(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राशी व त्यांचे स्वभाव – कर्क

    राशी :- कर्क
    स्वामी :- चंद्र
    देवता :- हरिवंश
    जप मंत्र :- ॐ ह्रीं हरिहराय नमः
    उपास्यदेव :- शिव
    रत्न :- मोती

    जन्माक्षर :- हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष
    बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.

  • स्वानंद

    संत श्री. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत:

    १) पहिले रत्न आहे...माफी
    तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.

    २) दुसरे रत्न...विसरून जाणे
    आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा पुनर्उच्चार, प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.

    ३) तिसरे रत्न...विश्वास
    नेहमी आपल्या मेहनतीवर आणि श्री रामरायांवर अतुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे...

    ४) चौथे रत्न...वैराग्य
    हे नेहमी लक्षात ठेवा की जसा आपला जन्म झाला आहे, तसाच एक दिवस आपला मृत्यू ही आहेच म्हणून लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.

  • नातं- स्त्रीचं स्त्रीशी

    कॉलेजात प्रवेश केल्यावर जाणवणार्‍या अनामिक हुरहुरीसारखी एक अनामिक हुरहूर कॉलेज संपत येऊ लागल्यावरदेखील जाणवू लागते. ‘पुढे काय?‘ याविषयी काहींनी ठरवलेले असते, तर काहींचे काही निश्चित मनाजोगते ठरतच नसते. अशा भांबावलेल्या मनःस्थितीत आपण व आपली खास मैत्रिण एकमेकींना यापूर्वी जशी साथ दिली तशीच यापुढेही प्रत्येक क्षणाला देऊ, असे मनोमन ठरवित असतो. अन् एक दिवस खरोखरच कॉलेज संपते… अन् सुरू होते कॉलेज कॅम्पसपेक्षा मोठ्ठ्या कॅम्पसमधली अस्तित्त्वाची लढाई!

  • विद्यार्थ्यांसाठी मनोगत

    मुलांसाठी मनोगत 

    (हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट  समजावून सांगावा.)


    श्री.सदानंद रामचंद्र भावे

  • उत्क्रांती

    माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!

  • बदनामीची भीती ! (बेवड्याची डायरी – भाग ४३ वा)

    पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा वेळी त्याला आपल्या चुकांचा ..व्यसनांचा तसेच व्यसनासाठी केलेल्या भानगडींचा कबुली जवाब देणे अवघड वाटते ..' तो मी नव्हेच ' असा त्याचा अविर्भाव असतो ..खरे तर कुठून ना कुठून तरी आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या व्यसनी होण्याबद्दल माहिती कळलेली असते ..घरातील मोलकरीण ..सोसायटीचा वाॅचमन ...ऑफिसमधील सहकारी ..सोबत पिणारे मित्र ..अश्या लोकांकडून त्याच्या व्यसनी असण्याबद्दल व्यवस्थित माहिती पोचलेली असते सगळीकडे ..फक्त ' आपल्याला काय करायचेय ' या विचाराने लोक त्याच्या तोंडावर तशी चर्चा करत नाहीत ..किवा एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर व्यसनी त्याला अनेक समर्थने देवून उडवून लावतो ..

    अनेकदा कुटुंबीय देखील बदनामीच्या भीतीने तो व्यसनात अडकल्याची बाहेर कुठे वाच्यता करत नाहीत ..कारण लोक काय म्हणतील याचा विचार असतो ..खरेतर पाठीमागे लोक बोलतातच ...शिवाय व्यसनी व्यसन करतो त्यात कुटुंबियांची काहीही चूक नसतेच त्यामुळे कोणी कुटुंबाला दोष देत नाहीतच ..कुटुंबियांना वाटते की आपण चांगले संस्कार दिले नाहीत असे लोकांना वाटेल ..खरे तर सर्वच पालक व्यसनीला लहानपणी चांगलेच संस्कार देतात ..मात्र तो त्या मोठा झाल्यावर त्या संस्कारांचे आचरण करत नाही हा काही पालकांचा दोष नसतोच .. पण पालक लोकलज्जेने व्यसनीच्या चुकांवर पांघरून घालतात..अन व्यसनी निर्लज्ज पणे व्यसन करत राहतो ..असा हा आजार आहे ..त्यामुळे पाचव्या पायरीत सांगितलेले ' कन्फेशन ' करणे व्यसनी व्यक्तीला खूप जीवावर येते ' मुझको बरबादी का कोई गम नही..गम है बरबादी का क्यू चर्चा हुवा ' ..अश्या प्रवृत्तीने तो आपल्या चुका लपवून ठेवतो ..इतरांनी त्याच्याबद्दल चर्चा करू नये असे त्याला मनापासून वाटते ..कितीही झाकले तरी कोंबडे बांग देतेच हे विसरता कामा नये ..आपल्या चुकांवर पांघरूण घालून कुटुंबीय खरे तर आपल्या व्यसनीपणाला खतपाणी घालत असतात ..

    सर व्यसनी व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मनस्थिती बद्दल बारकाईने माहिती देत होते ..मला ते लागू पडते आहे हे जाणवले ..मी नेहमी बाहेरच्या लोकांमध्ये अगदी असेच वर्तन करत असे ..स्वतचा चांगुलपणा लोकांना जाणवावा असे वागत असे ..मी साधा भोळा..प्रामाणिक प्रवृत्तीचा ..जवाबदार ..सरळमार्गी व्यक्ती आहे असेच इतरांना भासवत असे ..खरेतर अनेकांना मी रोज दारू पितो ..दारूमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय ..माझ्या कुटुंबात भांडणे होत आहेत ..आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललो आहे ..कामावर दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलेय .वगैरे माहिती मिळाली असणारच ..कारण मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की चार माणसे एकत्र जमली की ते इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतातच ..तेथे हजर नसलेल्या व्यक्तीच्या दुर्गुणांची चर्चा करतात ..आपल्याला समजलेली गुप्त बातमी कोणाला सांगू नकोस असे म्हणत सगळीकडे वितरीत करतात ..
    फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याला कोणी काही बोलत नाहीत कारण त्यांना तो आपलं अपमान करेल अशी भीती असते किवा ' ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल ' या उक्तीनुसार गप्प राहतात ..

    अलका भांडणात आमचा आवाज वाढला की शेजारचे लोक ऐकतील या भीतीने चूप बसत असे ..सुरवातीला तर तिने माहेरी देखील माझ्या पिण्याबद्दल वाच्यता केली नव्हती ..सगळे काही छान आहे असेच भासवले होते ..माझ्या आईबाबांनी देखील कधी इतर नातलगांकडे माझ्या पिण्याचा विषय काढला नव्हता ...इतरांना समजले तर बदनामी होईल या भीतीने त्यांनी माझ्या चुकांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न केला होता ..पाचव्या पायरीत स्पष्टपणे म्हंटले होते की आपल्या चुका मोकळेपणी कबूल केल्या पाहिजेत तरच पुढे जाता येते ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये केले जाणारे शेअरिंग हा पाचव्या पायरीचाच एक भाग आहे ...प्रत्येकाने निर्भयपणे शेअरिंग करणे गरजेचे असते ..

    सरांचे बोलणे सुरु असताना एकाने हात वर करून विचारले ' सर हे जे ईश्वर ..स्वतः ..व आदरणीय व्यक्तीजवळ चुकांची तंतोतंत कबुली दिली असे म्हंटले आहे.. ते तीन भाग का केले आहेत ..? " सरांनी त्याचे उत्तर दिले ..म्हणाले खरेतर जेव्हा आपण ईश्वरी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सर्वव्यापी ईश्वर ' यत्र ..तत्र ..सर्वत्र ' आहे असे म्हंटले होते ..म्हणजे प्रत्येक जीवात ते सर्वशक्तिमान चैतन्य वसलेले आहे ..तेव्हा चुकांची कबुली देताना नेमकी कोणाजवळ द्यावी हा प्रश्न पडतो ..किवा कोणाजवळही दिली तरी चालते का ? असा संभ्रम निर्माण होतो .. यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून हे तीन भाग आहेत ..पहिल्या भागातला ईश्वर म्हणजे आपले जवळचे कुटुंबीय ज्यात पत्नी ..आईवडील .भावंडे येतात ..आपण घरी अनेकप्रकारचे बेताल वर्तन केले आहे ..आपल्या वागण्याने कुटुंबियांना खूप त्रास झाला आहे

    ..आर्थिक ..मानसिक ..कौटुंबिक ..शारीरिक ..सामाजिक..आणि अध्यात्मिक या साऱ्या पातळ्यांवर जसे आपले नुकसान झालेय तसेच त्यांना देखील या सगळ्या पातळ्यांवर आपल्यामुळे त्रास झालेला आहे .. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध केला ..प्रतिकार केला तेव्हा तेव्हा आपण आक्रस्ताळे पणाने ..आक्रमकपणे ..त्यांना चूप बसवले आहे ..किवा त्यांनी आपल्याबद्दल चर्चा सुरु करतच तेथून काढता पाय घेतला आहे..त्यांना आपल्यामुळे त्रास होतोय हे कधीच त्यांच्या समोर मान्य केलेले नाहीय ..तर त्यांच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय असा कांगावा केला होता आपण ..पाचव्या पायरीचे आचरण करताना आपण जवळच्या नतलगांपुढे आपण त्यांना दिलेल्या त्रासाची कबुली देणे अपेक्षित आहे ..त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो ..तसेच आपण मनापासून सुधारू इच्छितो हे त्यांना समजते ..त्यांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळण्यास सुरवात होते ..आपल्या वागण्याबद्दल आपल्याला खरोखर पश्चाताप होतोय याची खात्री वाटते ..

    आता दुसऱ्या भागात " स्वतः जवळ कबुली दिली " असा उल्लेख आहे ..म्हणजे केवळ नातलगांकडे कबुली देणे पुरेसे नाहीय तर ..आपल्याला स्वतःला ते आतून ..अंतर्मनातून पटले पाहिजे ..अगदी मनाच्या खोल गाभार्यातून आपण चुकलो आहोत हे वाटले पाहिजे ..केवळ पाचव्या पायरीत सांगितले आहे म्हणून नव्हे ..किवा आपण व्यसनमुक्ती केंद्रात आलोत म्हणून नव्हे ..अथवा आता आपल्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरला नाही म्हणून ..इतरांनी लवकर आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून ..आपल्याला माफ करावे म्हणून ..पश्चाताप झालाय असे दाखवावे म्हणून नव्हे तर .मनापासून आपण चुकलो आहोत याची खोल जाणीव व्हावी अशी अपेक्षा आहे ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • चिनी कलेची विविधता – भाग ३

    जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच 'तू' जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. 'नवरा मुलगा' आमच्या शेजारीच होता. सूपचा आस्वाद घेत होतो तोच 'नवरीला' बरोबर घेऊन तिच्या 'सख्या' जेवणघरात आल्या आणि 'नवऱ्यामुला'च्या खुर्चीमागे घोळका करून दाटीवाटीने उभ्या राहिल्या. सूप चालू असताना त्या चिनी भाषेत गाणी गात होत्या. आमचे बाऊल उचलून दुसऱ्या प्लेट आल्या, पण 'नवऱ्या' मुलाचे सूप बाऊल 'नवरी' च्या सख्या उचलूच देईनात. आमच्यासाठी भात व भाजी आली, पण 'नवरा' रिकामा बाऊल पुढ्यात घेऊन तसाच! सख्यांची गाणी संपेनात, बाऊल उचलला जाईना! शेवटी आमच्या गाईडला 'दया' आली व त्याने 'मुली' कडच्या एका वयस्कर स्त्रीला पुढे आणले व "हा काय प्रकार आहे?" असे विचारले. भाषेचे गोंधळ संपले व उलगडा झाला की मैत्रिणींना बाऊल उचलण्यासाठी 'मेहुणीचा मान' म्हणून काही रक्कम हवी होती. शेवटी नवरोबांनी काही किरकोळ नोटा त्यांच्या हातात सरकवल्यावर त्याला पुढचे जेवण मिळाले. जेवण पूर्ण होईपर्यंत नवरी नवऱ्याला वारा घालत होती, जेवण वाढत होती, आग्रह करत होती. तोही या 'व्ही आय पी' ट्रीटमेंटमुळे खूप खूष होता, एन्जॉय करत होता, त्याची खरी बायको व्हीडियो शूट करत होती. आम्ही सगळे गंमत पहात होतो. त्याचे जेवण होताच लग्न समारंभ संपल्याचे जाहीर झाले, सगळे उठले. आम्ही वस्तीबाहेर पडणार तोच शेवटच्या घरातून पुनः नवरीच्या मैत्रिणी व नवरी तिचे सामान घेऊन आडव्या आल्या. नवरी राजरोसपणे आपल्या सख्यांना सोडून नवऱ्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिच्या सख्या मोठमोठ्याने हुंदके देऊ लागल्या. तिची 'आई' तर तिला मिठी मारून रडायला सुद्धा लागली. आमची बस थोडी दूरवर उभी होती. आम्ही, आमच्या मागे नवरा-नवरी, त्यांच्या मागे त्याची खरी बायको, व तिच्या मागे वस्तीवरचे 'बाराती'. बस जवळ आली तरी मंडळी मागे फिरेनात. उलट नव्या नवरीची नव्या नवऱ्याबरोबरची जवळीक वाढतच चालली. शेवट तिने त्याचा हात पकडला तेव्हा मात्र तोच काय आम्ही पण चपापलो. गाईडच्या मध्यस्थीने विचारले तर कळले की वस्तीवरचे लोक म्हणताहेत, "या दोघांचे लग्न झाले असून ही आता त्याची बायको झालीय, त्यामुळे ती त्याच्या बरोबर सिंगापूरला जाणार व त्याला तिला न्यावेच लागणार." आता मात्र नवरा व त्याची खरी बायको चांगलेच सटपटले. बसमधे चढून त्याची खरी बायको त्याला बसमध्ये खेचू लागली, तर 'ती' त्याला बसमधून खाली ओढू लागली. "हे काय संकट आले" म्हणून बायको, तर 'तो' आपल्याला नेणार नाही" म्हणून 'ती' रडू लागली. शेवटी मी सिंगापूरला रहातो, तिथे तुला व्हिसाखेरीज प्रवेश मिळणार नाही" असे सांगताच खरी गोष्ट उघडकीस आली व 'नवरी'ला माहेरी ठेऊन घेण्यासाठी भल्या मोठ्या रकमेची मागणी झाली. घासाघीस होऊन शेवटी थोड्याशा डॉलर्सवर सौदा तुटला. बिचाऱ्या नवरदेवाला फुकटचा भुर्दंड व त्याची बायको रडून रडून हैराण ! पैसे घेऊन 'नवरी' व बाराती मागे झाले व 'नवऱ्या'ला बसमधे जाण्याची परवानगी मिळाली. बस सुटेपर्यंत बाराती मात्र खिडकीपाशी टाचा उंच करून, नवरीकडे अंगुलीनिर्देश करून 'तिला लवकर घेऊन जा, विसरू नका' असे हातवारे करून सांगत होते. आता चालकाला तो नवराच बस सोडण्याची घाई करू लागला.

    तेवढ्यात आमच्यासारखीच दुसरी प्रवासी बस तिथे येऊन थांबली. त्यातून नवे प्रवासी उतरू लागताच इतका वेळ ओक्साबोशी रडणारी 'नवरी' हसतहसतच नटण्यासाठी खोलीकडे पळाली, बाराती बस मधल्या लोकांच्या स्वागतासाठी परत दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभे राहिले. नव्या पाहुण्यांबरोबर हाच खेळ, याच थेटरात फक्त नवीन 'नवऱ्या'साठी सज्ज होत होता. हा सगळा पैसे मिळवण्यासाठी चालणारा खेळ आहे हे जरी सुरुवातीपासूनच माहिती होते तरी त्या कलाकारांच्या अभिनयाला मनापासून दाद द्यावीशी वाटली. पैसे मिळवण्याची अशी पूर्वी न पाहिलेली अजब युक्ती गाईडने समजावताच चीनी नवरा आणि त्याची बायको यांच्यासह सर्वजण हसायला लागले. आम्ही मार्गस्थ झालो पण डोळ्यासमोर तरळत होती ती त्या नवरीची अप्रतिम 'अभिनय कला.'

    पुढचा टप्पा होता चेंगडू. विमानप्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. तिथली उत्कृष्ट बाग पहाणे व बाकी राहिलेली किरकोळ खरेदी एवढाच कार्यभाग होता. चेंगडूही ३००० फुटांवर आहे. त्यामुळे हवा आल्हाददायक होती. सिच्युआन प्रॉव्हिन्समधील चेंगडू हे महत्त्वाचे गाव. दुसऱ्या महायुद्धाचे वेळी या गावाचा चीनला खूप उपयोग झाला होता अन् त्यामुळे महत्वही. जगातील सर्वात उंचावरून जाणारा रेल्वेमार्ग सुरू होण्याअगोदर तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी हा मार्ग जास्त सोयिस्कर होता. शहरावर चिनी छाप अगदी ठळक दिसत होती. गजबजाटही बऱ्यापैकी होता. फिरत फिरत आम्ही तिथले प्रसिद्ध उद्यान व त्याच्या जवळच्या बाजार गल्लीपाशी आलो. आता चिनी वस्तू सर्वत्र मिळत असल्याने मोठे मोठे रंगीत पंखे, लाल केशरी दिवे, लायन-ड्रॅगनच्या मूर्ती यांचे विशेष आकर्षण वाटले नाही. बाग मात्र आकर्षक होती. वेगवेगळ्या पुष्परचना, ठिकठिकाणी कमानी होत्या. मधोमध एक ऍफीथिएटर होते. एक छोटा हौशी ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करत होता. त्या सुरांवर व तालावर गोबरी गुटगुटीत मुले नाचत होती. खूपच छान होते ते दृश्य! आम्ही बागेत हिंडत असता ती मुले आमच्या जवळ येऊन माझ्या साडीला हात लावून पहात होती. पदर ओढत होती, इतकेच काय आमच्या हातालाही स्पर्श करत होती. तिथे आम्ही दोघेच भारतीय असल्याने मोठ्या माणसांचेही आम्ही आकर्षण केंद्र ठरलो. खूप मजा वाटली या सगळ्याची. आम्ही भारतीय वंशाचे हे मात्र त्यांनी माझी साडी-कुंकू पाहून ओळखले. काही जणांनी आमच्या बरोबर फोटोही काढून घेतले. भारतीय वेषभूषा व भारताची काही वैशिष्ट्ये इतक्या दूरवरही माहिती आहेत हे पाहून खूपच आनंद झाला.

    चेंगडूमध्ये आमचे भेट देण्याचे दुसरे ठिकाण होते 'सिच्युआन ऑपेरा.' इतरही बरेच ऑपेरा आता जागोजागी दिसतात, पण 'सिच्युआन ऑपेरा' हे महत्त्वाचे, खूप पुरातन व मुख्य सांस्कृतिक केंद्र आहे. चेंगडू शहराची शोभा बघत बघत आम्ही पूर्वीच्या पद्धतीच्या खास चिनी कलाकुसर दाखवणाऱ्या भव्य कमान असणाऱ्या ऑपेराहाऊसपाशी पोहोचलो. सायंकाळी पाचच्या सुमारास हा खेळ सुरू होणार होता. भल्यामोठ्या प्रशस्त रंगमंचासमोरच्या अर्धगोलाकारात मांडलेल्या आसनांवर आम्ही स्थानापन्न झालो, पहातापहाता सगळे थिएटर आमच्यासारख्या पर्यटकांनी भरून गेले. भोवताली असलेल्या २ मजली छोट्या छोट्या कमानी असणाऱ्या खोल्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत ही आसनव्यवस्था होती. सगळीकडे रंगीबेरंगी छोटे-मोठे आकाशदिवे टांगलेले होते. पताकांच्या माळा वाऱ्यावर झुलत होत्या. संगीताचे मंद स्वर वातावरण प्रसन्न करत होते. आम्ही सगळी शोभा बघतो आहोत तोच कार्यक्रमाच्या निवेदनाला सुरुवात झाली. निवेदक सांगत होता, "या कार्यक्रमात रंगीबेरंगी वेशभूषा केलेले विविध समूह एकामागोमाग आपापली कला सादर करतील. यात सिच्युआन प्रॉव्हिन्सच्या, चीनच्या इतिहासाची उजळणी केली जाईल. कलाकार नाच, गाणे, नकला यांच्या माध्यमातून इतिहास आपल्या डोळ्यासमोर साकार करतील. चिनी राजेराण्यांच्या, त्यांना घाबरवणाऱ्या राक्षसांच्या, परिकथेतील दयाळू पऱ्यांच्या गोष्टी छोट्या छोट्या नाटकांद्वारे आपल्या समोर येतील.” सर्व निवेदन अर्थात मॅडरिन भाषेत होते. आम्हाला भाषा कळत नव्हती तरी त्याचे व इतर कलाकारांचे हावभाव इतके बोलके होते की, कथा सहज समजली. कार्यक्रम सुरू असताना छोट्या छोट्या किटल्यातून बिन दुधाचा बिन साखरेचा चिनी चहा, भाजलेल्या विविध बिया, शेंगदाणे आमच्या समोर येत होते. त्याचा आस्वाद घेताना कार्यक्रमात अधिकच रंग भरत होता. साधारण २ तास हा कार्यक्रम चालला.त्यानंतर चेंगडूच्या पारंपारिक कलेचा खेळ सादर होणार होता. तो होता 'फेस चेंजिंग उर्फ 'बियान लियान' -सिच्युआन प्रॉव्हिन्सचा फार पूर्वापार चालत आलेला खेळ. तो सादर करणारे कलाकार अत्यंत चमकदार रंगीबेरंगी वेशभूषा करतात. त्यांना साथसंगत तशीच नाट्यमय व जलद गतीची असते. रंगभूमीवर कुठली तरी चिनी परिकथा चालू असते. त्यात राक्षसाचा किंवा खलनायकाचा प्रवेश उशीरा असतो. भाषेमुळे कथा कळत नाही, पण राक्षस अवतरला की लगेच कळते की, हा आता राजाराणीला त्रास देणार. त्या दोघांना मदत करणारी देवताही यथावकाश अवतरते. आणि सुरू होते त्या दोघांचे युद्ध! आपण गुंग होऊन पहात असतो. आता देवतेची सरशी होणार.....तेवढ्यात पिवळ्या चेहऱ्याचा राक्षस अचानक लाल तोंडाचा दिसू लागतो. पुन: देवता त्याच्यावर कुरघोडी करणार तितक्यात लाल चेहरा अचानक निळा होतो. अंगातल्या कपड्यांमुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या चेहऱ्यांखाली आहे हे पटते. कोणतीही रंगरंगोटी न बदलता, स्टेजवरून नाहीसे न होता आपल्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा पिवळ्याचा लाल-लालचा निळा-निळ्याचा हिरवा-काळा-पांढरा होत असतो. कोणाच्याही मदतीशिवाय, नृत्य नाट्यात क्षणभराचाही खंड पडू न देता हे चेहरे एकच व्यक्ती वारंवार बदलते याचे खूप आश्चर्य वाटते. जोवर हे सगळे स्टेजवर चालू आहे तोवर "अंतर खूप आहे, त्यामुळे हातचलाखी दिसत नसेल, एकावर एक मुखवटे घातले असतील, ओढून काढलेला मुखवटा अंगरख्यात लपवला असणार" वगैरे शंका मनात येतात. पण जेंव्हा तेच पात्र प्रेक्षकात उतरून असे चेहरे क्षणार्धात बदलू लागते, तेंव्हा तोंडाचा 'आ' वासून दाही बोटे कधी तोंडात जातात, कळतही नाही. पापणीही न लववता हे आश्चर्य डोळ्यात साठवून घेता घेता कार्यक्रम संपतो. जेमतेम १५-२० मिनिटे चालणारा हा 'बिआन लिआन' चा खेळ मनात घर करून रहातो. पूर्वी हा खेळ फक्त चिनी सणावारीच ऑपेरात केला जाई, तोही फक्त चीनमध्येच. हल्ली मात्र त्याचे वैशिष्ट्य व वेगळेपण लक्षात आल्याने सिच्युआनमधील कलाकार हे प्रयोग जगभर करतात.

    या खेळाबद्दल खूप गंमतशीर माहिती समजली. ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जाते. पण पहिल्या पिढीतले बुजुर्ग पुढच्या पिढीतल्या फक्त मुलांनाच ही कला शिकवतात. मुली लग्न होऊन दुसऱ्या घरात जातात, त्यांच्या बरोबर आपली फेस चेंजींगची कला दुसऱ्या घराण्यात जाऊ नये यासाठी ही खबरदारी! मलेशियात काही स्त्री कलाकारांना ही कला येते, पण त्यात मुखवटे बदलताना इतकी सफाई येत नाही हेही आम्ही नंतर पाहिले. चिनी कलाकारांची शिताफी मात्र अगदी जवळून लक्ष देऊन पाहिले तरी समजत नाही. सहसा ४ पद्धतींनी हे मुखवटे बदलले जातात. डोक्यावर घट्ट मास्क एकावर एक बसवून ते संगीताच्या तालावर नाचता नाचता मानेला झटका देऊन चेहऱ्यावर ओढणे हा एक प्रकार. काही वेळा भुवया, गालावरचे कल्ले यात वेगवेगळे रंग लपवतात व बघता बघता तो चेहऱ्यावर ओढून मूळ रंगच बदलतात. कधीकधी फक्त मिशीत लपवलेला रंग मिशीवर ओढून आणून मिशीमुळेच चेहऱ्याचे वेगळेपण भासवले होते.

    चौथ्या प्रकारात चक्क मुठीत धरलेली धूळ वा रंगाची पूड उधळणे व त्या धुळीच्या पडद्या आड चेहऱ्याचा मुखवटा बदलणे हे केले जाते. जरी या चारी पद्धती प्रेक्षकांना माहीत झाल्या तरी प्रत्यक्षात ते कसे साध्य केले जाते हे अजिबात समजत नाही हेच या खेळाचे वैशिष्ट्य. चिनी कलाकारांच्या या नाविन्यपूर्ण 'चेंजींग फेस' या कलेला किती नावाजावे तेवढे थोडेच.

    बियान लियान चा मनावरचा प्रभाव कमी व्हायला खूप वेळ लागला. त्यानंतर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये १३ कोर्सचे ग्रँड डिनर होते. पूर्ण शाकाहारी असल्याने मी फक्त सूप, ब्रेड, भाजी व भात याचीच मानसिक तयारी ठेवली होती. पण सिंगापूरहून आलेली एक पाहुणी पूर्ण शाकाहारी असल्याचे शेफला सांगताच तो मान डोलावून अदृश्य झाला. हळूहळू इतरांची एकेक डिश समोर येऊन गट्टम होऊ लागली. मी मात्र तशीच! इतरांच्या सात-आठ डिशेस संपल्यासुद्धा. तितक्यात आतून माझ्यासाठी एका मागोमाग एक पदार्थ -दिसायला इतरांसारखे पण पूर्ण शाकाहारी-यायला लागले.१२ पदार्थ माझ्यासमोर मांडले गेले. हे आश्चर्य व शेफच्या कौतुकाने पोट खाण्याआधीच भरले. शेवटची १३ वी डिश मात्र आम्ही बनवू शकत नाही कारण बीफ फ्लेवर हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे" असे सांगून शेफने मनापासून माफी मागितली व त्याची भरपाई आइस्क्रीम खिलवून केली. सर्वच पदार्थ एकदम चविष्ट व आकर्षक होते. प्रत्येक डिश सादर करताना शेफचा आविर्भाव 'अतिथी देवो भव' मानणाऱ्या संस्कृतीशी मिळता जुळता होता. भरल्या पोटाने व आनंदी मनाने शेफचे आभार मानत आम्ही त्याचा निरोप घेतला. साध्या जेवणात सुद्धा त्याने जी त्याची 'पाककला' दाखवली त्याने मन एकदम तृप्त होऊन गेले. चेंगडू सोडून सिंगापूरला परतलो तरी या साऱ्या गोष्टी कायमच्या मनात ठसल्या. अचानक बघायला मिळालेल्या विविध कला दाखवणाऱ्या कलाकारांची आठवण मनात कायमच घर करून राहिली आहे.

    -- अनामिका बोरकर

  • विदारक सत्य

    काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते कि यंत्र चालावे तसे काही लक्षात येण्यापूर्वीच चहा झाला, सकाळची कामे आटोपली आणि आश्रमात जाण्याची वेळ झाली.
    इथे मात्र मी थोडी अडखळले. इतर वेळेस पटकन विकेट गेट उघडून पलीकडच्या आश्रमामध्ये गेले असते. पण आज तिकडे जाण्यासाठी पायच उचलत नव्हते. कशीबशी ऑफीसमध्ये पोहचले. कालचा प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता. तशीच मनाची समजूत घालीत रोजच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा केली आणि आश्रमात सकाळची ‘round’ मारायला निघाले.

    ह्या आश्रमात जवळ जवळ ३५ वृद्ध महिला आहेत. प्रत्येक खोलीत दोघी-दोघी रहातात. काही महिला वयाने जरी वृद्ध असल्या तरी शारीरिक रित्या व्यवस्थित आहेत. त्यांना रिकामटेकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये पाणी टाक, गार्डनची सफाई देखरेख असली कामे त्या करत असतात. तिघी-चौघीजणी किचन मध्ये स्वयंपाकाला मदत करत असतात दोन वृद्ध महिला तर अश्या आहेत, त्यांना आजारी माणसांची सेवा करायला आवडते. तरुणपणी त्या दोघीजणी नर्स होत्या एकीने लग्न केलेले नाही तर दुसरीला मुलांनी टाकून दिले आहे. एकाच पेशातल्या असल्यामुळे त्या एकाच खोलीत राहतात आणि आजारी वृद्ध महिलांची काळजी घेतात. त्यांची आम्हाला खूप मदत होत असते. असा हा “वृद्धाश्रम” महिलांना सहारा देणारा असला तरी त्यातील वृद्ध महिला देखील आश्रम चालवण्यास सहकार्य देत असतात. नेहमीच खेळीमेळीचे सुंदर वातावरण हे ह्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.

    सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी करणे हे माझे मुख्य काम असते. खास करून रोजच्या रोज चादरी बदलल्या जातात कि नाही आणि इतर स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने नजर फिरवणे जरुरी असते. आणि हे सगळे करत असताना त्या सगळ्यांची थोडीशी विचारपूस हा माझा नित्यनियम आहे. ह्या उतारवयात आपली कोणी विचारपूस करत आहे किंवा कोणी उभे राहून आपल्याबरोबर गप्पागोष्टी करते आहे ह्या विचारानेच त्यांचे मन प्रफुल्लित होत असते. अशीच मधुबेन बरोबर गप्पा मारता मारता समोरच्या ७ नंबरच्या खोलीकडे लक्ष गेले. ही खोली आणि बाजूची ८ नंबर ही आमची मेडिकल रूम आहे. कोणी जास्त आजारी असले तर ह्या खोलात त्यांना हलवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इथे हलवण्याचा हेतू असा असतो की बाकीच्या महिलांना त्रास होऊ नये आणि डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या सवडीनुसार येणे शक्य होते आणि शांतपणे तपासणी करणे शक्य होते.

    ह्या ७ नंबरच्या खोलीत गेले दोन महिने ‘केसरबा’ होत्या. ‘केसारबा’ राजकोटच्या होत्या. खात्यापित्या घरच्या चांगल्या बाई होत्या खरे तर. वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास होते. पण तब्येतीने धडधाकट होत्या. तीन-चार महिन्यापूर्वी खूप ताप आला होता आणि त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत ढासळतच गेली होती.

    दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेजारील दोन-तीन बायका त्यांना इथे घेऊन आल्या होत्या. उंचीने थोड्याशा ठेंगण्या, जाडसर बांधा, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा गोल काचांचा जाडजूड चष्मा, नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात लांब तुळशीची माळ, चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे भाव आणि खांद्यावर अडकवलेली एक मोठी लांब झोळीवजा पिशवी अशा ह्या; त्या वेळच्या केसरबा आजही मला आठवत आहेत. पायात स्लिपर्स, त्या पण फाटक्या होत्या आणि डोळ्यावरचे संपूर्ण पांढरे केस, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचे साक्षीदार, त्यांना शोभून दिसत होते.

    आमच्या नियमाप्रमाणे मी त्यांना तुम्हाला इथे का यावे लागले असा प्रश्न विचारला होता. साधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना बायका हळव्या होतात, रडायला लागतात. कित्येकवेळा तर महिन्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. परंतु ह्यांनी मला थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले होते, “एक दिकरो बाहर अमेरिका जतो रह्यो. बिजो एकलोच मने केम साचवे?” (एक मुलगा अमेरिकेला गेला तर दुसऱ्याने एकट्यानेच मला का सांभाळायचे?) आणि हळूच गालातल्या गालात हसल्या होत्या. त्यांच्या त्या चिंतीत चेहऱ्यावरचे हसू; त्या नाईलाजाने इथे आल्या आहेत हे सहज सांगून गेले होते. ज्या आशाळभूत नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या, त्या नजरेत इथे जागा मिळते कि नाही हा प्रश्न मी सहज वाचू शकत होते. सगळ्या formalities झाल्यावर त्यांना बारा नंबरच्या खोलीत कुसुमबेन बरोबर जागा दिली होती. ह्या नवीन वातावरणात थोड्याशा बिचकत बिचकतच त्यांनी खोलीत प्रवेश केला होता. खरे तर, बायकांना घरातल्या आठवणी विसरून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला पण खूप वेळ लागतो. कित्येक वेळा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा दोलायमान होत असते. परंतु केसरबा बघता-बघता इथल्या वतावरणात खूपच रमून गेल्या होत्या. हे पण कौतुकास्पदच होते.

    स्वयंपाकाची तर त्यांना अतिशय आवड होती. त्या स्वयंपाकखोलीत शिरल्या कि दोन्ही स्वयंपाकवाल्या मावश्या तर त्यांच्या assistant होऊन जायच्या. संध्याकाळची खिचडी तर त्यांच्याच हातची खाण्याची आम्हाला सगळ्यांना सवयच लागून गेली होती.
    ढोकळा, हांडवा ही तर त्यांची खासियत होती.

    साधारणपणे बायका इथे रुळल्या की कधीतरी गप्पा मारताना त्यांची इथे येण्याची कारणे सांगत असतात. सुनांना, मुलांना किंवा ज्यांच्यामुळे त्यांना इथे राहण्याची वेळ आली, त्यांच्याबद्दल चांगले वाईट बोलत असतात. साहजिकच आहे, “वृद्धाश्रम” कितीही चांगला, सुंदर, सर्व सुखसोयींनी उपलब्ध असला तरी तो “घर” तर नसतोच, तो पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेला एक पर्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांनी सोडून दिले आहे ह्याची मनात खंत तर असतेच. आयुष्यभर स्वतः च्या कष्टाने, हिमतीने उभ्या राहिलेल्या माणसाला कोणाच्या तरी मदतीवर जगायला कधीही आवडत नसते. शेवटी वृद्धाश्रमात राहून मरणाची वाट बघत उरलेले आयुष्य जगणे ही उतारवयात नाईलाजाने केलेली adjustment असते. आणि संपुर्ण आयुष्यातला मोठा पराभव असतो.

    ह्या केसरबाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही सुना-मुलांसंबंधी वाईट बोलल्या नाहीत. उलट मुलांचे तर भरभरून कौतुकच करत असत. कोणीतरी एकदा त्यांची थट्टा पण केली होती, “इतकी गुणी माणसे तुमच्याकडे असतांना तुम्हाला इथे का यावे लागले?” दोनच शब्दात त्यांनी उत्तर दिले होते, “माझे तकदीर” आणि परत गालातल्या गालात हसल्या होत्या. मार्मिक उत्तर देणे ही पण त्यांच्या वयाला शोभणारी खासियत होती. त्यांच्या अनेकविध गुणांमुळे आमच्या सगळ्यांच्याच त्या खूप लाडक्या झाल्या होत्या.
    तीन-चार महिन्यापूर्वी ताप आला होता तेंव्हा तापात मुलांची खूप आठवण काढत होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला तसे कळवले होते पण मुलाने “वेळ मिळाला की येतो” असे उत्तर तिले होते. दुर्दैवाने त्याला कधीच वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्या अमेरिकेच्या मुलाने तर थोडे फार पैसे पाठवले आणि “माझ्या आईला चांगल्या डॉक्टरांकरवी चांगले उपचार करा” असा सुंदर सल्ला आम्हाला दिला होता. झाले संपले. हळूहळू त्या तब्येतीने खंगत गेल्या. खंगत जाणाऱ्या तब्येतीबरोबर त्या मुलांची खूप आठवण काढत होत्या. कित्येक वेळा आम्ही त्या मुलांना कळवले. पण दोघांपैकी एकजण सुद्धा आला नाही. राजकोटच्या मुलाने तर फोनवर बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला. त्याने कारण असे दिले की, “ती मला घरी घेऊन जा असा हट्ट करेल आणि मी ते करू शकणार नाही ह्याची मला भीती वाटते.” त्याच्या त्या उत्तराने आम्ही सगळ्या बायका फारच चिडलो होतो.

    शेवटच्या चार दिवस त्या कोमात होत्या. अगदी शेवटी थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरच्या असिस्टंटलाच आपला मुलगा समजून त्याला हाक मारल्या होत्या आणि त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला होता व पुढच्या एका क्षणात प्राण सोडला होता. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच राहिलो होतो.

    आई गेल्यावर मुलाला फोन केला. राजकोट-गांधीनगर चार तासाचा रस्ता होता. पण मुलाने येण्यासाठी साफ नकार दिला. आम्ही त्याला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रडवेल्या आवाजात, “मला लाज वाटते, मी नाही येऊ शकत.” असे सांगून फोन बंद करून टाकला.

    खूप विचाराअंती अंत्यविधी उरकून टाकावा असा निर्णय घेतला. प्रत्येक बाई त्या मुलांना दोष देत होती. ‘केसरबा’ स्वर्गवासी झाल्या ह्याचे दुःख तर प्रत्येकाला होतेच पण मुलगा इतका वाईट वागू शकतो हे बघण्याचे दुःख जास्त होते. अनेक सेवाभावी संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या होत्या. पण एका सेवाभावी संस्थेने असा निर्णय घेतला की दोन दिवस त्यांना Cold-room मध्ये ठेवायचे आणि तिच्या मुलाला पकडून घेऊन यायचे आणि त्याच्याच करवी अग्नीदाह द्यायचा. कारण शेवटपर्यंत त्या बाईंचा जीव त्या मुलात अडकलेला होता.

    दुसऱ्याच दिवशी त्या संस्थेतील मंडळींनी राजकोटच्या लोकांबरोबर co-ordinate केले व त्या मुलाला समजावून घेऊन आले. त्याच्याबरोबर त्याचा दहा वर्षाचा मुलगा पण होता. आल्यापासून तो अगदी ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला खूपच वाईट वाटले आहे ते जाणवत होते.

    आम्ही सगळेच त्याच्यावर खूप चिडलो होतो. ज्याच्या तोंडात जे येईल ते त्याला बोलत होते. त्याने एक नाही की दोन नाही गुपचूप सगळे ऐकून घेतले

    अंत्यविधीनंतर आश्रमाच्या काही formalities पूर्ण करण्यासाठी तो आश्रमात आला होता, त्या वेळेस देखील मी त्याला अनेक प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण तो नुसताच रडत होता. काहीच बोलत नव्हता. न राहवून कुसुमबेन बोलून गेल्याच, “आता रडायचे नाटक कशाला करतोस”, दुसरी एक बाई म्हणाली, “असली मुले देवाने दिली त्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तरी बरे झाले असते”.

    मधुबेन तर त्याच्या अंगावर जवळजवळ ओरडल्याच, “ह्या असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा बिचारीच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली असती तरी बरे झाले असते, निदान मायेने आईला भेटली तरी असती. जीव सोडताना तिच्याजवळ बसली तरी असती.” आणि रडायलाच लागल्या.

    आता मात्र इतका वेळ गुपचूप ऐकून घेणाऱ्या त्या मुलाने शांतपणे डोळे पुसले आणि म्हणाला, “मावशी आता पुरे करा, कबूल आहे मी आईला ‘वृद्धाश्रमात’ पाठवण्याचे खूप मोठे पाप केले आहे. पण हे करण्यासाठी मला प्रवृत्त करण्यात कोणाच्या तरी मुलीचाच खूप मोठा वाटा आहे. हे विसरू नका. आणि तुम्हाला इथे राहावे लागते आहे त्याच्यासाठी पण कोणाची तरी मुलगीच जबाबदार असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे”.
    केसारबाचाच मुलगा तो, त्यांच्याच सारखे थोडक्या शब्दात त्याने पूर्ण उत्तर दिले होते.

    त्याच्या उत्तराने आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. पण असे जाणवले की प्रत्येक मुलीने थोडा समजूतदारपणा दाखवला तर कोणाच्याच आईला वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ येणार नाही.

    त्या रिकाम्या खोलीकडे बघताना सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहिला. रात्री पण त्या मुलाचे शब्द कानाच्या पडद्यावर आदळत होते आणि झोप आली नव्हती.

    केवढे ‘विदारक सत्य’ तो बोलून गेला होता. खरोखरीच देवाने घडवलेली ही प्रेमळ, कोमल स्त्री इतकी भयंकर निष्ठुर असते का?...........

    सौ वैजयंती गुप्ते
    (9638393779)

  • नेपाळी मित्राचा सहवास

    त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.

    बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.

    कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.

    तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, बीड

  • कोकणात विमान भरारी

    कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते.