मला नाही मान मला नाही अपमान,
हेच तूं जाण तत्व जीवनाचे....१
कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल
हा मनाचा खेळ तुमच्या असे....२
कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा
प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती....३
विविधता दिसे ती कृत्रिम असे
निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे
त्याच्याच जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।।
सुगंध....
माणसाला हवाहवासा वाटणारा
आपल्याच मस्तीत वावरणारा
घ्यावा तितका कमीच वाटणारा
एकांतातही आसपास दरवळणारा
सुगंध....
आयुष्याच्या वाटेवरील सुख-दुःखाचा झरा
मोर-लांडोरीच्या बेधुंद नर्तकीचा पिसारा
फुलांच्या कोमल त्वचेच्या आठवणी जपविणारा
निसर्ग आणि नात्यांची मखमली वाढविणारा
सुगंध....
माणसाचे मन सैरावैरा पळविणारा
निसर्गाशी बांधून ठेवणारा
दुखणी विसरायला लावणारा
जीवन जगायला शिकविणारा
सुगंध....
पक्ष्यांचे अमृत स्वर सुगंधित करणारा
शब्दाविना जुन्या आठवणींना उजाळा देणारा
तरुण प्रेमाच्या आठवणी ताज्या करणारा
घराला स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा
परंतु....
आजच्या धावपळीच्या जगात
सिमेंट जंगलांच्या प्रदूषणात
सुगंध कुठे लपून बसला देव जाणे
शिल्लक राहिले फक्त जीवघेणी जगणे
नक्षीदार बाटलीत कोंडलेला
अन् क्षणिक टिकणारा सुगंध घेणे
अगदी दुभंगलेल्या नात्याप्रमाणे
म्हणूनच....
माणूस आनंदाने सुगंधी होत नाही
अन् सुगंधी आयुष्य जगत नाही
तेव्हा कळेल त्याला....
माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे
त्याच्याच मस्तीत जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।।
देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका, मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
का असा धांवतोस तूं ,
नशिबाच्या मागें मागें,
यत्न होता भगिरथी,
नशीब येईल संगे ।।१।।
प्रयत्न होतां जोमाने,
दिशा दिसताती तेथें,
यशाचे ध्येय सदैव,
योग्य मार्गानें मिळते ।।२।।
प्रयत्न करूनी बघा,
ईश्वर देखील मिळेल,
इच्छा शक्ती प्रभावानें,
नशीबही बदलेल ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाहत असते जीवन सारे, वाहने जीवनाचा गुणधर्म
स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म
वाहात होते, वाहात आहे, भविष्याते वहात जाईल
सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल
आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जिव वस्तूसुद्धा प्रवाही
अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई
अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती
केवळ त्यातील वेगामुळे, स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक ती झोप स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप जीवास सुख देई
स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा
एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां
स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmain.com
तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला ।
दूरवर बघत राहीन, ती लेकीला ।।१।।
लेक चालली निरोप घेवूनी, सासरी ।
भरल्या नयनी माय उभी, शांत दारी ।।२।।
जड पावले पडता दिसती, लेकीची ।
ओढ लागली त्याच पावलांना, मायेची ।।३।।
उंचावूनी हात हालवीत, चाले लेक ।
जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक ।।४।।
वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली ।
अश्रूपूसून पदराने, माय घरात आली ।।५।।
दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून ।
स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
महाराष्ट्राची मराठी संस्कृती
आहे थोर किती
घंटानाद आणि काकड आरतीने
होते प्रभातीची सुरुवात नामस्मरणाने
सडासारवण,सुबक रांगोळी छान
दारी अगत्याचे झुले तोरण छान
येता वासुदेव दारी
पसाभर धान्य देती नारी
जात्यावरच्या ओवीने
आयुष्याचे वस्त्र विणले
दारोदारी गुढी उभारूनी
नववर्ष स्वागत घरोघरी
झुलला पाळणा रामनवमीसी
हनुमंताची जयंती अंजनेरीसी
भांडले-तंटले परी व्रतवैकल्य केले
वडपोर्णिमे सवे हरतालिका पुजन केले
घरोघरी येता गणपती
गौराई नटून आली
दुर्गापुजन,शस्त्रपुजन
दिवाळीत केले लक्ष्मीपुजन
दिवाळी-दसरा,
हात-पाय पसरा
सुगी कापणीच्या राशी
घेती घरात आसरा
संक्रातीचा सण सरता
होळी अंगणी पेटते
मराठी संस्कृतीत
संतमहिम्याची पोत नाचते
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Copyright © 2025 | Marathisrushti