नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपणांस वाचायला मिळतात. असे शब्द आपण बोलतो तेव्हा त्यामधून कधी कधी दोन अर्थ निघतात. एका वाक्यात ठराविक ठिकाणी स्वल्पविराम चिन्ह लिहीलं नाही तर गोंधळ उडतो. सरकारी कार्यालयांत, जिन्यांमध्ये किंवा ठळक भागावर सूचना लिहिलेल्या असतात. उदा. “येथे थुंकू नये”. हेच वाक्य "येथे थुंकून ये”. असा फक्त अक्षर लिहिण्यात गोंधळ झाला तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला जाऊन, एखादा विनोद तयार होतो.
काही वेळा बोलण्यातून एखादा जरी शब्द चुकीचा गेला तरी अनर्थ घडतो. कोणीतरी एका कविने लिहीलं आहे, "शब्दांना दात नसतात, परंतु शब्द ज्यावेळी चावतात, त्यावेळी माणसांच्या हृदयावरील घाव भरुन निघत नाहीत आणि अशा शब्दाचे घाव इतके खोलवर असतात की, माणसाचे जीवन संपून जाते. परंतु शब्दांनी झालेले घाव भरुन निघत नाहीत.'
शब्द.. हे शब्द असतात, त्यांना हात व पाय नसतात. परंतु एका शब्दाने शंभर घाव होतात. तर दुसऱ्या शब्दाने दुःखावर हळुवार फुंकर घालता येते. शब्दामधील कठोरता परमेश्वराला सुध्दा मान्य नाही. म्हणून जीभ प्राणी मात्रांना जन्मल्यापासून आहे आणि मरेपर्यंत शिल्लक असते. परंतु दात कठोर असतात म्हणून ते प्राणीमात्रांला जन्मल्यानंतर येतात आणि मृत्यूपूर्वी पडूनही ते
जातात. पण वैशिष्ठ्य असं आहे, दाताने चावून झालेली जखम भरुन येते. परंतु जीभेने चावलेल्या जखमेची आठवण कायम राहते.
मित्रांनो, शब्द प्रपंच खूप मोठा आहे आणि मी इतका तज्ञ नाही की, शब्दांचे भांडार खोलून तुमच्यापुढे उघडून ठेवू, पण शब्द गंधाचा फुलोरा प्रत्येक शब्दांनी फुलत असतो. एखाद्या शब्दाने वातावरण स्वच्छंदी होते तर त्याच शब्दांनी वातावरण दुषीत होऊन माणूस एक दुसऱ्यापासून शरीराने व मनाने खूप दूर जातो. म्हणून शब्दांचा वापर असा करावा की, आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द फुलासारखा असावा. ज्यामुळे त्या शब्दफुलांची जागा परमेश्वराच्या चरणावर असावी किंवा माणसांच्या हृदयावर कोरली जावीत.
आम्ही उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर आडवे होईपर्यंत किती शब्दप्रयोग करतो, त्याचा विचारच करीत नाही. आज कितीतरी लोक शब्दांच्या जोरावर बोलण्याने जग जिंकतात. साधू संतांच्या वाणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांमधील गोडवा तर सर्व समाजाची मानसिकता बदलू शकतो, इतकी प्रचंड ताकद ह्या शब्दांत दडलेली असते.
आम्हा पोलिसांना तर रात्रंदिन अनेक प्रकारच्या लोकांच्या शब्दांना सामोरे जावे लागते. प्रत्येक येणारा नागरिक वेगळा, त्याचे शब्द वेगळे आणि त्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो. काही शब्द, वाक्य यांनी हृदय हेलावून टाकणारी घटना समोर येते. तर काही शब्दांनी हलका-फुलका विनोद होऊन वातावरणातील गंभीरता नष्ट होऊन थोडा वेळ मनोरंजनही होऊन जात असते.
काही वेळा असे शब्द ऐकायला किंवा वाचनात येतात की, त्याचा अर्थ पूर्ण शब्दकोषात कुठेच सापडत नाही. पण त्याच शब्दाने मनाची अस्वस्थता वाढते. असे अनेक शब्द असतात. त्यांचे अर्थ दोन निघतात.
आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक महान हिरो होउन गेला, तो म्हणजे कै. श्री. दादा कोंडके. दादा प्रत्येक सिनेमात प्रत्येक वाक्यात असे शब्द प्रयोग करत असत की, त्या शब्दातून वेगवेगळे अर्थ निघून लोकांचं मनोरंजन व्हायचं. दादा गेले आणि द्विअर्थी शब्दांची मजाच निघून गेली.
सध्या काही ठिकाणी असे शब्द ऐकायला मिळतात, परंतु त्यामधून इतकं मनोरंजन होत नाही. शब्द म्हणा किंवा वाक्य म्हणा काही वेळा इतके गैरसमज होतात की, मग त्यामधून वाद विवाद, भांडणतंटा होतो. कधी हा वादविवाद आपसांत समझोता होऊन जागीच मिटवला जातो. तर कधी कधी या गैरसमजातून मैत्री तुटते. नातेवाईक दुरावतात व आयुष्याचे एक दुसऱ्यांचे संबंध बिघडतात. तर कधी कधी हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचतं आणि मग सुरु होते एक कायदेशीर लढाई. कायदेशीर प्रक्रिया करीत असतांना मग द्विअर्थी शब्दामुळे पोलिसांसमोर सुध्दा अडचणी निर्माण होतात आणि त्यावेळी पोलिसांची तारेवरची कसरत सुरु होते. दोन्ही पक्षकारांचं सर्वांना समजावून सांगून तर काही वेळा प्रबोधन करुन त्यांचे गैरसमज दूर करावे लागतात.
असाच एक किस्सा मी आपणांस सांगणार आहे. तसा मी गांव सोडून शहरात गेली ३५ वर्षांपासून राहत आहे आणि जवळ जवळ ३४ वर्षे पोलीस खात्यात काम करीत आहे. अनेक वेळा कामानिमित्त आम्हा पोलिसांना महाराष्ट्रातच नाही तर भारतभर भ्रमंती करावी लागते. अशी भ्रमंती करीत असतांना अनेक प्रकारचे लोक भेटले. त्या त्या प्रदेशातले रिती-रिवाज, बोली भाषा, प्रांतवार वेषभूषा पहायला मिळाल्या. अनेक प्रकारचे लोक पहायला मिळाले, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. अनेक गुन्हेगार सुध्दा प्रांताप्रांतात फिरुन शोधले. त्यांची माहिती घेतांना प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हा गाराची गुन्हा करण्याची पध्दत, त्याच्या सवयी पहायला मिळाल्या. वरील सर्व ठिकाणी फिरतांना प्रांतातील लोकांची माहिती घेतांना त्यांच्या भाषेची माहिती मिळाली. त्यांची बोलीभाषा ऐकायला मिळाली. त्यांच्या बोलीभाषेतून अनेक शब्दांचं आकलन झालं आणि मला सुध्दा नवीन शब्द ऐकायला, वाचायला मिळाल्यामुळे माझ्याकडे सुध्दा शब्द भांडार तयार झाले आहे.
तर अशा ह्या माझ्या पोलीस खात्याच्या व्यस्त कामातून वर्षातून चार दोन वेळा मी रजेवर गावी जात असतो. अलिकडच्या दहा वर्षाच्या काळात गावी जातांना एस. टी. किंवा रेल्वेचा प्रवास फार कमी होतो. स्वत:च्या गाडीने जातो आणि येतो. वेळ कमी असतो, रजा मर्यादित असल्यामुळे कमी कालावधीत जास्त कामं करावी लागतात. अनेक नातेवाईकांना भेटायला जावे लागते.
अशा वेळी गाडी असली म्हणजे वेळेची बचत होते. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा आनंद घेता येतो.
साधारण वीसएक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी असाच एका शहरामध्ये गेलो होतो. सिटी बस मधून प्रवास चालू होता, रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतील, तशी बसमध्ये गर्दी बऱ्यापैकी होती. मुंबई शहर सोडले तर इतर शहरांत किंवा खेडे भागांत रात्रीचे नऊ साडेनऊ वाजण्याची वेळ म्हणजे खूप रात्र किंवा खूप उशिर झालेला वाटत असे. काही काही वेळा त्या काळात रात्री दहा नंतर बससेवा बंद होत असे. त्यामुळे बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. बसमधील प्रवासी मिळेल त्या आसनावर बसत होते. काही उभे राहून बसण्यासाठी जागा मिळते का याकडे लक्ष ठेवून होते. काही आपआपसांत बोलत होते. तर काही जण शांतपणे आपल्या गंतव्यस्थानाची वाट पहात होते. त्यावेळी कंन्डक्टर हातातील तिकीटाच्या बॉक्सवर तिकीट पंच करण्यांच्या मशिनने आपटून किंवा पंच मशिन हातात कटकट वाजवून तोंडाने “तिकीट तिकीट” ओरडत प्रवाशांना तिकीटे देत होता. कोणाकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून कन्डक्टर वाद घालत होता. तर दुसरीकडे प्रवासी तिकीटासाठी कंडक्टरशी वाद घालत होते.
कोणत्याही प्रवासात कोणी कोणाचा नसतो. "दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव" या कवितेतील वाक्याप्रमाणे जो तो आपल्या आपल्या कामासाठी पुढे जात असतो. तास दोन तास तर काही क्षणीक वेळेसाठी प्रवासात सहप्रवाशांची ओळख होते. काही ओळखी जीवनात कायम साथ देतात तर काही प्रवास संपताच विसरुन मनुष्यप्राणी आपल्या पुढच्या कामाला लागतो. हा एक निसर्गनियम आहे. मी बसमध्ये बसल्याबसल्या माझे विचारचक्र सुरु झालं होतं. बस धावत होती आणि माझं मन त्यापेक्षा जास्त वेगाने जीवनाचे अनेक कंगोरे धुंडाळत पळत होतं.
अचानक बसमध्ये मागील बाजूस भांडणाचा आवाज आला. त्यामुळे माझी तंद्री भंगली. कंडक्टर आणि एक सहस्थ अंगात काळा कोट, हातात बॅग, डोळ्यावर चष्मा, साधारण पन्नाशी ओलांडलेले रागाने बडबडत होते. कंन्डक्टरही त्यांच्याशी वाद घालत होता. शब्दाने शब्द वाढत गेला.
कन्डक्टर त्यांच्याशी बोलत असतांना बसमध्ये इतर प्रवाशांचा आवाज, बसचा आवाज यामध्ये त्या दोघांमधील संभाषण निट एकू येत नव्हते. पण ते सदगृहस्थ खूप संतापून,
"कोण दारु प्यायले आहे? मला तुम्ही 'दारु प्यायलास काय? असं का म्हणालात? ” असं विचारत होतं.
“अहो साहेब, मी कसा बोलेन तुम्हांला असं वेडंवाकडं"? कंडक्टर आपली बाजू मांडत होता.
ते आता खूप संतापले होते. त्यांनी सिटवरून उठून रागाने बसची घंटी वाजविली. तशी ड्रायव्हरने गाडी थांबिवली. आता बसमध्ये गोंधळ वाढला होता. काही लोक त्यांना समजावत होते, काही लोक कंन्डक्टरला समजावत होते. परंतु ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मी माझ्या सिटवरुन पाठीमागे गेलो. त्या व्यक्तीचं एकच म्हणणं होतं ते म्हणजे,
"हे कंडक्टर प्रवाशांबरोबर अजिबात सरळ बोलत नाहीत. मला म्हणतो, तुम्ही दारु प्यायलात का?"
मी थोडा विचारात पडलो. मी एक पोलीस अधिकारी होतो, पण ह्या वेळी साध्या कपड्यांत होतो. मी मनात विचार केला, काय माहित, रात्रीची वेळ आहे, घरी जाता दोन पेग मारलेही असतील, हा विचार चालू होता, ते गृहस्थ अधिकच चिडल्याने माझी विचारधारा तुटली.
"चला. बस घ्या पोलीस ठाण्यात. मला तुम्ही दारु प्यायला म्हणता काय? ”, ते म्हणाले.
"कंन्डक्टर, तुम्ही त्यांना असं का बोललांत? ” मी विचारलं.
"अहो साहेब, असं कसं बोलेन मी यांना, मी असं काही वेडंवाकडं बोललोच नाही." कंन्डक्टर म्हणाला.
त्या गृहस्थाने शेवटी बस जवळच्या पोलीस ठाण्यात घेण्यास भाग पाडलं. बस मधील इतर प्रवासी वैतागले होते. तसा मी ही त्रासलो होतो, पण काय करणार. “कालाय तस्मै नमः" असं समजून आमच्या बसची वरात पोलीस ठाण्यात पोहोचली. सर्व प्रवासी खाली उतरले. समोर एक पोलीस ठाण्याची कौलारु इमारत, मोजकेच पोलीस उभे होते. मी खाली उतरलो. त्या कंन्डक्टर व गृहस्थाबरोबर पाच-दहा प्रवासी पोलीस ठाण्याच्या कंम्पाउंडमध्ये गेले. समोर एक फौजदार आपल्या बुलेटवर बसले होते. कदाचित ते घरी जावयास निघाले होते. बस मधील गर्दी पाहून ते बुलेटवर बसूनच निरीक्षण करीत होते.
ते पॅसेजंर व कंन्डक्टर अजुनही तावातावाने बोलत होते. मी त्यांच्यासोबत चालत होतो.
बुलेटवर बसलेले फौजदार खाली उतरले, बुलेट स्टॅन्डला लावून, त्या व्यक्तीकडे पाहून म्हणाले, "या, या साहेब. नमस्कार, वकील साहेब, काय प्रकार आहे? ”
“नमस्कार साहेब”. ते म्हणाले. “अहो साहेब, हा कंन्डक्टर मला म्हणतो, 'तुम्ही दारु प्यायला आहात काय? ”
फौजदार साहेबांच्या बोलण्यावरुन ते सदगृहस्थ शहरातील एक नामांकित वकील असल्याचं मला समजलं.
“काय हो कंन्डक्टर, तुम्ही असे का बोललात वकील साहेबांना? "
तुम्हाला काही समजतं की नाही? कोणाला काहीही बोलता? ” फौजदार म्हणाले.
"साहेब मी असं बोललोच नाही. माझी काहीच चूक नाही, तर माफी का मागायची? ” कंन्डक्टर म्हणाला.
मला त्यावेळी लोकमान्य टिळकांचं वाक्य आठवलं, "गुरूजी, मी शेंगा खाल्या नाहीत मी फोलपटं उचलणार नाही. " त्याच आवेशात कंन्डक्टर बोलत होता.
“साहेब, मी या गृहस्थांना म्हणालो, 'तुम्ही मला दहा रूपये दिले का?” तर हे मला म्हणाले, "दारू प्यायले का?" असं म्हणालो. साहेब मी असं कसं बोलेन प्रवाश्यांशी? ” कंन्डक्टरने आपली बाजू सफाईदारपणे मांडली होती.
ते गृहस्थ दोन्ही हात जोडत कंन्डक्टरकडे पहात म्हणाले, “धन्य झाली कंन्डक्टर तुमची, अहो, मी एवढा नामांकीत वकील असून सुध्दा तुमच्या पुढे हात जोडतो. सरळ सरळ दारू प्यायलात असं बोलून वर म्हणताय, 'दहा रूपये दिलेत का?’ वाऽऽऽ वाऽऽऽ फौजदार साहेब काय जमाना आलाय बघा.’ ते गृहस्थ म्हणाले.
फौजदार साहेब देखिल आता विचारात पडलेले दिसत होते.
"नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं बोललो नाही. " कंन्डक्टर म्हणाला.
कंन्डक्टरने शब्दांची फिरवाफिरव केल्याचं दिसत होतं. ते गृहस्थ उठून उभे राहिले व म्हणाले "चला फौजदार साहेब येतो आम्ही.
फौजदार साहेबांनी कंन्डक्टरला थोडं समजावून सांगून, पुन्हा असं बोलू नका असा दम दिला.
प्रकरण थोडक्यावर भागलं होतं. वकिल साहेबांचा राग आता कमी झाला होता. त्यांची काही तक्रार राहिली नव्हती. सर्वजण बसमध्ये जाउन बसले.
त्यानंतर मी फौजदार साहेबांना माझी ओळख सांगितली. आम्ही दोघेही खात्यात काम करणारी माणसं होतो. कंन्डक्टरची चलाखी लक्षात आली होती. परंतु त्या ठिकाणी कायदेशिर कारवाई करण्यासारखी परिस्थिती नव्हती. परंतु या सर्व प्रकारात बस मधील प्रवासी व पोलिसांचं चांगलं मनोरंजन झालं होतं. फौजदार साहेबांना घरी जायला उशिर झाला होता आणि मलाही उशिर झाला होता. पोलिसांना नेहमीच असं एक ना अनेक कारणांमुळे घरी जाण्यास उशिर होत असतो किंवा तो त्या व्यापातून मोकळा होईपर्यंत आपलं घर विसरून गेलेला असतो.
पोलिसांना तो कर्तव्यावर असो अगर नसो, त्याच्यासमोर कोणता प्रकार घडत असेल तर, हस्तक्षेप करावाच लागतो. असं हे पोलिसाचं जीवन असतं. पण काही म्हणा, पोलिसांना अशा धावपळीच्या व दगदगीच्या जीवनातही नवीन शब्द ऐकायला मिळतात. तो पोलीस असे प्रसंग कधीही विसरु शकत नाही.
आता केव्हाही बस मधून प्रवास करण्याची वेळ आली, तर मात्र त्या कंन्डक्टरच्या वाक्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
-व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस' या लेखसंग्रहातील हा लेख.
हसणं हे नेहमीच संसर्गजन्य असतं.. दुःखाचं असं नाही ते एकट्याचं असतं… ते शेअर करावं लागतं.. म्हणूनच अनादी कालापासून दुःखापेक्षा हसणं श्रेष्ठ आहे…

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला.
सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला गेला. भागवतकथा ऐकून तो इतका प्रभावित झाला की, ईश्वराबद्दल त्याच्या मनात खूपच आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच त्याला काव्य स्फूरत गेले. त्याचे हे काव्य लोकांनाही आवडू लागले. आपले काव्य प्रीतम पुढे भजनाच्या रूपात सादर करू लागला. एकदा प्रीतम श्री डाकोरजींच्या दर्शनाला गेला.
त्याला पाहताच पुजार्याला त्याची थट्टा करण्याची लहर आली. तो त्याला म्हणाला, तू तर नेत्रहीन आहेस मग कोणाचे दर्शन घ्यायला आला आहेस? त्यावर प्रीतमने भगवान डाकोरजींच्या प्रतिमेचे व्यात्मक वर्णन केले. डाकोरजींना कोणत्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे, तसेच त्याला कोणत्या रंगाची फुले घातली आहेत, त्याचा मुकुट कसा आहे, बासरी कशी ठेवली आहे हेही प्रीतमने काव्याद्वारे सांगितले. त्याचे काव्य ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाला व त्याने त्याच्या चरणी लोटांगण घातले. कारण ज्याच्या मनात ईश्वराची अपार भक्ती आहे ते डोळ्याशिवाय भगवंताचे दर्शन करू शकतात, याची प्रचिती त्याला आली होती. हाच प्रीतम पुढे संत प्रीतमदास बनला. एकदा रोमारोला या परदेशी संस्थेचे लोक भारतात आले होते. संत प्रीतमदास यांना भेटल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, प्रीतमदास नेत्रहीन आहेत. मात्र त्यांच्या भक्तिरचना इतक्या 'डोळस' आहेत की, कोणताही डोळस तसेच प्रज्ञावान मनुष्य अशा रचना करू शकणार नाही. संत प्रीतमदासच्या निवडक भक्तिरचना ते परदेशी घेऊन गेले.
आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक.
पादचाऱ्यांची चुकी नसताना, असे अपघात होण्याचे प्रमाण भयंकर आहे.. इथे त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे, त्यांच्या कुटुंबियांची अवस्था किती बिकट होते, याची कुणालाही कल्पना नसते.. ती व्यक्ती कमवती असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते.. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या राहिलेल्या असतील तर ते कुटुंब, पूर्णपणे हतबल होतं..
सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....
ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..
गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा.
त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..
आणिअचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातीलआदर्श कुटुंब..सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हेअत्यंत
जवळचे मित्र ...
सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.
तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले..
दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे..
लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते..मी माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....
धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला..कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...
या बाईला सर्पदंश झालाय...
डाँक्टर आहेत का? मी विचारले..
हो आहेत...
थांबा मी बोलावते..
असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..
पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.
डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,. तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..
तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये काकूंनी मारलेला साप होता..
डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..
तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या..
त्यानंतर मला भुकेची तीव्र जाणीव झाली..तो पर्यंत उपवास असुनही भुकेची साधी आठवणही आली नाही हे विशेष..।
-- श्री.रामदास तळपे (मंदोशी ) ता.खेड जि.पुणे
एक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो.
मुळात, कोणताच माणूस ‘गुन्हेगार’ म्हणून जन्मत नाही. परस्थिती त्याला घडवत असते, असं म्हणतात. खूप पूर्वी ‘जेल रहित राज्य!’ हि कल्पना माझ्या वाचनात आली होती. कदाचित त्याची मूळ या कथेत असावीत.
Copyright © 2025 | Marathisrushti