नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची.
June 8, 2021

ती त्या दिवशी माझा नंबर घेऊन गेली ती गेलीच. मी पण विसरून गेलो, म्हणा अशा अनेक भेटतात ..
July 1, 2021
लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या.
February 2, 2022

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे.
February 27, 2022
आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.
March 24, 2010
माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा झालेला होता. ते जात पात ह्या संकल्पनेला केव्हाच मानीत नव्हते. शिज्ञण व ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने संस्कारीत करत असते ही त्यांची धारणा. धर्म व कर्मकांड जर पाळावयाचे असतील तर ते फक्त घराच्या चौकटीतच असावे ही त्यांची धारणा.
( काळाप्रमाणे चालावे लागते म्हणतात , माझी आजी अर्थात त्यांची आई हीचे देखील केशवपन झालेले होते. ती खुप धार्मिक व जुनी विचारसरणी सांभाणारी होती. मात्र हे सारे स्वतः भोवतीच असे. देवघर व स्वयंपाकघर हेच तिचे लक्ष होते. )
माझ्या आग्रहाने मारुती प्रथम माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबकेपणा स्पष्ट दिसत होता. भव्य घर, प्रशस्त हॉल, फर्नीचर, सोफासेट, पंखे, पडदे, नोकर चाकर, हे बघून मारुती हादरुन गेला. सभोवतालची भव्यता त्याचे डोळे टिपून घेत होत असलेले जाणवले. त्याला मी खुर्चीवर बसवले. समोर आराम खुर्चीवर वडील पेपर वाचीत बसले होते. मी त्याना सांगितले. “ हा मारुती माझा मित्र. आम्ही रोज शाळेच्या मैदानांत एकत्र खेळतो. “ वडीलांनी त्याच्याकडे नजर टाकली.
“ छान खुप खेळत जा. अभ्यासही मन लाऊन करीत जा. ज्ञान व आरोग्य ह्या अत्यंत महत्वाच्या जीवनातील गोष्टी “
मारुतीने उठून त्यांच्या पुढे जात वाकून नमस्कार केला. आईने नोकरातर्फे कांही फळे बशामध्ये घालून पाठविली, ती दोघानी खाली. नंतर मारुती व मी दोघेजण बाहेर खेळण्यासाठी गेलो.
अर्थात हे सारे त्यावेळच्या काळ व परिस्तिती प्रमाणे होते. जीवनाची दोन टोके. एकात होती भव्य दिव्यता. सुस्थिर आर्थिक परिस्थिती. हाताशी प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य
होण्याची शक्यता. तर दुसरीकडे नजरेंत भरेल अशी गरीबी, असहायता, जगण्यासाठीची धडपड. परंतु हे सारे आजच्या चश्म्यातून बघताना, त्यावेळी जरी हेच होते, तरी त्या बाल वयांतील मनाला कोणतीच पर्वा नव्हती. काळजी नव्हती. आम्ही फक्त मित्र एकत्र राहू, खेळू, इच्छीणारे होतो. ह्याच अंतरीक इच्छेपायी परिस्थितीच्या भिन्नतेची गढद काळी छाया आमच्यावर पडू शकली नाही. त्याचा आम्ही केंव्हाच स्विकार केला नव्हता. याच कारणास्तव जीवनरेखा वेगळ्या तरीही समांतर जात होत्या.
बाल वयांत मारुती सर्वच खेळांमध्ये माझ्या बरांच वरचढ होता. मोज मापत जर बोलावयाचे तर तो पाचपट माझ्यापेक्षा खेळांत पुढेच असावयाचा. हां ! मात्र त्याच काळातील अभ्यासामधील प्रगतीचा जर शोध वा आलेख घेतला, तर मी त्याच्या पुढे नेहमी दोन पाऊले जास्त होतो. हे ही एक सत्य आहे. माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील, त्याच्यापुढे असण्याचे कारण, मला त्याच वेळी नजरे समोर आलेले मी जाणले.
मारुती नियमीत घरी येत असे. गप्पा, चर्चा, सतत होत असे. तो खेळण्याच्या गप्पामध्ये रस घेत होता. तर मी पुस्तकामधील वाचलेले सांगुन त्याची व पर्यायाने दोघांची करमणूक करीत असे.
एका दिवसाची घटना मला फार चांगली आठवते. आम्ही दोघे बोलत बसलो होतो. अभ्यासा संबंधी विषय होता. मी त्याला म्हटले “ मारुती ह्या पुस्तकामधील पांच गणित मी सोडवतो. तीच तु पण सोडव. आपण दोघे उद्या सकाळी त्याची उत्तरे बघूत.” मारुती लगेच म्हणाला “ मी रात्रीचा अभ्यास करीत नसतो. जेव्हां जमेल तेव्हां फक्त दिवसाच करतो. मला आश्चर्य वाटले. “ आरे मी तर रोज रात्री तासभर तरी अभ्यास करीत असतो. रात्री जेवणानंतर एक तास मी अभ्यासांत खर्च करतो. चांगले असते. वातावरण पण शांत असते.” मारुती शांत मनाने ऐकत होता. “ भगवान मलापण रात्रीचा अभ्यास करणे आवडते. परंतु आमच्या घरी दिवा नाही. कंदील वा चिमणी नाही. अंधारांमुळे अभ्यास करता येत नाही. मारुती एकदम गप्प झाला. “
घरांत शेजारच्या खोलीत वडील वाचत पडलेले होते. आमचे बोलणे त्यांच्या कानावर पडले. त्यानी चटकन आम्हा दोघाना हाक दिली. “ मारुती तु कोठे रहतोस.? जर जवळच असेल तर रोज रात्रीचा येथेच ये. तू व भगवान मिळून अभ्यास करा. तुझी सर्व सोय केली जाईल. फक्त तुझ्या घरी वडीलांना विचारुन दररोज येत जा. “
हाच एक अत्यंत महत्वाचा क्षण, माझ्या जीवनाशी संबंधीत झाला होता. जो एक Life Turning point ठरला गेला. आमच्या मैत्रीचे, आपुलकीचे धागे आवळत चालले होते. त्याची चेतना व साथ घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडूनच मिळत गेली. आम्ही दोघे दररोज नियमीतपणे अभ्यास करीत असू. अभ्यास करण्यासाठीच्या सर्व तांत्रीक बाबी वा
सोई घरातूनच व्यवस्थीत मिळू लागल्या. कोणतीही गैरसोय होत नव्हती. आमची अभ्यास करण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली होती. आणि ती बाब आमच्या दोघांच्या आवडी व स्वभावानुसार निश्चीत होत होती. मला पुस्तक वाचणे आवडायचे, तर त्याला केवळ ऐकून ज्ञान मिळवण्यात आनंद वाटे. तो मात्र अतिशय लक्ष केंद्रित करुन ऐकत असे. थोडेसे वाचन, त्यावर चर्चा ही पद्धत आम्ही अंगीकारली होती.
येथेच एक अत्यंत महत्वाचे Observation सांगतो. आमची दोघांची अभ्यास करण्याची ही सवय वा पद्धत , आम्ही फक्त बालवयांतच अंगीकारीत होतो, असे नव्हे, तर तशीच पद्धत पुढे भावी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही योजीत होतो. तसाच अभ्यास औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना देखील करीत होतो. एका खोलीत बसून अभ्यास करीत असू. Medicine, Surgery, Gynecology, आणि इतर वैद्यकीय पुस्तके आम्ही मिळून वाचीत असु. चर्चा करीत असू. तेथेही मी प्रत्यक्ष पुस्तक वाचत होतो, व तो समोर बसुन ते वाचन लक्ष देऊन ऐकत असे. चर्चा होई, एकमेकांच्या चुका वा समज दुरुस्त केल्या जात असे. हीच ज्ञान साधना पद्धती, प्रक्रिया शैक्षणीक काळ पर्यंत जोपासली होती.
बालपणी आभ्यास करताना आई सरबत. दुध, फळे, वा खाण्याचे पदार्थ देत असे. आमचा तो विश्रांतीचा काळ ( Interval ) मजेत जात होता.
मी माझ्या वडीलांना “ भाऊ ” व आईला “ ताई “ ह्या नावांनी संबोधीत असे. अर्थात नाम संबोधन ही प्रक्रिया जुन्या काळी साचेबद्ध नव्हती. तेथे आजकालचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. घरांतील वडील मंडळी जे म्हणतील, जसे संबोधन करतील तेच लागु होत असे. तेथे न नियम होते ना पद्धती. मोठे मामा माझ्या वडीलाना “ भाऊ “ म्हणाले, माझ्या आईला ते
“ ताई “ संबोधायचे. बस असेच आम्ही भावंडानी त्याचे नामकरण अंगीकारले. त्याला त्या काळी कुणीच विरोध केला नसेल, आणि मान्यता मिळाली. नात्याच्या स्तरावर बाबा, आई, मामा, काका, आत्या, दादा, ताई, आक्का इत्यादी नाते नामकरणे त्या काळी वेगळीच होऊन जात होती. ह्यातूनच बप्पा, आबा, बापू, मा, माई, बाई, दीदी, अम्मा, इत्यादी प्रकारची नामावळी होती. हे नांव उच्चरल्या नंतर ते माझे कोण हे कित्येक वेळा सांगणे गरजेचे होई. आई, बाबा ... म्हणताच नात्याचा इतरांना बोध होतो, तसे बापू, अम्मा .... इत्यादीत उलगडा करावा लागे.
मारुती देखील माझ्या वडीलांना भाऊ व माझ्या आईला ताई याच पद्धतीने संबोधीत असे. जणू त्यानेच मैत्रीचे नव्हे तर बंधूत्वाचे नाते आमच्या घराण्याशी निर्माण केले होते.
मारुती व मी दोघे रात्री अभ्यास करुन बरोबर रात्री १० वाजतां झोपत असू. घरांत एक गजराचे घड्याळ मजसाठी दिलेले होते. रोज आम्ही गजर लाऊन सकाळी पांच वाजता उठत असू. घराच्या मागील परसदारी एक मोठी विहीर होती. त्यावर पाणी काढण्यासाठी रहाटचक्र पक्के लावलेले होते. सकाळीच आम्ही पाणी काढीत असू. गम्मत म्हणजे सकाळचे पाणी खुपच गरम असायचे. वातावरणाच्या मानाने एकदम कोंम्बट ( Warm water ) . आम्ही हात पाय धुवुन खोलीमध्ये थोडावेळ अभ्यास करीत असू.
एकदा कुलकर्णी गुरुजी म्हणाले होते सकाळी गार पाण्याने स्नान करणे प्रकृतीसाठी फार चांगले असते. बस माझ्या डोक्यांत ते शिरले. तसे सकाळचे नुकतेच उपसलेले पाणी खुपच गरम असते. मी पण ठरऊन टाकले की आपण गार पाण्याने स्नान करावे. दुसऱ्याच दिवशी मी सकाळी उठताच विहीरीच्या गार पाण्याने स्नान करु लागलो. मारुती मला मदत करीत असे. तो पाणी उपसुन देई. ती बादली भरुन काढलेले पाणी माझ्या अंगाखाद्यावर टाकीत असे. दोन चार बादल्या पाणी उपसले जाई. मारुती ह्यात सहकार्य व मेहनत घेई. असे बराच काळ पुढे चालले.
पुढचा भाग पुढील अंकात---
डॉ. भगवान नागापूरकर
March 4, 2019

मला अजून आठवतं, मी विचारत होतो, परमेश्वर म्हणजे काय? तो खरेच अस्तित्वात असतो का? माझ्या प्रश्नावर मी खूष होतो. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर्कशुद्ध पद्धतीनं देता येणार नाही असं मला वाटत होतं. एका अर्थानं एका पत्रकारानं एका आध्यात्मिक गुरूला विचारलेला तो प्रश्न होता. प्रश्नामागे उत्तर मिळविण्याच्या अभिलाषेपेक्षा समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्याचा इरादा अधिक होता.
April 6, 2010
मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.
September 2, 2021
लॉकडाऊन २०२० मध्ये लिहिलेली भयकथा
July 8, 2024
पुलंची मुलाखत घेण्यासाठी एकदा एक स्त्री पत्रकार आली होती. मुलाखत अगदी छान हसत खेळत झाली आणि आता आपल्याविषयी पेपरात काही बरं छापून येईल या कल्पनेने पुलंही पुलकित झाले. काही दिवसांनी त्या बाईंची समिक्षा पेपरात छापून आली, "पुलं स्वतःस पुरोगामी म्हणत असले तरीही त्यांचे पाय मातीचेच आहेत" पुलं बुचकळ्यात पडले, बाईंनी हे असं लिहिण्याचं कारण काय असावं? शेवटी त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, ज्या दिवशी त्या बाई मुलाखत घ्यायला आल्या होत्या तेव्हा सुनीताबाईंनी कुठले कुठले गुडघेदुखी वरचे मातीचे लेप त्यांच्या पायाला अगदी मांडी पर्यंत लावून त्यांना बसविले होते. ते बघूनच बहुतेक त्या बाईंनी थेट पेपरात लिहिलं होतं की पुलंचे पाय मातीचे आहेत.
समीक्षक अभ्यासक आणि विचारवंत, कुठल्या गोष्टीचा काय अर्थ लावतील आणि काय निष्कर्ष काढतील याचा नेम नसतो. म्हणजे छान हापुसच्या आंब्याचा रस काढायचा, तो रस फेकून द्यायचा आणि बाठ चोखत बसायचं आणि आंबा खाणे हा किती घाणेरडा अनुभव आहे हे जगाला ओरडून ओरडून सांगायचं.
असाच रस फेकून देऊन चोथा चघळत बसणाऱ्यांना भारतामध्ये डॉक्टरेट मिळते, मोठं मोठ्या संस्थांमध्ये मनाच्या स्थानी नोकरी मिळते, त्यांना त्या विषयातील औथोरिटी समजले जाते, पण त्या विषयातील रसास्वाद त्यांनी कधी घेतलेलाच नसतो.
महाराष्ट्रात असेच एक ज्ञानेश्वरीचे अभ्यासक मी बघितले आहेत, ज्ञानेश्वर असे नुसते नांव घेतले की ते अहाहा, अहाहा, वावावा, सुंदर सुंदर आहाहा, पाच दहा मिनिटे ते नुसते असेच डोळे बंद करून बरळत राहतात. समोरच्याला काहीच कळत नाही, यांना हा असा झटका कशामुळे आला? पण वास्तविक मला तरी कुठे काय कळलंय हेच त्यांना सांगायचं असतं. ते ज्ञानेश्वरीवर दाबून व्याख्यानं देतात, पुस्तकं लिहितात, पण सुरुवातीला अर्थसाठी वाचलेली एक ओवी सोडली की त्यात बाकी ज्ञानेश्वर कुठेच दिसत नाहीत. डॉक्टरेट आहेत बिचारे.
एक असेच शिक्षण क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही ज्ञानेश्वरीवर बोलायची खूप हौस आहे, ते विशेषतः अमृतानुभव मधील विराण्यांबद्दल बोलतात, पण ज्ञानेश्वरांच्या उपमा जेवढ्या चपखल असतात तितक्याच या गृहस्थांच्या उपमा विषय सोडून असतात. कमळाच्या देठाशी अडकलेल्या त्या भुंग्याला ते त्या तलावामध्ये एक हत्ती घुसवून ठारही मारून टाकतात. ऊसाचा रस काढायचा तो फेकून द्यायचा आणि चोथा चावत बसायचा. यांना डॉक्टरेट मिळते, डि लीट मिळते, पण स्वतः ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्षात येऊन जर ज्ञानेश्वरीवरील पीएचडी साठी अर्ज केला तर त्यांना निश्चितपणे नापास केले जाईल यात शंकाच नाही.
आम्ही बाबा वाक्यम् प्रमाणम् या पद्धतीने शिकतो, आमचे शिक्षणाचे ध्येय रसास्वाद किंवा ज्ञानवृद्धी हे नसून आपल्या वरिष्ठांची खूषमस्करी करून पोट भरणे हेच असते. त्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वर ब्राह्मण दिसतो, शिवाजी मराठा, सावता माळी आणि नामदेव शिंपी दिसतो, त्यांच्या काव्य गुणांशी आणि कार्याशी आमचा संबंध नसतो, आम्ही फक्त खूषमस्करे विद्यार्थी आहोत.
ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, हे आरती प्रभूंनी लिहिलेले काव्य कृत कृत्यतेतून आणि समाधानातून आल्याचे मला स्पष्टपणे दिसते पण काही समीक्षक खानोलकरांनी व्याकूळ होऊन दुःखातिरेकाने आंघोळ केल्याचे म्हणतात, मला हसावे की रडावे तेच कळत नाही. अनेक अभ्यासकांना साहित्याचे सृजन नक्की कोणत्या मानसिकतेतून झाले असावे हे शोधण्याची फार घाई झालेली असते. त्या साहित्यातील नक्की भाव कोणता? हे आजिबात समजत नाही, मग त्या साहित्यिकाचे चरीत्र ढुंढळतात आणि आपले मनमानी भाव त्या काव्याला चिकटवून टाकतात. दुर्दैवाने डॉक्टरेट वगैरे फक्त अशांनाच मिळते आणि पिढ्यानपिढ्या तीच समिक्षा प्रमाणभूत मानून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवावी लागते.
परीणामी साहित्याकडे वळणारे विद्यार्थी आता आटले असल्याचे दिसून येते. त्यांच्या बुद्धीला जे पटत नाही ते कितीकाळ माणूस डोक्यावर वागवत राहणार? सगळेच विद्यार्थी थोडेच पोटार्थी असतात? पुनर्जन्मावरून हिंदू धर्मावर प्रचंड टीका करणारे एक अभ्यासक मला माहिती आहेत, तेच अभ्यासक गौतमबुद्धांच्या जातककथांमधील पुनर्जन्म हा खराखुरा आहे असे सांगत होते. गौतमबुद्धांना साहित्यिक फ्रीडम घेण्याचा आधिकार होता, हे त्यांना मान्य नाही. किंबहुना जातककथा या बोधकथा आहेत, कॉग्निटिव्ह थिंकिंग साठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत यावर त्यांचा विश्वासच नव्हता.
ज्ञानेश्वरांनी याचे वर्णन गायीच्या सडाला चिकटून तिच्या सडातल्या मधुर दुधाचा आस्वाद घ्यायचे सोडून देऊन तिच्या सडातलं रक्त पिणारे गोचीड असे केले आहे. हे गोचीड रक्त पिऊन पिऊन गायीचं दूध आटवतात आणि नंतर तिला अशक्त करून भाकड ठरवून कसायाकडे द्यायला भाग पाडतात. हि गोचिडांची घाण शिक्षणक्षेत्रातून जेवढी लवकर हद्दपार होईल तेवढी लवकर मराठी भाषा आणि मराठी साहित्य लवकर लोकाभिमुख होईल.
एका स्वतःस पुरोगामी आणि बुद्धिवादी समजणाऱ्या अभ्यासकांनी पसायदानावर लेख लिहिला होता.
इये ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये।
दृष्टादृष्ट विजये होआवे जी।
यावर त्यांचा आक्षेप होता. कारण ज्याअर्थी ग्रंथोपजीविये म्हटले आहे त्याअर्थी हा श्लोक कुणीतरी ब्राह्मणाने घुसडला आहे, असा भन्नाट निष्कर्ष त्यांनी काढला होता. मी त्यांना ग्रँथोपजीविये हा शब्द इतर वेद वाङ्मया विषयी नसून फक्त ज्ञानेश्वरी बद्दलच आहे, आणि या ग्रंथात सिद्ध केलेल्या नियमांनुसार वागलात तर तुम्ही दृष्य आणि अदृष्य संकटांवर मात करू शकाल, असे आत्मविश्वासाने माऊली सांगत आहेत असे सांगितल्यावर स्वारी गुळणा धरून बसली. मी इतरही काही गोष्टी त्यांना विचारल्या, त्याचीही उत्तरे ते देऊ शकले नाहित.
लाचार अभ्यासक, निर्बुद्ध विचारवंत, राजकीय हेतूंनी विकले गेलेले समीक्षक, जातीयवादाने पोखरलेले सुधारक यांनी मराठी भाषेचे अपरिमित नुकसान केलेले आहे. मराठी टिकविण्यासाठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, मराठी भाषेचे साहित्याचे निरपेक्ष अवलोकन करणारे आणि निर्भीडपणे व्यक्त होणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे.
-- विनय भालेराव.
September 13, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti