नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बर्याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली.
आपण इतके तन्मयतेने शिकवित आहोत व एकाही मुलाचे लक्ष नाही, व त्याला कारणीभूत तो मुलगा आहे हे पाहून ते अतिशय संतप्त झाले व त्याच अवस्थेत ते वर्गाबाहेर आले व त्यांनी त्या मुलाला खडसावून विचारले, '' इथे उभा राहून काय करतोस?''
त्यावर तो गरीब मुलगा घाबरत म्हणाला, '' सर, मी तुम्ही काय शिकवता ते ऐकत होतो. परंतु माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर उद्यापासून मी येथे उभा राहणार नाही. ''
त्या गरीब मुलाच्या तशा अवतारातही त्या शिक्षकाला त्याच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसली. ते त्याला म्हणाले,'' तुला शिक्षणाची आवड आहे तर मग शाळेत का येत नाहीस?''
त्यावर तो मुलगा खाली मान घालून म्हणाला, '' सर, माझे वडील साधे मजूर आहेत. त्यांना माझ्या शाळेची फी परवडत नाही म्हणून मला शाळा अर्धवट सोडावी लागली. ''
हे सांगताना त्या मुलाला गहिवरून आले. तरीही त्या शिक्षकाचा प्रथमदर्शनी त्या मुलावर विश्वास बसला नाही. ते त्याला म्हणाले, ' 'मी काल वर्गात काय शिकविले हे तू सांगू शकशील काय?'' त्यावर त्या मुलाने लगेच आदल्यादिवशी त्यांनी काय शिकविले ते सांगितले.
त्याची स्मरणशक्ती पाहून शिक्षक दंगच झाले. त्यानंतर ते त्याला म्हणाले, '' शाळेच्या फीची मुळीच काळजी करू नकोस. उद्यापासून सरळ वर्गात येऊन बसत जा. ''
त्याप्रमाणे तो विद्यार्थी शाळेत शिकू लागला व प्रत्येक वर्षी तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. मोठेपणी हाच मुलगा प्राध्यापक होऊन प्रसिद्ध लेखकही झाला. त्याचे नाव होते लुडव्हिक अँटोनिओ म्युरोहोरी..
(थोरांच्या गोष्टी या संग्रहातून)
स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच 'श्रेष्ठ कोण?' यावरून भांडण सुरू झाले.
'स्वप्न' म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
त्यावर ' सत्य' म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
दोघांचे भांडण विकोपाला गेले. मात्र निर्णय काहीच होईना. म्हणून दोघेही जगन्नियंता असलेल्या परमेश्वराकडे गेले. परमेश्वराने दोघांचीही बाजू ऐकून घेतली व तो म्हणाला की, मला तुमच्या दोघांचीही परीक्षा घ्यायची आहे. जमिनीवर उभे राहून ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील तोच श्रेष्ठ ठरेल.
त्यामुळे दोघेही परीक्षेला तयार झाले.
प्रारंभी सत्याने प्रयत्न केला. त्याने जमिनीवर उभे राहून आभाळाला हात लावायचा प्रयत्न केला. मात्र कितीही प्रयत्न केले तरी त्याचे हात आभाळाला काही केल्या टेकेनात.
आता स्वप्नाची पाळी आली. त्याचे हात एकाच मिनिटात आभाळाला टेकले. मात्र त्याचे खालचे पाय मात्र जमिनीवर नव्हते. स्वप्न तसेच अधांतरी लोंबकळत राहिले.
थोडक्यात या परीक्षेत दोघेही नापास झाले. त्यावर परमेश्वर त्यांना म्हणाला, तुमच्यात श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण, याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण तुम्ही दोघेही परस्परांना पूरक आहात त्यामुळे 'श्रेष्ठ कोण' असा वाद न घालता एकमेकांच्या संगतीने तुम्ही प्रवास केलात तर त्यात दोघांचेही हित आहे.
स्वप्न आणि सत्य या दोघांनाही हे उत्तर पटले व त्यांनी पुन्हा कधी वाद निर्माण केला नाही.
शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होवून शरीरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.
आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहीत स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोकावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येवू देवू नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तीत्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तीच कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया, हवा नाकपुड्यातून शरीरात जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतू इतर विचारांना सारून चित्त एक दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे केव्हा जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेवून जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ठेविले अनंते तैसेचि रहावे.. चित्ती असो द्यावे समाधान
आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वहात जावून एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल. कोलीडोस्कोपधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा लागते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वताचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डूबन्याचा असतो. येथपर्यत सिमीत. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.
हवा नाकांमधून छातीत फूफ्फूसात जाते. निरनिराळ्या नलीकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करतात. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होवू लागते. मग ते फूफ्फूस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असोत वा इतर कोणते इंद्रिय असोत. सर्वांशी तुमचा जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.
हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेशनात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतू जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हा हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलीकेतून रक्तपेशीपर्यत व पूढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चीत नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहांत आणि चेतनारूपी जीवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजीना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली.
गाडगेबाबांनी सर्व माणसांना बसवले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली.
गोपाला ऽऽऽ गोपाला ऽऽऽ देवकीनंदन गोपाला !
“बाबाहो, दारू पिऊ नका. कर्ज काढू नका. बळी देऊ नका. बकरे, कोंबडे मारून नवस फेडू नका. तुमी अडाणी रायले, पोरायले अडाणी ठेवू नका. त्यांना पाटी पेन्सिल द्या. शाळेत घाला. उपाशी राहा; पण पोराले शिकवा!”
कीर्तन संपले. आता दुपार झाली होती. कसलासा सण असावा. घरोघर तळणाचा वास दरवळत होता. बाबांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. एका
घरासमोर ते भिक्षा घेण्यासाठी उभे राहिले. समोर पाहातात तो त्या घरमालकीणीने पंचपक्वानांनी भरलेले ताट ओट्याजवळ उभ्या असलेल्या
गाईसमोर धरले होते. ती गाईने ते अन्न खावे म्हणून प्रयत्न करीत होती; पण गाय मात्र सारखे तोंड इकडे-तिकडे वळवीत होती आणि गायीने ते सुग्रास अन्न खावे म्हणून बाई हट्टाला पेटली होती.
गाडगेबाबा आणखी जवळ गेले आणि त्या बाईला म्हणाले, “बाई, तुम्ही देत असलेले अन्न जनावराचे नाही, ते माणसाचे अन्न आहे. माणसाचे अन्न तुम्ही जनावरांना का देता! तुमच्या गावात पुष्कळ माणसे उपाशी असतील त्यापैकी कोणाला तरी ते अन्न द्या. समाधानी होईल बिचारा!”
गाडगेबाबांचे ते बोलणे ऐकून ती बाई खजिल झाली. ते ताट घेऊन ती पटकन घरात गेली अन् बाबांना भिक्षा घेऊन आली. ती भिक्षा स्वीकारून गाडगेबाबा दुसरीकडे वळले.
तात्पर्य काय.. तर ज्याचे अन्न त्यालाच द्यावे.
मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.
ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.
जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्हाईकांकडे घेऊन जात असे.
कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.
गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.
रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.
गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला 'गाढवाला' कसे कळणार ?”
काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.
आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.
विशेष म्हणजे, ही यात्रा स्पेशल गाडी सुरू करण्यासाठी खामगाव-जलंब येथील प्रवासी संघटनेने खूप प्रयत्न केले. तसेच बुलडाणा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंदराव आडसूळ यांनीही आमची मागणी रेटून धरली. त्यामुळेच ही गाडी सुरू झालेली आहे. सर्वसामान्य वारकऱ्याला स्वस्तात पंढरपूर जाण्याची संधी यामुळे मिळाली. फक्त दीडशे रुपयात जत्रा असल्याने अनेकांनी पंढरीची वारी सुरू केली. मलाही वाटले चला पंढरपूरला जावे. त्यामुळे दरवर्षी रेल्वेने पंढरपूर जात होतो. तेथे गेल्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या भक्तनिवासात तर कधी श्री संत सोनाजी महाराज कवठा यांच्या मठात मुक्काम असायचा. कधी विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील एखाद्या भाड्याच्या खोलीत थांबायचो. त्यामुळे पंढरपुरातील बहुतेक रस्ते ओळखीचे वाटायचे. तसे काही नाही. आपल्या शेगावसारखेच पंढरपूर आहे. पण गर्दी लाखात असते. त्यामुळे एकदा ओळखीची व्यक्ती भेटली की, यात्रेत ती दुसऱ्यांदा भेटणे कठीणच आहे. अशा परिस्थिती जर एखाद्याची बॅग हरवली तर मग काय सोय?
त्याचे असे झाले की, माझी बदली आकोटला झाल्यामुळे मी सन २००९ मध्ये वारीला जाऊ शकलो नाही. पण परिचयातील बरीच मंडळी खामगाव रेल्वेगाडीने पंढरपूरला निघाली होती. ही गाडी खामगाववरून निघत असल्यामुळे आपल्याकडचीच मंडळी जास्त असते. खामगाव, नांदुरा, जळगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा, अकोला तालुक्यातील वारकरी खामगावहून बसतात, ते जागा मिळण्यासाठी. असेच अकोल्यातील दोन शिक्षक मित्र एका बोगीत बसले. हातरुणचे पांडुरंग चोपडे सर आणि अकोल्यातील महादेव शेगोकार हे साेबत असल्याने त्यांनी आपआपल्या बॅग प्रवासादरम्यान कॅरिअरवर ठेवल्या. सर्व वारकरी मंडळी आणि आपल्याकडची म्हटल्यावर चोरीचा धोका नव्हताच. प्रवासादरम्यान सर्वच निश्चिंत होते. मग २० तास जर पंढरपूरला जाण्यासाठी या गाडीने लागतात, तर सुरू झाल्या गप्पा. पीक पाणी काय म्हणते पासून तुम्ही कोण्या गावचे, कुठे असता, जमीन किती आहे, शेजारच्याचे आडनाव असे झाडून पुसून विषय प्रवासात एकमेकांशी शेअर केले गेले.
नंतर प्रवास संपला, उतरण्याची सर्वांची घाई. गडबडीत यातील शिक्षक महादेव शेगोकार यांची काळ्या रंगाची वर ठेवलेली बॅग कुणीतरी उचलून उतरताना घेऊन गेला. त्याच रंगाची आणि तशीच दुसरी बॅग तेथे होती. ती आपली समजून हे शिक्षकही उतरले. आणि गेले मुक्कामाच्या ठिकाणी सोनाजी महाराजांच्या मठात. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी कपडे, मोबाईलचे चार्जर काढण्यासाठी बॅग उघडली तर उघडेना. कुलप लावलेले असल्याने वांदा झाला. आता कसं? आपली बॅग कुणीतरी अनावधानाने नेली. आणि त्याची आपल्या हाती आली. बग अदलाबदल झाल्याने आता एवढ्या लाखोच्या जनसागरात ती सापडणे महाकठीण काम. मग काय करायचे तर लावा एकमेकांना फोन, पण त्या पंढरपुरात गर्दीच एवढी की मोबाईल टॉवर जाम झालेले. कुणाशीच संपर्क करता येत नव्हता.
पण इकडून त्यांना फोन लागत होते. अशातच आकोटचे श्री संत वासुदेव महाराज यांचे निधन झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याची खात्री करण्याच्या उद्देशाने मी आमच्या नात्यातील चोपडे सरांना थेट फोन लावला. आणि माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, आमचे मित्र शेगोकार सरांची बॅग हरवली आहे. आता ४००- ५०० किमी अंतरावर मी आकोटला आणि यांच्या बॅगचे मी तरी काय करणार?
पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी माझ्या परीने शोध घेणे सुरू केले. त्यांना विचारले तुमच्या आजुबाजूला कोण बसलेले होते. कोणत्या गावाचे होते. त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? त्यावर त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्या माणसाच्या घरी दुकान असावे, कारण त्यांनी प्रवासादरम्यान आपल्या घरी फोन लावून चौकशी केली होती. बहुतेक नांदुरा तालुक्यातील असावे, आणि त्यांचे आडनाव घोराडे असण्याची शक्यता आहे. त्यांची बॅगही काळ्याच रंगाची होती. पण एवढे असून फायदा काय? म्हणून डोके चालवू लागलो.
आणि मला आठवले आमच्या वडी येथील वार्ताहराचे नाव. मुकुंदा घोराळे पाटील हे आता हयात नाहीत. त्यांचे अपघाती निधन झाले आहे. परंतु त्यांचा अतिरिक्त व्यवसाय मला माहीत होता. त्यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयांची एजन्सी होती, सर्व्हिसिंगसाठी ते ग्रामीण भागात जात होते. त्यामुळे जवळपास तालुक्यातील सर्वच दुकानदारांशी त्यांची ओळख होती. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घोराळे अाडनाव असलेल्या व्यक्तीचे आणखी कोण्या गावात दुकान आहे, हे विचारून बॅग हरवल्याची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ त्या दुकानदाराचा फोन नंबर दिला. मी थेट पंढरपूरला गेलेल्या त्या दुकानदाराच्या घरी लॅण्डलाइनवर संपर्क साधला. सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही पंढरपूरहून फोन आला होता की, आमची बॅग हरवली आहे. त्यानुसार मोबाइल नंबर घेतला व थेट त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांचेही मोबाइल नंबर माझयाकडे होते. एकमेकांना ते दिले. परंतु टॉवर जाम मुळे त्यांचा एकमेकांशी एकाच गावात संपर्क होत नव्हता. मी ४०० किमी अंतरावरून आकोटवरून लॅण्डलाईनवरून दाेघांशी संपर्क साधत होतो. त्यानुसार हरवलेली बॅग घेऊन तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मठाजवळ या, असे दोघांनाही सांगत गेलो, दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांना ओळखले, बॅगही ओळखली. आणि सुटकेचा निश्वास सोडला.
यावर आमचे मित्र पांडुरंग चोपडे सर म्हणाले की, काय गड्या नऊ हजार लोकांच्या गर्दीत एकदा भेटलेला माणूस डबल भेटत नाही. अन तू ४०० किमी अंतरावर बसून आमची बॅग एकमेकांनाा परत मिळवून दिली. हे ऐकून मी धन्य झालो. पण बॅग हरवणारे शिक्षक महादेव शेगोकार माझ्या परिचयाचे नव्हते.
दरम्यान, सन २०१३ मध्ये मी अकोला शहरात राहायला आलो. एके दिवशी लग्न संबंधाच्या ठिकाणी शेगोकार सरही आले. परंतु ओळख नव्हती. आमच्या सोबतच्या पाहुण्यांना त्यांनी घरी नेण्याचे ठरवले, मलाही चला म्हटले. मी त्यांच्या घरी गेलो. मग एकमेकांचा परिचय सुरू झाला. माझा परिचय त्यांना नव्हता. मी माझा परिचय देताना सांगितले, जनार्दन गव्हाळे. दैनिक दिव्य मराठीला असतो. नाव ऐकताच अरे बापरे तुम्ही काय ? मी म्हटले काय झाले सर ? तर ते त्यांच्या वडिलांना सांगत म्हणाले, हे गव्हाळे साहेब. यांनीच माझी हरवलेली बॅग पंढरपूरच्या गर्दीत सापडून दिली होती. त्यावेळी मला मनात आले की, सांगा. आठवणी किती पक्क्या राहतात.
— जनार्दन गव्हाळे,
खामगाव जि. बुलढाणा, विदर्भ.
Copyright © 2025 | Marathisrushti