(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मला देव दिसला – भाग ९

    आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वहात जावून एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल. कोलीडोस्कोपधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा लागते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वताचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डूबन्याचा असतो. येथपर्यत सिमीत. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.

    हवा नाकांमधून छातीत फूफ्फूसात जाते. निरनिराळ्या नलीकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करतात. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होवू लागते. मग ते फूफ्फूस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असोत वा इतर कोणते इंद्रिय असोत. सर्वांशी तुमचा जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.

    हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेशनात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतू जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हा हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलीकेतून रक्तपेशीपर्यत व पूढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चीत नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहांत आणि चेतनारूपी जीवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजीना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ज्याचे अन्न त्याला द्या !

    संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली.

    गाडगेबाबांनी सर्व माणसांना बसवले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली.

    गोपाला ऽऽऽ गोपाला ऽऽऽ देवकीनंदन गोपाला !

    “बाबाहो, दारू पिऊ नका. कर्ज काढू नका. बळी देऊ नका. बकरे, कोंबडे मारून नवस फेडू नका. तुमी अडाणी रायले, पोरायले अडाणी ठेवू नका. त्यांना पाटी पेन्सिल द्या. शाळेत घाला. उपाशी राहा; पण पोराले शिकवा!”

    कीर्तन संपले. आता दुपार झाली होती. कसलासा सण असावा. घरोघर तळणाचा वास दरवळत होता. बाबांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. एका
    घरासमोर ते भिक्षा घेण्यासाठी उभे राहिले. समोर पाहातात तो त्या घरमालकीणीने पंचपक्वानांनी भरलेले ताट ओट्याजवळ उभ्या असलेल्या
    गाईसमोर धरले होते. ती गाईने ते अन्न खावे म्हणून प्रयत्न करीत होती; पण गाय मात्र सारखे तोंड इकडे-तिकडे वळवीत होती आणि गायीने ते सुग्रास अन्न खावे म्हणून बाई हट्टाला पेटली होती.

    गाडगेबाबा आणखी जवळ गेले आणि त्या बाईला म्हणाले, “बाई, तुम्ही देत असलेले अन्न जनावराचे नाही, ते माणसाचे अन्न आहे. माणसाचे अन्न तुम्ही जनावरांना का देता! तुमच्या गावात पुष्कळ माणसे उपाशी असतील त्यापैकी कोणाला तरी ते अन्न द्या. समाधानी होईल बिचारा!”

    गाडगेबाबांचे ते बोलणे ऐकून ती बाई खजिल झाली. ते ताट घेऊन ती पटकन घरात गेली अन् बाबांना भिक्षा घेऊन आली. ती भिक्षा स्वीकारून गाडगेबाबा दुसरीकडे वळले.

    तात्पर्य काय.. तर ज्याचे अन्न त्यालाच द्यावे.

  • मला देव दिसला – भाग १०

    मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.

    ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.

    जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • देखल्या देवाला दंडवत

    एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्‍हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्‍हाईकांकडे घेऊन जात असे.

    कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.

    गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.

    रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.

    गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला 'गाढवाला' कसे कळणार ?”

    काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.

  • मला देव दिसला – भाग ११

    ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.

    मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • असाध्य ते साध्य

    जीवनात कोणतेही आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. शिवाय समोर आलेले कोणतेही आव्हान आपण स्वीकारूच व त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास असला तर कोणतेही असाध्य काम साध्य व्हायला वेळ लागत नाही.

    एकदा एका राजाला एका विशेष कामासाठी चांगल्या कर्तबगार अधिकार्‍याची गरज होती. असा अधिकारी परीक्षा घेऊनच त्याला निवडायचा होता. त्यासाठी त्याने राजवाड्यासमोरील भव्य पटांगणावर एक मोठा डोंगर तयार केला व हा डोंगर दुसर्‍या बाजूला जो नेऊन ठेवेल त्याला ते मुख्य पद मिळेल,
    अशी अट त्याने घातली. प्रत्यक्ष राजवाड्यात नोकरी मिळणार म्हणून अनेक तरुण त्या स्पर्धेत उतरले. मात्र समोरचा डोंगर लांबूनच पाहून त्यातील जवळजवळ सर्वच तरुणांचे अवसान गळाले. हा डोंगर उचलून तो दुसर्‍या बाजूला नेणे सर्वस्वी अवघड आहे असे त्यांचे मत बनले. शिवाय नोकरीसाठी अशी विचित्र अट घातली म्हणून त्यातील अनेकांनी राजालाच वेड्यात काढले. परंतु त्यामधील एका तरुणाने मात्र हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. तो अतिशय आत्मविश्वासाने त्या डोंगराजवळ गेला त्याने बारकाईने त्या डोंगराचे निरीक्षण केले. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, हा डोंगर अगदीच कृत्रिम आहे. तो काड्या, कापूस, कागद आदी हलक्या वस्तूंनी तयार केलेला आहे. त्याने त्या डोंगराच्या
    तळाशी हात घालून तो उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सहज लक्षात आले की, हा डोंगर आपण डोक्यावर उचलून नेऊ शकतो. त्याप्रमाणे त्याने दोन्ही हातांनी डोंगर उचलला व डोक्यावर ठेवून तो दुसर्‍या बाजूला नेऊन ठेवला व राजाची अट पूर्ण केली. हा तरुण तो डोंगर डोक्यावरून घेऊन जात असता स्पर्धेतील इतर तरुण मात्र हे आम्हीही सहज केले असते, असे म्हणू लागले. त्यावर राजा त्यांना म्हणाला, ' 'मी तुम्हाला थोडेच अडवले होते? केवळ तुमच्यात आत्मविश्वास व आव्हान स्वीकारण्याची जिद्द नव्हती म्हणून तुम्ही या स्पर्धेतून पळ काढलात. '' राजाने नंतर त्या विजयी तरुणास प्रमुख पदावर नेमले व तरुणानेही राजाचा विश्वास सार्थ ठरवला.

  • एक समाधानी योनी

    रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बकरय़ा त्यांच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यांत व्यस्त दिसल्या. जीवन चक्रामधले जवळ जवळ सर्व उपक्रम त्या तन्मयतेने पूर्ण करीत असल्याचे जाणवले. त्याच बरोबर त्या मेंढपाळामुळे सर्वजण सुरक्षित असल्याची भावना देखील बाळगुन होते.

    भरपूर खा, प्या, बागडा, मजा करा, सुरक्षित रहा, हा संदेश त्या बाळगुन होत्या. आणि हे सत्य ह्या साठी की सर्वजण वर्तमान काळांत जगण्याचा आनंद घेत होत्या. भविष्याची त्याना समज नव्हती व क्षमतांदेखील नव्हती. त्या कारणाने गरज वाटत नव्हती. त्यांचे भविष्य निश्चीत व अटळ होते. जसे तुमचे आमचे असते. ते म्हणजे मृत्यु. मृत्यु अंतीम असतो हे जरी सत्य असले, तरी त्याना खाटीकखाना ( Slaughter House ) ह्या दरवाज्यातून जावे लागणार असते. हे मानव निर्मीत सामाजिक व व्यवहारीक आधारलेले सत्य बनलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या मृत्युचे विविध प्रकार वा स्थळे नाहीत. मृत्युची एकच पद्धत. अपघाती आणि कांही क्षणांतच. एक घाव आणि दोन तुकडे.
    कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे. आपल्या विद्वतेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिखरावर जाऊन तो अनेक तर्क-वितर्क, प्रमेये, प्रस्थापीत करतो. तो श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे लागला आहे. त्याचा संघर्ष, अविश्वास, आणि नैसर्गिक चक्रामधला विरोध हा शेवटी त्याचेच जीवन अशांत होण्यातच घडत आहे. खाण्याची चिंता, पिण्याची चिंता, विश्रांतीची चिंता, सुरक्षिततेची चिंता, थोडक्यांत म्हणजे जगण्याचीच चिंता त्याने निर्माण केलेल्या आहेत. निसर्गाला हवे असते ते एक जीवन चक्र. जन्म, वाढ, पुनर्निमिती आणि मृत्युच्या छायेत जीवनाला निरोप. पुन्हा चालत राहते ते तसेच जीवन चक्र.
    हे सारे करीत होत्या त्या बकरय़ा. शिवाय आपल्या जीवाचे बलीदान देऊन इतर जीवांचे पोषण करण्यांत सहभाग देत होत्या. मानवाने मात्र त्याच्या जीवनचक्रांत बाधा आणून निर्माण केलीत अनेक दुःखे आणि अशांतता. मृत्यु अटळ असला तरी त्याचे प्रकार अनिश्चीत केले. तो वेळ घेणारा झाला. वैचारीक भय निर्माण करणारा झाला. मृत्युची जाणीव तिवृतेने करणारा झाला.
    " बकरय़ानो – मेंढ्यानो निसर्गाच्या योनीतील समाधानी चक्रांत तुम्ही आहांत " म्हणत मी तेथून घरी आलो.-- डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com

  • उत्साह आणि कृती

    काही लोक अतिशय उत्साही असतात. उत्साहाच्या भरात ते वेगवेगळ्या वल्गना करतात. मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्यांचा उत्साह मावळू लागतो.

    नीलेश आणि ज्ञानेश हे दोघे मित्र खूपच उत्साही होते. प्रत्येक गोष्टीत ते इतके उत्साहाने बोलत की, ऐकणार्‍यांवर त्यांचा खूपच प्रभाव पडत असे. उत्साहाच्या बाबतीत दोघेही एकमेकाला हार जात नव्हते.दिवाळीचे दिवस जवळ आले होते. दिवाळीचे आणि फटाक्यांचे व फराळाचे जसे अतूट नाते आहे तसेच किल्ले तयार करण्याचेही आहे. अनेक मुले आपापल्या इमारतीत किले तयार करण्यात मग्न होती.

    नीलेश आणि ज्ञानेश यांनाही किल्ला तयार करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या शेजारच्या इमारतीत तयार होत असलेला किल्ला पाहिला आणि त्यांनी उत्साहाच्या भरात आपल्याही इमारतीत तसाच किल्ला तयार करण्याचे ठरविले. दोघेही उत्साहाने त्या किल्याबाबत बोलू लागले.

    आपण किल्ला असा करू तसा करू यावर दोघांची बरीच चर्चा झाली. शेवटी किल्यासाठी माती आणायचे दोघांनी ठरविले. दोन-चार टोपली माती त्यांनी आणलीही. त्यात पाणी घालून चिखलही केला. मात्र प्रत्यक्षात किल्ला करताना त्यांचा उत्साह मावळला. सुरुवात झाली. किल्ला करून आपण आपले श्रम नि वेळ वाया घालवित आहोत, असे त्यांना वाटू लागले.

    अर्थातच त्यांनी आपली कल्पना सोडून दिली. तो चिखल किल्ल्याची वाट पाहून केव्हाच वाळूनही गेला. किल्ला मात्र अस्तित्वात आलाच नाही. उत्साह आणि कृती यामध्ये किती अंतर असते याचे प्रत्यंतर त्यांना आले होते.

  • जग आणि देह – एक साम्य

    शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचाल हा जसा बाहेरचा देखावा दिसतो, आगदी तसाच रचनात्मक पद्धतीने शरीराच्या आंत दिसला. वेगळेपणा जो भासत होता तो केवळ बघण्याच्या दृष्टीकोणामुळे. दोन्हीमध्ये जसे सौंदर्य होते, तसेच भयानकता देखील जाणवत होती. वाहीन्यामधून वाहणारे द्रव, रक्त, सारे शरीरभर वाहत होते. अवयवांत जमा होत होते. मोठ्या बहीरगोल भिंगामधून ( Magnifying lens ) त्याचे चित्र जणू निरनिराळ्या लोक व प्राणीच्या वस्त्याप्रमाणे जंगलाप्रमाणे भासत होते. त्यांची जा- ये हालचाल ह्या जरी सुक्ष्म असल्या तरी जणू वस्त्या, गांव, सडक, नदी, तलाव, इत्यांदींची अगदी हूबे हूब प्रतीकृती त्या सर्व देहातील स्थुल व सुक्ष्म रचनेमध्ये अगदी स्पष्टपणे जाणवत होती. एका भागातले अन्न, पाणी, हवा, वा इतर जीवनघटक पदार्थ एका अवयवातून दुसरय़ा अवयवामध्ये वाहीन्याच्या जाळ्यामार्फत नेल्या जातात. जे त्यावेळी काढून टाकण्यात आले, त्यालाच तज्ञानी हानीकारक वा रोगाची वाढ म्हटले गेले. शरीरातील अवयव रचनेचा व ह्या रोग रचनेचा देहांत असांच सदैव संघर्ष होत असतो. शरीरातील टिश्यू नष्ट होणे, पुन्हा नविन निर्माण होणे, ह्या क्रिया सतत चालतात. जगातील वातावरणात वा परिसरांत देखील अशाच लोक, प्राणी, झाडे, जंगले, पर्वत, ह्या सर्वांत सतत हालचाली निर्माण होणे वा नष्ट होणे चालत असतात. रचनेमधले वर्णन जरी भिन्न वाटले तरी ह्या जगामधले आणि देहामधले सर्व स्थुल वा सुक्ष्म घटक पदार्थ कार्यानी, कार्याच्या लक्ष्यानी एकच असल्याचे भासतात. ते म्हणजे उर्जा निर्मिती व सर्व प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे हेच नव्हे काय ?

    जगाची जशी भौगोलिक रचना असते, ती पदार्थाची अथवा निर्जीव साधनांची असते. त्याच वेळी जो इतिहास बनत असतो तो सजीव प्राणीमात्रांचा. मानवी देहांत देखील अशाच प्रकारे इतिहास भूगोलाची सतत पुनरावृत्ती होत राहते. शरीरातील अवयवांची वाढ होत जाणे आणि त्याच वेळी अनेक रोगांची देहावर आक्रमणे होणे त्याच प्रकारचे ठरते. ह्यांत तोड-मोड-जोड होत राहते. नष्ट होणे वा विकास पावने सतत घडत जाते.

    शरीरामध्ये सुक्ष्म भाग हा पेशी असतो. अगणित पेशींची ग्रंथी बनते. अनेक ग्रंथींपासून अवयव बनतात. अनेक अवयव एकत्र येऊन शेवटी शरीर बनते.

    पेशींच्याच स्थरावर उर्जा शक्ती निर्माण होते. बाहेरुन मिळणारे घटक पदार्थ हवा, पाणी अन्न ह्यांच्या मदतीने उर्जा निर्मीती होते. देहाच्या सर्व हालचाली क्रिया ह्या शक्तीनेच पूर्ण केल्या जातात. जगामध्ये देखील प्रत्येक पदार्थात सुक्ष्म घटक अणू असून त्यात देखील उर्जा निर्मीत वा साठवलेली असते, जीला अणू उर्जा म्हणतात. तीची शक्ती प्रचंड प्रमाणात असते. निसर्गामधल्या दिसणारय़ा, जाणवणारय़ा आणि न दिसणारय़ा, आद्रष्य असलेल्या सर्व हालचाली व क्रिया ह्या केवळ ह्याच उर्जेमुळे होत असतात. जगाला ह्या उर्जा शक्ती मोठ्या गृहाकडून, सुर्याकडून मिळते. ह्यामुळे मानवी देहाचे, कार्याचे, व जीवनचक्रांचे सारखेपण साधर्म ह्या जगांप्रमाणे भासते हे म्हटल्यास चुक ठरणार नाही.

    म्हणूनच सत्य वचन आहे की " जे पिंडी ते ब्रह्मांडी "

    आणि जर देहाप्रमाणे जग असेल, जगाप्रमाणे विश्व वा ब्रह्मांड असेल तर कल्पना करता येईल की सारे 'विश्व' हे एक प्रचंड, अनंत, भव्य दिव्य 'देहधारी' शक्तीस्वरुप आहे. ती केवळ कल्पना असली तरी त्याचे वर्णन अवलोकन ज्ञान हे मानवी विचारांच्या कितीतरी बाहेर आहे. त्यामुळे ' परमात्मा ' आहे येवढेच आम्ही म्हणू शकतो. तो कसा कोठे ह्याची उकल करणे शक्यच नाही. तो केवळ 'उर्जामय ' असल्यामुळे, त्याला जाणता येते येवढेच समाधान.

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • असेही एक गणेश विसर्जन

    अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएक वास्तू खरेदी केली. गणेश चतुर्थीचा दिवस होता. पुजेची पुस्तके, कॅसेट, सी.डी. आणि इतर पुजेचे साहित्य तेथील भारतीय दुकानामधून मिळाले. छोट्या छोट्या गणेशच्या मुर्ती पण १० ते १२ डॉलर्सपर्यंत उपलब्ध होत्या.

    नव्या घरांत छोटीशी गणेश मूर्ती आणली गेली. तिकडेही महाराष्ट्र मंडळ स्थापन झालेले आहेत. मंदीरे आहेत पूजाअर्चा अथवा आन्हीके सांगणारे भटजी देखील आहेत. फक्त तुमची इच्छा हवी. भटजीच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना, आवाहन, पूजन, आरती, प्रसाद इत्यादी सर्व धार्मिक सोपस्कार कुटूंबीय आणि मित्रमंडळी ह्यांच्या परिवारांत पूर्ण केल्या.

    दिड दिवस सर्वानी आनंद उपभोगला. गणेश विसर्जनाची वेळ आली. तेंव्हा मात्र सर्वाना एक वेगळाच मार्ग अवलंबावा लागला.कारण चौकशी करता कळले की स्थानिक शासकीय आदेशा प्रमाणे कोणत्याही तलावांत मुर्त्या, निर्माल्ये, वा इतर कोणत्याही पूजाविधीमधल्या वस्तूंचे विसर्जन करण्यावर बंदी होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास जबरदस्त शिक्षेची तरतूद होती. तेथील त्या परिस्थितीला उपाय नव्हता. तेथील मुलांच्या ग्रुपने सारे नियम व बंधने आनंदाने मान्य केली. एक मोठा टब आणला व स्वच्छपाण्याने भरला. सर्वजण खूप नाचले, गायले. प्रथम खूप जल्लोश केला. आनंद व्यक्त केला. श्री. गणेशाचा जयजयकार केला. पूजा आरती झाली. गणपतीबाप्पा मोऱ्या, पुढल्या वर्षी लवकर या ह्या गर्जनेच्या नादामध्ये त्या गणेशाचे त्याच टबमध्ये विसर्जन केले गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला म्हणत सर्वजण प्रसाद घेऊन गेले.

    आठ दिवसांत त्या पाण्यांत गणेशमुर्तीचे खऱ्या अर्थाने विसर्जन झालेले जाणवले. आतां तीच पवित्र माती व पवित्र पाणी घरातील अंगणामधल्या फुलझाडांना पद्धतशीर टाकले गेले. दररोज सकाळी उमललेल्या टपोऱ्या फुलाकडे बघून त्यांचा आनंद तर द्विगुणीत होऊ लागला. गणरायाच्या पाऊलखूणा ह्या त्या सुंदर फुलांमध्ये डोकावीत आहेत, असा भास होत असे.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com