नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा.
अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. परंतु खुद्द बादशाहने हत्ती भेट दिल्यामुळे तो हत्ती नाकारू शकत नव्हता. शेवटी त्याने आपली अडचण बिरबलाला सांगितली. .बिरबलाने लगेच त्या गवयाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे गवयाने दुसऱ्याच दिवशी हत्तीच्या गळ्यात एक ढोलके व तंबोरा बांधला व त्याला राजधानीच्या मुख्य रस्त्यावर सोडले.
हत्ती जाताना इकडे तिकडे सोंड हलवी व ती ढोलक्यावर पडत असल्यामुळे ढोलके वाजत असे व तंबोराही अधूनमधून सूर देत असे. हत्तीचा हा अवतार पाहून बघ्यांची एकच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे हत्ती बिथरला व मोकाट सुटला. शेवटी याची तक्रार बादशाहपर्यंत आली. बादशाहला खरा प्रकार
कळल्यानंतर त्याने गवयाला पकडून आणण्याचे आदेश दिला.
गवई आल्यावर अकबर बादशाह त्याला म्हणाला, 'मी तुला इनाम दिलेला हत्ती तू असा मोकळा का सोडलास!'त्यावर गवई हात जोडून बादशाहला म्हणाला, 'खाविंद माफ करा, मला या हत्तीचे पालनपोषण करणे अशक्य आहे. म्हणून मीच त्या हत्तीला सांगितले, की मी जसे गायन करून माझे पोट भरतो तसेच तूही गायन-वादन करून तुझे पोट भर. म्हणून मी त्याच्या गळ्यात ढोलके व तंबोरा अडकवून रस्त्यावर सोडला.
त्याचे उत्तर ऐकून बादशाहला त्याच्या या युक्तीमागे कोण आहे हे लगेच कळले. त्यामुळे त्याने त्या गवयाकडून तो हत्ती परत घेऊन त्याला सुवर्णमुद्राने भरलेली थैली दिली.
गवई मनापासून बिरबलाचे आभार मानत घरी परतला.
एक शेतकरी होता. त्याने दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतात भाताचे पीक लावले होते, कारण त्या भागात चांगला पाऊस पडायचा. त्या वर्षीही चांगलाच पाऊस पडला व हळहळू भाताचे पीक चांगले आले. त्या भाताच्या पिकातील एक मोकळी जागा पाहून एका पक्षिणीने आपल्या पिलांसाठी घरटे केले. ती पक्षीण आणि तिची चार-पाच पिले तेथे मजेने रहात होती, कारण शेतकर्याला त्या घरट्याची कल्पनाच नव्हती. भाताचे पीक चांगलेच वर आल्यानंतर त्या शेतकर्याने कापणी करायचे ठरविले व एकेदिवशी आपल्या मुलाला त्याने सांगितले की, उद्या आपल्या सर्व नातेवाइकांना कापणीसाठी बोलव. त्याप्रमाणे त्या मुलाने सर्व नातेवाइकांना कापणीसाठी निरोप दिला. शेतकर्याने त्याच्या मुलाला काय सांगितले हे त्या पक्षिणीच्या पिल्लांनी ऐकले होते. त्यामुळे सायंकाळी पक्षीण येताच त्यांनी तिला शेतकर्याचे बोलणे सांगितले व आपल्याला आता आपले घरटे सोडावे लागणार याचे त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्या तरी कोणीही कापणी करायला येणार नाही त्यामुळे लगेच आपल्याला घरटे हलवावे लागणार नाही. दुसऱ्या दिवशी शेतकरी कापणीसाठी नातेवाइकांची वाट पाहत बसला मात्र कोणीही आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा मुलाला म्हणाला, ' 'नातेवाइकांचे काही खरे नाही, तू उद्या आपल्या आजुबाजूच्या शेतकर्यांना निशेप दे म्हणजे आपणच कापणी करू. ' ' मुलगा हो म्हणाला व निरोप द्यायला गेला. शेतकरी व मुलाचे हे संभाषणही पिलांनी ऐकले व सायंकाळी पक्षीण आली की तिला ते सांगितले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्याही कोणी येणार नाही. त्यामुळे उद्याचा दिवस तरी घरटे आपले शाबूत राहील. दुसर्या दिवशीही कापणीसाठी कोणीच आले नाही त्यामुळे शेतकरी वैतागला व आपल्या मुलाला म्हणाला, आता आपणच उद्या घरातील सर्व जण भाताची कापणी करून टाकू. हेही पिल्लांनी ऐकले व आपल्या आईला ते सांगितले. तेव्हा मात्र पक्षीण त्यांना म्हणाली, आता मात्र आपल्याला दुसरीकडे घरटे करावेच लागेल. त्याप्रमाणे सायंकाळीच तिने आपल्या सर्व पिल्लांना दुसरीकडे तात्पुरत्या घरड्यात हलविले. इकडे दुसर्या दिवशी सकाळीच शेतकरी आपल्या कुटुंबासह आला व त्याने भाताची कापणी सुरू केली.
एक राजा होता. एके सायंकाळी तो राजवाड्याभोवती असलेल्या बागेत फिरायला गेला. तेथे एका झाडावर मधमाशांचे पोळे होते. असंख्य मधमाशा ये-जा करत होत्या. राजा थोडा वेळ तेथे थांबून त्या
मधमाशांचे निरीक्षण करू लागला; परंतु तेवढ्यात एकाएकी एक मधमाशी खाली आली व राजाच्या हाताला दंश करून उडून गेली. राजा कळवळला. बरोबरच्या सैनिकांची धावपळ झाली. गांधीलमाशीच्या दंशामुळे राजाचा हात सुजला. राजवैद्यांनी उपचार करून हात बरा केला, मात्र त्यात दोन दिवस गेले.
राजाला वाटले की, एक साधी गांधीलमाशी चावल्यामुळे आपले दोन दिवस वाया गेले,मग सर्वात जास्त वेदना देणारा दंश कोणाचा असू शकेल?
एके दिवशी राजदरबारातच त्याने हा प्रश्र्न उपस्थित केला. कोणी म्हणाले, सापाचा दंश फारच वेदनादायक असू शकतो, तर कोणी म्हणाले, फणा काढणारा नाग चावला तर तो पाणीदेखील मागू देत नाही. तर एकाने सांगितले, विंचवाचा दंश फारच वेदना निर्माण करणारा असतो; परंतु राजाला ती
सर्व उत्तरे नेहमीची म्हणजे पुस्तकी वाटली. त्यामुळे त्याचे समाधान झाले नाही. तेव्हा राजदरबारातील वयोवृद्ध मंत्री उठून उभा राहिला व म्हणाला, महाराज, दोघांचा दंश फारच प्रखर असतो. राजाने विचारले, ते दोघे कोण? त्यावर तो मंत्री म्हणाला, हे एक स्तुतिपाठक व दुसरा निंदक, एक समोरून दंश
करतो, तर दुसरा पाठीमागून. मात्र दोघांचे दंश तसे इतके प्रखर असतात त्यामुळे माणसाचे मन बेभान तरी होते किंवा संतापामुळे त्याचा उद्रेक तरी होतो. राजाला त्या मंत्र्यांचे उत्तर मनोमन पटले व त्याबद्दल त्या मंत्र्यांचे दरबारातच त्याने कौतुक केले.
बर्याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली.
आपण इतके तन्मयतेने शिकवित आहोत व एकाही मुलाचे लक्ष नाही, व त्याला कारणीभूत तो मुलगा आहे हे पाहून ते अतिशय संतप्त झाले व त्याच अवस्थेत ते वर्गाबाहेर आले व त्यांनी त्या मुलाला खडसावून विचारले, '' इथे उभा राहून काय करतोस?''
त्यावर तो गरीब मुलगा घाबरत म्हणाला, '' सर, मी तुम्ही काय शिकवता ते ऐकत होतो. परंतु माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर उद्यापासून मी येथे उभा राहणार नाही. ''
त्या गरीब मुलाच्या तशा अवतारातही त्या शिक्षकाला त्याच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसली. ते त्याला म्हणाले,'' तुला शिक्षणाची आवड आहे तर मग शाळेत का येत नाहीस?''
त्यावर तो मुलगा खाली मान घालून म्हणाला, '' सर, माझे वडील साधे मजूर आहेत. त्यांना माझ्या शाळेची फी परवडत नाही म्हणून मला शाळा अर्धवट सोडावी लागली. ''
हे सांगताना त्या मुलाला गहिवरून आले. तरीही त्या शिक्षकाचा प्रथमदर्शनी त्या मुलावर विश्वास बसला नाही. ते त्याला म्हणाले, ' 'मी काल वर्गात काय शिकविले हे तू सांगू शकशील काय?'' त्यावर त्या मुलाने लगेच आदल्यादिवशी त्यांनी काय शिकविले ते सांगितले.
त्याची स्मरणशक्ती पाहून शिक्षक दंगच झाले. त्यानंतर ते त्याला म्हणाले, '' शाळेच्या फीची मुळीच काळजी करू नकोस. उद्यापासून सरळ वर्गात येऊन बसत जा. ''
त्याप्रमाणे तो विद्यार्थी शाळेत शिकू लागला व प्रत्येक वर्षी तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. मोठेपणी हाच मुलगा प्राध्यापक होऊन प्रसिद्ध लेखकही झाला. त्याचे नाव होते लुडव्हिक अँटोनिओ म्युरोहोरी..
(थोरांच्या गोष्टी या संग्रहातून)
स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच 'श्रेष्ठ कोण?' यावरून भांडण सुरू झाले.
'स्वप्न' म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्यावर ' सत्य' म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
दोघांचे भांडण विकोपाला गेले. मात्र निर्णय काहीच होईना. म्हणून दोघेही जगन्नियंता असलेल्या परमेश्वराकडे गेले. परमेश्वराने दोघांचीही बाजू ऐकून घेतली व तो म्हणाला की, मला तुमच्या दोघांचीही परीक्षा घ्यायची आहे. जमिनीवर उभे राहून ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील तोच श्रेष्ठ ठरेल.
त्यामुळे दोघेही परीक्षेला तयार झाले.
प्रारंभी सत्याने प्रयत्न केला. त्याने जमिनीवर उभे राहून आभाळाला हात लावायचा प्रयत्न केला. मात्र कितीही प्रयत्न केले तरी त्याचे हात आभाळाला काही केल्या टेकेनात.
आता स्वप्नाची पाळी आली. त्याचे हात एकाच मिनिटात आभाळाला टेकले. मात्र त्याचे खालचे पाय मात्र जमिनीवर नव्हते. स्वप्न तसेच अधांतरी लोंबकळत राहिले.
थोडक्यात या परीक्षेत दोघेही नापास झाले. त्यावर परमेश्वर त्यांना म्हणाला, तुमच्यात श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण, याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण तुम्ही दोघेही परस्परांना पूरक आहात त्यामुळे 'श्रेष्ठ कोण' असा वाद न घालता एकमेकांच्या संगतीने तुम्ही प्रवास केलात तर त्यात दोघांचेही हित आहे.
स्वप्न आणि सत्य या दोघांनाही हे उत्तर पटले व त्यांनी पुन्हा कधी वाद निर्माण केला नाही.
शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होवून शरीरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.
आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहीत स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोकावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येवू देवू नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तीत्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तीच कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया, हवा नाकपुड्यातून शरीरात जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतू इतर विचारांना सारून चित्त एक दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे केव्हा जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेवून जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ठेविले अनंते तैसेचि रहावे.. चित्ती असो द्यावे समाधान
आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वहात जावून एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल. कोलीडोस्कोपधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा लागते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वताचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डूबन्याचा असतो. येथपर्यत सिमीत. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.
हवा नाकांमधून छातीत फूफ्फूसात जाते. निरनिराळ्या नलीकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करतात. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होवू लागते. मग ते फूफ्फूस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असोत वा इतर कोणते इंद्रिय असोत. सर्वांशी तुमचा जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.
हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेशनात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतू जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हा हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलीकेतून रक्तपेशीपर्यत व पूढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चीत नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहांत आणि चेतनारूपी जीवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजीना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली.
गाडगेबाबांनी सर्व माणसांना बसवले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली.
गोपाला ऽऽऽ गोपाला ऽऽऽ देवकीनंदन गोपाला !
“बाबाहो, दारू पिऊ नका. कर्ज काढू नका. बळी देऊ नका. बकरे, कोंबडे मारून नवस फेडू नका. तुमी अडाणी रायले, पोरायले अडाणी ठेवू नका. त्यांना पाटी पेन्सिल द्या. शाळेत घाला. उपाशी राहा; पण पोराले शिकवा!”
कीर्तन संपले. आता दुपार झाली होती. कसलासा सण असावा. घरोघर तळणाचा वास दरवळत होता. बाबांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. एका
घरासमोर ते भिक्षा घेण्यासाठी उभे राहिले. समोर पाहातात तो त्या घरमालकीणीने पंचपक्वानांनी भरलेले ताट ओट्याजवळ उभ्या असलेल्या
गाईसमोर धरले होते. ती गाईने ते अन्न खावे म्हणून प्रयत्न करीत होती; पण गाय मात्र सारखे तोंड इकडे-तिकडे वळवीत होती आणि गायीने ते सुग्रास अन्न खावे म्हणून बाई हट्टाला पेटली होती.
गाडगेबाबा आणखी जवळ गेले आणि त्या बाईला म्हणाले, “बाई, तुम्ही देत असलेले अन्न जनावराचे नाही, ते माणसाचे अन्न आहे. माणसाचे अन्न तुम्ही जनावरांना का देता! तुमच्या गावात पुष्कळ माणसे उपाशी असतील त्यापैकी कोणाला तरी ते अन्न द्या. समाधानी होईल बिचारा!”
गाडगेबाबांचे ते बोलणे ऐकून ती बाई खजिल झाली. ते ताट घेऊन ती पटकन घरात गेली अन् बाबांना भिक्षा घेऊन आली. ती भिक्षा स्वीकारून गाडगेबाबा दुसरीकडे वळले.
तात्पर्य काय.. तर ज्याचे अन्न त्यालाच द्यावे.
Copyright © 2025 | Marathisrushti