रामासाठी फुले आणून हार करण्यास मदत करु लागली. परंतु त्याच क्षणी तीचा स्वार्थ अर्थात स्वतःचे हीत ही भावना चेतवली गेली. हे सर्व साधारण मानवी स्वभावाचेच चित्रण असते. ही तीच्या विचारांची धारणा अयोग्य वाटली, तरी व्यक्तीची मानसिकता ह्यात दडलेली असते. म्हणूनच व्यक्त आणि अव्यक्त विचार ह्यांच्या संघर्षात मनुष्य भरकटला जातो. हेच तर जगासाठी एक व मनासाठी दुसरे होऊ शकते. हे स्वाभाविक असते. मंथरेच्या ह्या विचाराला विक्षीप्त म्हणता येणार नाही.
राम आणि मंथरेमधले भावनीक सख्य अंतर , तीच्यापासून खूप खूप दुर होते. तेच तुलनात्मक भरत व तीच्यातील सख्य अंतर खूप जवळचे होते. तीच्या मालकीनीचा आपला पुत्र असणारा. दोन्हीहीमध्ये आदर व प्रेम भावना होती. भरताकडून रामापेक्षा हे सहजगत्या मिळणे दासी मंथरेसाठी सुलभ होते. स्वार्थाच्या ह्याच वैचारीक भावनेने मंथरेला झपाटले. विचारांचे चक्र सुरु झाले. तीला रामापेक्षा भरताला राजसिंहासनावर आरुढ होताना बघावे ही इच्छा उत्पन्न झाली. ह्यांत वाईट बुद्धी नव्हती. दुष्टता नव्हती. मात्र स्वार्थ पुर्णपणे भरलेला होता. मंथरा सुद्धा अत्यंत चाणाक्ष्य होती. हूशार होती. सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन आपली मालकीन राणी कैकयी हीच्याकडून कांही जमेल कां? याचा अंदाज घेण्यासाठी उत्सुक होती. ती बागेतून फुले न आणता तशीच परत राजवाड्यांत आली.
कैकयी ही प्रथम राजकन्या होती. नंतर राजा दशरथाची राणी झाली. स्वतः कैकयी अत्यंत चतूर, दुरदर्शी व मुरलेली राजकारणी होती. राजा दशरथाला राज्यकारभारांत तीचे क्रियात्मक सहकार्य होते. अनेक युद्ध प्रसंगी देखील ती रणांगणावर गेली. तीने एका कसलेल्या योद्ध्याप्रमाणे योगदान दिले होते. एक युद्धांत तर कैकयीने राजाचे प्राण देखील वाचवले. युद्ध जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राजा आनंदी व खूश झाला. त्याने तीला दोन वर दिले. ती मागेल त्यावेळी ते पूर्ण करण्याचे वचन दिले. ती राजा दशरथाच्या संपूर्ण विश्वास व योग्य मार्ग दर्शनासाठी पात्र ठरलेली होती. तीचा शब्द तोलामोलाचा समजला जायी.
अशा प्रभावी व्यक्तमत्वाच्या कुशल राणी कैकयीने, आपली निजी सेवक व जवळकी करण्यास योग्य असलेली व्यक्ती म्हणून दासी मंथरेला निवडावे ही साधी बाब नव्हती. ही पसंती, मंथरेच्या चाणाक्ष्य व कर्तबगारीला बघूनच. राजभवनातील सेवकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्यतेचा कस लाऊनच केली जात असे. विशेषकरुन ज्यांचा संपर्क राजा राणी अथवा त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात असावयाचा. एखाद्या सामान्य दासी स्त्रीप्रमाणे वा नोकरासारखे बडबड करणे, इकडच्या तीकडच्या गप्पा मारणे, बाहेर बघीतलेल्या बातम्या सांगत बसणे, खऱ्याखोट्याचा आधार घेत चकाट्या मारणे, कुणाच महत्व मोठ वा छोट करणे, असे खालच्या वैचारीक दर्जा असलेल्या व्यक्तीना राजा वा राण्यांच्या संपर्कामध्ये केव्हांच ठेवले जात नव्हते. दासी मंथरेची वैचारीक योग्यता उच्य कोटीतीलच असणार.
एक प्रसंगात मंथरेची वैचारीक झेप लक्षांत येते. भरताला राज्य मिळण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती तीने कैकयीला केली. रामाबद्दल प्रेम व आदर व्यक्त करीत हे तीने सुचविले. राम हा सर्वांचा आवडता आहे, त्याच्या विषयी कोणताही उणा शब्द वा अनादर कैकयी सहन करणार नाही हे तीला जाणीव होती. त्याच वेळी जर कैकयीने मंथरेचे विचार एकदम धुडकावले वा फेटाळले तर निर्माण होणारा परिणाम निश्चीतच भयावह होईल. मंथराने आपल्या चाणाक्ष गुणधर्माचे योग्य प्रदर्शन केले. अतिशय हळूवारपणे व समजदारीने तीने भरताला राजसिहांसन मिळवे हा विचार राणी कैकयीसमोर व्यक्त केला.
कैकयीला मंथरेचा विचार ऐकून प्रथम गम्मत वाटली. हासू आले. पण ती रागावली नाही. कारण मंथरेच्या हूशारपणाची तीला जाणीव होती. मंथरेमध्ये स्वार्थी विचार असला तरी त्यांत कुणाचा द्वेश नव्हता. एखादी गोष्ट मिळावी ही अभिलाशा होती. कांहीही मल्लीनाथी न करता, कैकयी त्याक्षणी शांत बसली.
एका वेगळ्याच विचारांचे दालन दासी मंथरेने उघडले होते. कैकयीला त्यावर विचार करावयास लावले. राजा दशरथाच्या निर्णयांत फेरबदल करावयास भाग पाडणे, ही अत्यंत अवघड गोष्ट होती. एक प्रकारे जीवाशीच खेळण्याचा हा प्रकार होऊ शकतो. कैकयीला प्रथम राजा दशरथारला हे पटवावे लागणार. न पटल्यास परीणाम वेगळाही होऊ शकतो. राजा दशरथाचा राग, चौकशी आणि दासी मंथरेसह सर्वाना प्रचंड शिक्षेलाही सामोरे जाणारे होऊ शकते.
खरी भूमिका होती ती राणी कैकयीकडून. तीने राजा दशरथाबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आपला अनुभव. राजकारण, दुरदृष्टी, रावण व इतर आसूरांचा दक्षिणेकडे चाललेला अत्याचार, अशा निरनीराळ्या त्या काळच्या व परिस्थीतीवर भाष्य झाले. "रावणाचा नाश करणे" ही सर्वांत महत्वाची प्राथमिकता होती. आयोध्या ते लंका हे अंतर प्रचंड दुर होते. विशेषकरुन पायी चालून वा घोडागाडीने. कदाचित् ती योजना पू्र्ण करण्यासाठी १२ ते १४ वर्षे लागू शकतील. राणी कैकयीने बघीतले की राजा दशरथाला देखील हे मान्य होऊ लागले. त्याच क्षणी तीने सुचविले की रामाने त्यावेळी राजसिंहासन न घेता पुढील योजनेसाठी दक्षिणेकडे वनांत जावे. ज्या भागांत रावणाचे प्राबल्य असून त्याच्याशी संघर्ष होण्याची खूप शक्यता आहे. राम येईपर्यंत ती गादी राजाचा दुसरा पुत्र भरत सांभाळेल.
राजा दशरथाला ही योजना मान्य होती. परंतु स्वतःचे वाढते वय व रामा विषयी नितांत प्रेम ह्यामुळे तो अतिशय बेचैन झाला, हातबल झाला होता. कैकयीचा प्रस्ताव मान्य करावा की अमान्य करावा ह्या द्विधा विचारांत तो होता. राणी कैकयी मात्र आपल्या योजनेवर ठाम होती. त्याच क्षणी तीने अतिशय चतूरपणे पूर्वी तीला मिळालेल्या दोन वरदानांची आठवण करुन दिली. आणि मागणी केली. रामाचे दक्षिणेकडे १४ वर्षासाठी जाणे व त्या काळांत भरताने राज्य सांभाळणे. ह्या संकल्पना त्यामधूनच साकार झाल्या.
विकल्पाने दासी मंथरेच्या माध्यम रुपाने वैचारीक ठिणगी चेतवण्याचे प्रभावी कार्य केले. कैकयीने त्याचे रुपांतर प्रचंड आगीत केले. वैचारीक भडका उत्पन्न झाला. सत्तांतराची उलथापालथ झाली. रावणाचा वध व खऱ्या रामराज्याचा उदय झाला.
अनेक घटना अघटीत होत गेल्या. आणि सर्व रामायण रोमांचकारी झाले.
ज्याचा शेवट चांगला व समाधानी होतो, त्यालाच विधी लिखीत म्हणतात.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली.
“गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”
ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.
पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.
शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.
अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-
“दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?...........लक्षीमनाच्या”.
- भाऊसाहेब लाला टुले
tulebhausaheb1986@Gmail.com
"राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन देण्याआधी विचार कर. जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला, अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही, माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको, म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती. रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला. सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो. पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं, भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला, ते मलाही माहिती नाही. हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे. त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात. आणि ते कशानेही भरत नाही.!!
एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.
श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
श्रीकृष्ण हसून म्हणाले " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ' कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ' म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. "
जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.
१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.
२ - तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.
त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.
ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.
ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.
व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.
ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.
एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.
यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.
आहो तुम्ही बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.
केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.
अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.
ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.
कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ समजले जाते?
प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.
इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली, व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले. त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.
ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.
जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो. निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious अर्थात जाणीवेच्या स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.
तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.
माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो. ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.
इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.
जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.
जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.
१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे, काय वेगळ त्यानी केल ? ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.
एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.
येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti