भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या 18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं.
गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून मानवानं विज्ञानात खूपच प्रगती केली आहे. पुराव्यासहीत, अनेक अध्यात्मिक संकल्पनांचं स्पष्टीकरण विज्ञानानं दिलं आहे. पृथ्वीवरील सजीवांची अुत्क्रांती, गेल्या 3.8 ते 3.5 अब्ज वर्षापासून होते आहे. सजीवांच्या अुत्क्रांतीचा शेवटचा टप्पा म्हणजे, या पृथ्वीवर मानवाचं अवतरण. सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी, बिनशेपटीच्या, दोन पायावर चालणार्या माकडांच्या प्रजातीत (होमो अिरेक्टस) अुत्क्रांती होअून आदीमानव अुदयास आला (होमो सॅपिअेन, सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी) असं शास्त्रज्ञांनी, अुत्खनात सापडलेल्या मानवी अवशेषाच्या आधारे सिध्द केलं आहे.
सुमारे 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी, जेव्हा मानवाला शेती आणि पशुपालनाची विद्या/तंत्र अवगत झालं तेव्हा, समूह, समाज, आणि कुटुंबं निर्माण झाली. पोटभर आहाराची सोय झाली. त्यामुळे मानवाला सभोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करायला आणि त्यापासून बरंच काही शिकायला वेळ मिळाला. मेदूचा विकास झपाट्यानं होअून तो तार्किक दृष्ट्या विचार करू लागला.
पृथ्वीवरील निसर्ग आणि आकाशातील चंद्र, सूर्य आणि तारे वगैरे पाहून त्याच्या मेंदूत पहिला विचार आला तो हा, की या सर्व वास्तव घटकांना कुणीतरी निर्माण केलं असणार आणि तोच या सर्वाचं नियंत्रण करीत आहे. हीच अीश्वराची संकल्पना. दुसरं महत्वाचं निरीक्षण म्हणजे, सर्व सजीव, त्यांच्या अिच्छेनुसार हालचाल करू शकतात. म्हणजे त्यांच्या शरीरात कोणतीतरी शक्ती, प्रेरणा, चेतना असली पाहिजे. ती चेतना शरीरातून निघून गेली की ते शरीर अचेतन होतं, मरतं. ही चेतना म्हणजेच सजीवांच्या शरीरातील आत्मा.
अीश्वर आणि आत्मा या संकल्पनांतूनच अध्यात्म अुदयास आलं. या संकल्पना मानवाच्या मेंदूत, फार फार तर 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी आल्या. पण त्यापूर्वी कोट्यवधी वर्षे, या पृथ्वीवर सजीवांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते.
पृथ्वीच्या आयुष्यकाळातील 5 हजार वर्षे म्हणजे नगण्य काळ आहे. या काळात मानवाची शारीरिक अुत्क्रांती फारशी झाली नाही. त्यामुळे आपले पूर्वज विचारवंत आणि रुशीमुनी यांनी जे अनुभव घेतले तेच आपण आजही घेअू शकतो. त्यांच्या अितकी किंवा त्यांच्याहून जास्त बुध्दीमान व्यक्ती आजही जन्म घेअू शकतात, नव्हे जन्मलेल्याही आहेत. आपली मुलंमुली जेव्हा आणि जशी वयात येतात तशीच त्यांचीही मुलंमुली वयात येत होती. आपण ज्या मार्गानं प्रजनन करतो त्या मार्गानंच त्यांनीही प्रजनन केलं. ज्या मार्गानं आपलं अन्नपचन होतं तसंच त्यांचंही अन्नपचन होत होतं. त्यांच्या शरीरात जे अवयव होते तेच अवयव आजही आपल्या शरीरात त्याच जागी आहेत.
पृथ्वीवर जेथे जेथे मानवसमूह भरभराटीला आले तेथे तेथे त्यांच्या संस्कृती अुदयाला आल्या. मानवसमूहाची प्रगती, पृथ्वीवर, निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या काळी झाली. प्रत्येक संस्कृतीत विचारवंत माणसं जन्मली आणि त्यांनी समाजाच्या भल्यासाठी धर्माचरणं सांगितली. त्या काळची माणसं आपल्यापेक्षा फारशी निराळी नव्हती. आपल्यासारखीच होती. त्या माणसांनीच धर्मग्रंथ लिहीले. जनमानसावर या धर्मग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून त्यांना देवत्व बहाल केलं, त्यातील मानवी व्यक्तींना दैवी गुण चिकटविले, अतिशयोक्तीपूर्ण घटनांचा समावेश केला वगैरे. या सर्वांवर, धर्मभीरू व्यक्तींचा आजही विश्वास आहे.
आता पुन्हा गीतेकडे वळू या. गीतेतील सर्वच अध्यायात तत्वज्ञान सामावलेलं आहे. तरीपण काही महत्वाच्या अध्यायांचा अुल्लेख करावासा वाटतो. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो (अध्याय 2 ). कर्मयोग (अध्याय 3), ध्यानयोग, आत्मसंयम योग (अध्याय 4) विश्वरूप दर्शन योग (अध्याय 11) भक्तियोग, श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा (अध्याय 12),, क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग अर्थात प्रकृती-पुरुष विवेकयोग (अध्यय 13) मोक्षसन्यास योग (अध्याय 18 ) वगैरे.
गीतेवर भाष्ये केलेल्या असामान्य व्यक्ती म्हणजे आद्य शंकराचार्य (ज्ञानमार्ग), ज्ञानेश्वर माअुली (भक्तिमार्ग) लोकमान्य टिळक (गीतारहस्य, कर्ममार्ग) या मानल्या पाहिजेत. त्यांनी केलेल्या भाष्यांमुळे, सामान्य माणसाला, गीतेचं खरेखुरं ज्ञान झालं. प्रा. सोनोपंत दांडेकर यांनी ज्ञानेश्वरीवर, म्हणजे पर्यायानं गीतेवर, भाष्य केलं आहे. ज्ञानेश्वर माअुलींची मराठी आपल्याला कळावी म्हणून प्रा. सोनोपंतांनी आधुनिक मराठीत भाष्य केलं आहे .हरिद्वारचे श्रीस्वामी रामसुखदासजी आणि आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनीही रसाळ भाष्ये केली आहेत. ही सर्व भाष्ये अध्यात्माच्या दृष्टीकोनातून केली आहेत, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून नव्हे.
गीतेचं तत्वज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, असं आढळतं की, त्यात पुरेपूर विज्ञान सामावलेलं आहे. पण ते अध्यात्माच्या आवरणात झाकलं गेलं आहे. या आवरणाच्या आत डोकावलं तरच गीतेतील विज्ञान कळू शकेल. तोच प्रमाणिक प्रयत्न मी करणार आहे.
रुशीमुनी, महान तत्त्ववेत्ते आणि महान विचारवंत यांनी या विश्वाचं गूढ अुकलण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा, अध्यात्माच्या मार्गानं, प्रयत्न केला आहे. या मार्गानं जात असतांना, त्यांनी अनेक संकल्पना रूढ केल्या. अीश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, मोक्ष, सजीवांच्या जन्ममृत्युचे फेरे, पुनर्जन्म वगैरे वगैरे. या सर्व संकल्पना, अनुभूतीतून साकारल्या आणि त्या अमूर्त स्वरूपात आहेत. रुशीमुनींना विज्ञानाची जाणीव होती याचे अनेक पुरावे आहेत. पण ते ज्ञान, अध्यात्माच्या भाषेत सांगितल्यामुळे सामान्य माणसांना त्याची जाणीव झाली नाही असं मला वाटतं.
आता विज्ञानानं खूपच प्रगती केली आहे. विश्वाचं गूढ अुकलणं, सत्य जाणून घेणं, हाच विज्ञानाचाही अुद्देश आहे. अमूर्त स्वरूपात, विश्वाचा कोणताही घटक अस्तित्वात असू शकत नाही, अख्खं विश्वच मूर्त स्वरूपात असतं हा विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे विज्ञानानं काढलेले निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळून आल्यास, कोणाही व्यक्तीला, केंव्हाही, कोणत्याही स्थानावरून आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात.
या विश्वात कोणतीही घटना किंवा कोणताही परिणाम, कारणाशिवाय घडत नाही (कार्यकारणभाव) आणि या कारणामागं कोणत्यातरी प्रकारच्या अुर्जेचा सहभाग असतोच असतो. हे कारण किंवा हा अुर्जेचा प्रकार समजला नाही तर ती घटना किंवा तो परिणाम, चमत्कार समजला जातो. पण ते खरं नाही. विश्व हाच, या विश्वातील अेकमेव चमत्कार आहे.
विज्ञानाचा दुसरा भक्कम पाया म्हणजे, या विश्वाचे वास्तव नियम कोणतीही व्यक्ती मोडू शकत नाही किंवा त्या नियमांचं अुल्लंघन करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण बल, वीजचुम्बकीय बल आणि दोन प्रकारची अणुगर्भीय बलं, या चार भौतिक मुलभूत बलांमुळेच, विश्वाचे सर्व व्यवहार चालतात. विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानानं, शास्त्रज्ञांनी मिळविलेलं ज्ञान नगण्य आहे, याचंही भान शास्त्रज्ञांना आहे.
गीतेत सांगितलेल्या संकल्पनांना, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काही स्पष्टीकरणं देता येतील असा माझा दृढ विश्वास आहे आणि तसं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
'विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता' या लेखमालेचा हाच अुद्देश आहे.
-- गजानन वामनाचार्य
शनिवार 25 फेब्रुवारी 2017
शनिवारचा सत्संग : 14
February 25, 2017
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
February 6, 2010
सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.
त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.
शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.
मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.
मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
January 14, 2017
१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला.
June 25, 2022
गेली तीन वर्षे भातीय राजकारण आर्थिक भ्रष्टाचार या राक्षसामुळे अक्षरशः ढवळून निघालेले आहे. इतिहासाचा मागोवा घेत असताना असे आढळून येते की देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पं. जवाहरलाल नेहरु १५ ते १६ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षरुपाने एकही आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नाही. आरोप झाला नाही.
June 19, 2013
राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे.
November 15, 2022
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.
July 15, 2012
प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.
January 25, 2010
कारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.
December 21, 2010
साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.
October 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti