वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यांत पोलीस बळाचा बराच वापर होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचे अनेकदा दुर्लक्ष होते.त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेचे महत्व कमी करुन जास्त पोलिस दल सामान्य जनतेच्या सुरक्षेकरता तैनात केले जावे.
February 29, 2020
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 18, 2018
आपला देश तसा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, अर्थात ही गौरवाची बाब आहे की खेदाची हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल, परंतु केवळ आपल्या देशाची म्हणून अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे जागोजागी उभ्या असलेल्या, उभ्या होणाऱ्या संघटना. हा देश संघटनांचा देश आहे.
March 25, 2007
युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते.
'त्या दोन जिल्ह्यात' मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले होते. शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या पंधरा-पंधरा दिवसांच्या शिक्षकांच्या निवासी कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात झाल्या होत्या. त्यानंतर गावात झाल्या. एकदम होलसेलमधे शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्माण केले होते. जिथे या कार्यशाळा सुरू असत तिथे रंगीबेरंगी कागद, वेगवेगळ्या आकाराचे व रंगांचे मणी, फेविकॉल, तारा, कात्र्या, सुऱ्या, हातोड्या, वेगवेगळ्या जाडीचे पुठ्ठे, कार्डबोर्डस्, सोनेरी चंदेरी कागद, टिकल्या, स्केच पेन्स, मार्करर्स, ब्रश, पोस्टर कलरर्स, अंक पत्ते, चित्रांचे कॅटलॉग अशा अनेक गोष्टींचा अक्षरश: खच पडलेला असे. ज्या शाळेत प्रशिक्षण असे त्या शाळेतील वर्गात शैक्षणिक साहित्याचा कच्चा माल साठवून ठेवल्याने वर्गातील मुलांना दुसऱ्या वर्गात किंवा व्हरांड्यात महिनाभर तरी बसावं लागे. आणि प्रशिक्षण कालावधीत शाळेला जत्रेचे रुप प्राप्त होई. शाळेच्या आवारातच शिक्षकांचे जेवण, नाश्ता, चहा आणि गुटखा-गप्पा यांचा फड जमलेला असे. काही राजकीय वजनदार शिक्षकांचा तर 'उशीरा येणे व लवकर निघणे' असा एक कलमी कार्यक्रम असे. शाळेतील 150 मुलांपेक्षा प्रशिक्षणाला आलेल्या 150 शिक्षकांचाच कलकलाट अधिक असे.
'अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी, संबोधासाठी एक शैक्षणिक साहित्य हवेच' असे काहीसे त्या शिक्षकांना प्रशिक्षणात शिकविलेले होते. उदा. इयत्ता पहिलीच्या गणित अभ्यासक्रमाच्या त्यांनी ३२ पायऱ्या केल्या होत्या. या प्रत्येक पायरीसाठी एक साधन. पाच शिक्षकांचा एक गट ही 32 साधने तयार करत असे. प्रशिक्षणानंतर ही साधने शिक्षक आपापसात वाटून घेत. पण हे पाच शिक्षक वेगवेगळ्या तीन शाळातले असत. त्यामुळे आणखीनच गोंधळ होई. हे झाले फक्त गणिताचे. त्यानंतर भाषा व विज्ञान. प्रशिक्षणाच्या ठिकाणी गणिताची साधने, भाषेची साधने व विज्ञानाची साधने असे तीन ढीग केलेले असत. संसाधन व्यक्ती शिक्षकांकडून विषय निहाय साधने मोजून घेत. त्यामुळे तिथे साधनांच्या उपयुक्ततेवर चर्चा होत नसे तर साधनांचा कोटा पूर्ण केला का? यावर चर्चा होत असे.
खरं म्हणजे कुठलेच शैक्षणिक साधन हे एखाद्या विशिष्ट विषयाचे किंवा संबोधाचे नसते. तर शिक्षक किती कल्पक आहे यावरच सारे अवलंबून असते. कुठलेही शैक्षणिक साधन हे अनेक विषयांसाठी वेगवेगळ्याप्रकारे तर वापरता येतेच पण परिसरातील कुठलीही गोष्ट हे शैक्षणिक साधनच आहे, हे शिक्षकाला माहित असावे लागते. त्यामुळे कुठल्यातरी ठराविक साहित्यावर अवलंबून राहाणे हा शिक्षकाचा परावलंबीपणा आहे याचा आमच्या शिक्षकांना थांगपत्ताच नव्हता. कारण ज्या मान्यवर संस्थेने आमच्या शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचच शैक्षणिक साहित्याचं दुकान आहे आणि 'शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण' हा त्यांचा धंदा! असो.
या 'शैक्षणिक साहित्य क्रांती' नंतर जेव्हा आम्ही शाळा भेटींना सुरुवात केली तेव्हा, प्लॅस्टीकच्या पिशवित ठेवलेली शैक्षणिक साधने प्रत्येक वर्गात तारेवर लोंबकळताना दिसत. वर्गात मुले 40 ते 45 आणि वेगवेगळी 20 किंवा 25 साधने! 'प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची सवय असल्याने' सर्व साधने ही पंचमहाभूते व मुले यांच्यापासून लांब ठेवलेली! अनेक शाळांतून, 'कुठले साधन कुठल्या विषयाला वापरायचे? एका विषयाचे साधन दुसऱ्या विषयाला वापरुन चालेल का? ही साधने मोडली तर आमच्यावर कारवाई तर होणार नाही ना? या साधनानी कधी शिकवायचे... म्हणजे यासाठी काही वेगळी तासिका असणार आहे का? आम्ही तयार केलेली सगळी साधने आमच्याकडे आता नाहीत तर मग जुन्याच पध्दतीने शिकवून चालेल का?' अशा अनेक प्रश्नांबाबत शिक्षकांच्याच मनात संभ्रम होता. एकंदर काय तर 'अमाप पैसा खर्च करुन ही शून्य फायदा झाल्याचे लक्षात आले.' पण प्रोजेक्ट चालवायचा असल्याने काही शाळांतून ही साधने वापरणे सुरू आहे असे दाखविणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट पाहण्यासाठी भारतीय किंवा परदेशी पाहुणे येत. त्यांचा ही विचार करणं आवश्यक होतं. मग अशावेळी काही शाळांतून फक्त 'त्यावेळी' शैक्षणिक साहित्याचा वापर प्रभावीपणे केला जाई.
या अशा कॅनव्हासवर त्या जिल्ह्यात मी शिक्षण सल्लागार म्हणून रुजू झालो. माझा दुसराच दिवस होता. श्री. नंदकुमार (आय.ए.एस.) हे युनिसेफ तर्फे तिथे होते. शाळांची, शिक्षकांची व एकूणच शिक्षणाची अवस्था पाहून मी खचूनच गेलो होतो. नंदकुमार भेटल्यानंतर मी तेथील अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचू लागलो तेव्हा मला थांबवत ते म्हणाले,'हे मला सारं ठाउक आहे. म्हणून तर तुझी नेमणूक केली आहे. पुढच्यावेळ पासून माझ्याकडे प्रश्न घेऊन नव्हे तर उत्तरं घेऊन यायचं! या प्रश्नांसाठी तू काय केलंस आणि आणखी काय करायला हवं? हे मला सांगायचं!ठ त्या दिवसापासून मी पूर्णत: बदललो! हे काम आपल्याला केलंच पाहिजे याची आग मनात उसळली. कुठलंही काम सकारात्मक वृत्तीने करण्याची सवयच झाली. मी बएड किंवा डीएड नसल्याचा मला मोठा फायदा झाला. मी वेगळ्या प्रकारे विचार करू शकलो, प्रश्नांना थेट भिडू शकलो! शिक्षकाची अध्यापनातील अडचण सुटलीच पाहिजे हा ध्यास घेऊन, उत्तर मिळेपर्यंत प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू शकलो. याचे सारे श्रेय मी नंदकुमारांनाच देईन.
आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की 'शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापनातील अडचणींचा त्यात समावेशच नाही.' त्यामुळे प्रशिक्षणानंतर ही शिक्षकांच्या अडचणी कायमच राहात. आणि विशेष म्हणजे फारच कमी शिक्षकांना याबाबत खंत वाटत होती. असले प्रशिक्षण काय कामाचे? दोन्ही जिल्ह्यातील विशेष गती असणाऱ्या 100 शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांना अध्ययनात व अध्यापनात येणाऱ्या विषय निहाय व इयत्ता निहाय अडचणींची यादी तयार केली. अशी यादी तयार करताना शिक्षकांनी यादीवर त्यांचे नाव लिहिणे अपेक्षित नसल्याने शिक्षकांनी आपले काम निर्भयपणे केले. गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास व भूगोल अशा सर्व विषयांच्या इयत्तानिहाय अडचणींच्या याद्या तयार झाल्या. या 100 याद्यांपैकी अडचणींची वारंवारिता आणि प्राथमिकता ठरवून प्रत्येक विषयाच्या 20 अडचणींची अंतीम यादी तयार केली. उदा.गणितातल्या अडचणी होत्या : मुलांना '3003' लिहायला सांगितल्यास काही मुले '30003 किंवा 300003' असेही लिहितात. (कारण आपण लिहितो डावीकडून उजवीकडे व मोजतो मात्र उजवीकडून डावीकडे! त्यामुळे मुलांचा गोंधळ होतो.) तसेच, 36 आणि 63 किंवा 49 व 59 हे अंक लिहिताना मुलांचा गोंधळ होतो. अर्धा,पाव,पाऊण या संकल्पना समजणे, त्याचा व्यवहारात उपयोग करणे या बाबत मुलांचा गोंधळ होतो. पाढे पाठ कसे करावेत. वगैरे.
भाषेतल्या अडचणी : जोडाक्षरं आणि रफार शिकविताना गोंधळ. 'बैल' असे न लिहिता काही मुले 'बइल' असे लिहितात. मुलांचे अक्षर वळणदार होण्यासाठी व लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करावे? मुलांना बोली भाषेकडून प्रमाणित भाषेकडे कसे आणावे? इत्यादी. यानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला.
शिक्षकांना सक्षम करण्याअगोदर शिक्षकाचे मूल्यमापन होणे ही गरजेचे होते. कारण शिक्षकाला जर अध्ययन व अध्यापनातील स्वत:ची अडचण ओळखता आली व ती निर्भयपणे मांडता आली तरच त्याला त्याचे उपयोजन करणे सोपे होईल. पर्यायाने मुलांसोबत शिकण्याची गती ही वाढेल. त्यासाठी तीन पायऱ्या तयार केल्या.
एक, शिक्षकाला मुलाची अडचण ओळखता येते का?
दोन, मुलाची अडचण ओळखता आल्यानंतर, ती सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजतंय का?
तीन, मुलाचा प्रश्न सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजले आहे.पण आता, ही अडचण सोडविण्यासाठी त्या शिक्षकाने कोणत्या संसाधन व्यक्तीची, अधिकाऱ्याची, संस्थेची मदत घ्यायची हे त्याला माहित आहे का? आणि माहित असल्यास तो त्यासाठी उपयोजन करतो आहे का?
या साखळीतील कुठलाही एक दुवा जरी निखळला तरी त्या मुलाच्या शिक्षणातला व्यत्यय कायमच राहतो. हा झाला एक घटक. त्याचप्रमाणे मुलांना,'आनंदाने शाळेत जावे असे अजिबात वाटत नाही!' यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत :
-- रटाळ पाठ्यपुस्तकं व आपली 'घोका आणि ओका' शिक्षणपध्दती.
-- मूल शिकत असताना जर त्याला कुठली शंका आली तर तो ती बिनधास्त विचारू शकतो, असं निर्भय वातावरणच वर्गात नाही.
-- चुका करत शिकण्याची व स्वत: शोधून शिकण्याची संधी मुलांना नाही.
-- वर्गातील नीरस अध्यापन व शिस्त म्हणजे शिक्षा! याचा मुलांनी घेतलेला (रास्त) धसका.
-- प्रचंड गृहपाठचा बोजा घेऊनच मुलांनी घरी जाणं.
-- मुलांनी समोर पाठ्यपुस्तकं किंवा वर्कशीटस् घेऊन सतत काहीतरी लिहित राहणं म्हणजेच अभ्यास करणं यावर पालक आणि शिक्षकांचं एकमत. किंवा 'एका जागी गप्पं बसून काहीतरी कर' म्हणजे अभ्यास कर.
-- अवांतर वाचन करणं, खेळायला जाणं म्हणजे टाइमपास करणं, याबाबत अनेक शिक्षक व पालक याचं एकमत आहे.
-- मुलांना मारुन नव्हे तर प्रेमाने जिंकता येतं. त्यांनी चुका केल्या तर त्याला सुधारण्याची संधी देता येते याची सुतराम कल्पना नसल्याने 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' या ओळी जणू काही राष्ट्रगीतातल्याच आहेत असा अनेक शिक्षकांचा व पालकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अतीव निष्ठेने त्याचंच उपयोजन करण्यावर त्यांचा भर असतो.
-- पोर्शन पुरा करणे, हेच काही शिक्षकांचे अंतीम ध्येय असते.
-- नवनवीन शिक्षण प्रयोग जाणून घेणे किंवा त्यांचे उपयोजन करणे याबाबात शाळा व शिक्षकांची अनास्था.
या साऱ्या गोष्टींचा विचार करुन, जे 'मास्टर टिचर्स' इतर शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार त्यांच्यासाठी आधी 'व्हिजनिंग कार्यशाळा' आयोजित केल्या. आणि एकदा व्हिजनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातूनच तयार झाली दोन दिवशीय 'अध्यापन कौशल्य कार्यशाळा.'
शिक्षकांनीच मांडलेल्या अध्यापनातील अडचणी सुटू शकतील असे गरजाभिमूख 'शून्य खर्चाचे खेळ' तयार केले. असे हे सुमारे 89 खेळ. यातला प्रत्येक खेळ किमान दहा प्रकारे खेळता येतो. यातील काही खेळ भाषेचे आहेत पण विशिष्ट भाषेचे नाहीत. त्यामुळे ते खेळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेसाठी खेळता येतात. त्याचप्रमाणे अनेक खेळ हे युनिव्हर्सल आहेत. ते कुठल्याही विषयासाठी खेळता येतात.
या खेळांचे तीन प्रकार आहेत. एक,संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही खेळ. दोन, उजळणी करण्यासाठी खेळ. तीन, मूल्यांकनासाठी खेळ.
याचप्रमाणे भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी काही प्रयोग केले. निबंध लेखनाच्या किमान सहा पध्दती विकसित केल्या. उदा.पावसाळ्यात मुले त्यांच्या शालेय परंपरेनुसार 'पावसाळ्यातील एक दिवस'हा निबंध लिहित असत. आम्ही मग पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा. वर्तमान पत्रातील फोटो, बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती, शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले. एका मुलाने निबंधात लिहिले होते, 'माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात. हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!' 'वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!'ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते, असा एक नवीनच साक्षात्कार मला त्यावेळी झाला.
खेळता खेळता मुलांचे पाढे पाठ होऊ लागले. तोंडी गणितं, सम विषम संख्यांची उजळणी, शिटी वाजवा-झांजा वाजवा पण संख्या लिहा, शब्दांचा वाक्यात उपयोग करण्यासाठी खेळ, जोडाक्षरासाठी खेळ, शब्दांचे खेळ, वाक्यांचे खेळ, संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी खेळ, आलेखाचा खेळ, नकाशाचा खेळ, पूर्णांक अपूर्णांकाचा धमाल मस्ती खेळ असे अनेक खेळ रोज शाळेत खेळले जाऊ लागले.
शाळेत खेळ खेळायला मिळतात यामुळे मुलांमधे उत्साह संचारला. आणि या खेळांमुळे मुलांच्या गणिताच्या, भाषेच्या अडचणी सुटतात म्हणून शिक्षकांचा हुरुप वाढला. बालभारतीवर फार अवलंबून राहायचं नाही अस ठरवलं होतं. कारण बालभारती मधील धड्यांचा मुलांच्या भावविश्चाशी काडिमात्र संबंध नाही. मुलांच्या बुध्दीला चालना व आव्हान मिळेल असे त्यात काही नाही. कल्पकता शून्य पुस्तकाचे नाव 'बालभारती.' यातील भाषा, आणि धड्याखालील स्वाध्याय हा तर इतका रटाळ प्रकार आहे की मुलांमधे मातृभाषेविषयी अरुची निर्माण करण्यात बालभारतीचाच सिंहाचा वाटा आहे! रवींद्रनाथांचे बालसाहित्य आणि आजचे आपले 'बालभारतीय बालसाहित्य' (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे.
आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा 'अडाणी किंवा मातीचा गोळा' आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला.
शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र 'मुलांना काहीतरी शिकवणं!' बिचारी मुले 'त्या शरीराला' फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील 'आत्मा' मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते.
रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!! 'मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही' ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती.
मुले गोष्टी वाचत, कविता-गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
रवींद्रनाथांनी वयाच्या एेंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या 'सहज पाठ' ह्या तीन पुस्तिका लिहिल्या, त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!! 'करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे' असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.
(आम्ही ह्या पासून काही धडा घेणार का?)
बालभारती मधले स्वाध्याय हा एक अजबच प्रकार आहे. मुख्य म्हणजे हे स्वाध्याय स्मरणशक्तीवर आधारित आहेत, आकलनशक्तीवर नाहीत! त्याचप्रमाणे हे स्वाध्याय हे निव्वळ पाठावर आधारित आहेत,पाठातील आाशयावर नाहीत! हे स्वाध्याय इतके पकाव असतात की मुले अक्षरश: पिसून निघतात. 'सक्तमजूरी परवडली पण हे स्वाध्याय नको' अशी त्यांची अवस्था होते.आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकातील धडे/कविता ह्याविषयी एक घृणा त्यांच्या मनात पैदा होते!
वानगी दाखल एक छोटेसे उदाहरण पाहू.
'चामड्याची एक चौकोनी पिशवी घेऊन सुरेश ऑफिसला निघाला होता.' ह्या वाक्यावरचा 'बालभारतीय स्वाध्याय' पुढीलप्रमाणे असू शकतो :
1. सुरेश कुठे निघाला होता?
2. चामड्याच्या पिशवीचा आकार कोणता असतो?
3. ऑफिसमधे कशाची पिशवी नेतात?
4. सुरेश किती पिशव्या घेऊन ऑफिसला जातो?
ह्या स्वाध्यायात नाही काही कल्पकता/रंजकता/उफम/प्रकल्प किंवा मुलांच्या सर्जनशीलतेला आवाहन व आव्हान! केवळ 'घोकंबाज' मुलेच ह्यातून तयार होतात. स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्त:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे.
समजा, त्याच वाक्यातील आशयावर जर स्वाध्याय तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे असावा :
1. कुठल्या-कुठल्या गोष्टींपासून पिशव्या तयार होतात? उदा.नायलॉन,कापड इ.
2. ऑफिसला नेण्यासाठी,भाजी आणण्यासाठी,तेल आणण्यासाठी अशा आणखी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला माहित आहेत?
3. एकच पिशवी वेगवेगळ्या कामासाठी वापरता येऊ शकते का? कशाप्रकारे?
4. पिशव्यांचे किती वेगवेगळे आकार तुम्हाला माहित आहेत? तुम्हाला आवडणारा आकार तुमच्या वहीत काढा व रंगवा.
5. जुनी वर्तमानपत्रे घेऊन त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करा.त्यावर नक्षी काढून त्या रंगवा. ह्यासाठी कुणाचिही मदत घ्या.तुम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे वर्गातच प्रदर्शन भरवा.इ.
अध्यापन कौशल्य कार्यशाळांच्या यशस्वीतेनंतर मात्र 'बहुआायामी स्वाध्याय निर्मिती' कार्यशाळांचं आयोजन सुरू केलं. आणि शाळेतल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलायला सुरुवात केली. मी लहानपणी शाळेत असताना कधीच प्रयोग केले नव्हते. आणि प्रयोग न करताच पुस्तकात पाहून प्रयोगाचे निष्कर्ष लिहिले होते. किमान माझ्या मुलांवर तरी अशी पाळी येऊ नये यासाठी प्राथमिक शाळांतून शून्य खर्चाच्या प्रयोग शाळा सुरू केल्या. दैनंदिन जीवन व विज्ञान याचा सहसंबंध मुलांना उलगडावा, त्यांना स्वत: प्रयोग करुन पाहाता यावा हा त्यामागचा हेतू होता. शून्य खर्चाचे किमान 49 प्रयोग तयार केले. मुले चुकतील पण त्यातूनच शिकतील अशी पॉलीसी ठेवली. पहिलीतली मुले सुध्दा प्रयोग करू लागली. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि वेगवेगळ्या प्रयोगातून ती नवं काही शोधू लागली!!
वानगी दाखल एक छोटा प्रयोग सांगतो. (आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत हा प्रयोग तुम्हीसुध्दा कधी केला नसेल.) इयत्ता तिसरीला विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे व त्याखाली बालभारतीय स्वाध्याय आहेत. नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक वाक्य आहे.
हे नेमकेपणानं उमजण्यासाठी व विज्ञान आणि माझे दैनंदिन जीवन यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी एका प्रयोगाचे आयोजन केलं. एक जुना सुती रुमाल आणला त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली.
एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं,हा तुकडा जळायला किती वेळ लागेल?
मुलांनी काहीही उत्तरे दिली. 'एक तास,अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे'. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासाठी किती वेळ लागेल हे मुलांन सांगणे अपेक्षितच नव्हते. तो तुकडा अकरा सेकंदात जळला. मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी आता 'सेकंदात' उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले.
आम्ही सर्वांनी मिळून पाण्यात भिजून जळलेल्या कापडाचा वास घेतला. तो पहिल्यापेक्षा वेगळा होता.
तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला.
हा तुकडा जळायला बत्तीस सेकंद लागली. कारण तेल आधी जळले मग कापड. हा वास ही वेगळाच होता.
मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली जे सुके,ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो.
त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. ऊतू जाणारं दूध, लागलेलं दूध, आटणारं दूध इ.
त्याचप्रमाणे डोळे बंद करुन ओळखता येणारे वास. मुलांनी सुमारे 82 वासांची यादी तयार केली.
नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजू शकते, आणि तीच खरी महत्वपूर्ण असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवायला घाबरतो, त्यांना कमी लेखतो म्हणून मुले शिकत नाहीत असंच मला वाटतं.
पण हे सारं काही इतक्या सहजतेने घडलेलं नाही. पैसे खर्च करुन तर नाहीच नाही! वर्ग खोल्या बांधून, शैक्षणिक साधनांचा पुरवठा करुन किंवा दुपारी जेवायला देऊन प्रश्न सुटत नाही तर तो क्षणिक सुटल्यासारखा वाटतो. खरा प्रश्न हा मानसिकता आणि दृष्टीकोन याच्याशी निगडित आहे! शिक्षकांची मानसिकता बदलवणं,त्यांना शाळा, शिक्षण आणि शिकणं याबाबत नवा दृष्टीकोन देणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि बदललेल्या दृष्टीकोनानुसार त्याचे उपयोजन करण्यासाठी त्यांना सक्षम करणं म्हणजे मूल शिकण्याच्या प्रक्रियेला गती देणं. (यासाठी आम्ही व्हिजनिंग कार्यशाळा व अध्यापन कौशल्य कार्यशाळा यांचं एकत्रिकरण करुन तीन दिवसांच्या 'कार्यवेध कार्यशाळा' सुरू केल्या.) त्यासाठी तुम्हाला दोन किस्से सांगणं आवश्यक आहे.
एक.... सर्व शाळांतून मुलींसाठी लंगडीच्या व रांगोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. याचे कारण काय असं विचारल्यावर शिक्षक म्हणाले,'शासनाचे पत्रकच आहे की मुलींच्या लंगडीच्या स्पर्धा घ्या.
'पण त्या पत्रकाखाली असं तर लिहिलेलं नाही ना, जर का शिक्षकांनी मुलांच्या पण लंगडीच्या स्पर्धा घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येईल?' मी विचारलं.
त्यावर शिक्षक म्हणाले :
'पण पत्रकाप्रमाणे वागलं तर काय झालं?'
'पण आमच्या इथे तर अशीच पध्दत आहे!'
'मुलं कशापायी लंगडी घालणार'
'मुलांनी रांगोळ्या काढल्या तर सारा गाव त्यांना हसेल ते?'
'ग्रामीण भागात मुलीच लंगडी घालतात. रांगोळी काढतात.'
'तुम्हा शहरी लोकांना काय कळणार? इकडे असं चालत नाय!'
आता मी बोलायला सुरुवात केली,'तुमचं मत आणि तुमचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! महात्मा फुलेंच्या वेळी बायका शिकत नव्हत्या हे वास्तव होतं. पण फुलेंचं मत होतं की बायकांनी शिकलं पाहिजे आणि त्यांचा विश्वास होता की त्या शिकू शकतील. आणि त्यांनी वास्तव बदललं! मुले पण लंगडी घालू शकतात आणि सुंदर रांगोळी पण काढू शकतात.याबाबत तुमचं मत काय? आणि तुमचा विश्वास काय? हे आधी ठरवा. मला खात्री आहे आजपासून आपण बदलू शकतो. सर्व खेळ आणि सर्व स्पर्धा सर्वांसाठी ठेवू शकतो.ठ असं सांगितल्यावर किमान 15 टक्के शाळांतून काही वेगळं करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
दोन..... एका प्रशिक्षण कार्यक्रमात मी पिशवीतून पत्यांचा जोड बाहेर काढला आणि शिक्षकांना विचारलं,
'हे शैक्षणिक साधन तुम्ही वर्गात वापरता का?'
जीवंत भूत पाहिल्याप्रमाणे शिक्षक माझ्याकडे पाहू लागले. काही शिक्षिकांचा चेहरा तर लकवा भरल्याप्रमाणे वेडावाकडा झाला. एका शिक्षिकेच्या हातात मी पत्ते देऊ लागलो तेव्हा दोन पावलं मागे सरत ती म्हणाली,'म..माफ करा! मी पत्यांना हात लावत नाही. माझ्यावर लहानपणीच चांगले संस्कार झाले आहेत!' शिक्षक वर्गात पत्ते वापरत नाहीत कारण 'पत्ते म्हणजे जुगार' याविषयी सर्व शिक्षकांचं एकमत होतं.
जुगार ही वृत्ती आहे किंवा जुगार हा डोक्यात असतो आणि तो पत्ते नसताना ही खेळता येतो. आपण पत्यांचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते. ही वरवर साधी वाटणारी गोष्ट कुणालाच माहित नव्हती.
बदाम म्हणजे एकक,किलवर म्हणजे दशक व चौकट म्हणजे शतक असं जर आपण गृहित धरलं तर..815 ही संख्या कशी सांगता येईल? सोपं आहे,चौकट अठ्ठी,किलवर एक्का व बदाम पंजी ज्यांच्याकडे आहे ती मुले उभी राहतील. पत्ते हे अंकपत्ते आहेत असं समजलं तर त्यातून शिकवणं सोपं होईल.
प्रत्येक गोष्ट हेच शैक्षणिक साधन आहे. त्यामुळे पैसे खर्च करून नवीन काही करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आजूबाजूला जे काही उपलब्ध आहे त्याचा कल्पकपणे वापर करणं आणि त्याचा वापर करुन मुलांना शिकवणं नाही तर ते स्वत:हून शिकू शकतील यासाठी प्रोग्रॅम तयार करणं हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे! विश्वास ठेवा, त्या प्रशिक्षणात आम्ही सर्वांनी मिळून गणिताचे नवीन 19 खेळ तयार केले. हे खेळ सर्वजण मिळून आणि पत्ते वापरून खेळलो. त्यावेळी आमच्या बरोबर त्या 'सुसंस्कारी शिक्षिका' पण सहभागी झाल्या होत्या.
'शिक्षण-विचार' या विनोबांच्या पुस्तकात 'गुरुचा अधिकार : मार्गदर्शन' असा एक परिच्छेद आहे. तोच इथे मांडतो. 'एका प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ असा सर्वात जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश्न समोर उभा राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा घ्या. आज आपली स्थिती काय आहे? संपूर्ण नोकरीच्या काळात हजारो विद्यार्थी आपल्या हातातून पार होतात.आपण त्यांना शिक्षण दिले,संस्कार दिले यात शंका नाही. परंतु त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा घेतात. भावाचा किंवा मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ट मानला गेला पाहिजे. परंतु आज ही स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा आज वेगळे स्थान नाही.'
काही प्रमाणात हे आजचे वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण शिक्षकांचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे मत आणि त्यांचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! आपण आपल्यापासून सुरुवात करू. शिक्षकांसोबत मुलांच्या शिकण्याचा ध्यास घेऊ. मग काहीच अशक्य नाही! तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमचा विश्वास जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
मी तुमच्या ध्यास पत्रांची वाट पाहतोय.
- राजीव तांबे.
October 7, 2015
१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले.
June 8, 2024
१.‘कापसाला सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव देणार, उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकऱ्याना मिळतील, अच्छे दिन येणार’- प्रतप्रधान नरेंद्र मोदी, सोलापूरची सभा.
२.सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो’- राज ठाकरे, ९ ऑक्टोबर २०१४.
३.शेतमालाला भाव नाही, अस्मानी संकटात मदत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय- सेनेचे ट्विट दि. २० एप्रिल २०१४
मागील वर्षी लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाची ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांची व्यक्तव्ये.राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामेही चक्क कॉपीपेस्ट केल्यासारखे. आघाडी सरकारच्या काळात शेतमालाची एमएसपी किंवा हमीभाव दुप्पट केल्याचा दावा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होता. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के अधिकचा मोबदला मिळवून देण्याची घोषणा मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाने केली तर भाजपानेही हीच घोषणा करुन शेतकऱ्यांचा कैवार घेतला होता. अपुरा पाऊस, गारपीटीच्या माऱ्यातून सुटल्यानंतर हातात आलेल्या धान्याला कवडीमोलही किंमत मिळत नसल्याने दुष्काळाची भिषणता तर वाढतच आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना आत्महत्येच्या कडेलोटावर नेऊन ठेवत आहे.
मागील वीस वर्षात काही बदलले असेल तर फक्त खुर्चीवरची माणसे. दुसरीकडे शेती करणे आतबट्टयाचा व्यवहार होत गेला. पारंपारिक पिकांकडून शेतकरी नगदी पिकांकडे वळल खरा पण मका, कापूस, सोयाबीन यांच्या किंमतीतील हेलकावे सामान्य शेतकऱ्यांना पेलवले नाहीत. परिणामी एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादन खर्चही निघणार नाहीत असे भाव या कात्राीत शेतकरी सापडला. शेतमालाला हमी भावाएवढा दर मिळाव एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा पूर्ण होत नसल्याने शेतकरी आणखीच कंगाल होत चालला आहे.
महाराष्ट्र शासनाने २३ एप्रिल २०१५ रोजी राज्य शेतमाल भाव समितीचे रुपांतर कृषी मूल्य आयोगात करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत पीक उत्पादन खर्चाची आकडेवारी गोळा करण्यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा असावी यासाठी राज्य शेतमाल भाव समिती होती. राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या मदतीने मागणी व पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीची स्थिती, बाजारातील किंमतीमध्ये होणारे चढउतार, आदी विचारात घेऊन शेतमालाच्या किंमती समिती ठरवत असे. त्या आधारे केंद्र शासन राष्ट्रीय पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करुन जाहीर करत असे. राज्यातील शेतमालाल किफायतशिर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा असा दुहेरी उद्देश ठेऊन समितीचे रुपांतर राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आले.आयोग स्थापन्यामागचा सरकारचा उद्देश चांगला असला तरी शेतमालाच्या किंमती ठरवताना ग्राहकांचे हितच सरकारला सर्वोच्च स्थानी ठेवणे भाग आहे आणि ते प्रत्येकवेळी ठेवले जाते हे सिध्द झाले आहे. राज्यांनी सुचिवलेल्या हमी भावानंतर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग (कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कॉस्टस् अॅण्ड प्रायझेस) करत असला तरी या आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याचे बंधन केंद्र सरकारवर नसते. शेतकऱ्यांचा विचार केल्यास हमी भावाच्या निर्धारणावर आक्षेप नोंदवायचा असल्यास तशी व्यवस्थाही नाही.
आयात निर्यातीची धरसोड धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहेत. कांद्याचे कोसळणारे आणि वाढणारे याचाच परिणाम आहे. १९९८ ते २००३ या काळात देशात सुमारे १५ ते २० लाख गाठींची आयात दर वर्षी होत होती. परिणामी देशात कापसाचे भाव हमी भावापेक्षाही खाली कोसळले. महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार योजनेचा तोटा वाढत गेला अखेर ही योजनाच बंद झाली. साखर आयातीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले त्याचे थेट परिणाम ऊस दरावर झाला. चीन, पाकिस्तान, रशिया, अमेरिका या सर्वाधिक सोयाबीन उत्पादीत होते. आघाडी सरकारच्या काळात सोयाबीनवरील आयातशुल्क घटवण्यात आले त्यानंतर सोयाबीनच्या भावात झपाट्याने घट झाली. मका पिकाचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारावरच ठरतात शेतमाल ऐन बाजारात येत असताना
शेतमालाचे भाव पाडण्याचे चक्र वर्षानुवर्षे जसे सुरु आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास करुन शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारात केव्हा आणावा याचे ज्ञान त्यांना समजणाऱ्या भाषेत सांगणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.
शेतमालाला रास्त भाव मिळावा या एकाच मागणी भोवती शेतकरी चळवळी वाढल्या. या चळवळीतून सत्ताही प्राप्त झाली. तथापी मागील ३५ वर्षात ना शेतमालाला भाव मिळाला आहे ना भाव ठरवण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना महत्वाचे स्थान. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी साखळीचे हितसंबंध जपले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती ३० ते ३५ टक्केच मोबदला पडतो. स्वामिनाथन समितीने शेतमालाल भाव वाढवून देण्याची शिफारस केली होती प्रत्येक राजकीय पक्षाने स्वामीनाथन समितीच्या शिफारशीचा उल्लेख जाहीरनाम्यात केला. त्यात भाजपही होते आता त्याच पक्षाच्या सरकारने समितीच्या निकषाप्रमामाणे शेतमालाला भाव देणे शक्य नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाला लिहून दिले आहे यापेक्षा दुदैव ते काय म्हणावे.
-- प्रज्ञा देशपांडे
August 25, 2015
राधा.. ठाकूर बलदेवसिंगची विधवा सून.. लग्न होउन अजून अंगाची हळदही उतरली नव्हती.. तोवर तिच्या संसारावरच वीज कोसळली.. त्या राक्षसाकडून तिच्या सासरची सारी लोक मारली गेली.. त्यात तिचं कुंकू देखील पुसले गेले.. जन्मभरांच वैराग्य गाठीशी घेउन जगणं नशीबी आलं होतं तिच्या.. पण अशा वैराण वाळवंटात एक सुखद वा-याची झुळूक आली.. जय च्या रुपाने..
ठाकूरने गब्बरला जेरबंद करण्यासाठी आणलेली दोन माणसे.. त्या दोघातला हा शांत, संमजस, प्रेमळ तरुण.. दोघांची नजरानजर झाली..नजरा झुकल्या.. अनाहुतपणे त्यांचे समोर येणे, बोलणे होत गेले.. ती गार वा-याची झुळूक कुठे तरी आतपर्यंत तिला स्पर्शून गेली.. हे चूक आहे, समाज मान्य नाही, हे ठाउक असूनही.. दोघे नकळतपणे एकमेकांकडे आकर्षिले गेले.. वाळवंटातली ही हिरवळ सुखद वाटून गेली.. रोज संध्याकाळी सुर्य मावळताना तो तिथे बसायचा.. त्या आउटहाउसच्या पाय-यांवर.. रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळीही तो बसून असायचा.. आपल्या माउथ आॕर्गनवर तीच धून वाजवायचा.. त्याचवेळी राधा पहिल्या मजल्यावरच्या उभी असायची..
व्हरांड्यातले कंदील लावत असायची वा मालवत असायची.. जयच्या त्या धूनमधे एक अनाम वेदना होती..एक आर्त हाक होती..
ती हाक जणू राधासाठीच होती..तिचे काळीज विदीर्ण करायची.. पण समाजाच्या बंधनांना तोडून ती कशी जाणार..? पण..असेच होते सारे.. नजरेनेच केलेले प्रश्न..नजरेनेच दिलेली उत्तरे.. आणि ती काळजात आरपार जाणारी धून.. बस्स..एवढच त्या अबोल प्रेमाच्या नशीबी होतं.. कारण.. या कहाणीचा अंत आधीच ठरला होता.. जय शेवटी म्हणतो तसं.. 'हे कहानी भी अधूरी रह गई....'
'शोले' मधली जय-राधाची अधूरी राहून गेलेली ही प्रेमकहाणी.. समस्त भारतीय फिल्म प्रेमींची जणू दुखती रग आहे.. जयच्या मृत्युचा इतका त्रास होत नाही हो.. पण 'राधाला ही जन्मभराची शिक्षा का?' हा प्रश्न मात्र घोर लावून जातो.. राधा आणि जयचे या अबोल प्रेमाचे प्रतीक म्हणजे 'ती' धून. पंचमदा साठी ती वाजवली हार्मोनीका स्पेशालीस्ट भानू गुप्तांनी. भानूदांनी ही धून आपल्या हार्मोनीकाने अजरामर केलीय.. कश्मीर ते कन्याकुमारी कुठेही आर.डी. बर्मन नाइट असेल किंवा हार्मोनीका/माउथ आॕर्गन महोत्सव असेल..
गेला बाजार ट्रेन मधे, मेट्रोमधे, बसेस मधे... तुम्हाला कुठेना कुठे ही धून वाजताना दिसेल.. कुठेही ऐका.. पहिली लकेर येताच दाद घेणारी धून आहे ही.. आमिताभनी अलिकडे एका मुलाखतीमधे सांगीतले होते.. जय ती हार्मोनीका वाजवताना राधा दिवे मालवत जाते तो सीन.. परफेक्ट शाॕट साठी रमेश सिप्पी आणि सिनेमॕटोग्राफर व्दारका व्दिवेचा यांनी तब्बल तीन वर्षे वाट पाहिली...
त्यांना जो नैसर्गिक प्रकाश हवा होता त्यासाठी.. एका सीनसाठी केलेली किती ही धडपड..? पण म्हणूनच पहाना.. एक अजरामर सीन बनून गेला..!! या हार्मोनीका धूनला शोलेची 'लव्ह थीम' म्हणून संबोधले जाते.. पण मला वाटते ही खरे तर एक 'विरह थीम' आहे..
जय आणि राधा च्या अबोल प्रेमाचे ते सारे कंदिल दिवे.. हळू हळू मालवत जाणारी.. अन.. शेवटी राधा आणि तिचा विरह, एवढेच मागे ठेउन जाणारी..
-सुनिल गोबुरे
April 16, 2023
मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच.
December 15, 2017
प्रकाशन दिनांक :- 22/02/2004
भारतीय पुराणात सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे. बजरंगबली, अश्वत्थामा वगैरे मंडळींचा या सप्त चिरंजीवात समावेश आहे. पुराणकथांचे लेखन नेमके केव्हा बंद झाले ते माहिती नाही, परंतु ते आजतागायत सुरू राहिले असते तर त्यात आठव्या चिरंजीवी संकल्पनेची नक्कीच भर पडली असती.
February 22, 2004
मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा - राजाभाऊ बेहरे - यांचा फोन आला . " मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . "
बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , " मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . "
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .
कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .
पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .
त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .
या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )
--- पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .
त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .
पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )
तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .
त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ' आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .'
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .
पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .
आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .
आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
---------------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
August 12, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti