वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणा-या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव हार्ट फेल्युअर) होतो व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
हृदयविकार का होतो ?
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभा कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
- धूम्रपान करणे
- मधुमेह
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- उच्च कोलेस्टेरॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल
- शारीरिक श्रमाची कमतरता
- अनुवंशिकता
- तणाव, रागीटपणा आणि चिंता
- वंशानुगत मुद्दे
काय लक्षणे असतात ?
काही वेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यत:
- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे हीदेखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
- तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
- काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
हृदयविकार कसा ओळखला जातो ?
डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते.
छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अॅ्न्जियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑॅक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ढवळून अॅॅस्प्रीन द्यावे.
हृदयविकारावर काय उपचार असतात ?
हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. यात कोरोनरी अॅेन्जियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.
हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :
जीवनशैलीत परिवर्तन :
- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल - कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत असावे.
- वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
- शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
- धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
- मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कोलेस्टेरॉलपासून सुटका करायची असेल तर जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.
कोलेस्टेरॉलला चांगलं मानलं जात नाही, कारण आपल्यापैकी बरेच जण या कोलेस्टेरॉलचे बळी ठरतात. हो, कोलेस्टेरॉलचं वाढतं प्रमाण म्हणजे आजारपणाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात. पण खरा गुन्हेगार कोलेस्टेरॉल नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? हे लिपीड पित्ताशयात (लिव्हर) तयार होतं.
तसंच शरीराच्या अनेक प्रक्रियांमध्ये ते महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशींचे विसंवहन (इन्सुलेटिंग), पेशींना आकार देण्यात कोलेस्टेरॉल महत्त्वाची भूमिका बजावतं. हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल)ची पातळी घसरते तेव्हा समस्या सुरू होते, तर दुसरीकडे हृदयातील धमन्यांवर लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल) जमू लागते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदय तसेच रक्तवाहिकांचे आजार बळावतात.
याचा अर्थ आजार हे एलडीएलच्या उच्च पातळीमुळे आणि एचडीएलचा स्तर घसरल्याने होतात. कोलेस्टेरॉलमुळे नव्हे! हृदयरोग निर्माण होण्याचं हे एक मुख्य कारण आहे.
जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण देणारे अन्नपदार्थ ओळखता येतात आणि त्यांचे सेवन कमी करता येतं. कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या पातळीमुळे कोणत्याही शरीर प्रकारच्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट (संतृप्त मेद) आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळा. अनेक हवाबंद अन्नपदार्थ उदाहरणार्थ बटाटयाचे वेफर आणि बेकरी उत्पादने ज्यामध्ये मैद्यासारखे घटक वापरले जातात, त्यात तंतुमय घटक कमी असतात आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय कराल ?
» जेवणाकरिता वारंवार उकळवलेल्या तेलाचा वापर केल्यास ट्रान्स फॅटची पातळी वाढते.
» त्याचपद्धतीने लाल मांस, मलईयुक्त दूध उत्पादनं, तूप आणि खोबरेल तेलाचा वारंवार वापर केल्याने लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल)चं प्रमाण वाढतं. कारण त्यात संतृप्त मेद अधिक असतो. अशा प्रकारच्या सेवनावर मर्यादा आणून ताजे, प्रक्रियारहित अन्न आहारात घ्यावं.
» आपण नियमितपणे आपला आहार घेत असतो, मात्र काही जागरूक व्यक्तीच कोशिंबिरी आणि कच्च्या फळांचा समावेश आपल्या आहारात करतात. आपल्या नियमित आहारात मैदा, ब्रेड, पांढरा भात, बिस्किटांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाचा उपयोग कमीत कमी करणं महत्त्वाचं आहे.
» सालासकट असलेली धान्य, न सडलेली धान्य म्हणजे लाल तांदूळ, लाल पोहे, सालासकट असलेल्या डाळी इत्यादींचा जेवणात समावेश करावा.
» बदाम हा असा अन्नघटक आहे ज्यामुळे शरीरात हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल) कोलेस्टेरॉल वाढते. तसंच आहारात अळशीचा नियमित वापर केल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
» आणखी एक प्रभावी बदल म्हणजे संतृप्त मेद अधिक प्रमाणात असलेले पदार्थ म्हणजे बटर न वापरता कमी मेद असलेले पर्याय उदा. लो फॅट टेबल स्प्रेडचा वापर करावा. लो फॅट टेबल स्प्रेड हे आरोग्याला हितकारक असतात. टेबल स्प्रेडची निवड करताना न्यूट्रीशन फॅक्ट लेबलवर शून्य टक्के कोलेस्ट्रॉल आणि शून्य ग्रॅम ट्रान्स फॅट पाहा. तंतुमय घटकही दोन प्रकारचे असतात. एक विरघळणारे आणि दुसरे न विरघळणारे. तुम्ही आहारात विरघळणा-या तंतुमय घटकांचा समावेश करा. या दोन्ही घटकांचे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधिक आहे. परंतु, विरघळणारे घटक कमी एलडीएल पातळी राखण्यास मदत करतात.
» ओट्स, ओट्सचा कोंडा, कडधान्य, डाळी आणि भाज्यांचा तुमच्या नियमित आहारात समावेश करा.
» आहारात कायम तेलाचा वापर कमी ठेवा. मग ते फिल्टर तेल असो किंवा रिफाईन. कारण रिफाईन तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि फिल्टर तेलावर यांत्रिक.
» आहारात सुका मेवा प्रामुख्याने पिस्त्यांचा समावेश करा. डायबेटीज फाऊंडेशन ऑफ इंडिया (डीएफआय) अँड दी नॅशनल डायबेटीज, ओबेसीटी अँड कोलेस्ट्रॉल फाऊंडेशनच्या पाहणीनुसार पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ते नसíगकरित्या कोलेस्ट्रॉलमुक्त असतात. त्यात प्रथिने, तंतुमय घटक आणि अॅोन्टीऑक्सिडंट घटक विपुल प्रमाणात असतात. या घटकांमुळे पिस्त्यांचे सेवन स्थूलतेची भीती असणा-यांसाठी आणि हृदयरोग्यांकरिता अतिशय उपयोगी ठरते.
» याशिवाय साली-कोंडयांसकट असलेली धान्यं, प्रक्रियारहित अन्न, फळे आणि भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नियमित करावा.
» अळशी, सूर्यफूल बिया आणि चरबीयुक्त मासे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदतीचे ठरतात. अधिक प्रमाणात मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ न घेता कमी प्रमाणात मेद असलेले पदार्थ वापरावेत.
» नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. नियमित साधे चालणे, सायकल चालविणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळल्याने मदत होऊ शकते.
» लिफ्ट, एलिवेटर न वापरता पाय-यांचा वापर करावा.
» टीव्ही पाहताना अधे-मधे केलेली ऊठबस फायदेशीर ठरू शकते.
» तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात असू द्या. त्याची काळजी केवळ तुम्हीच घेऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अर्चना रायरीकर /प्रहार
अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.
नंबरांचे वर्गीकरण
चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
ऱ्हस्व दृष्टिदोष - अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.
काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.
जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.
डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.
दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे - डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.
प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.- संतोष शेणई
मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत.
घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार
रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात.
जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.
कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे, यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.
टाकळ्याचे बी चावून खाऊन वरून एरंडेल घेतल्यास जंत पडतात.
ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.
कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.
डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या् प्रमाणात घेतले तर जंतांची प्रवृत्ती कमी होते.
शेवग्याच्या शेंगा उत्तम कृमिनाशक असतात. शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ.मधुरा भिडे
केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.
तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य
- खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.
प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.
१५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.
थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.
मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.
अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.
१५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
फीट्स, मिरगी, आकडी, फेफरं या नावानं ते ओळखलं जातं. इंग्रजीत मात्र त्याला एकच शब्द आहे, एपिलेप्सी. खरं तर हा एपिलेप्सी किंवा फीट्स येणं हे काही व्यंग नाही. तसंच हा आजारही नाही. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते.
ब्लडप्रेशर, मधुमेह, अॅसिडिटीसारखे आजार जसे असतात, तसंच हे. नियमित औषधोपचार घेतल्यास या फीट्स येण्यावर नियंत्रण मिळवून एक उत्तम आयुष्य जगता येतंच!
मात्र आपल्याकडे अजूनही या फीट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर मूल बेशुद्ध पडते किंवा डोळे फिरवते. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. मेंदूकडे पोहोचणाऱ्या संवेदना काही वेळासाठी यात खुंटतात, त्यामुळे यावेळी मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. काहीवेळा तापाचे प्रमाण वाढल्याने फेफरे येतात. हा काळ पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतका असतो.
लक्षणे
पहिल्या टप्प्यांत चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, शरीर सैल पडणे अशी लक्षणे जाणवतात फेफरे किंवा फिट येण्याच्या टप्प्यांत काही तीव्र संवेदना कारण ठरू शकतात.
मेंदूमधील कंपनांमध्ये किंवा कामात अडसर निर्माण होणे.
खूप ताप, अचानक वाढलेला रक्तदाब वा मधुमेह
अतिनैराश्य
रक्तदाबाचे प्रमाण खाली जाणे.
चक्कर येऊन आदळल्याने शरीर सैल पडणे
श्वसनाचा वेग मंदावणे
रुग्णांची प्राथमिक काळजी काय घ्यावी.
फिटस् येत असतील तरी सतत या आजाराच्या दडपणाखाली राहू नये. दुखापत होईल, असे काम हाती घेऊ नये, उदा. विस्तवाजवळ काम करणे, उंचावर चढणे, जोरात वाहन चालवणे
डोळ्यावर तीव्र प्रकाशझोत येईल अशा ठिकाणी काम करणे टाळावे.
औषधोपचार सुरु असतील तर त्यात खंड पाडू नये.
प्राणायाम, योगा या सारख्या वेदनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या थेरपीज् महत्त्वाच्या असतात. त्यांचा वापर करावा. हा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये औषधांनी थोडी झोप येते. पण, त्यामुळे औषधे बंद करू नयेत.
फिटस् रोखण्यासाठीचे उपचार
फीट आली तर रुग्णाच्या तोंडाजवळ चप्पल सरकवली जाते. ही अतिशय चुकीची कल्पना आहे. दातामध्ये पट्टी, चमचा किंवा कपडा सरकवण्याचा प्रयत्न केला तर इजा होऊ शकते. रूग्णाला दाबून धरले तरी त्याला इजा होते.
रुग्णाला कुशीवर झोपवावे, त्याची लाळ गळू द्यावी. त्यानंतर, रुग्णाला धीर द्यावा. फीट आली असता नाकात उग्र वासाचे वेखंड फुंकावे पण ते नाकात जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते नसल्यास मिठाच्या पाण्याचे एक-दोन थेंब त्यावेळी नाकपुडीत सोडावेत. लगेच करायचा उपाय म्हणून त्याचा उपयोग होतो. या रुग्णांना मानसिक आधार देणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
नैराश्यामुळे फिटस् येण्याचे प्रमाण वाढू शकते. सकस पोषक आहार, नियमित व्यायाम, मोकळ्या हवेतला वावर वाढवल्याने फिटस् येण्याचे प्रमाण निश्चितच कमी करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा
काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या असतात.
अॅपल शेप (सफरचंदाचा आकार)
या आकाराचे शरीर चारही बाजूंनी गोलाकारात पसरलेले असते. हा आकार अनुवांशिक असतो आणि यामध्ये छाती आणि खांदे रुंद असतात. याउलट कमरेच्या खालच्या भागात म्हणजेच पायांमध्ये कमी चरबी असते. तज्ज्ञांच्या मते, या शरीराच्या आकारात बॅली फॅट कमी करण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागते; परंतु खाली दिलेल्या टिप्सच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
• जर तुमचे आतडे अधिक संवेदनशील असतील तर अल्कोहोलचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्हाला ही सवय सोडून द्यावी लागेल. अशा स्थितीत झोपेशी संबंधित समस्या वाढायला लागतात.
• या आकारासाठी प्रोबायोटिक फूड अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फॅट कमी असतात पोषक द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटही साफ होते.
• भरपूर पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहील. तसेच शरीरात भरपूर पाणीही राहील. डायट, सोडा यासारख्या काबरेनेटयुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कारण यामुळे पोट फुगते.
बनाना शेप (केळीचा आकार)
केळीच्या आकाराचे शरीर असलेले लोक हडकुळे आणि उंच असतात. या लोकांनी काहीही खाल्ले तरी त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम होत नाही. तसेच या लोकांचे स्नायूही अत्यंत कमी असतात. या लोकांनी योग्य आहार घेतला नाही तर त्यांना लवकर थकवा येतो. त्यामुळे त्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.
• स्नायू वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. ग्रिल्ड चिकन, उकडलेली अंडी यांचा आहारात समावेश करावा.
• या आकाराच्या लोकांनी आपल्या भोजन पद्धतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. रक्तात साखरेचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, अशा लोकांचे वजनही लवकर वाढत नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.
• आरोग्यदायी मेद/ प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पॉपकॉर्न, बदाम, दही आणि अँव्होकॅडो यासारख्या फळांचे सेवन करावे.
पीअर शेप (नाशपाती फळासारखा आकार)
पेरूसारखे दिसणार्या नाशपाती या फळासारखा आकार असणार्या लोकांचे शरीर वरच्या बाजूने अरुंद आणि कमरेच्या खालच्या बाजूने रुंद असते. अशा लोकांचे जेव्हा वजन वाढते तेव्हा पोटाच्या खालचा भाग, कंबर आणि मांड्या जड व्हायला लागतात. मेदयुक्त दुग्धजन्य उत्पादने आणि गोड पदार्थ ही या लोकांची कमकुवत बाजू आहे. अशावेळी या लोकांना खालील उपाय करायला पाहिजेत.
• आइस्क्रीममध्ये मेद आणि साखर जास्त असते, त्यामुळे याऐवजी कमी गोड असलेल्या फ्रोजन योगर्ट यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.
• दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. एक औंस चीजमध्ये 100 कॅलरी आणि आठ ग्रॅम फॅट असते.
त्यामुळे याचे सेवन कमी फॅट असलेल्या क्रॅकर्ससोबत केले जाऊ शकते.
• अपचन होईल अशा पदार्थांपासून दूरच राहावे. दिवसातून किती वेळा जेवण करता, याकडेही लक्ष ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३१७३३
संदर्भ.इंटरनेट
साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये १८-२० वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही. अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते, असा अनुभव आहे. व्यक्तितमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उंची. अर्थात शरीरबांधा आणि उंची यांचा समतोल असला, तरच उंची शोभून दिसते. शरीर सात धातूंपासून बनलेले आहे, हे आपण जाणतो. यातील अस्थी धातूवर म्हणजेच हाडांवर उंची अवलंबून असते व ती शोभून दिसण्यासाठी मांस-मेद धातूंना व्यवस्थित पोषण मिळण्याकडेही लक्ष ठेवावे लागते.
प्रकृति परीक्षणामध्ये उंची हा मुद्दा महत्त्वाचा असतो. वातप्रकृतीच्या व्यक्तीं सहसा एक तर फार उंच व बारीक तरी असतात किंवा फार बुटक्या व अनियमित शरीरठेवणीच्या असतात. पित्तप्रकृतीच्या व्यक्ती साधारण मध्यम उंचीच्या व मध्यम बांध्याच्या असतात, तर कफप्रकृतीच्या व्यक्तीक धिप्पाड, उंचीच्या मानाने वजन जरा जास्ती असणाऱ्या असतात. उंचीवर प्रकृतीइतकाच आनुवंशिकतेचाही प्रभाव असतो, तसेच लहानपणापासून धातुपोषणाकडे लक्ष देण्याचाही उंची वाढण्यावर परिणाम होत असतो.
साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये १५-१६ वर्षांनंतर व मुलांमध्ये १८-२० वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही.
अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते असा अनुभव आहे.
गर्भधारणेच्या काळात गर्भवतीने लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये व नैसर्गिक स्वरूपात सेवन करणेही उंचीच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली औषधे आतमध्ये हाडांपर्यंत तसेच हाडांचे पोषण करणाऱ्या मज्जेपर्यंत पोचू शकतातच असे नाही, त्यापेक्षा नैसर्गिक अन्न व औषधातून ही तत्त्वे शरीरात सहजपणे स्वीकारली जातात व त्यामुळे उंची नीट वाढण्यास, एकंदरच सर्व शरीराचे पोषण होण्यास मदत मिळते.
उंचीला पूरक उपाय
जन्मानंतरही वाढत्या वयात आहारात दूध, घरी बनवलेले साजूक तूप, लोणी, पंचामृत, गहू, खारीक, खसखस, बाभळीच्या डिंकाची लाही या सर्व गोष्टी असल्या तर त्यामुळे उंची नीट वाढण्यास मदत मिळू शकते. उंचीला पूरक असे साधे, पण प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील -
•सकाळी व संध्याकाळी कपभर गरम दूध खारकेचे चूर्ण टाकून घेणे. तसेच सर्व धातुपोषक औषधद्रव्यांपासून तयार केलेला "शतावरी कल्प' किंवा "संतुलन चैतन्य कल्प' दुधात टाकून घेणे.
•रोज सकाळी एक-दोन चमचे घरी बनवलेले ताजे लोणी साखर टाकून घेणे.
•आहारात रव्याची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, गव्हाची खीर यांचा अधूनमधून समावेश असणे.
•डिंकाची लाही, खारीक, बदाम वगैरे शक्तिवर्धक व हाडांना पोषक द्रव्यांपासून तयार केलेला डिंकाचा लाडू किंवा अश्व गंधा, मुसळी वगैरे घटक असलेले "मॅरोसॅन' हे रसायन सेवन करावे.
•वात संतुलन करणाऱ्या व धातुपोषण करणाऱ्या औषधांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे.
•प्रकृतीचा विचार करून दिलेल्या मोती भस्म, प्रवाळ भस्म, शौक्तिक भस्म वगैरे औषधांचाही वयाच्या मर्यादेत उंची वाढवण्यासाठी चांगला उपयोग होताना दिसतो, यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्यय घ्यावा.
हाडे करा बळकट
तारुण्यावस्थेत पोचेपर्यंत जी उंची वाढते, ती नंतर वाढत्या वयानुसार म्हणजे साधारणतः चाळिशीनंतर थोडीशी कमी होऊ लागते. याचे कारण असते वयानुसार हाडांची थोड्या प्रमाणात झीज होणे, विशेषतः पाठीचे मणके झिजणे. त्यामुळे पस्तिशीनंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवले, पाठीच्या कण्याला कुंडलिनी तेलासारखे तेल लावण्याची सवय ठेवली तर वयानुसार उंची घटण्याचे प्रमाण कमी करता येते. लहानपणापासून ताठ बसण्याची, ताठ उभे राहण्याची सवय सुद्धा उंचीसाठी पूरक असते. लहानपणापासून योगासने, सूर्यनमस्कारांचा सराव केल्याने सुद्धा शरीराच्या एकंदर परिपूर्ण वाढीला पाठबळ मिळते, उंची वाढण्यास कारणीभूत संप्रेरक स्रवण्यास उत्तेजना मिळू शकते.
दोरीवरच्या उंच उड्या, सिंगल बार, डबल बार म्हणजेच लटकण्याचे व्यायाम उंची वाढण्यास उपयोगी असतात. याखेरीज उंची वाढण्यासाठी सहायक म्हणून योगासने व संतुलन क्रियायोग करावेत.
स्थैर्य
स्थैर्य क्रियेच्या अभ्यासाने मानेला व पाठीला व्यायाम मिळतो व मेरुदंड लवचिक होतो, पिच्युटरी ग्रंथी कार्यान्वित होते, पचनक्रियेत सुधारणा होते. तसेच दीर्घ व लांब श्वाचसोच्छ्वास करायची सवय लागते. या क्रियेच्या अभ्यासाने सजगता वाढते व व्यक्तीला स्थैर्य मिळते.
•ही क्रिया जास्तीत जास्ती सात वेळा करावी.
•दोन्ही टाचांमध्ये सुमारे १५-२० सें.मी. तर दोन्ही चवड्यांमध्ये २५-३० सें.मी. अंतर ठेवून ताठ उभे राहावे. हात शरीरालगत सरळ ठेवावेत व हाताच्या मुठी वळलेल्या असाव्यात.
•पाय जमिनीवर घट्ट रोवावेत.
•श्वाजस आत घेत, दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवर उभे राहावे. टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे, अशी कल्पना करावी.
•पोट आत व वर ओढून श्वावस आत कोंडून धरावा. या वेळी लक्ष सहस्राधार चक्रावर केंद्रित करावे. शक्यप तितका वेळ या स्थितीत राहावे.
•श्वास हळू हळू बाहेर सोडत, पोटावरचा ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवत खाली यावे.
विस्तारण
या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. कंबरेच्या भागाला बळकटी येते, वायू सहजपणे सरायला मदत होते, तसेच पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो. मेंदूला उत्तेजना मिळते, संवेदनशीलता वाढते, विस्तार व बदल या दोन मूलभूत गोष्टींची पूर्तता होते.
ही क्रिया पुढीलप्रमाणे करता येते-
•वज्रासनात बसावे, पुढे वाकून पोटावर झोपावे. दंड जमिनीला लंब ठेवून कोपरे जमिनीला टेकवावेत, तर्जनी कानाच्या मागे व उरलेली तीन बोटे गालावर ठेवून दोन्ही हात असे ठेवावेत की हनुवटी तळव्यांना चिकटलेली नसेल. दृष्टीसमोर असावी. स्नायूवर ताण येऊ न देता डोळे वटारल्यासारखे मोठे करावे.
•तोंडाचा मोठा आ करावा. या वेळी अजगर जणू आपले भक्ष्य आकर्षून घेत आहे अशी कल्पना करावी.
•सावकाशपणे एका संथ लयीत श्वास घ्यावा व सोडावा आणि असे करताना श्वारस आत घेतल्याचा व बाहेर सोडल्याचा फुसकारल्यासारखा आवाज यावा, अशी १०-१२ (सुमारे एक मिनिट) आवर्तने करावीत.
•श्वाहसोच्छ्वास पूर्ण झाल्यावर कुठल्या बाजूच्या नाकपुडीने श्वास चालू आहे हे पाहावे.
•ज्या बाजूच्या नाकपुडीने श्वाणस चालू आहे ती नाकपुडी वरच्या बाजूला येईल अशा तऱ्हेने डोके जमिनीवर ठेवावे. हात कोपऱ्यातून काटकोनात वाकवून डोक्यारच्या दोन्ही बाजूला ठेवावे, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले असावे, पाय शिथिल असावेत.
•डोळे बंद करून शरीरातील सर्व अवयवात प्राणशक्तीचा संचार होत आहे, अशी कल्पना करावी व हळूहळू सर्व शरीर शिथिल करावे. या वेळी आपल्या शरीराचा विस्तार झाला आहे असा अनुभव येतो.
•थोड्या वेळाने डोळे उघडून वज्रासनात यावे व नंतर उभे राहावे.
धनुरासन
या आसनाच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याची व पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते व मज्जातंतूंना बळकटी मिळते. भुजंगासन व शलभासन या दोन्ही आसनांचा यामुळे लाभ होतो.
•पोटावर झोपावे, पाय एकमेकाला जुळलेले असावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला असावेत. कपाळ जमिनीला टेकलेले असावे.
•पाय गुडघ्यात वाकवून पायांच्या टाचा नितंबाजवळ आणाव्यात.
•दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवून हातांनी पायाचे घोटे पकडावेत. घोटे पकडताना हाताचे अंगठे आतल्या बाजूला व इतर चार बोटे बाहेरच्या बाजूला असावीत. तसेच दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टेकलेले असावेत.
•पाय व डोके हळूहळू जास्तीत जास्ती वर उचलावे, हात कोपरात सरळ असावेत.
•स्थितीत संपूर्ण शरीराचा भार नाभीभोवतीच्या भागावर येईल. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे.
•हातांनी पकडलेले घोटे साडून दोन्ही हात, छाती व डोके जमिनीला टेकवून पूर्वस्थितीला यावे. पोटावर थोडा वेळ आरामात झोपून राहावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे ?
अनेकांच्या दिवसाची सुरवात कपभर चहाने होते. आरोग्यासाठी प्रमाणात चहा पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्य सुधारायला मदत होते. त्यामध्ये गवती चहा, चक्रफूल असे मसाल्याचे पदार्थ मिसळून आस्वाद आणि आरोग्यदायी फायदेदेखील वाढवता येतात. पण केवळ दिवसातील दोन कप चहाने शरीराला आवश्यक फायदे होतात का ? तसेच दिवसातून नेमका किती कप चहा पिणे योग्य आहे अशा सार्याफ प्रश्नांना आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी दिलेली उत्तरं नक्की पहा. वजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’ हे देखील अवश्य जाणून घ्या.
दिवसाला 3-4 कप चहा पिणेच आरोग्यदायी आहे. युनिव्हरसिटी ऑफ मेरीलॅंड मेडीकल सेंटरच्या जर्नलमधील अहवालानुसार 4 कप चहातून शरीराला आवश्यक कम्पाऊंड्स मिळतात. मात्र त्याहून अधिक चहा पिणे शरीराला त्रासदायक ठरू शकतो.
कॅफीनच्या सेवनाचा तुम्हांला त्रास होत असल्यास छातीत जळ्जळ होणे, मन अस्वस्थ्य होणे, चिडचिड होणे, हृद्याचे ठोके वाढणे, निद्रानाश होणे, सतत गोंधळ होण्याची शक्यता वाढते.
चहाच्या अतिसेवनामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
चहा अतिप्रमाणात प्यायल्यास युरीनमधून कॅल्शियम निघून गेल्याने हाडं ठिसूळ होतात.
चहातील टॅनिनिस घटक फॉलिक अॅ्सिड शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. यामुळे बर्थ डिफेक्ट्स होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर चहाने सेवन नियंत्रणात ठेवा.
चहामुळे शरीरात आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. त्यामुळे जेवताना चहा पिणे किंवा जेवणानंतर लगेचच चहा पिणे टाळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हणता येईल. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
दमा हा शब्द ऐकताच अनेक रुग्ण जरा घाबरतातच. लहान मुलांचे आईवडील तर चिंतेतच पडतात. माझ्या वीसेक वर्षांच्या अनुभवात असे आढळून आले आहे की दमा हे निदान झाल्यावर त्याचा स्वीकार करण्यास रुग्ण नाखूश असतात. बरेचदा डॉक्टर्सही मग त्याला दमा न म्हणता ‘अॅलर्जीक आँगकायटीस’ या नावाचा ‘गोंडस पर्याय’ शोधतात. पण जर खरंच दमा असेल तर अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर ताबा मिळवणे कष्टप्रद असले तरी प्रयत्न साध्य आहे. मात्र पूर्वअट अशी की निदान स्वीकारणे अपरिहार्य आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊ की दमा म्हणजे नक्की काय?
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. या कणांमध्ये परागकण, विविध प्राणी वा सूक्ष्म कीटकांच्या अंगाचे कण, वायू प्रदूषणाचे कण असे अनंत प्रकार असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होते. या अॅलर्जीमुळे त्यांच्या श्वासनलिका एकाएकी अरुंद होतात आणि हवा आत तर येते पण बाहेर जायला अडथळा येतो. श्वास सुई सुई वाजतो. खोकला येतो. छाती भरते. उठून बसावंसं वाटतं. कपडे सैल करावेसे वाटतात. बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हणता येईल.
असे झाले तर यावर तात्पुरता उपाय म्हणजे श्वासनलिका उघडतील असे औषध घेणे. अस्थालीन, लेव्हीलीन सारखी औषधे (इनहेलर्स) हे काम चटकन करतात आणि स्वस्त असल्यामुळे या औषधांचा रुग्णांमध्ये खूपदा अतिवापर केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वासनलिकांना प्रत्येक आकुंचनानंतर एक विशिष्ट अॅलर्जीक सूज येते आणि कालमानाने ही सूज वाढतच जाते. ज्यांना हंगामी (Seasonal) दमा असतो त्यांना त्या काळात (उदाहरणार्थ काँग्रेस गवताला फुलोरा आल्यानंतर) ही सूज खूपच तीव्र होते आणि मग अॅटॅक्स वारंवार आणि जास्त जोराचे येतात. साहजिकच आहे की तात्पुरत्या औषधांनी (वर उल्लेख केलेल्या) ते बरेही होत नाहीत.
थोडक्यात म्हणजे अॅलर्जीक सूज कमी करणे हा दम्यावर ताबा मिळवण्याचा खराखुरा उपचार आहे. स्टेरॉईडसच्या गोळय़ा किंवा इंजेक्शने हे काम उत्तम करतात. वाय सोलोन, डेक्सोना अशी औषधे वापरल्यास अॅटॅक चटकन आटोक्यात येतो. जीव वाचवण्यासाठी ही औषधे डॉक्टर्स ‘शॉर्ट कोर्स’ (काही दिवस उपचार) म्हणून रुग्णांना देतात. पण आपण जाणतो की पोटात जाणारी स्टेरॉईडची गोळी ही आयुष्यभर घेणे नक्कीच असुरक्षित किंवा धोकादायक आहे. पण मग असे औषध फक्त श्वासनलिकेत सोडले तर? दम्यावरील उपचारांमध्ये आज सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजे श्वासावाटे जाणारे स्टेरॉईड. ज्याला इनहेल्ड स्टिरॉईड्स (Inhaled steroid) म्हणतात. मंडळी हे औषध शंभर टक्के सुरक्षित तर आहेच पण नियमित वापराने ते श्वासनलिकांची सूज कमी करते आणि अॅटॅक्स पूर्णपणे थांबवते. इनहेलर स्टेरॉईड आणि श्वासनलिका उघडून धरणारी अशी दुहेरी औषधे एकाच इनहेलर पंपामध्येही मिळतात आणि या औषधांचा योग्य आणि नियमित वापर ही दम्याच्या रुग्णाला नवसंजीवनीच आहे.
या वेळी प्रश्न असतो, कुठल्या रुग्णाला किती डोस द्यायचा? हे कसे ठरवायचे यासाठी आज मेडिकल तंत्रज्ञानाचा एक छोटेखानी चमत्कार उपलब्ध आहे. त्याला म्हणतात स्मायरोमेही अर्थात फुप्फुस क्षमता चाचणी. डॉक्टराच्या क्लिनिकवर वीस मिनिटांत आणि काही वेळा जोराने फुंकर मारून आपली फुप्फुस क्षमता आणि दम्याचा पक्का पुरावा मिळतो, तीव्रतेचा पूर्ण अंदाज येतो आणि श्वासावाटे घेतले जाणारे औषध श्वासनलिका उघडते की नाही (reversibility) यांचाही पूर्ण पडताळा मिळतो. जसे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह मोजून उपचार करतात तसेच आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे दमा मोजून उपचार करू शकते. त्याचप्रमाणे कालांतराने परिस्थिती सुधारली किंवा बिघडली तर पुन: पुन्हा मोजून डॉक्टरांना डोस अॅडजस्टही करण्याची सोय उपलब्ध होते.
या पलीकडे जाऊन श्वासावाटे घेण्याच्या औषधांचे कुठले उपकरण वापरावे याचे काही संकेत आहेत. सौम्य दमा असेल तर रोटाकॅप्स जरूर वापरता येतात. पण मध्यम ते तीव्र आजार, लहान मुले, म्हातारी माणसे यांना स्पेसर वाटे आणि एम.डी.आय. (पंप) असे औषधे देणे सोपे आणि योग्य आहे. खूपच छोटे बाळ असेल तर बेबी मास्क स्पेसर आणि एम.डी.आय. इनहेलरचा वापर करता येतो. आपण जर दमेकरी असाल किंवा आपल्या बाळाला दमा असेल तर पुढील काळजी घ्या.
१) वातावरणातील बदल- घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्या वेळी धूळ उडणार नाही अशा पद्धतीने साफसफाई करा.
२) कुठलाही धूर निर्माण करताना विचार करा. उदबत्ती, कासव छाप यांमुळेही दमा बळावू शकतो.
३) कुठलीही फवारणी पेस्ट कंट्रोल, बेगॉन स्प्रे अगदी सुगंधी परफ्युम्स वापरतानाही विचार करा. शक्यतो दमेकरी माणसाने त्यावेळी तिथून दूर असले पाहिजे.
४) रंगकाम-फर्निचर काम सुरू असताना दमेकऱ्यास दूर ठेवा.
५) अनेकदा आपल्याला बेड माईट्सची अॅलर्जी असू शकते. याचा संपर्क टाळण्यास गाद्या व उशांना प्लास्टिक कव्हर घाला. आपल्या चादरी व पांघरुणे सुती कपडय़ांचीच वापरा.
६) घरामध्ये कुत्रा, मांजर असेल तर त्याची अॅलर्जी निर्माण होऊ शकते. डॉक्टरांशी बोला व निर्णय घ्या.
७) सर्वात महत्त्वाचे दम्याच्या आजाराचे निदान होत असेल तर त्याला सामोरे जा.
८) फुप्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा.
९) डॉक्टरांनी दिलेलेऔषध नियमित वापरा.
१०) उपकरण वापरण्याचे तंत्र समजून घ्या. डॉक्टरांना फॉलो अप देताना आपण औषध कसे वापरतो आहोत ते दाखवा.
११) कुठल्याही परिस्थितीत नियमित वापराचे औषध बंद करू नका. नेहमी परिस्थिती आणीबाणीची असल्यासारखे वागा.
१२) अनेकदा दम्याबरोबर अॅलर्जीक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टर देऊ शकतात. याचाही वापर नियमित करा.
दमेकऱ्यांसाठी सूचना-
*बदलत्या हवामानात, ढगाळ वातावरणात दमा बळावू शकतो. या काळात डॉक्टरांना भेटून डोस वाढवण्याची गरज लागू शकते.
* धूम्रपान आणि दमा म्हणजे आगीत तेल ओतणे आहे हे नक्कीच टाळा.
* अन्नपदार्थाची अॅलर्जी ही खूपच कमी वेळा दम्याशी संबंधित असते. आपल्याला जाणवल्यास हे डॉक्टरांशी बोला. विविध वातावरणात जर पुन:पुन्हा आणि तीव्र रिअॅक्शन आली तरच अन्नपदार्थाची अॅलर्जी आहे असे माना.
* आहारामध्ये विनाकारण बंधने घालू नका. लिंबू नाही, ताक नाही, दही नाही, फळे नाहीत असा नन्नाचा पाढा या गोष्टींची खरीखुरी अॅलर्जी नसताना आपल्या मुलांवर लादू नका.
*अन्नपदार्थाची अॅलर्जी लिस्ट- तशी मोठी आहे, पण ही अॅलर्जी दुर्मीळ असते. त्यामुळे मुद्दामच लिस्ट देत नाही. त्यातल्या त्यात विविध नट्स आणि समुद्री (sea food) खाद्यपदार्थ लक्षात ठेवायला हरकत नाही.
* बाल दमा आपोआप नाहीसा होईलच हे सत्य नाही. रुग्णाचा अॅलर्जीकारक वस्तूंशी संपर्क आणि त्याला मिळणाऱ्या औषधांचा प्रभाव यातून आजार कितपत ताब्यात येतो, यानुसार त्याचे भवितव्य ठरते.
* हंगामी दमा (seasonal asthma) हा ठरावीक कालावधीत (ऑगस्ट-सप्टेंबर) बळावू शकतो आणि उन्हाळय़ात रुग्ण एकदम नॉर्मल राहू शकतो.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य उपचार न मिळाल्याने दमा बळावतो, जुनाट होतो आणि हळूहळू श्वासनलिकांत कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. मग हा आजार सा.ओ.पी.डी. या जास्त दुर्धर आजारात रुग्णांतरित होतो. ज्यामुळे आयुष्यमान कमी होण्याचा धोका वाढतो.
* व्यायामाचा योग्य उपयोग जरूर करावा काही व्यक्तींना exercise induced asthma म्हणजे व्यायामाने बळावणारा दमा असतो. या माणसांनीसुद्धा व्यायाम सोडणे योग्य नाही. योग्य उपचारांनंतर व्यायाम पूर्ववत करता येतो. फ्लोरेन्स ग्रिफिथ जॅकजॉयनर हिने पाच ऑलिंपिक मेडल्स जिंकली ती दमेकरी होती. यावरून सत्य लक्षात येईल.
* अॅस्थिरिन, ब्रुफेन यांसारख्या वेदनाशामक औषधांनी दमा बळावू शकतो. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. नीतिन अभ्यंकर
Copyright © 2025 | Marathisrushti