(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय नृत्यशैली – कथक

    कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम 'कथा कहे सो कथक' असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हटले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.

    कथकची तीन प्रमुख घराणी आहेत - जयपूर, लखनउ आणि बनारस. फारसे प्रचलित नसलेले रायगढ घराणे ही कथक या नृत्यशैलीचे उगमस्थान आहे.

    जयपूर घराणे : राजस्थानमधील राजा कच्छवा यांच्या दरबारात ज्या विविध प्रकारचे फुटवर्क,चक्कर आणि तालाच्या विभिन्न प्रकारांचा उगम झाला ते जयपूर घराणे. पखवाज हे वाद्य जयपूर घराण्यातील नृत्यप्रकारात जास्त वापरले जाते.

    लखनऊ घराणे: अवध राज्यातील नवाब वाजिद अली शाह यांच्या दरबारात ज्या कलात्मक रचना, ठुमरी या अभिनयांबरोबर शाब्दिक अभिनय व काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा उगम झाला ते लखनऊ घराणे. सध्याच्या काळात अच्छन महाराज यांचे पूत्र पंडित बिरजू महाराज हे लखनऊ घराण्यातील कथक नृत्याचे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात.

    बनारस घराणे : प्रसिध्द साहित्यिकांमधील एक जानकी प्रसाद यांच्यापासून कथकमधील बनारस घराण्याचा उगम झाला. या घराण्यात नटवरी नृत्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यातील घेरे (चक्कर) डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंनी घेतले जातात.

    रायगढ घराणे : छत्तीसगडचे महाराज चक्रधार सिंह यांच्याकडे कथकमधील रायगढ घराणे जन्माला आले. यात तबल्याचा जास्त वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यशैली,कलाकारांमधील एकात्मता आणि तबल्याच्या विविध रचना यांमुळे या घराण्यातील नृत्यशैलीला वेगळेच महत्व प्राप्त होते. पंडित कार्तिक राम, पंडित फिर्तु महाराज, पंडित कल्याणदास महांत व पंडित बरमानलक हे ह्या घराण्यातील नृत्यशैलीचे प्रतिनिधी मानले जातात.

    इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरील मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.

    -- पूजा प्रधान

  • किल्ले कल्याणगड

    सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे

  • शिक्षणातील टर्निंग पॉइंट

    अनेक मुलां-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली.

    कोविड-19 महामारी या शतकातील सर्वांत मोठ्या आपत्तीने 2020 मध्ये जगभरातील मानवजातीवर आक्रमण केले. या आकस्मिक व अनपेक्षित संकटापासून बचाव करण्यासाठी एकीकडे त्यावरील उपचाराबद्दल अपुरे ज्ञान, अपुरी वैद्यकीय व्यवस्था आणि उपाययोजनांबद्दलचे अपुरे संशोधन अशी गोंधळाची परिस्थिती होती. मार्च 2020 पासून कोरोनाने जगभरातील लाखो जीवांचा अकाली बळी घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, निराधार झाली. एकूण जनजीवन अनिश्चित, असुरक्षित झाले. मृत्यूच्या छायेत जीव मुठीत घेऊन दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाऊनमध्ये कसेबसे एकेक दिवस ढकलण्याशिवाय लोकांना गत्यंतर उरले नाही. रोजच्या बातम्यांतून फक्त कोरोना संक्रमित रुग्णसंख्या आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या... हे सर्व सुन्न करणारे! प्रत्येकाच्याच मनामध्ये आपण कुणीही कुठल्याही क्षणी कोरोना संकटाचे बळी ठरू शकतो, या भीतीने कायम ठाण मांडलेले. अशा या परिस्थितीमध्ये कडक निर्बंध, टाळेबंदी, कर्फ्यू, लसीकरण या मार्गांनी कोरोनाशी मुकाबला करणे एकीकडे सुरू होते आणि दुसरीकडे नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले.

    या साथीच्या काळात वरवर न दिसणारा गंभीर परिणाम झाला आहे तो शिक्षणावर. भारत जगातील दुसऱया क्रमांकाचा मोठा देश असून एकट्या भारतात 32 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या कोरोनामुळे परिणाम झालेला आहे. लागोपाठ दोन वर्षे या पिढीतील 25 कोटी विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत.

    मार्च 2020 मध्ये बंद झालेल्या शाळा व महाविद्यालये वगळता एव्हाना अन्य सर्व व्यवहार जवळपास सुरू झालेले आहेत. या दिवाळीनंतर शाळा सुरू होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता 4 ऑक्टोबरपासून अंशत: शाळा सुरू होतील. एकंदर गेले 19 महिने शाळांची दारे बंद आहेत. याच काळात फळा, खडू ऐवजी कॉम्प्युटर क्रीन, मोबाइल हातात धरून शिकणे-शिकवणे सुरू झाले. घरबसल्या ऑनलाइन शिक्षणाची ही व्यवस्था या काळात जरी स्वीकारली गेली तरी मुलांनी शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकण्याला हा सर्वस्वी पर्याय ठरत नाही, हे वास्तव या काळातील अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. सामाजिक कौशल्यांचा विकास हा मानसिक, बौद्धिक विकासाइतकाच महत्त्वाचा आहे. 24 तास घरातच अडकून पडल्याने मुलांचा सर्वांगीण विकास साध्य करणे अवघड झाले. त्यांच्यात चिडचिड, नैराश्य निर्माण झाले. पालकही पूर्णवेळ घरीच असल्याने त्यांचे सतत मुलांवर लक्ष ठेवणे जाचक ठरू लागले.

    पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे. मुलांपाशी स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब यांसारखी साधने नसणे, नेटवर्क नसणे यामुळे शिक्षण फारच थोड्या मुलांपर्यंत पोहोचू शकले. चाचपडत ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे पण या शिक्षणासाठी ना शिक्षकांकडे पुरेसे तांत्रिक कौशल्य होते आणि ना विद्यार्थ्यांकडे. शाळा बंद झाल्याने 6 टक्के ग्रामीण कुटुंबातील व 25 टक्के शहरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या मदतीने शिक्षण घेता आले. ग्रामीण भागात फक्त 17 टक्के तर शहरी भागात 42 टक्केच कुटुंबाकडे इंटरनेट सुविधा होती.

    ‘शाळा बंद’च्या या कालावधीतील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर सतत येणाऱया उलटसुलट सूचना, निर्णय यामुळे अस्थिर व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

    मार्च 2020 मध्ये दहावीच्या भूगोल विषयाच्या एका पेपरचा अपवाद वगळता दहावी, बारावीच्या परीक्षा पार पडल्या. मात्र शाळांतून घ्यावयाच्या वार्षिक परीक्षा न होताच सर्व विद्यार्थी वरच्या इयत्तेमध्ये गेले. त्यानंतर 2020-2021 हे पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले; मात्र शाळा बंद राहिल्या आणि मार्च 2021 च्या दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अन्य शिक्षण मंडळांनी घेतला व त्यानंतर राज्य मंडळानेही घेतला. 11वी चे प्रवेश प्रामुख्याने गुणवत्तेनुसार होत असल्याने सर्व विषयांची एक सामायिक परीक्षा (CET) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि ICSE किंवा CBSE सारख्या इतर शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित CET परीक्षा देणे अडचणीचे वाटल्याने मा. उच्च न्यायालयापुढे आलेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार CET रद्द ठरविण्यात आली. परीक्षा न घेताच मागील वर्षाच्या इयत्ता 9 वी व 11 वी च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संपादणूक व शाळास्तरावर केलेल्या श्रेणी, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांची 10वी, 12वी परीक्षेतील उत्तीर्णता ठरवण्यात आली. बोर्डाच्या निकालाची टक्केवारी 85 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर गेली. मात्र या गुणांची खात्री देता येणार नाही, ही जाणीव विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांनाच होती. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे शिकण्याची गुणवत्ता घसरली तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी मात्र वधारली. पुढील टप्प्यावरील शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास पूर्ण न होताच वरच्या इयत्तेमध्ये गेल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया कच्चा राहिला. आधीच आपल्या देशातील शिक्षणाचे चित्र फारसे चांगले नाही. ‘असर’च्या सर्वेक्षणातून ते वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. इ. 3 री, 4 थी च्या विद्यार्थ्यांची क्षमता लेखन, वाचन, गणित यामध्ये इ. 1 ली च्या स्तरावर आहे.

    आता कोरोना भयाने शाळा बंद राहिल्याने होणाऱया शैक्षणिक नुकसानामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली. आधीच वंचित असलेल्या मुलांसाठी हा फटका खूप मोठा आहे. मध्यान्ह भोजनाची सोय सरकारी शाळांमध्ये असल्याने मुलांची उपस्थिती नियमित होत असे. आता मात्र शाळा नसल्याने त्यांची एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. कामधंदा नसल्याने आईवडिलांसोबत अनेक मुले-मुली शाळा सोडून आपापल्या गावाकडे स्थलांतरित झाले. अनेक मुला-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क नसणे, साहित्य साधने नसणे यातून शहरी व ग्रामीण ही दरीसुद्धा रुंदावली.

    या काळात कौटुंबिक ताणतणाव, प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक ओढाताण, शिकण्यासाठी साधनसुविधांचा अभाव यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले. त्यातून येणाऱया नैराश्यातून आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना घडणे हे खरोखरीच दुःखदायक आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शिकण्यास मदत होण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या मालिकेद्वारे ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘दीक्षा अॅप’ मधील निवडक पाठांचे प्रसारण केले. ‘टिली मिली’सारखा कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित केला. मात्र हे दोन्ही उपक्रम घाईघाईने केलेल्या निर्मितीमुळे असेल कदाचित पण फारसे दर्जेदार नसल्याने अपेक्षित परिणामकारक ठरले नाहीत. याउलट अन्य राज्यांमध्ये कोरोनापूर्व काळात सातत्याने दूरदर्शनच्या शैक्षणिक वाहिन्या पूर्णवेळ शालेय अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम देत होत्या. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात दूरदर्शनवरील अशा कार्यक्रमांमुळे त्या राज्यांतील मुलांना खूपच फायदा झाला. महाराष्ट्रात दुर्दैवाची गोष्ट ही की शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करणारी बालचित्रवाणी संस्था काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली.

    दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये माहिती व तंत्रज्ञान राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले त्यानुसार शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड देणे व शिकवताना विविध दृश्राव्य माध्यमांची जोड देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी करण्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी अपेक्षेनुसार तंत्रसाक्षर झाले नाहीत आणि आवश्यक तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यात मागे राहिले. कोरोना महामारी संकटकाळात गरजेपोटी नाइलाजाने या माहिती-तंत्रज्ञानाला शरण जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिल्यानुसार आगामी काळातील शालेय शिक्षण हे तंत्रज्ञान आधारित असणार आहे यापुढे वर्ग अध्यापनात खडू-फळा याच्या जोडीने डिजिटल शिक्षणाची जोड दिली जाणार आहे आणि पुस्तकाबाहेरील माहिती, उदाहरणे, संदर्भ, चित्रफिती, सहजपणे पडद्यावर पाहून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी व परिणामकारक ठरेल ऑनलाइन व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा उपयोग उच्च शिक्षण या प्रमाणे शालेय शिक्षणामध्ये केला जाईल संकट काळात या निमित्ताने ऑनलाइन शिक्षण स्वीकारले गेले ही एक जमेची बाजू म्हणायला हवी.

    आकस्मिकपणे उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थी-शिक्षक यांना ऑनलाइनवर शिकणे-शिकवणे यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. याचे मुख्य कारण तांत्रिक कौशल्यांचा अभाव. मात्र चाचपडत अन्य सहकाऱयांची मदत घेत का होईना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ऑनलाइन वर्ग घेऊ लागले. ऑनलाइन शिक्षण बऱयाचदा नीरस, कंटाळवाणे ठरले. कारण शिक्षक नेहमीच्या पद्धतीने पाठाचे वाचन करून गृहपाठ देत राहिले. ऑनलाइन शिक्षणाचे प्रश्न फारच वेगळे. वर्गात मुलं समोर... ज्यांच्यात हसत खेळत शिकणं, संवाद होई. ऑनलाइन बहुतेक वेळा एकतर्फी. शिकणाऱया मुलांची ऑनलाईन वर्गातील हजेरी अलीकडे वीस-पंचवीस टक्क्यांवर येऊन ठेपलेली. याशिवाय शहरी किंवा ग्रामीण भागातील वंचित घटकातील तळागाळातील मुलांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल, टॅब ही साधने नाहीत. नेटवर्क आणि खंडित वीज पुरवठा या समस्या वेगळ्याच. एकंदर या दीड वर्षात मुलं किती शिकली, मागच्या इयत्तेतील कितीसं स्मरणात राहिलं, या प्रश्नांची उत्तरे सर्वेक्षणातून समोर आली.

    25 ते 30% मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचले. याशिवाय या ऑनलाइन शिक्षणामध्ये इतरही अनेक अडचणींतून मार्ग शोधावे लागत होते. 24 तास मुलं घरी पालकांबरोबर असल्याने सतत पालकांकडून प्रत्येक बाबतीत शिस्त लावणं, रागावणं, तसंच बाहेर जायला खेळायला बंदी असल्याने शाळा व शाळेनंतर शिकवणी वर्ग ऑनलाइन यामुळे तासन्तास क्रीनसमोर बसून राहिल्याने कंटाळलेली. त्यातून नैराश्य, चंचलता, चिडचिड यांसारख्या वरवर न दिसणाऱया मानसिक, भावनिक समस्या. बऱयाच शिक्षकांच्या दृष्टीने हा काळ खूप कठीण आणि आव्हानात्मक ठरला. ऑनलाइन पाठ घेण्यासाठी भरपूर पूर्वतयारी करावी लागली. पीपीटी बनवणे, लिंक शोधणे, तांत्रिक बाबींची जुळणी करणे, मोबाइलवरून गृहपाठ देणे, तो तपासून देणे यासाठी नवीन तंत्रांशी/पद्धतींशी जुळवून घेणे तसेच शाळेच्या ऑनलाइन सभा, प्रशिक्षणे, इतरांकडून नवनवीन पद्धतींची माहिती घेणे, कौशल्ये शिकून घेणे, यातून शिक्षकांची दमछाक होत राहिली. महिला शिक्षिकांना प्रापंचिक जबाबदाऱयांच्या जोडीने हे सारे करावे लागत असल्याने त्यांच्यावरील ताण अधिकच वाढला. पालकांसाठी हा कोरोना काळ अधिक तणावपूर्ण ठरला. एकीकडे ऑफिसचे काम घरून करीत असताना मुले ऑनलाइन वर्गात नीटपणे शिकत आहेत किंवा कसे यावर लक्ष ठेवणे, त्यासाठी योग्य वातावरण राखणे, मुलांना मदत करणे, त्याच जोडीला धुणीभांडी, केरवारा करणाऱया कामवाल्यांशिवाय घरातील ही अधिकची कामे करावी लागणे, हे सारे विशेष करून महिलावर्गाला दमविणारे ठरले. मात्र बहुतेक कुटुंबांतील सदस्यांनी जबाबदारीने शक्य तितका आपला सहभाग या कामामध्ये उचलला, हेसुद्धा दिलासा देणारे.

    तथापि या काळामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षकांनी मुलांनी शिकत राहावं यासाठी उत्साहाने प्रयोग केले. स्वयंस्फूर्तीने विविध विषयांच्या घटकांवर स्वत:चे पाठ तयार केले. इतर शिक्षकांना त्याचा उपयोग करता आला. अनेक वॉट्सअॅप ग्रुपवरून सातत्याने विविध माहिती, महत्त्वाच्या संकल्पना, संबोध यांचे परस्परांशी शेअरिंग सुरू झाले. एरवी आपापल्या शाळेच्या चौकटीत राहून शिकवणाऱया शिक्षकांचे क्षितिज एकाएकी विस्तारले. शेकडो शिक्षक एकमेकांच्या संपर्कात आले. तांत्रिक बाबी, संदर्भ साहित्य निवड करणे इत्यादी एकमेकांकडून अप्रत्यक्षपणे शिकणं सुरू झालं.

    शहरातीलच नाही तर अतिशय दुर्गम भागातील शिक्षकांनीही ज्ञानदानाचे व्रत अविरत ठेवण्यासाठी जी धडपड केली ती कौतुकास्पद आहेच. मेधा कुळकर्णी यांनी लेखात दिलेली ही काही उदाहरणे पाहिली की याची प्रचिती येते.

    कोविडच्या स्थितीतही विद्यार्थ्यांनी शिकत राहावं, यासाठी शिक्षकांनी नवनव्या पद्धती शोधल्या, अडचणींतून वाट काढली, शक्य तिथे तंत्रज्ञानाची मदत घेतली, ते शक्य नव्हतं तिथेही डिजिटल विषमतेवर मात करण्यासाठी कल्पना लढवल्या, धोके पत्करले, कधी स्वखर्चाने, कधी लोकांकडून मदत गोळा करून विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या. अशा किमान दोन-तीन हजार शिक्षकांनी विषयमित्र, शिक्षकमित्र अशी नावे देऊन गावातल्या जाणत्या व्यक्ती, विद्यार्थ्यांची मोठी भावंडे, नोकरीधंदा गमावल्याने शहरांतून गावांत परतलेले तरूण यांना मुलांचं मित्रत्व स्वीकारायला लावलं, शिकवण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात, मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतवलं. शाळा बंद झाल्या तेव्हा सर्वाधिक भीती होती मुलं शाळाबाह्य होण्याची. विशेषत गरीब मुलंमुली शाळेपासून तुटतील आणि त्यांची शाळा सुटेल. जिल्हा परिषदच्या अनेक शिक्षकांनी हेच रोखण्यासाठी जिवाचे रान केले, हे पुढील काही उदाहरणांवरून दिसून येईल.

    तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. सातपुड्याच्या कुशीत पावरा समाजाची वस्ती असलेली गावं. ना इंटरनेट, ना स्मार्टफोन, ना साध्या मोबाइल फोनवरून बोलायला गावात रेंज. एकमेव पर्याय, अभ्यासक्रमाचे कागद मुलांच्या हाती देणं. रूपेशकुमार नागलगावे सरांनी झेरॉक्स प्रती किराणा दुकानात ठेवणं. सामानासाठी गेल्यावर पालकांनी त्या उचलणं. आठवड्यातून एकदा सरांनी मार्गदर्शनासाठी जाणं. झेरॉक्सच्या देवाणघेवाणीचे निरोप देण्यासाठी फोन करायचा तरी डोंगरावर चढून रेंज शोधायची. उमराणीखुर्द, उमराणीबुद्रुक, काल्लेखेत शाळांत चार-पाच किलोमीटरवरील गावातूनही मुलं येतात. पटसंख्या 168. शारीरिक अंतर राखून घरांच्या ओट्यावर बसून गटागटाने मुलं अभ्यास करतात. शिक्षकांची अभ्यासओट्यावर फेरी असतेच. ‘उलगुलान ओटलू’- म्हणजे (शिक्षणाच्या) क्रांतीचा ओटा हा मंत्र आहे. मे महिन्यात आढळलं की, सात-आठ मुलं कुठल्याही गटात नाहीत. लॉकडाऊनमध्ये गुराखी नसल्याने ही मुलं गुरं चारायला डोंगरात जात होती. मग चार शिक्षकांनी गुंडाळी फळे, खडू, पुस्तक घेऊन डोंगर गाठला. सातपुड्यातील चौथी रांग. टेकडीवर पोचताच शिक्षकांनी शिट्टी वाजवायची. आवाज डोंगरादऱयांत घुमायचा. मुलगा त्या झाडाखाली आल्यावर फळा लटकवून वर्ग सुरू.

    कोविडकाळ सुरू झाला तेव्हा, धुळे जिह्यातल्या अंचाडेतांडा शाळेतली लेकरं गावात आणि तो ऊसतोडणीचा मोसम असल्याने त्यासाठी गेलेले त्यांचे आई-बाप गुजरातेत अडकलेले. मुख्याध्यापिका अरूणा पवार यांनी घरोघर जाऊन अन्नधान्य, तेल-मीठ-मसाला, औषधं हे सारं मुलांना आणि आजी-आजोबांना पुरवलं. कोविडचा धोका पत्करून त्या संपूर्ण तांड्यावर हिंडल्या. गुजरातेत अडकलेले पालक आणि मुलं- आजी-आजोबा यांचे बोलणं फोन/व्हिडिओ कॉलवर करून दिलं. चार-चार विद्यार्थी गटागटाने अंतरा-अंतरावर घरांच्या ओट्यावर बसवत शाळा सुरू केली. शिक्षकांची ही धडपड पूर्ण गावाने पाहिली. त्याचाच परिणाम असा की, यावर्षी एकाही पालकाने दिवाळीनंतर मुलांना ऊसतोडणीला सोबत नेलं नाही. मुलं गावातच घरी थांबून अभ्यास करत आहेत. पालकांनी इतका विश्वास शिक्षकांवर टाकून शिक्षकांच्या कामाची पावतीच दिली.

    तुलनेने, कराड हे सुस्थितीतल्या पालकांचं गाव. 12 जूनला कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 (अर्जुन कोळी हे मुख्याध्यापक) टिव्हीवर सुरू झाली. केबल चॅनल-फीचा पहिल्या दोन महिन्यांचा खर्च शाळाव्यवस्थापन समितीसदस्यांनी आणि त्यानंतरचा पालक उचलत आहेत. शाळेच्या इमारतीत थाटलेल्या तात्पुरत्या स्टुडिओत केबलवाल्यांच्या मदतीने चित्रीकरण केलं जातं. शाळेच्या 2,561 विद्यार्थ्यांसाठी हा खटाटोप. पण हे केबल नेटवर्क कराड आणि पाटण तालुक्यात जिथे जिथे पोचलंय, तिथल्या सगळ्याच मुलांना, ते शाळा क्र 3 चे विद्यार्थी नसूनही, या वर्गांचा लाभ मिळतोय. असे सुमारे 50 हजार विद्यार्थी आहेत. खरंच, शिक्षणाने शाळेच्या भिंती ओलांडल्या, असं शब्दश घडलंय इथे.

    याच काळात गणिताचे शिक्षक शमशुद्दीन आत्तार (शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) यांची गणित अध्यापनाची ऑनलाइन सत्रं इतकी विद्यार्थीप्रिय झाली की, दिवसभर ते झूमद्वारे वेगवेगळ्या वर्गांचे तास घेण्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या शाळेतल्या आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतातच. पुणे, सांगली, सावंतवाडी इथले विद्यार्थीही सरांच्या ऑनलाईन वर्गात हजेरी लावतात. ‘सोप्पं गणित’ही त्यांनी सुरू केलेली चळवळ आधीचीच आहे. पण कोविडकाळात चळवळ आणखी बहरली. इंटरनेट आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञानाची भुरळ पडल्याने त्याचा वापर करून गणित सोप्या पद्धतीने, खडू-फळ्याशिवाय शिकवण्याचे, मुलांना गणितात रमवण्याचे प्रयोग करत त्यांनी एक क्रांतीच घडवली आहे. आत्तार सर दररोज 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांना पाठवतात. त्याची उत्तरं मुलांनी सोडवली की त्यांना किती गुण पडले ते कळवतात. ते सांगतात, “गाव दुर्गम. पालकांची स्थिती बेतासबात. पण मुलांची शिकण्याची जिद्द वाखाणण्याजोगी. गावात नेटवर्क नाही तर, इंटरनेटच्या रेंजसाठी आमचे विद्यार्थी डोंगरावर तात्पुरत्या झोपड्या बांधून अभ्यासासाठी तिथं येत आहेत. हे पाहिलं की, माझी जिद्द आणखी वाढते. तंत्रज्ञान आणि चांगल्यात-चांगलं शिक्षण आमच्या खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंतदेखील पोचवायलाच हवं, म्हणून मी आणखी जोमाने कामाला लागतो.”

    सरकारी म्हणजे काहीतरी हिणकस असं समजणाऱयांनी कोविडकडून जरूर धडा शिकावा. सरकारी काम फक्त मंत्रालयातल्या आदेशाबरहुकूम चालतं, हा ग्रह बरोबर नाही. इथेही मोकळीक मिळते. अन्यथा, ही शिक्षकमंडळी इतके प्रयोग करूच शकली नसती. शाळेच्या तालुका-जिह्यातल्या स्थानिक स्थितीला, भिन्नतेला अनुरूप असे निर्णय शिक्षक-मुख्याध्यापकांनी कोविडकाळात क्षणोक्षणी घेतले. चेंबूरपेक्षा जालन्यातल्या तांड्यावर वेगळी रीत, तांड्यापेक्षा आदिवासी मुलांसाठी निराळी, त्याहून अलग कोकणात असं घडलं. बजेट, फाइल इकडून तिकडे पोचण्यातला वेळ, मंजुरी वगैरे काहीच आड आलं नाही. जिल्हा परिषद शाळा आणि तिथले शिक्षक यांच्याबद्दल, त्यांच्या दिसण्या-बोलण्यापासून पेहरावापर्यंतची दूषित मतं संबंधितांनी त्वरेने दुरुस्त करून घ्यावीत. त्यांच्या त्याच दिसण्या-बोलण्यातून त्यांनी मुलांशी गहिरं नातं जोडलंय. या काळातल्या कित्येक प्रयोगांना राज्य, देश आणि जगाच्या पातळीवर वाखाणलं गेलंय. याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांत अधिक मुलं येण्यात होत आहे. प्रथम फाउंडेशनचा 2020 सालाचा असर (ASER - Annual status of education report 2020) अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातही याला दुजोरा देणारी निरीक्षणं मांडलीयेत.

    इंटरनेट-स्मार्टफोन-ऑनलाइनच्या जमान्यात शहरवासीयांना जुनी वाटली तरी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, फिल्म्स, प्रोजेक्टर अशी साधनंही किती उपयोगाची आहेत, हे कोविडकाळाने अधोरेखित केलं. अनेक गावांनी देवळातला ध्वनिक्षेपक, भोंगा गावातल्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध केलाय. भोंगाशाळा असंच नाव पडलंय या शिकण्याला. प्रथम संस्थेची निर्मिती असलेल्या ‘शाळाबाहेरची शाळा’ हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरवरून प्रसारित होतोय. 40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचणारा हा कार्यक्रम अनेक गावांत भोंग्यावरून ऐकवला जातोय.

    अहमदनगर जिह्यातील हिरवेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. स्थानिकांच्या सहकार्यामुळे यशवंत माध्यमिक विद्यालय ही जिल्हा परिषदेची शाळा 15 जूनला सुरू करण्यात आली. त्या आधी गावात करोनाचे सावट होते. कित्येक रुग्ण अत्यवस्थ होते. पण गावकऱयांनी एकजुटीने प्रयत्न करून गाव कोरोनामुक्त केले आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून शाळा सुरू करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहिले.

    ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असल्या तरी त्यामुळे काही सकारात्मक बदल नक्कीच झाले आहेत. शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. पालकांचा मुलांच्या शिक्षणातील सहभाग वाढला आहे. मोबाइल, लॅपटॉप यांच्या मदतीने गेमव्यतिरिक्त शालेय शिक्षण, तसेच अमर्याद ज्ञान विद्यार्थ्यांसमोर खुले झाले आहे. त्याचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांना क्षमता विकास साधता येईल.

    देशातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत बरीच उलटसुलट चर्चा झाली, त्यात सुधारणा झाल्या. हे आक्षेपार्ह नाहीच; परंतु देशाचे भवितव्य उज्ज्वल करणारी सक्षम पिढी घडविणारी शिक्षण व्यवस्था मात्र या काळात दुर्लक्षित राहिली, हे खरे.

    आता शाळा सुरू होताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे जवळजवळ दोन वर्षांच्या अभ्यासाची तूट कशी भरून काढता येईल याचे नियोजन जसे आवश्यक तसेच ठळक संबोध संकल्पनांची उजळणी करून घेणे हे महत्त्वाचे ठरेल कारण आधीच्या इयत्तांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहिला असेल तर पुढचे समजणे विद्यार्थ्यांना नक्कीच अवघड जाईल चाचण्या वार्षिक परीक्षा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यासाठी अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीचे स्वरूप याबाबत तत्परतेने निर्णय घ्यावे लागणार आहेत जेणेकरून ऐनवेळी गोंधळाची परिस्थिती उद्भवणार नाही. खेरीज शिक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळांनी प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणी करणे याला प्राधान्य द्यायला हवे.

    मोठ्या गॅपनंतर शाळा सुरू होताना मुलांना काही दिवस तरी शाळेत येण्याचा, सवंगड्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आनंद व मोकळीक मिळायला हवी. त्यांनाही नवीन वातावरणात रुळण्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा. लगोलग अभ्यास, चाचण्या, परीक्षांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावणे उचित होणार नाही. कोरोनाच्या भयसंकटातून मुक्त व्हायला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तोवर कोरोनाच्या बातम्या माध्यमातून येतच राहतील. पण त्यामुळे न डगमगता शाळा सुरू राहतील यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटेल अशी ठाम भूमिका शिक्षकांनी, शाळांनी व प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

    -- डॉ. बसंती रॉय

  • नारळी पौर्णिमा

    श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे.

  • आस्तित्व

    जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी का असावा? समाज तरी का असावा? सगळेच नसले तर कुणाला काहीच फरक पडण्याचे कारण नाही. कारण फरक पडण्यासाठी कुणी असणारच नाही.

    पण असं असलं, तरी ‘मी नसावं’ असं कधीच मला वाटत नाही. येनकेन प्रकारे ‘मी’ माझं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण एकटा ‘मी’ असून भागत नाही. या अवाढव्य पसरलेल्या पृथ्वीवर ‘मी’ एकटा काय करणार? माझ्या सारखचं कुणीतरी माझ्या सोबतीला असायला हवं, नाहीतर ‘मी’ एकटा पडेन. एकट्या ‘मी’ला संपून जाण्याची खूप मोठी भीती असते. पण दुसऱ्या कुणाचे तरी असणं एवढच ‘मी’च्या जगण्यासाठी पर्याप्त नसतं. त्या ‘दुसऱ्या’शी ‘मी’ चे भावनिक नाते असायला हवे. तसे नसेल तर दुसऱ्याच्या असण्याचा ‘मी’ला काहीच लाभ नाही. त्याचा एकटेपणा आणि असुरक्षितता जाणार नाही. म्हणून ‘मी’चं इतरांशी भावनिकरित्या जोडलेलं असणं महत्वाचं असतं. त्या शिवाय ‘मी’ला आनंदानं जगता येणे शक्य नाही. आनंदानं जगण्यासाठी ‘मी’नं कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं गरजेचं असतं. दुसरं कुणीतरी ‘मी’ वर जीवापाड प्रेम करत असेल तर मग ‘मी’च आयुष्य आनंदाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही.

    no man is an island. आपण सगळे एकमेकांना पूरक आहोत. एकमेकांच्या खांदयावर उभे राहून आपण उत्क्रांतीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मुक्ती असली तरी ती सामुहिक आहे. एकट्या ‘मी’ला इथे मुक्ती नाही.

    -- संदीप घडमोडे यांचा फेसबुकवरील लेख

  • चाकोरीबाहेर जाऊन हळद उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

    नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.

  • राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे.

    न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात …..

  • ओम पुरी, निरुपम आणि मंडळी..

    p-27587-murarideshpoande-vatratika

  • जेनेट आणि जेम्स!!

    २००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोबत त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, म्हणून मला जरा नवल वाटले. त्यांच्या पाठीमागून, एक तसाच गोऱ्या वर्णाचा मुलगा आला आणि लगेच क्लिफने त्याची,’जेम्स” म्हणून ओळख करून दिली. अर्थात, जेम्स, हा जेनेटचा Boyfriend असणार, हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवाने ओळखले. साउथ आफ्रिकेत, आपल्यासारखे, प्रियकर-प्रेयसी असे प्रकार तुरळक असतात, म्हणजे आधी ओळख करून घ्यायची, नंतर ती वाढवायची, हा प्रकार काही वर्षे चालला की मग आपण प्रेमात पडलो आहोत, हे कबूल करायचे, ही आपली पद्धत, तिथे जुनाट ठरते!! इथे “चट मंगनी, पट शादी” यातील दुसरा भाग वगळता, सगळे अनुभव एकसाचीच असतात.जेम्स, पहिल्या भेटीतच मला फार स्मार्ट वाटला, म्हणजे प्रथमच भेटत आहोत, याचा, त्याच्या बोलण्यात लवलेश देखील नव्हता. हे एक, गोऱ्या लोकांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. एकदा की ओळख झाली की लगेच त्याचे मैत्रीत सहजपणे रुपांतर होते. मने जुळणे, मते एकजीव होणे, याला इथे थारा नाही. मी, तिथे एकटाच रहात असल्याने, नंतर, ते माझ्याकडे अधूनमधून येत राहिले. विशेषत: शुक्रवार किंवा शनिवार संध्याकाळी जेम्स , जेनेटसह माझ्याकडे यायचे,संध्याकाळ असल्याने नेहमीच ड्रिंक्स व्हायचे. एकूण, जेम्स माझ्या मनात चांगल्यापैकी भरला. तसे, मी माझे मत, जेनेटच्या वडिलांना, क्लिफला मनमोकळेपणी सांगितले, तशी क्लिफदेखील सुखावला. जेनेट ही त्याची तिसरी मुलगी. पहिल्या दोन्ही, लग्न करून, लंडन इथे स्थिरावल्या होत्या.

    कधीकधी, मी त्या जोडप्याबरोबर, सिनेमाला किंवा हॉटेल अथवा क्लबमध्ये जात असे. असेच काही महिने गेले आणि एकेदिवशी क्लिफने त्यांच्या Engegement ची बातमी आणली आणि यथावकाश तो समारंभ, अर्थात ख्रिश्चन रीतीरिवाजानुसार पार पडला. २००४ च्या अखेरीस, मी नोकरी बदलली आणि प्रथम रस्टनबर्ग आणि नंतर २००५ मध्ये Standerton इथे नोकरीनिमित्ताने राहायला गेलो, तरीही फोनवरून किंवा इंटरनेटवरून, माझा त्यांच्याशी संपर्क होता. २००७ साली, मी प्रिटोरिया इथे नोकरीसाठी आलो आणि ते माझ्या अगदी शेजारीच राहायला आले. त्याचवेळेस, क्लिफला देखील त्याच शहरात नोकरी मिळाली असल्याने, तो काही महिने माझ्याकडे राहायला आला.

    क्लिफ जसा माझ्याकडे राहायला आला, तशी आमच्या परत पूर्वीसारख्या गाठीभेटी सुरु झाल्या.२००७ च्या शेवटला तर, जेम्स आणि जेनेट एकत्र, लंडन इथे महिनाभर फिरायला देखील गेले होते. लंडनवरून परतल्यावर मात्र, त्यांचे जमत नाही, मतभेद वाढले अशा कुरबुरी कानावर यायला लागल्या, एक दोनदा तर, चक्क माझ्यासमोर, क्लिफसमवेत भांडणे झाली!! वास्तविक ते एकत्र रहात होते आणि या गोष्टीला आता तीन वर्षे होऊन गेली होती.मी, माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला पण अखेर पालथ्या घड्यावर पाणी, असला प्रकार झाला. शेवटी, विभक्त होणे काही टळले नाही!! या गोष्टीचेही मला काही फारसे वाईट वाटले नाही, कारण इथे असेच बहुतेकवेळा चालते, ओळख असते, तेंव्हा ते जीवश्च कंठश्च मित्र असतात पण,तरीही प्रत्येकाचे व्यवहार संपूर्ण वेगळे असतात. अगदी, लग्नाशिवाय एकाच घरात रहात असले तरी, घरातील प्रत्येक गोष्टीवरील हक्क हा वैय्यक्तिक असतो. आपल्या सारखे सामायिक सामंजस्य तिथे अभावानेच आढळते. अगदी, लग्न होऊन २५,३० वर्षे झाली तरीही, एखाद्या कडाक्याच्या वादाप्रसंगी, बायको नवऱ्याला किंवा, नवरा बायकोला, लगोलग घराबाहेर काढतात!!

    कितीही मैत्रीचा आव आणला तरी प्रत्येक नाते हे व्यावहारिक पातळीवरच असते. त्यातूनच “लिव्ह आणि रिलेशनशिप” असले नवे नातेसंबंध सुरु झाले. मानसिक गुंतवणूक ही नेहमीच व्यावहारिक पातळींवर होत असते आणि त्यामुळे मानसिक स्थैर्य ही बाबच जणू विस्मरणात गेली.

    अर्थात, असेच सगळीकडे असते, असे नव्हे. नियमाला अपवाद अशी काही जोडपी भेटतात पण तो अपवादच, नियम सिद्ध करण्यापुरता!! समाजात मोकळेपणा असल्याने, ओळख व्हायला आणि त्याचे डेटिंगमध्ये परिवर्तन व्हायला, अजिबात वेळ लागत नाही. आजही, जरी मी भारतात परतलो असलो तरीही, जेनेटशी आणि विशेषत: क्लिफशी मेलवरून संपर्क आहे. जेंव्हा, ते दोघे वेगळे झाले, तेंव्हा, जरी वरवर जेनेट आनंदी आहे असे दाखवत असली तरी आतल्या आत, ती खंतावत होती, हे निश्चित. त्यानंतर, त्यांच्या घरी मी ख्रिसमस पार्टीला गेलो तरी, ती पूर्वीची खेळकर जेनेट मला कधीच दिसली नाही.

    मला, यावरून नेहमी एक प्रश्न पडतो की, हे असले तकलादू नाते निर्माण करून, काय साधतात? आज, आपल्या समाजात देखील हळूहळू अशीच “लिव्ह आणि रिलेशनशिप” पसरत चाललेली आहे. म्हटले तर त्यात वरवर पहाता, काहीच गैर नाही पण, जर का एकमेकांचे फाटले तर मात्र अनेक प्रश्न उभे राहतात. आज, जशी जेनेट मनाची उभारीच हरवून बसली आहे आणि लग्न या विषयावर बोलायचेच बंद झाली आहे, त्यातून होणारा मानसिक कोंडमारा अतिशय त्रासदायक ठरू शकतो. साध्या ती अजूनही तरुण आहे – सध्याचे तिचे वय २८!! त्यामुळे, आला दिवस कसाबसा धकवून नेते, त्यातून तिने हातात असलेली नोकरी घालवून बसल्याने, दिवस तिच्या अंगावर येतो.

    इथे मी हा एकाच प्रश्न उपस्थित केला आहे पण या विषयाच्या अनुषंगाने अनेक चिचार मनात येतात. स्त्री-पुरुष यांचे संबंध केवळ याच प्रकारे संबोधले जावेत का? आणि जर होकारार्थी उत्तर असेल तर कितपत संयुक्तिक आहे? आपल्याकडे मानसिक चलनवलनाला बरेच महत्व दिले जाते पण तरीही व्यावहारिक दृष्टीने मानसिक वृत्ती कितपत महत्वाची? हा प्रश्न या अनुरोधाने उपस्थित होतो. जेनेट हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले पण, अशी अनेक उदाहरणे केवळ परदेशातच नव्हे तर आपल्या समाजात सापडू शकतात. आता याच जेनेटच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, ते दोघे साधारणपणे चार वर्षे तरी एकत्र होते, त्यातून फाटण्यापूर्वी कमीतकमी दोन वर्षे एकाच घरात रहात होते, तेंव्हा शारीरिक संबंध आला नसणार का? नक्कीच आला असणार पण आता विचार करायचा झाल्यास, शारीरिक संबंध केवळ गरज म्हणून निर्माण झाले का?

    मानसिक वृत्ती त्याला कारणीभूत नव्हत्या का? आणि महत्वाचा प्रश्न असा की, हेच स्त्री-पुरुष यांच्या संबंधाचे आधुनिक रूप आहे का? हल्ली, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा एकूणच सामाजिक कार्यक्रम वा तत्सम गोष्टीतून स्त्री-पुरुष एकत्र येतच असतात. एकत्र येणे हे जर आधुनिकतेचे फलस्वरूप मानले तर, त्या संबंधाची इतिश्री अशाच हताशतेत व्हावी, हे कितपत संयुक्तिक ठरते? स्त्री आणि पुरुष हे निर्सगत: वेगळे आहेत, हे जर मान्य केले तर, त्यांच्या मनोवृत्ती, विचार करण्याची पद्धत यात तरतमभाव सहजपणे निर्माण होणार!!

    अर्थात, प्रत्येक वेळेस, स्त्री-पुरुष नाते हे शारीरिक संबंधातच आविष्कृत होते, असे माझे म्हणणे नाही. आज, आपल्या नेहमीच्या जगण्यात, असे कितीतरी नातेसंबंध फक्त, मानसिक गरजेतून निर्माण झालेले दिसतात. म्हणजे, शारीरिक संबंध, ही या नात्याची एकमेव अट नव्हे!! हल्लीच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात, स्त्री आणि पुरुष एकत्र येणे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळेस, केवळ संशयाच्या नजरेतून अशा नात्याकडे बघणे, केंव्हाही चुकीचेच ठरते. आपले मन तितके मोकळे असणे गरजेचे आहे. असेही कितीतरी वेळा घडू शकते की, ज्या गोष्टी आपण नवऱ्यासमवेत किंवा प्रियकरासमावेत उघडपणे बोलू शकत नाही(असे का व्हावे हा वेगळा प्रश्न!!) ते विषय मित्राबरोबर अतिशय सहजपणे बोलू शकतो, किंबहुना हेच अटळ असू शकते पण इथेच विश्वासाचा प्रश्न उभा राहतो.

    इथे केवळ पुरुषालाच दोष देणे चुकीचे आहे, माझ्या माहितीत स्त्रियादेखील तितक्याच महत्वाच्या आहेत. हल्ली काय होते की, अशा संबंधात जरा कुठे बोभाटा झाला की, लगेच स्त्री “अबला” आणि पुरुष “काळ्या” रंगात रंगविला जातो. खरेच अशी परिस्थिती आहे का? आधुनिक जगात अशी वर्गवारी, माझ्या मते फार चुकीची आहे. या प्रश्नाला अनेक बाजू आहेत आणि अनेक दृष्टीकोनातून, हा विषय मांडता येऊ शकतो. जसे, स्त्रीला पुरुषाची गरज असते त्याचप्रमाणे पुरुषाला स्त्रीचीदेखील गरज असते, आणि ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक गरज देखील असू शकते.

    आपले मन, आपण किती व्यापक ठेऊ शकतो, हाच खरा प्रश्न आहे. वरील उदाहरण जर का प्रातिनिधिक म्हणून मानले तर, केवळ जेनेटची चूक असेल, हे मानणे जितके चूक आहे तितकेच जेम्सची चूक आहे, हे देखील मानणे चूक ठरते. मानसिक सामंजस्य अखेर महत्वाचे ठरते आणि तिथेच आपण फार कमी पडतो. प्रत्येक वेळेस, आपला (नको तितका!!) अभिमान हरघडी आड येत असतो आणि आपण, नको तिथे आपली मते ताठरपणे दुसऱ्यावर लादत असतो. तडजोड तर आवश्यक ठरतेच पण प्रसंगी आपल्या मतांना तिलांजली देणे आवश्यक ठरते. प्रत्येक वेळेस, केवळ स्त्री असणे हेच सगळ्या दोषाला कारणीभूत आहे, असे मानणे अर्धवट ठरते तसेच पुरुष आगाऊ असतो हे मानणे देखील तितकेच अर्धवट ठरते.

    अजून, आपला समाज (दुर्दैवाने!!) अजूनही पुढारलेला नाही (याचा अर्थ असा नव्हे की पाश्चात्य समाज आधुनिक आहे!! तिथेही वेगळे प्रश्न उभे आहेतच!!) अजूनही, आपल्या समाजावर जुन्या संस्कृतीचे कांबळ पसरलेले आहे. या विधानाला कुणीही बुर्झ्वा मनोवृत्ती म्हणू शकेल. पण, बहुतेकवेळा प्रत्यक्षात हेच सत्य आहे, हे तठस्थपणे विचार केला तर ध्यानात येईल. खरतर हा प्रश्न सामाजिक तत्वज्ञानी लोकांनी सोडवायला हवा. अर्थात, हे काही इतके सोपे उत्तर नाही. जिथे प्रत्येक व्यक्ती ही स्वत:चे सार्वभौम व्यक्तित्व घेऊन जगत असते, तिथे अशी ढोबळ वर्गवारी योग्य नव्हे. असा प्रश्न केवळ एक लेखातून सुटणे निरतिशय कठीण आहे. पण, म्हणून हा प्रश्न चर्चिला जाऊ नये, असे मानणे देखील चुकीचे ठरते.

    - अनिल गोविलकर

  • जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

    या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम..