देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली.
फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...
' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .
" फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे स्वतःला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..
या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..थोरांनी शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..
सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..
शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व संतांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते....
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
गणेशोत्सव जवळ आलाय...
आजपासून फक्त ४० दिवसांवर
दास रामाचा वाट पाहे "सजणा"
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..!
"संकष्टी पावावे" म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या...
पण,
.
.
दिपकजोशी नमोस्तुते
वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!
आणि
.
"लव्ह लव्ह" ती विक्राला...
कायेन वाचा "मच्छिन्द्र देवा"...
"दर्शन म्हात्रे" मन 'श्रावण म्हात्रे' मन...
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना तर आरतीची पुस्तकं द्याच द्या..!
आणि...
.
.
.
"दास रामाचा वाट पाहे सजणा"
वरुन आठवलं...
"फळीवर वंदना" आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे..!
प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.
माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !
नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!
माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !
-मकरंद करंदीकर.
आपण एका जागी स्थिर उभे असतो. आपला श्वासोच्छ्वास सोडला तर आपली कोणतीही हालचाल होत नसते. अशा वेळी एखादा फुटबॉल आपल्यावर येऊन आदळला, तर काय होईल?
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
सकाळी उठल्या उठल्या खिडकी उघडून बाहेर डोकावले. आज सूर्य देवाने पडद्याआड रहाणेच पसंत केले होते. काळ्याभोर घनमालांनी दिलासा दिला. 'होय, तो आज नक्की येणार'. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ग्रीष्माच्या भट्टीत होरपळलेली सृष्टीही माझ्यासारखीच अधीर झाली होती. मृगाचे चार दिवस उलटून गेलेत, तरी याच्या येण्याची चाहूल नाही. फक्त जीव गुदमरून टाकणारे वातावरण स्वत:शीच स्पर्धा करीत दररोज नवा उच्चांक गाठणारा उष्मा, खरतर आत आणि बाहेर जीवाची काहिली होतेय. आशेने पहावे आकाशाकडे तर तेथेही वाकुल्या दाखवणारा पिंजलेला कापूस. काय करावे? कुठे जावे? पूर्वीसारखे शहर सोडून महिना दोन महिने मामांचा गाव गाठावा तर तिथले चित्र हृदय पिळवटून टाकणारे, गुरावासरांसोबत जीव कंठाशी आलेला बळीराजा, दुभंगलेली धरणीमाय, थेंबाथेंबाचा हिशोब घालणारे कोरडे पाणवठे, तहानलेले नद्यानाले, हिरवळण्यासाठी आसुसलेली वनराई, अंकुरण्याची आस धरून बसलेले बी-बीयाणे सगळेच त्राण नसलेले निस्तेज होत चाललेले. डोळ्यांसमोर भरदिवसा काजवे चमकले.डोळे भरून आले. इतक्यात...... इतक्यात कुठुनसा आलेल्या पावशाने वर्दी दिली 'धीर सोडू नका तो येतोय'. पाठोपाठ वाऱ्याने गिरक्या घेत हजेरी लावली. आतामात्र प्रत्येकजण जीव डोळ्यात आणून आशेने आभाळाकडे पाहू लागला. मी सुध्दा सगळ्या संवेदना एकवटून टपोऱ्या थेंबाची वाट पहात होते. घरावर, अंगणात, रस्त्यावर, झाडावेलींवर पहिला वहिला प्रेमस्पर्श करणारा पर्जन्यराजा, किती बरं वाट पहायला लावतोय. मातीचा सुगंध रोमारोमात भरण्यासाठी जीव अधीर झालाय. मनसोक्त चिंब होण्याच्या कल्पनेनेच सृष्टी सुखावलीय. अचानक टपटपकरीत टपोऱ्या थेंबातून त्याने धाव घेतली. कौलांवर तडतड ताशा वाजवित तो आला. मुलांनी अंगणात धाव घेतली. दोन्ही हात पसरून गोल फिरत आकाशाकडे पाहून डोळे मिचकावू लागली. डांबरी रस्त्यावर पाऊस फुलांचा वर्षाव पहाण्यासाठी डोळे भिरभिरले.तप्त रस्त्याने विश्वास टाकला. चिमण्या पाखरे किलबिलू लागली. झाडेवेली थरथरू लागली. जणूकाही सृष्टी शहारू लागली. मी सुध्दा लहान मुल होऊन अंगणात धावले. पण अचानक काय झाले कुणास ठाऊक. आला आला म्हणत असताना तो कुठे निघून गेला ते कळलंच नाही. मी हिरमुसली होऊन वर पहात राहिले का बरे मागे फिरला तो. ज्याच्या स्वागताची तयारी मनापासून करावी आणि तो मात्र दारावरून मागे फिरावा असंच झालं. मातीचा सुगंध हवेतच विरला. झाडेवेली माना खाली घालून स्तब्ध झाली. आता मात्र तो रुसला असल्याचे स्पष्ट झाले होते. णन अस्वस्थ झालं. उन्हाचा कवडसाही नाही तरी उन्हाळा अंगाची लाही लाही करतोय. जळमटलेले वातावरण मनाला उदास करून सोडतय. सगळीकडे धीरगंभीर शांतता पसरलीय. मनातल्या मनात हात जोडून विनवण्या सुरू होत्या. सृष्टी अबोल होऊन विनवित होती. 'नको रे असा निर्दय होऊस. का बरं रुसलास माझ्यावर? जीवाची नुसती घालमेल होतेय. आज किती खुश होते मी तू येणार म्हणून. पण तुला तर काहीच नाही त्याचं असा कसा रे निष्ठून होऊन मागे फिरलास? सांग ना कशी जगू मी तुझ्याशिवाय? गेले काही दिवस तू येण्याच्या वार्ता येतायत. त्या ऐकून मला हायसं वाटतं. कारण मागच्या वर्षीची जलसंपत्ती लोकहितासाठी खर्च झाली. अलीकडे मी कोरडी झालेय. सूर्यदेवाने तर सगळ्या शक्तीनिशी मला होरपळून काढलंय. माझी सहनशीलता आता संपत चाललीय. मी निस्तेज झालेय, रुक्ष झालेय. निर्जीवच होत चाललेय. तुझ्यावाचून माझे जीवन संपत चाललेय. आता तरी तू माझ्यावर दया कर. असा अंत नको रे पाहूस. मी तुझ्याविना नाही रे जगू शकत. अरे तू येत नाहीस म्हणून राजाने वाघिणीने पाणी आणले. कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. मला खूप वाईट वाटले. पण मला माहित आहे असे कितीही प्रयत्न झाले तरी ते तुझ्या पासंगाला पुरणार नाहीतच. एकदा का तू आलास की हे सगळे कुठल्या कुठे पळून जातील. मी जाणून आहे. एक दिवस तुला नक्की पाझर फुटेल. माझ्या हाकेला तू साद देशील. आणि माझ्या सर्व यातना, दु:ख संपवून टाकशील. ए, खरच आज मी खूप आनंदात होते. तुझ्या येण्याचा संकेत मिळाला आणि पुन्हा एकदा मन मोरपीस झालं होतं. पण तू .... तू अशी हुलकावणी दिलीस, मागे फिरलास का ... का असा हा आडमुठेपणा? ये ना लवकर आणि मला चिंब भिजवून टाक. मला नवसंजीवनी दे. मला जगायचंय, मला फुलायचंय, मला हसायचंय आणि हे सारं फक्त तूच करू शकतोस... तूच करू शकतोस.' तिच्या कळवळण्याने कदाचित तो हेलावला. त्याला रहावले नाही. तिच्या आर्त हाकेला त्याने साद दिली. मेघ गर्जना करीत विजांच्या लखलखाटात वाऱ्याच्या वेगाने तो अवतरला. सगळा आसमंत व्यापून टाकला. वसुंधरेला कवेत घेतली. तिचे शुष्क अश्रू पुसले आणि कडाडत म्हणाला, 'मला तुझ्या वेदना पहावत नाहीत म्हणून मी आज आलो. परंतु तुझ्या मुलांना जे तू लाडावून ठेवलं आहेस ना तेच तुझ्यावर अन्याय करताहेत. मला त्यांची कीव करावीशी वाटते. तू त्यांचे पालन पोषण करतेस आणि ते मात्र तुला केवळ दु:ख देतात. किती कृतघ्न आहेत ते. त्यांच्या बेदरकार वागण्याने सगळं ऋतुचक्र बिघडून गेले आहे आणि माझ्याकडून किती मोठ्या अपेक्षा ठेवतात,बघ. ते जर वेळेवर जागे झाले नाहीत तर अन्नपण्याविना प्राण सोडण्याची वेळ येईल त्यांच्यावर हे का त्यांना कळत नाही. त्यांच्या क्रूर कर्माची फळं त्यांच्या मुलाबाळांना भोगावी लागतील हे समजत असं नाही. मी तुझ्यावर रागावलो नाहीच. परंतु या मानवपुत्रांच्या हव्यासापोटी तुझी ही अवस्था झाली आहे. आता तरी त्याने जागे व्हावे आणि स्वत: सुखाने जगावे तसेच तुलाही जगू द्यावे. नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणीच असणार नाही. मी जसे जीवन देतो तसेच ते घेतोही. माणसा जागा हो. माणसा जागा हो!' मी सुन्न होऊन हे सारे ऐकत होते. डोळ्यातल्या पावसाने पापण्यांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. खरंच जागे व्हायला हवे ना माणसाने?
("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)
-- नूतन बांदेकर
आपल्याला संगीतातील नेमकं काय आवडतं? गीताचे बोल, गायक-गायीकेचा आवाज, गाण्याची चाल की या सर्वांचा एकूण मेळ? अर्थात नेमकं उत्तर सांगणं तसं अवघडच….कारण सिने संगीतात सर्व घटक मिसळलेले असतात. पण हिंदी चित्रपट संगीतात काही गाणी अशी आहेत की ती वरील घटका शिवाय कायम स्मरणात राहिली आहेत. गाण्याची चाल अर्थातच संगीत दिग्दर्शक तयार करतात मात्र गाणे पूर्णत्वास जाते ते वाद्य संयोजक (अरेंजर) नावाच्या त्यांच्या सहाय्यकांमुळे. गीतातील सुरूवात, स्थायी आणि अतंरा यांच्या मधील जागा वेगवेगळे वाद्यवादक भरून काढत असतात. अनेकदा सुरूवातीच्या सुरावटी इतक्या अप्रतिम असतात की आता कोणते गाणे लागणार हे आम्ही लगेच ओळखतो. एक उदाहरण देतो: बोल राधा बोल संगम होगा की नही…..च्या सुरूवातीची धून. तुम्हाला अशी अनेक गाणी आठवू शकतात. आज प्रकर्षाने मला एक सुरावट आठवत आहे.
१९५४ मध्ये प्रदीपकुमार व वैजयंतीमालाचा चित्रपट “नागीन” प्रादर्शीत झाला. हेमंतदा यांनी एकूण १३ गाणी संगीतबद्ध केली होती. मात्र यात एक गाणे असे होते ज्याला बोलच नव्हते आणि तरीही तेच या चित्रपटाचा हायलाईट ठरले. त्यावेळी हेंमतदाकडे दोन तरूण सहाय्यक काम करत होते. पैकी एक होते कल्याणजी वीरजी शहा व दुसरे रवी शंकर शर्मा. चित्रपटाचे नावच “नागीन” असल्यामुळे बीन हे वाद्य ओघाने आलेच. या बीनचा साउंड ट्रॅक तयार करताना कल्याणजीने नुकतेच भारतात आणले गेलेले क्लाव्हायोलिन हे वाद्य वाजवले. तर रवी यांनी हार्मोनियमवर त्यांना साथ केली आणि या दोघांच्या काम्बीनेशन मधून तयार झाली नागीनची सुप्रसिद्ध धून…”मन डोले मेरा तन डोले”….या बीनची नशा आज ६३ वर्षानंतरही उतरत नाही……
ही बीन वाजवणाऱ्या कल्याणजीने पूढे आपला धाकटा भाऊ आनंदजीला सोबत घेऊन स्वतंत्र संगीत कारकिर्द सुरू केली आणि एक प्रतिष्ठीत संगीतकार बनले. (त्यानां साथ देणारा रवी शंकर शर्मी ही देखील पूढे रवी या नावाने प्रख्यात संगीतकार झाला) ३० जून १९२८ ला गुजरात मधील कच्छ प्रांतात कल्याणजीचा जन्म झाला. आनंदजी त्यांच्याहून ५ वर्षे लहान. वडील कामधंद्यासाठी मुंबईत आले च ग्रोसरीचा व्यवसाय करू लागले. कल्याणजीचे आजोबा त्याकाळाचे लोकसंगीतकार होते. त्यामुळे वारसा घरातुनच मिळाला. क्लाव्हायोलीन या परदेशी वाद्यावर त्यांची हुकूमत होती त्यामुळेच नागीन धून तयार होऊ शकली. करीअरच्या सुरूवातीला त्यांचा स्वत:चा ‘कल्याणजी वीरजी अण्ड पार्टी’ नावाचा आर्केस्ट्रा होता. मुंबई व देशात ते शो करत असत. कल्याणजीने या क्षेत्रात यायचे ठरविले त्यावेळी एकापेक्षा एक दिग्गज संगीतकारांनी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती. त्यामूळे त्यांच्यापूढे जबरदस्त स्पर्धा होती. १९५९ मधील ‘सम्राट चंद्रगुप्त’ या चित्रपटातुन त्यानां पहिली संधी मिळाली. त्यातील ‘चाहे दूर हो चाहे पास हो’ हे लता रफीचे द्वंद गीत खूप गाजले. नंतर त्याच वर्षी आला ‘सट्टा बाजार’ आणि ‘मदारी’. पैकी मदारी मध्ये पुन्हा एकदा त्यांची ‘बीन दिल लुटने वाले जादूगर अब….’ या गाण्यात वाजली.लता-मुकेशचे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. यावेळी मग लहान भाऊ कल्याणजी त्यांना जॉईन झाले.
सुरूवातीला कल्याणजी वीरजी शहा नावाने ते संगीत देत पण पूढे भाऊ देखील सक्रिय झाला व मग ते सुप्रिसद्ध कल्याणजी-आनंदी झाले. त्यांचा खरा डंका वाजला तो १९६५ मधील ‘हिमालय की गोदमे’ आणि ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील गाण्यामुळे. नंतर मात्र त्यानां कधीच मागे वळून बघावे लागले नाही. १९६८ मधील ‘सरस्वती चंद्र’ यातील ‘चंदनसा बदन’ या गाण्याने पहिले तर १९७४ मध्ये ‘कोरा कागज’ यातील ‘मेरा जीवन कोरा कागज’… या गाण्याने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. लता व आशासांठी त्यांनी जवळपास ६०० गाणी संगीतबद्ध केली. मला स्वत:ला त्यांची----डम उम डिगा डिगा (छलिया)……ये समा, समा है (जब जब फूल खिले)…..आंखो आंखो मे हम तुम हो गये(महल)…….आओ तुम्हे मै प्यार सिखादू (उपासना)…..अकेले है चले आओ (राज)…..चांदी की दिवार ना तोडी (विश्वास)….बेखुदी मे सनम (हसीना मान जाएगी…..) चाँद आहे भरेगा(फूल बने अंगारे……)चंदन सा बदन (सरस्वतीचंद्र)…..चाँद सी मेहबूबा होगी मेरी (हिमालय की गोद मे)…..हम बोलेगा तो बोलता है (मर्यादा)…..जींदगी का सफर है कैसा (सफर)……पल पल दिलके पास (ब्लॅकमेल)…..पल भर के लिए कोई (जॉनी मेरा नाम)…..रहने दो गिले शिकवे (रखवाला….) समा है सुहाना सुहाना (घर घर की कहानी)…..यारी है इमान मेरा (जंजीर)… वक्त करता जो वफा (दिल ने पुकारा)….कसमे वादे प्यार वफा सब (उपकार)…..ओ साथी रे (मुकदर का सिंकदर) ही गाणी आवडतात. खरं तर ही यादी खूप मोठी आहे पण जागा अपूर पडेल. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास २०० चित्रपटापेक्षा अधिक चित्रपटानां संगीत दिले. या शिवाय नवनवीन तरूण गायक गायीकांना त्यांनी संधी दिली. लहान मुलांतील टॅलेंटला संधी मिळावी म्हणून किती तरी कार्यशाळा घेत असत. सन २००० मध्ये कल्याणजीचे निधन झाले. बंधू आनंदजी आज कल्याणजी विना अधुरे वाटतात. त्यांची नागीन धून ऐकून कदाचित आजही साप बीळा बाहेर येत असावेत कारण आजही मदारी सापा समोर हीच धून वाजवतात.
-दासू भगत (३० जून ०१७)
Copyright © 2025 | Marathisrushti