(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • हौस – Part 2

    घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! "अहो, या दोन किलो
    जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?'

    "अग, असू दे आता. मी मुद्दामच आणल्यात जास्त. तुला हव्या तेवढ्या ठेव, बाकी मी उद्या क्लासमध्ये द्यायला आणल्यात!"

    "सर काय बोलताय काय? खरंच असं झालं?"

    "अरे, मग सांगतेय काय? हे तुझे प्रोफेसरसाहेब, कॉलेजमध्ये असतील वाघ. पण व्यवहारात एकदम शेळी रे शेळी! बरं, काय रे तू कशाला आला होतास? आमच्या या बुडुला गंडवायला तर नाही ना?"

    "छे! छे! काय बोलताय बाईसाहेब? अहो मी काय गंडवणार यांना?"

    "उल्हास, अरे हे क्रेडिटकार्ड तूच ना मारलेस माझ्या गळ्यात? गोड गोड बोलून?"

    "क्रेडिट कार्ड? बघू बघू!" म्हणून हीनेही ते घेतले. उल्हासने अगदी नव्या उत्साहाने तिला सगळं रामायण पुन्हा सांगितलं. त्यावर ही खूष होऊन गेली.

    "एक वर्ष फुकट आहे ना? मग काही हरकत नाही. यांच्या हातून मुहूर्त होतोय ना? छान! आणू का आणखी थोडी जिलबी?"

    "नको, बाईसाहेब राहू द्या. उशीर फार झालाय." चहा घेऊन उल्हास तोटे "
    सटकला. क्रेडिट कार्ड हिच्या ताब्यात देऊन!

    मी पण कामाला लागलो. दोन तास त्या तोट्याने खाल्ले. माझे नेहमीचे रुटीन चालू झाले. क्रेडिट कार्ड प्रकार मी विसरुनच गेलो. कारण दुकानात जायची वेळ माझ्यावर क्वचितच यायची. यायची म्हणण्यापेक्षा यांना दुकानात पाठवणे म्हणजे नसती आफत अशी हीची ठाम समजूत. मी पण गप्प बसून ते संकट परस्पर टळतंय ते बरं अशा धोरणीपणाने आणि एकूणच प्रोफेसर मंडळी म्हणजे जरा हीच असतात या बुरख्याखाली ते अप्रिय प्रसंग टाळीत असे. कुठल्याही दुकानात जाऊन खरेदी करणे म्हणजे तो दुकानदार आपल्यावर उपकार करायलाच बसलाय या भावनेने मी त्याच्याकडे अगदी लाचारीने पहातो. रेल्वे खिडकीवर जाऊन तिकीट काढणे किंवा रिझर्वेशन करणे म्हणजे त्या महान व्यक्तीस आपण फारच त्रास देतोय ही आमची भावना! तर हे माझे शत्रूपक्ष टाळणेच मी पसंत करतो.

    मधे आठ-पंधरा दिवस गेले. चिरंजीव म्हणाले, "बाबा! तुमचे लेंगे आता फार जुने नाही का वाटत तुम्हाला?"

    "का रे बाबा, माझ्या लेंग्यांवर का घसरलास? फार तर दीड-दोन वर्ष झाली असतील. आणि घरात तर घालायचे असतात."

    "बाबा, प्रत्येक वस्तूचे एक आयुष्य असते. त्यानंतर त्याचे विसर्जन करावे लागते. गणपती नाही का, आपण नवा कोरा आणतो, पण पाच-दहा दिवसांनी त्याचं विसर्जन करतोच ना? देव पण हेच सांगतो.फार मोह पाशात गुंतू नका.

    "हे बघ राहूल, तू मला मोहपाशाच्या गोष्टी शिकवू नकोस. अरे कुठे लेंगा आणि कुठे गणपती? काही कशाचा ताळमेळ?"

    "काय चुकलं हो त्याचं? आणि काय वाईट सांगतोय का तो? ते जुने लेंगे द्या आता फेकून. वीट आला तेच तेच पाहून. ते प्रोफेसर दीक्षित पहा, कसे पॉश असतात. रोज रोज नवीन झब्बा सुरवार घालतात घरात कायम. टिप टॉप!"

    "आता, कोण हे दीक्षित काढलेस?"
    "अहो,ते अवंतिकाचे वडील हो?" सौ.

    "अवंतिकाचे वडील? कोण ही अवंतिका? मला समजेल असं बोलशील
    का?"

    'अहो, असं काय करताय? ती अवंतिका मालिका नसते का टी.व्ही. वर?
    त्यातल्या अवंतिकाचे वडील! ते प्रो. दीक्षित म्हणतेय मी!

    "अच्छा? ते दीक्षित म्हणतेस होय? अग हे टी.व्ही मालिकावाले काय वाट्टेल ते दाखवतात. एखाद्या कारकुनाचे घरसुद्धा एखाद्या सावकाराच्या तोंडात मारील असे दाखवतात.

    "ते जावू दे! मी म्हणते, चांगलं टिपटॉप रहायला काय हरकत आहे हो?"

    "अग, म्हणजे रोज ते टिप टॉप ठेवायचं म्हणजे आलंच रोज धोबी इस्त्रीचा भुर्दंड. त्यापेक्षा हे काय वाईट आहे? धुतलं की घातले. काही इस्त्री नको का फिस्त्री!'

    "अहो, पण ते लेंगे आता अगदी विरलेत हो. नका पाहू अंत त्यांचा, काही नाही. आता जर का तुम्ही ते नवीन शिवणार नसाल ना, तर मी राहूलला सांगते नवे सुरवार झब्बे आणायला तुमच्यासाठी. रेडीमेड!

    "अग, नको, नको. मला ते रेडिमेड कपडे नाही येत अंगाला. पुन्हा ते उंची जास्त झाली. हात लांब वाटतात. म्हणून मी कमीजास्त करायचे प्रकार. मी आणतो दोन -चार दिवसात नवीन कापड आणि टाकीन शिवायला मग तर झालं?

    तो विषय तिथं संपला. मग दोन-चार दिवसांनी मी हिला म्हणालो, "बरं का ग, मी येतो जरा बाहेर जाऊन."

    "कुठे?"

    "अग ते लेंग्यासाठी कापड घेतो आणि आपला मॉर्डर्नवाल्याकडे शिवायला टाकतो."

    "थांबा. मी येते तुमच्याबरोबर.

    "अग, आता तू कशाला तेवढ्यासाठी?"

    "थांबा म्हणते ना? मी येते. तुम्हाला नाही कळायचं कुठलं कापड घ्यायचं

    ते.".

    "म्हणजे? अगं लेंग्याला काय मी लाल, पिवळ्या रंगाचं कापड घेणार आहे का? साधं पांढरं तर कापड आणायचंय. तू उगाच नको माझ्यामागे लागू,

    "अहो, दोनशे ग्रॅम जिलब्या आणायला पाठवले तर दोन किलो घेऊन आलात! आता लेंगे आणायला जाल आणि लंगोट घेऊन याल!"

    "काय म्हणतेस काय तू? अगं लंगोट आणि लेंगा हे मला काही कळत नाही का? तूम्हणजे बुवा अगदी कहरच करतेस कधी कधी

    "हे पहा. पांढरे कापड आणणार असाल ना, तरी त्यात हजार प्रकार असतात. तुम्हाला काही कळायचं नाही. घेऊन याल एखादं मांजरपाट!"

    "बरं, मग असं करतेस का? तूच घेऊन ये. एखादं चांगलं पांढरं कापड. त्या मॉडर्नवाल्याला विचार माझ्या लेंग्या,झग्यासाठी किती लागेल ते. नंतर मी जाईन शिवायला टाकायला." ही खरेदीची ब्याद टाळावी म्हणून मी ठेवणीतला उपाय काढला पण हिनं तो उधळून लावला.

    "काही नको, आपण बरोबरच जायचं. आणि माप घेऊ आणि तसेच दुकानात जाऊ.पुनः पुन्हा नको तेच तेच काम!"

    आम्ही दोघं बाहेर पडलो. शिंप्याकडे जाऊन किती कापड लागेल याचा अंदाज घेतला आणि मी माझा मोर्चा शेजारच्याच दीपक क्लॉथ स्टोअरकडे वळवला.

    'मला वाटलेच तुम्ही इकडे घुसणार ते! तुम्हाला काय दीपक शिवाय दुसरे काही दिसतच नाही का हो?"

    "का गं? काय वाईट आहे? शिवाय पांढरे कापड तर घ्यायचंय. त्यात काय बघायचं? पटकन घेऊन जाऊ आणि मोकळं होऊ?"

    "अहो जरा पहा तरी आजुबाजूला. केवढाली मोठी मोठी सुंदर, वातानुकुलीत दुकानं आली आहेत ती? आम्ही मेलं त्या भिकारड्या शिवाय कुठे जाणारच नाही कधी. चला मी तुम्हाला एक मस्त पॉश दुकानात नेते आज. ह्या डायमंड हॉलसमोर नवं दुकान झालंय, कामिनी, तिथं जाऊ.'

    कामिनी? म्हणजे बायकांचं दिसतंय, साड्या बिड्यांचं?"

    "हो साड्यांचंच आहे! पण तिथं पांढरं कापडसुद्धा मिळतं."

    "अग, पण येवढ्याश्या पांढऱ्या कापडासाठी येवढ्या मोठ्या दुकानात जायचं?"

    "मग? तो दुकानदार काय खातोय का काय आपल्याला? अहो त्याचा धंदाच आहे. काय हवं ते दाखवलं पाहिजे त्यानं आपल्याला. आता ग्राहकराजाचे दिवस आहेत म्हटलं."

    "अगं, पण घ्यायचंलेंग्याचं कापड, आणि बघायच्या साड्या?"

    "मग काय झालं! तुम्ही ना फारच घाबरट बाई! चला माझ्याबरोबर मुकाट्यानं,

    मी बळीचा बकरा असल्यासारखा खाटकाच्या हाती मान देतात तसा,
    निमूटपणे निघालो.

    --विनायक अत्रे

  • उद्यान एक्सप्रेसचा थरार

    इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.

  • विश्वबंधुत्व जपणारी लेखिका पर्ल बक

    ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे.

    पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली.

    पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील दोघेही चीनमध्ये अमेरिकी मिशनरींचे काम करीत होते. त्यामुळे पाच महिन्यांची असतानाच पर्ल त्यांच्याबरोबर चीनमध्ये गेली. यांगत्सी नदीवरील चिकियांग शहरात तिचे बालपण गेले. लहानपणापासूनच तिला साहित्याची फार आवड होती. वयाच्या सातव्या वर्षी तिने चार्ल्स डिकिन्सच्या रचना वाचायला सुरुवात केली. तिला सांभाळण्यासाठी ठेवलेल्या चिनी महिलेने तिला अनेक चिनी कथा सांगितल्या, त्यामुळे चिनी संस्कृतीबद्दल तिला साहजिकच ओढ निर्माण झाली होती. शांघाय येथील एका दैनिकात तिने लिहायला सुरुवात केली व वाचकांना तिचे लेखन आवडू लागले.

    वयाच्या सतराव्या वर्षी पर्ल बक पुन्हा अमेरिकेत गेली, मात्र अमेरिकेतील अति मोकळे वातावरण तिला आवडले नाही. चीनची ओढ होतीच, त्यामुळे ती पुन्हा चीनमध्ये गेली. आपल्या आजारी आईची सेवा करीत असताना तिने उत्तर चीनमधील मका जनजीवनाचा अभ्यास केला व ' इन चायना टू ' हा लेख प्रसिद्ध केला. तो अतिशय गाजला. १९२६ साली पर्ल बकने ' ईस्ट विन्ड, वेस्ट विन्ड' ही आपली पहिली कादंबरी लिहिली. ती १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर लिहिलेल्या 'द गुड अर्थ' कादंबरीला 'पुलित्झर ' पुरस्कार मिळाल्यामुळे तिला आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पर्ल बकने एकूण १८ कादंबऱ्या व लहान मुलांसाठी २३ कथांची पुस्तके लिहिली.

    १९३८ मध्ये तिला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयुष्याच्या अखेरीस आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात तिने निराधार मुला-मुलींसाठी आश्रम सुरू केला व तेथे आलेल्या मुला-मुलींच्या आयुष्याला वेगळे वळण दिले.

  • पार्श्वसंगीत

    … तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले.

  • आईचा जोगवा जोगवा

    काळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत.

  • नमू’ तुझ्या येण्यानं ‘जत्रा’ भरली!!

    नमानं वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यातील ‘लाॅली’नं अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे.

  • घरात असण्याचे फायदे

    कोरोना पित्यर्थ सतत बाहेर पडणारी माणसे आता घरात पडून आहेत. सप्ताहात एकदा घरी असले की कसे गोड वाटायचे.आता मात्र खिडकीवाटे डोकावले तरी , डोकावण्याचे सुख काय असते याचा अनुभव येतो.

  • अजब न्याय नियतीचा – भाग ३

    तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.

  • अपघात

    अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, प्रत्यक्ष घटनास्थळावर जायचं का, असे प्रश्न यायचे. अपघातामागचा धक्का, वेदना त्या वेळी तरी जाणवल्या नाहीत. त्याची बातमी दिली, की आपली इतिकर्तव्यता संपली, असंच काहीसं होतं. वेगळ्या व्यवसायाचा तो परिणाम असावा किंवा आपल्याला काय त्याचं, ही वृत्ती असावी; पण वृत्तपत्रात उमटणाऱया एखाद्या छोट्या बातमीमागे एखाद्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून जातं, याची जाणीव नव्हती. एक अपघात असा पहिला, की त्या दिवशी रात्री मी जेवण नाही करू शकलो. पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या बसने रस्त्यातच पेट घेतला आणि ती भस्मसात झाली. शांताबाई जोग आणि इतर काही नाट्य कलावंतांचा त्यात कोळसा झाला. पाच बाय पाच एवढ्या आकारात चार-पाच जणांच्या मृतदेहाचे ते अवशेष पाहिले अन् गदगदून आलं. या अपघाताची बातमी वर्णनासह लिहिली; पण ती घटना अस्वस्थ करून गेली. त्या दिवशी ना झोप, ना भूक. आता एखादी बातमी वाचली तरी त्या व्यक्तीचं कुटुंब उभं ठाकतं डोळ्यापुढं, आप्तस्वकीय दिसू लागतात. कोणाचा तरुण मुलगा, तर कोणा बछड्याचा बाप. कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ... आयुष्य विस्कटून टाकणारे आपघात.

    हे एवढं सारं सांगण्याचं कारणही तसंच आहे. पत्रकारितेत मनाचा दगडही होऊ शकतो अन् त्याला पाझरही असतो. आता अशी एक घटना... नागपूरला घडलेली. एक महिला पत्रकाराच्या संदर्भातली, माझ्या सहकारी महिलेच्या संदर्भातली. लोकमत नागपूर कार्यालयात `सखी' या पुरवणीचं काम पाहणारी वर्षा पाटील. ती अन् तिचा मुलगा बरोबर राहायचे. दोघांना तेच एकमेकांचे. जिवाभावाचे. ऑफीसमध्ये बसलो होतो. फोन आला. वर्षाच्या मुलाला अपघात झालाय. मेंदूला जबरदस्त मार बसलाय. मी आणि काही सहकारी हॉस्पिटलमध्ये धावलो. काही मदत हवी आहे का, याची विचारपूस केली. डॉक्टरांकडे चौकशी केली. त्याला पाहिलं. वर्षाला भेटलो तिचा चेहरा काहीच बोलत नव्हता. ती धीटपणा दाखवीत होती. तिनं अवसान आणलं होतं, की ती या धक्क्यानं थिजली होती... काही कळेना. अशा वेळी काय बोलायचं ते कळेना. काळजी करू नको, सगळं ठीक होईल हे शब्द तिच्या पशात टाकून परतलो. अपघात गंभीर होता. कोण चुकलं, कोण बरोबर यापेक्षाही शिक्षा अटळ होती. आणखी काही दिवस वर्षाला कामावर येणं कठीण होतं. मी कामाची व्यवस्था पाहिली. दुसऱया सहकाऱयाला जबाबदारी दिली. तो दिवस संपला. दुसऱयाच दिवशी ऑफीसमध्ये गेलो. आता दवाखान्यात जावं असा विचार करून जिना उतरलो, तर वर्षा येत होती. मी थांबलो. तिचा तो तसाच भावनाविहीन चेहरा. मी विचारलं, `इथं काय करत्येस?' ती म्हणाली, मजकुराचं पाहते.' मी म्हटलं, `इथली काही काळजी करू नको. आम्ही पाहू.' ती म्हणाली, `नको, मी पाहीन. तिथं तरी नुसतंच बसायचंय ना?' मी काही बोलले नाही. वर्षानं त्या अंकाचं, पुढच्या अंकाचं काम सुरू केलं. दिवस जात होते. धीर खचत होता अन् वर्षा खंबीरपणे सगळ्यांनाच धीर देत होती. उपचाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, प्राथर्ना सुरू झाल्या; पण परमेश्वरानं कोणाचं काहीही ऐकायचं नाही, असंच ठरविलं होतं.

    अचानक एक दिवस वर्षाच्या हालचालींना वेग आला. मुलाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलवायचं होतं. मुलाच्या किडनी दान करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले होते. अवधी कमी होता. तिला तिचा मुलगा कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत पाहायचा होता. त्यासाठी हे रूप संपलं तरी चालेल, या वास्तवाचा तिनं स्वीकार केला होता; पण नागपूरसारख्या शहरातही अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारं रसायन उपलब्ध नव्हतं. मुंबई-हैदराबाद फोन सुरू झाले; पण त्यासाठीचा अवधी आणि वर्षाच्या मुलाला देवानं दिलेलं आयुष्य यात कोण जिंकणार, हा प्रश्न होता. अखेर त्याला दुसऱया रुग्णालयात हलविलं. डॉक्टरांचं पथक तयार झालं. ज्याला या किडनीचा लाभ होणार तोही सज्ज होता; पण ते होणे नव्हते. तो गेला होता. मृत व्यक्तीच्या किडनीज् काही कामाच्या नव्हत्या. पेशन्टचं रूपांतर बॉडीमध्ये झालं होतं; पण वर्षा अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिनं नेत्रदानाचं काम तरी पूर्ण करावं यासाठी खटपट सुरू केली. पोलिसांची अडवणूक, वैद्यकीय तत्परता, वेळेची स्पर्धा यातून अखेर डोळे घेता आले. हा अपघात आणि अंत्यसंस्कारापर्यंतच प्रवासच असा होता, की तिथं दुःख, वेदना यापेक्षाही यंत्रणेविरुद्धचा संताप अधिक यावा, अशी परिस्थिती होती. मृतदेह मिळण्यासाठी एखाद्या आईकडून जेव्हा 500 रुपयांची लाच मागितली जाते, त्या वेळी तिला काय वाटलं असेल? पण वर्षा तिथंही घट्ट उभी होती. वर्षा एकटी राहिली. तिचा 18 वर्षांचा मुलगा, तिचं श्रांत होण्याचं स्थळच एका अपघातानं उखडून टाकलं. नियोजन करता येणार नाही त्याला अपघात म्हणावं, हे खरं; पण अपघातातही जेव्हा दृष्टी देण्याचं, जीवन देण्याचं नियोजन करण्याची उमेद येते त्याला काय म्हणावं?
    आजही वर्षाला जेव्हा मी पाहतो, तिच्याशी बोलतो त्या वेळी मला आठवते ती काळापेक्षाही मोठी झालेली वर्षा.

    -- किशोर कुलकर्णी

  • आधुनिक काशियात्रा

    रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. ‘रोजची पहाटच्या दिवाळी अंकाची ओरात तयारी चालू होती आणि या काकांचा पत्ताच नव्हता! काकांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण असायचे. आपल्या टकलावर अतिरागाचा ठेका धरत ते ओरडले.