(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • लोणावळ्याजवळचा कोरीगड

    गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा; म्हणूनच पावसाळा स्थिरावला की, एखाद्या वारी वेळ काढून कोरीगडची वाट धरावी. लोणावळय़ाच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर हा कोरीगड. ‘सह्य़ाद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, कोरी हे कोळय़ांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे. लोणावळय़ापासून या कोरीगडापर्यंत अंतर आहे साधारण वीस किलोमीटर. याशिवाय मुळशी रस्त्यावरील माले गावातूनही एक रस्ता घुसळखांबमार्गे कोरीगडकडे जातो. पण या दोन्ही वाटांवरून एका दिवसात ही भ्रमंती करायची असेल तर स्वतचे वाहन असणे सोयीचे. अन्यथा लोणावळय़ातून सुटणारी दुपारी १२ किंवा सायंकाळी पाचची भांबुर्डे एस.टी. पकडायची आणि आंबवणे गावातील महादेवाच्या मंदिरात मुक्काम ठोकत गडदर्शन आटोपायचे.

    असो, तर या आंबवणेत आलो की, या गावातूनच एक वाट तीन हजार फूट उंचीच्या या गडावर जाते. पण यापेक्षा एक सोपी वाट आंबवणे अलीकडच्या शहापूरमधून गडाकडे निघते. हे शहापूर म्हणजे गडाची एकेकाळची पेठ. यामुळे गावचा उल्लेख पेठ शहापूर असाही होतो आणि यामुळेच कोरीगडला कुवारीगड, कोराईगडच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात. तर हे शहापूर ओलांडले की, एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. या दरवाजाअलीकडेच काही प्राचीन खोदीव लेण्या दिसतात. यातीलच एका लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजालाही त्याची ओळख मिळाली - गणेश दरवाजा! हा गणेश दरवाजा ओलांडून आत गेलो की, उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. यातील बलदंड तटावरूनच गडप्रदक्षिणा सुरू करावी. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! पण आपण पावसाळय़ात आलो तर या वेळेची हिरवाई या मोजक्याच निर्जीव अवशेषांनाही जिवंत करते. यातही सर्वात जास्त लक्ष जाते ते गडावरील दोन मोठय़ा तळय़ांकडे. पश्चिम तटाला खेटून असलेली ही तळी पावसाळय़ात काठोकाठ भरतात. अगदी कधीकधी वाऱ्याच्या हेलकाव्यावर हे पाणी बाहेर पडू पाहते. अशा वेळी या कठडय़ावर यावे आणि आपल्याच हलणाऱ्या प्रतिमा पाहत तासन् तास बसून राहावे. या तळय़ाच्याच पाश्र्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. भव्य आणि तेजस्वी मूर्ती. असे म्हणतात की, शेवटच्या मराठे-इंग्रज लढतीत जेव्हा हा गड पडला तेव्हा इंग्रजांनी या देवीचे दागिने उतरवले आणि ते मुंबईच्या मुंबादेवीला घातले. पुढे काळाच्या ओघात देवीचे छतही कोसळले. यामुळे एरवी कधी आलो की, उघडय़ावरील ही मूर्ती आणि तिची ही कथा आठवली की हळहळ व्यक्त होते. पण तेच पावसाळय़ात आलो की, भोवतालच्या हिरवाईतून असंख्य रानफुले उमलतात आणि जणू हे सारे दु:ख बाजूला सारत कोराईदेवी नवरात्रासाठी पुन्हा सालंकृत होते.

    गडाच्या पोटातील काही खोदीव लेण्यांकडे पाहून हा गड प्राचीन असावा असे वाटते. पुढे तो कोळय़ांच्या ताब्यात असताना १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. यानंतर १६४६ मध्ये अन्य गडांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला आणि अखेर १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात तीन दिवसांच्या प्रखर लढय़ानंतर गडावर युनियन जॅक चढला. इतिहास सांगणाऱ्या या काही सन-सनावळय़ा आणि घटना कोरीगडाबाबत मिळतात. इतिहासाचे हे दाखले देणाऱ्या सहा तोफा आजही गडावर दिसतात. पैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तिच्या हिशेबाने उभे राहावे आणि उगाच समोरच्या मावळाकडे उरी अभिमान घेत पाहावे. गडावरील हे विशेष पाहत असतानाच आपल्या नजरा आजूबाजूलाही वळतात. यामागे दऱ्याखोऱ्यांचा मावळ हे कारण तर असतेच, पण त्यातही पावसाळा हे खास निमित्त असते. एरवी लक्षातही न येणारे डोंगर पाऊस पिऊन हिरवे-ओले झाले की, उगीचच ओळखीचे वाटतात. मग त्यातही थोडेसे धुके हटले की, दूरदूरचे कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, मोरगड, ढाक, राजमाची ही दुर्गमंडळी ओळखी देऊ लागतात. तळातील भातखाचरांची सर्वच गावे एकसारखी वाटतात. मुळशी जलाशय या साऱ्या देखाव्याला एक निळी किनार देतो आणि मग हे सारे पाहता पाहता कोरीगडची मुशाफिरी आकार घेऊ लागते.

    पावसाळ्या मध्ये हा गड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची भटकंती करीत असताना समोरील गावामधून वारकरी सप्ताहातील कीर्तने ऐकायला येत होती. या मधुर गाण्याच्या तालावर गड कधी फिरून झाला हे कळेच नाही. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करीत होता. खरे तर या साऱ्याचा मोह ‘त्यांनाही’ झाला, त्यातूनच श्रीमंतांचा सहारा आता या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र उगाचच अवघडून उभा राहिल्यासारखा वाटतो. चालायचेच, काळाचा महिमा! पण या ‘काळा’ला एकच विनंती; गावे, शेती, जमिनी गेल्या; आता आमचा गड तरी आहे असाच सोळाव्या शतकातील राहू द्यावा! राजांच्या या कोरीगडालाही त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!

    सौजन्य : संतोष घारे यांनी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहे.

  • खेळावेसे वाटले म्हणून

    पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास.

  • बाल संन्यासी

    ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे....

  • ब्रिंदाबनी सारंग

    वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, "मध्यम","पंचम" स्वरांच्या जोडीने "कोमल निषाद" कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण करणे अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात.

    वास्तविक, हा राग म्हणजे दुपारच्या काहीलीवर "उतारा" असा उल्लेख, बऱ्याच ग्रंथातून वाचायला मिळतो. "औडव/औडव" जातीचा हा राग, फार विलक्षण किमया करतो. "गंधार" आणि "धैवत" वर्जित सूर असले तरी, अवरोही स्वरांतील "कोमल निषाद" इथे भलतीच करामत करून जातो. "मध्यम" आणि "पंचम" हे या रागाचे वादी - संवादी स्वर असले तरी, या रागात काही वेळा "तीव्र निषाद" आणि "कोमल निषाद" अशा दोन्ही स्वरांचा वापर केला जातो, पण खरी ओळख होते ती, "मध्यम" आणि "कोमल निषाद" या स्वरांनी. वर उल्लेखलेली दुपारची दाहकता, जणू या दोन स्वरांच्या सहाय्याने शीतल करण्याची जादू करतात. काफी थाटातील या रागाची "मींड" ही मध्यम, पंचम आणि कोमल निषाद स्वरांतून सिद्ध होते. या रागाची आणखी एक गंमत सांगता येते. या रागाचे स्वर जर का नेमकेपणी घेतले नाही तर, हा राग नकळत "मेघ" रागात मिसळून जाऊ शकतो, इतके या दोन रागांत साम्य आहे. या रागात काहीवेळा दोन्ही निषाद घेतले जात म्हणजे कोमल आणि तीव्र निषाद घेतले जातात पण अर्थात, याला एक प्रयोग, इतपतच अर्थ घेता येईल. कोमल निषाद, हेच खरे या रागाचे स्थान!!
    उस्ताद रशीद खान, हे नाव आता शास्त्रीय संगीताच्या रसिकांना परिचित झालेले आहे. अत्यंत मुलायम आवाज, ताना घेताना देखील शक्यतो खंडित स्वरूपाच्या घ्यायच्या, ज्या योगे प्रत्येक सुराची "ओळख" रसिकांना घेता यावी. मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात शक्यतो गायन सादर करण्याची प्रवृत्ती. सरगमचा अतिशय सुंदर उपयोग करणे, इत्यादी अनेक वैशिष्ट्ये, या गायकाची सांगता येतील. गायन ऐकताना काहीवेळा उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायनाचा प्रभाव जाणवतो, विशेषत: लयकारी ऐकताना, हा प्रभाव जाणवतो. "रामपूर साहसवान" घराण्याचा जरी गायक असला तरी इतर सगळ्या घराणेदार गायकीतून, चांगले उचलून, स्वत:च्या गायकीत मिसळून, स्वत:ची अशी वेगळीच गायकी प्रस्थापित केली. काहीवेळा खर्जातील सूर लावताना, पंडित भीमसेन जोशींचा देखील ठसा दिसतो. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, उस्ताद रशीद खान यांनी, सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आपल्या गायनात सामावून घेतली आहेत.
    " ओ रे दिन आज" या बंदिशीत, विशेषत: आलापी ऐकताना, आपण वरती जी "मिंड" मांडली आहे, तिचा अनुभव घेता येतो. खरतर, मला बरेचवेळा " रागदारी गायनातील भावगीत" असे म्हणायचा मोह होतो इतके भावपूर्ण गायन असते. कुठेही स्वर लावण्याचा खटाटोप नाही की कुठे अडखळणे नाही. ज्या सहजतेने, कोमल स्वर लावले जातात त्याच सहजतेने, शुध्द स्वर आणि तीव्र स्वर घेतले जातात आणि वरच्या पट्टीत गाताना, कुठेही स्वर "ताणला" आहे, असे न होता, स्वरांचे "मुलायमपण" कायम राखले जाते. ऐकताना, काहीवेळा "कोमल गंधार" स्वराचा भास होतो पण तो प्रभाव आहे "मध्यम" स्वराचा!! या रागात "गंधार" स्वराला अजिबात स्थान नाही.
    संगीतकार हेमंत कुमार, यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्याअर्थाने स्थिरावायची संधी प्राप्त झाली, ती "नागिन" चित्रपटाच्या अभूतपूर्व लोकप्रियतेने. या चित्रपटातील सगळी गाणी अप्रतिम आहेत. याच चित्रपटात, या रागावर आधारित अतिशय सुश्राव्य असे गाणे आहे - "जादुगार सैय्या" आणि हे गाणे ब्रिंदाबनी रागाची नीटसपणे ओळख करून देते.
    जादुगार सैंय्या, छोडो मोरी बैय्यां;
    हो गयी आधी रात, अब घर जाने दो".
    मेंडोलीनच्या सुराने सुरु होणारे गाणे, झटक्यात जलद लयीत जाते. ताल, पारंपारिक केरवा आहे. यात लय जलद असली तरी इतक्या अप्रतिम हरकती आहेत की, प्रत्येक हरकत अत्यंत बारकाईने न्याहाळावी. तालाच्या प्रत्येक मात्रेगणिक हरकत आहे आणि त्यामुळे चालीला एक सुंदर निमुळते "टोक" येते. प्रणयी गाणे आहे आणि चाल तशी साधी असली असली तरी मनाची लगेच पकड घेते. अर्थात, उडत्या तालामुळे हे शक्य होते. साधी चाल असून देखील, त्यात "गायकीला" कसा वाव मिळतो, याचे हे गाणे म्हणजे नमुना आहे. या गाण्यावर तालाचा इतका प्रभाव आहे की, ताल बाजूला ठेऊन, केवळ हरकती ऐकायच्या तर त्याला फार प्रयास पडतो.
    मघाशी मी लिहिताना, एक वाक्य लिहिले आहे, या रागाचे "मेघ" रागाशी फार जवळचे नाते आहे आणि जर का स्वरांची ठेवण नेमकी ठेवली नाही तर रागांची "गल्लत" होऊ शकते. खालील गाणे, माझ्या या म्हणण्याला "दाखला" म्हणून देता येईल. "सावन आये, या ना आये" हे, "दिला दिया दर्द लिया" या चित्रपटातील गाणे, आपण ऐकुया. गाण्याचे शब्द तर स्पष्टपणे, " मेघ" रागाशी जवळीक दाखवतात पण तरीही, पहिला अंतरा जिथे संपतो तिथे सतारीचे सूर आहेत, तिथे "ब्रिंदाबनी सारंग" दिसतो. खरतर, या रागाची उत्तम ओळख या गाण्यातून आपल्याला होते.
    "सावन आये, या ना आये;
    जिया जब झुमे सावन है".
    या गाण्यात चक्क दोन ताल आहेत. १] केरवा आणि २] त्रिताल. गाण्याची सुरवात त्रितालाने होते पण पुढे त्याच लयीत केरवा ताल मिसळतो. फारच सुंदर प्रकार आहे. या गाण्यात पहिला अंतर संपत असताना, "नि सा रे म प" ही जी सरगम आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. रागदारी संगीताची आवड आणि ओळख करून घेण्यासाठी हे गाणे एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगता येईल.
    मंगेश पाडगावकरांनी अनेक चिरस्मरणीय भावगीते लिहिली आहेत. प्रस्तुत गीत हे त्यातील अजरामर स्वरूपाचे गीत आहे. वास्तविक, या कवितेचा ढाचा थोडासा "कथात्म" स्वरूपाचा आहे, क्वचित गद्याकडे झुकणारा आहे परंतु तरीही संगीतकार यशवंत देवांनी चाल लावताना, चाल कुठेही रेंगाळणार नाही आणि प्रवाहित्व कायम राहील, इकडे नेमके लक्ष दिले आहे. सुगम संगीतात, चाल कुठेही रेंगाळणार नाही, याकडे बारकाईने भान ठेवावे लागते. "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" या गीतातून, समर्थपणे, हा राग दिसून येतो.
    "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,
    अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी".
    अरुण दाते यांनी, हे इतके मोठे गाणे असून देखील, अतिशय सुंदर गायले आहे. गाण्याच्या सुरवातीला वाजलेल्या सनईमधून, "ब्रिंदाबनी सारंग" रागाची झलक मिळते. खरतर, हे गाणे म्हणजे आत्ममग्न कथासूत्र आहे. अर्थात, याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दानुरूप बदलेली चाल. लय तशीच कायम ठेऊन, सुरांत किंचित बदल करून, आवश्यक तो "भाव" सुरांतून व्यक्त करायचा. हा खेळ इथे फारच बहारीने साधला आहे. त्यादृष्टीने या गाण्यात वाद्यमेळाचे फारसे प्रयोग नाहीत आणि प्रत्येक अंतऱ्यात जवळपास तशीच " धून"कायम ठेवली आहे.
    "रुदाली" चित्रपटात या रागाची नव्याने ओळख दाखवणारे एक नितांत रमणीय "झुठी मुठी मितवा" असे गाणे आहे. संगीतकार भूपेन हजारिका यांची चाल असून, लताबाईंनी हे गाणे गायले आहे.
    "झुठी मुठी मितवा आवन बोले,
    भादो बोले कभी सावन बोले;
    बादलों पे चलने को चाहू पिया,
    आओ मेरा झुलना झुलाओ पिया
    झुठी मुठी मितवा आवन बोले."
    कवी गुलजार यांची शब्दकळा देखील चित्रदर्शी आहे. चित्रपटातील प्रसंग आणि वातावरण, याचे नेमके चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून केले आहे. या गाण्यात देखील आपल्याला "मेघ" रागाचा भास होण्याची शक्यता आहे आणि तसे बारकाईने ऐकले तर तसाच भास होतो पण गाण्याची काही "वळणे" ही "ब्रिंदाबनी सारंग" राग दर्शवतात.
    मराठी नाट्यगीतांत अभिमानाने स्थान मिळवणारे गीत - "साद देतो हिमशिखरे" हे गाणे या रागाची अशीच फसवी ओळख करून देतात. मराठी संगीत नाटकांत, "संगीत मत्स्यगंधा" या नाटकाचे नाव चिरस्मरणीय ठरले आहे आणि त्यामागे, पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची कामगिरी अतुलनीय आहे,. त्यांनी, नाट्यगीतांचा ढाचा(च) बदलून त्यात अधिक लालित्य आणले आणि भावगीताच्या जवळ आणून सोडले. अर्थात, असे करताना त्यांनी, रचनेत विस्ताराच्या असंख्य शक्यता निर्माण करून ठेवल्या असल्याने, गाताना "गायकी" दाखवण्याचा अवसर गायकांना नेहमी मिळतो.
    "साद देती हिमशिखरे, शुभ्र पर्वताची;
    क्रमीन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची".
    आता या गाण्याकडे कविता म्हणून वेगळ्या बाजूने बघितले तर, शब्दकळा पूर्वीच्या गाण्यांपेक्षा काहीशी निराळी आहे. मुख्य म्हणजे अर्थ आकळून घेताना फारसा प्रयास पडत नाही. हाच आशयाचा गाभा ठेऊन, अभिषेकी बुवांनी गाण्याच्या चाली बांधल्या आणि मराठी संगीत रणभूमीवर नवे मन्वंतर घडले. रामदास कामत यांनी हे गाणे गायले असून, गायनाची धाटणी देखील अतिशय सहज, सुगम अशी ठेवली आहे. गाण्यात तानबाजी, हरकती आहेत पण त्यांचा भरमार नसून, त्यात एक प्रकारचा लडिवाळपणा आहे.
    "संथ वाहते कृष्णामाई" या मराठी चित्रपटाचे शीर्षक गीत देखील याच रागाची अनोखी ओळख करून देते. संगीतकार दत्ता डावजेकर यांनी चाल बांधताना, वाद्यमेळ आणि त्यातील प्रत्येक वाद्याचा "गुणधर्म" ओळखून संगीत रचना केली आहे. माडगूळकरांची कविता तर अलौकिक आहेच पण त्याला सुरांची असामान्य जोड मिळाल्याने, या गाण्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे.
    " संथ वाहते कृष्णामाई,
    तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तुजला नाही".
    आता, कवितेतील शब्द संख्या बघा म्हणजे मग संगीतकाराच्या चालीचे मर्म नेमके ओळखता येईल. एका सलग "मीटर" मध्ये शब्द नाहीत पण तरीही गाण्याची चाल(च) अशा प्रकारे बांधली आहे की त्यातील "गेयता" अचूकपणे ध्यानात येईल. गाण्याचा "ठेका" देखील किती विलक्षण आहे. गाणे अतिशय संथ लयीत आहे आणि तोच या चालीचा "स्वभाव" आहे. स्वभावानुसार तालाचे महत्व ठेवले आहे आणि गाण्याच्या पार्श्वभागी बहुतांशी बासरी आणि व्हायोलीन वाद्यांचे स्वर तरळत ठेवले आहेत. परिणाम असा घडतो, गाण्याची चाल आपल्या मनात कायमचे स्थान मिळवते.
    - अनिल गोविलकर

  • राशी व त्यांचे स्वभाव – मेष

    राशी :- मेष
    स्वामी :- मंगळ
    देवता :- भगवान विष्णु
    जप मंत्र :- ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः
    उपास्यदेव :- श्री गणेश
    रत्न :- पोवळे

    जन्माक्षर :- चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ल लं मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्या, धीट, महत्वाकांक्षी, कोणत्याही
    समस्येला बुद्धीने तोंड देणार्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष,कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. कालपुरूषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्याचा पक्षाघात,नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त
    यशस्वी होतात.

  • नशायात्रा – प्रस्तावना आणि ओळख

    कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा प्रवास या सदरात केलेले आहे..

  • किल्ले कल्याणगड

    सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे

  • भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

    आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली.

  • बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग १

    २०१८ च्या डिसेंबर महिन्यात आमच्या गुड्डीचा (विशाखा) विवाह झाला. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार झाला होता. सन-२०१८ साल लग्नाच्या गडबडीत कधी सरलं हे कळायच्या आत सन-२०१९ साल सुरू झालं.

  • विकल भैरवी

    "झिमझिम पाऊस,आभाळ भरून.

    शिरशिर गारवा, वाराभरुन.
    कातरवेळा, अंधारभरून.
    मिणमिण दिवे, सांवल्याभरून.
    मुकें घर. दालन दालन.
    मुकें तन. मुकें मन.
    मुकें काहूर. इथून-तिथून.
    मुका ताण पदर भरून.
    कवियत्री इंदिरा संत यांच्या "पदर भरून" या कवितेच्या या ओळी, भैरवी रागीणीच्या भावछटा नेमक्या दर्शवून देतात. या रागिणीचे सूर असेच आहेत, पहिल्या सुरांपासून विरहाची तसेच विकल भावनेची आर्तता दर्शवतात. मनात एकप्रकारची पोकळी निर्माण करतात आणि रितेपण दाखवतात. अर्थात हे झाले भैरवी रागिणीचे एक भावविश्व. भारतीय रागदारी संगीत हे बहुतेकवेळा भावनांच्या वेगवेगळ्या छटा दर्शवून रसिकांना चकित करण्याची किमया करते आणि याला ही रागिणी देखील अपवाद नाही इथे ज्या प्रमाणात विरही छ्टा आहेत, त्याचबरोबर भजनातून येणारा समर्पित भाव देखील विपुल प्रमाणात आढळतो.
    उस्ताद अली अकबर खान साहेब म्हणजे सरोद वादनातील अपूर्व नाव. द्रुत लय चालू असताना, मध्येच खंडित तान घेऊन, त्यातून "मिंड" काढायचे त्यांचे कौशल्य केवळ असामान्य असेच म्हणायला हवे. वादन करताना, प्रत्येक सूर आणि त्याचे सादरीकारण, यात सतत वैविध्य आणण्याचे त्यांचे कसब लाजवाब म्हणायला लागेल. वास्तविक सरोद म्हणजे तंतुवाद्य, तेंव्हा त्यातून निघणारे स्वर हे नेहमीच "तुटक" असणार पण तरीही तारेची खेच आणि तारेवर दाब देऊन, निर्मिलेली रचना रसिकांना नेहमीच चकित करून सोडते. भैरवी सारखी अत्यंत लवचिक रागिणी सादर करताना, "सा ग रे ग म" ही स्वरसंहती ऐकण्यासारखी आहे. "गंधार" आणि "मध्यम" घेताना, ज्याप्रकारे "षडज" स्वरावर "उतरतात" हे ऐकणे अतिशय विलोभनीय आहे.यात आणखी एक मजेशीर बाब आढळते. सरोदवर भैरवीचे सूर ऐकायला मिळत असताना, एकदम "सिंध भैरवी"चे सूर देखील ऐकायला मिळतात. वास्तविक, "सिंध भैरवी" ही रागिणी "भैरवी" कुटुंबातील सदस्य पण, फरक इतकाच आहे, "सिंध भैरवी" ही लोकसंगीताच्या आधारे सादर केली जात असल्याने, त्यात सुरांना बरेच स्वातंत्र्य मिळते आणि रचनेची शोभा अधिक खुलून येते.
    माडगूळकरानी "गीत रामायण" लिहून, गेयताबद्ध कवितेचा एक मानदंड निर्माण केला असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. गीत रामायणातील कुठलेही गीत, ही आधी अप्रतिम कविता आहे, याचे आपल्याला भान येऊ शकते. गाण्यासाठी लेखन करताना, आपली शैली चित्रदर्शी असावी म्हणजे सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर विनासायास येऊ शकतो आणि ही अट, गीत रामायणात पूर्णांशाने झालेली दिसते. भारतीय समाजाच्या मानसिकतेचे खरे प्रतिबिंब या काव्यातून दिसून येते. या गीत रामायणाचा शेवट करताना, माडगूळकरांनी,
    रघुराजाच्या नगरी जाऊन,
    गा बाळांनो, श्रीरामायण.
    अशा ओळीने केला आहे. प्रसंग असा - रामाचे चरित्र सांगून पूर्ण झाले असताना, आता चरित्राची "सांगता" करण्यासाठी योजलेले हे गीत. एका अर्थाने अतिशय प्रभावी समारोप. एक मोठा कालखंड संपल्याची इतिश्री पण त्याचबरोबर योजलेले काम यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद, हे दोन्ही भाव या गाण्यातून व्यक्त होतात.
    अर्थात, सुधीर फडक्यांनी अत्यंत समयोचित अशी भैरवी रागिणी इथे योजलेली आहे. "रघुराजाच्या नगरी जाऊन" या पहिल्याच ओळीत आपल्याला भैरवी दिसते आणि पुढे संपूर्ण रचना याच रागीणीच्या छायेत वावरते. संगीत रचना अतिशय द्रुत लयीत आहे आणि याचे मुख्य कारण, एका भव्य समारंभाचा अंत देखील तितक्याच सहजतेने आणि कायमस्वरूपी रहावा, हीच इच्छा. इथे देखील सुधीर फडक्यांचे अतिशय विशुद्ध, भावपूर्ण गायन, हेच वैशिष्ट्य आढळते. गायनात स्पष्टोच्चार असावेत पण त्याच जोडीने भावपूर्ण गायनाला कुठेही "ढळ" लागता कामा नये, अशी दुहेरी कसरत करायची. वरती ज्या प्रमाणे, मी माडगूळकरांचा मानदंडाबद्दल लिहिले, त्याच शब्दात सुधीर फडक्यांच्या गायनाबाबत लिहावे लागेल.
    मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, भैरवीत भजनी अंग देखील सुंदररीत्या रंग भरते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ज्ञानेश्वरांची "अजि सोनियाचा दिनू" ही रचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानेश्वरी स्वरबद्ध केली त्यात, ही रचना आहे. मुळात, ज्ञानेश्वरांची रचना म्हणजे प्रासादिक रचनेचा आदिनमुना!! अत्यंत लयबद्ध शब्दकळा, हे तर वैशिष्ट्य आहेच पण त्याला जोडून, आशयाची अभिवृत्ती आपला वाचिक अनुभव श्रीमंत करणारी. काहीवेळेस, रचना काहीशी गुढार्थात शिरते परंतु संपूर्ण रचना वाचायला घेतल्यावर आशयघनता संगीतकाराला आव्हान देणारी.
    अजि सोनियाचा दिनु,
    वर्षे अमृताचा घनु.
    स्वररचना करताना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी फक्त "एकतारी" आणि "चिपळ्या" यांचाच वापर केला. त्यामुळे, रचनेतील ज्ञानेश्वरांची शब्दकळा आपल्याला, गाण्याच्या स्वरुपात ऐकताना देखील स्वच्छपणे समजून घेता येते. आता एकूणच शब्दकळा बघितली तर, आज ईश्वराचा साक्षात्कार शाल आहे आणि आता आयुष्यात आणखी काही बघायचे, अनुभवायचे राहिले नाही, या विरक्तीची जाणीव लखलखित दिसते आणि मग अशा आशयाला भैरवीचे सूर आत्ममग्न स्वरूप नेहमीच प्रदान करतात. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, भैरवीची आळवणी सुरु आहे आणि ती संपूर्ण गाणे भारून टाकणारी आहे.
    मराठी संगीत नाटक "संन्यस्त खड्ग" मध्ये अशीच एक असामान्य रचना, भैरवी रागाचे अनोखे रूप दाखवणारी आहे. नाटककार आणि कवी सावरकरांनी इथे दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. नाटक सरळ, सरळ ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या विरोधात लिहिलेले आहे, त्यामुळे बरेचसे प्रचारकी झालेले आहे. असो, तो भाग वेगळा. नाट्यगीताच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव घडत असते आणि ती म्हणजे, गायक कलाकाराच्या मगदुरानुसार संगीत रचनेत बदल घडू शकतात, क्वचित प्रसंगी चाल देखील बदलली जाते. "शत जन्म शोधिताना" ही मुळातली कविता, आधी मास्टर दीनानाथांनी प्रसिद्ध केली. नंतर मग वसंतराव देशपांड्यांनी त्यात आणखी वेगळे रंग भरले आणि ही रचना अधिक श्रीमंत केली. कविता म्हणून देखील ही रचना अतिशय समृद्ध आणि आशयाधिष्ठीत आहे. पहिल्या वाचनात आकळून घेणे, सगळ्यांना जमेलच असे नाही. सावरकर, कवी म्हणून आपली ओळख नव्याने आणि फार वरच्या दर्जाने करून देतात.
    शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या;
    शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या.
    संगीतरचना म्हणून देखील हे गाणे फारच सुंदर आहे. मध्य लयीत सुरु होते आणि बघत, बघत द्रुत लयीत शिरते. मास्टर दीनानाथ काय किंवा वसंतराव देशपांडे काय, गायनाचा आवाका प्रचंड आणि ऐकणाऱ्याला दिपवून टाकणारा, अस्वस्थ करणारा. भैरवी रागिणीचा विचार करता, या रचनेत भैरवी सरळ समोरून आपल्याला भेटत नाही. एकूणच सगळी रचना एकदम अंगावर येत असल्याने, आपल्याला शांतपणाने ऐकण्याची चैन घेता येत नाही आणि त्यामुळे भैरवी नेमकी कुठे आहे, याचा संभ्रम पडतो.अर्थात, जरा शांतपणे आस्वाद घेण्याचे ठरवले तर गाण्यातील भैरवीचे अंग समजून घेता येईल.
    मुळातल्या रागदारी गायिका तरीही सुगम संगीतात देखील सहज विहार करणाऱ्या गायिका म्हणून किशोरी आमोणकरांचे नाव घ्यावेच लागेल. गळ्यावर "जयपुर" घराण्याचा ठसा तरी देखील रागदारी गायनात इतर घराण्यातील सौंदर्यस्थळांचा सहज आढळ!! एकूणच रागदारी गायन म्हणजे बुद्धीगम्य गायन, हा विचार ठामपणे मांडणारी गायिका. भैरवी रागातील काही अप्रतिम भजनांपैकी "अवघा रंग एक झाला" या भजनाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अर्थात जरी भजन गायन असले तरी, गळ्यावरील रागदारी गायनाचा ठसा पुसणे अशक्य आणि हे तर सगळ्याच शास्त्रीय गायन करणाऱ्या कलाकारांबाबत म्हणता येते. सततच्या रागदारी गायनाच्या रियाजाने, कलाकाराचा गळा "जड" होतो आणि त्यामुळे स्वरांची फेक देखील त्याच अनुषंगाने होत असल्याने, सुगम संगीतात जो सहजपणा आवश्यक असतो तिथे बरेचवेळा हे कलाकार अपुरे पडतात.
    अवघा रंग एक झाला,
    रंगी रंगला श्रीरंग.
    या रचनेत, भैरवी रागाचे सूचन पहिल्या झटक्यात आपल्या लक्षात येते रचना सरळ, सरळ भजनी अंगाने विस्तारलेली आहे. " अवघा रंग एक झाला" या ओळीत, "झाला" या शब्दावर भैरवीचे "तोंड" दिसते. भजनी ठेका आहे. अर्थात, मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, गाण्यातील हरकती, ताना इत्यादींवर रागदारी गायनाचा पगडा दिसतो. अर्थात, इथे आणखी वेगळा मुद्दा मांडता येतो. ज्या हिशेबात गझल गायन देखील "भावगीत" अंगाने तसेच "मैफिली" अंगाने, दोन्ही प्रकारे सादर करता येते तर मग भजन देखील त्याच वळणाने सादर होऊ नये? अर्थात कलाकाराला सुरांची नेमकी जाण असल्याने, एकूणच सगळी रचना समृद्ध होते, हे निश्चित.
    मराठी चित्रपट "एक गाव,बारा भानगडी" - या चित्रपटात, सुमन कल्याणपूर यांनी अतिशय सुश्राव्य असे गाणे गायले आहे. "कशी गौळण राधा बावरली, बावरली". संगीतकार राम कदमांची चाल आहे. संगीतकार राम कदम, यांच्या चालीवर मराठी लोकसंगीताचा नेहमीच प्रभाव जाणवतो. इथे तर चित्रपटातील नायिका तमाशामधील असल्याने, खास मराठी लोकसंगीताचा ठसा उमटणे साहजिक ठरते. कवियत्री शांताबाई शेळक्यांची शब्दरचना आहे. शांताबाई मुळातल्या भावगीत लेखिका, याचा परिणाम या गाण्यात देखील दिसून यतो. जसे वरती माडगूळकरांच्या रचनेबद्दल लिहिले आहे, तेच शब्द इथे शांताबाईंच्या कवितेबद्दल लिहिता येतील. सहज, सोप्या शब्दातील रचना परंतु आशयसंपन्न. त्यामुळे संगीतकाराला चाल बांधायला हुरूप देणारी.
    कशी गौळण राधा बावरली, बावरली.
    जलभरणा यमुना गेली, शीळ खुणेची अवचित आली;
    रोमांचित काया थरथरली, कशी गौळण राधा बावरली.
    सुमन कल्याणपूर यांच्या गायकीशी किंचित फटकून वागणारी ही रचना आहे पण, मुळात चालीत गायकी अंग असल्याने, गायनात तितकाच उठाव मिळतो. गाण्यात बारीक हरकती आहेत पण त्या हरकती सहजगतीने गळ्यावर चढणाऱ्या नाहीत. गाण्यातील "गौळण" शब्द या दृष्टीने ऐकावा. किंचित स्वरांत हेलकावा आहे पण सुरांचे जराही ओझे होत नसून, गाण्यातील सौंदर्य वाढवणारे आहे. भैरवी रागिणीचे हे देखील अनोखे तितकेच अप्रतिम विलोभनीय रूप.
    -- अनिल गोविलकर