वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः ।
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥
आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते.
आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही दृष्टी अमृताने भरलेली आहे.अर्थात ज्याच्यावर हा दृष्टिपात होतो त्याला अमृत प्राप्त होते. अमृत स्वर्गात असते. म्हणजे जणूकाही त्या साधकाला या जगातच स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.
लक्ष्मीस्वयंवरण- आईच्या दृष्टीचे वैभव म्हणजे ती ज्याच्यावर पडते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःच धावत येते. जगात बाकी सगळ्यांना लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मात्र आई जगदंबेच्या कृपा पात्र साधकाला या जगातील सर्व सुखे आपोआप
बसल्याजागी मिळतात. हे आचार्य कथन किती सुंदर आहे?
मंगलदीपिकाभिः- आईची दृष्टी मंगलाची दीपिका आहे. दीप प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करतो. तो नसला तर समोर असलेली गोष्ट ही अंधारात दिसत नाही. तो असला की सर्वत्र लख्ख दिसू लागते. तशी आईची कृपादृष्टी प्राप्त झाली की सर्वत्र मंगलच मंगल दिसू लागते. अमंगलाचा अंधार दूर होतो.
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ- हे आई जगदंबे एकदा तुझा चरणकमलांची सेवा करण्याला सुरुवात केली की मग त्या सेवेने,
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम्- त्या भाग्यवान जणांच्या मनामध्ये असलेले काय होत नाही? अर्थात त्यांच्या मनात जे जे येईल ते पूर्ण सफलच होते.
अशी आईची सेवा करणाऱ्या साधकाला आचार्य भाग्यवंत म्हणत आहेत.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ ।
सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य
त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥
अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात,
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात,
त्वद्वन्दनॆषु - तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनी माझे नेत्र स्थगित होतील, अर्थात यामुळे मला दिसणे बंद होईल.
ज्यावेळी असा साधक आईची चरण वंदना करण्यासाठी वाकेल त्यावेळी डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंनी त्याला ती चरणकमले देखील दिसणार नाहीत. त्यावेळी त्याची प्रार्थना आहे की,
उद्यत् - उगवणाऱ्या
अरुण- सूर्य सारथी, प्रभातीचा लालिमा.
अयुत- कोट्यावधी
सॊदरस्य- समान.
अर्थात प्रभाती पसरलेल्या अरुणोदय कालीन लालिम्याच्या कोट्यावधी पट अधिक तेजस्वी असलेल्या,
परया सुधयाप्लुतस्य- परम म्हणजे श्रेष्ठ सुधा म्हणजे अमृताने अर्थात आनंदाने प्लुत म्हणजे परिपूर्ण भरलेल्या.
त्वद्विग्रहस्य सान्निध्यम् - तुझ्या विग्रह म्हणजे स्वरूपाचे, सान्निध्य म्हणजे जवळीक, मला प्राप्त होवो.
अर्थात ज्या वेळी मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझी चरणकमले मला दिसणार नाही, त्यावेळी हे आई जगदंबे ! मला दिसत नसले तरी, तुझ्या शिवाय मला कोणीही नाही हे, तुला दिसत असल्याने तू दूर जाऊ नकोस.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥
आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,
ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति
ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.
अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.
अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनंकारुण्यकन्दलित कान्तिभरं कटाक्षम् ।
कन्दर्पकॊटिसुभगास्त्वयि भक्तिभाजः
सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयॆऽपि ॥ ४ ॥
खरी बुद्धिमत्ता ती जी इतरांना बुद्धी संपन्न करते. खरे वैभव ते जे इतरांना वैभवसंपन्न करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य तेच की ज्याच्या संपर्काने इतरांना सौंदर्य प्राप्त होते. आई जगदंबेचे सौंदर्य तसेच आहे. तिच्या नेत्र कटाक्षांचे हे आगळे वैभव सांगताना, पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनं-
त्रिपुरसुन्दरि- हे त्रिभुवनसुंदरी !
तावकीनं- तुझी
लब्ध्वा- प्राप्त करून
सकृत्- एकदाच, सहजपणे.
कारुण्यकन्दलित- कारुण्याने परिपूर्ण भरलेली, कारुण्य ओसंडून वाहत असलेली,
कान्तिभरं -तेज:पुंज
कटाक्षम् - नेत्र कटाक्ष.
अशाप्रकारची आई जगदंबेची दृष्टी प्राप्त झाल्यावर होणारा अद्वितीय लाभ आचार्यश्री सांगत आहेत. त्या दृष्टीचे सौंदर्य सांगताना ते म्हणतात,
कन्दर्पकॊटिसुभगा- कंदर्प म्हणजे मदन. सौंदर्याचे आपल्यासमोर असलेले सगळ्यात मोठे परिमाण. त्याच्या कोट्यावधी पट सुंदर अशी ती, कन्दर्पकॊटिसुभगा.
त्वयि भक्तिभाज:- तुझ्या भक्तीला पात्र असणारी.
तरुणी- अन्य समस्त सुंदरी.
सम्मोहयन्ति- मोहित करतात.
भुवनत्रयॆऽपि- तीनही लोकांना.
अर्थात आई जगदंबेच्या वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असलेली कृपादृष्टी प्राप्त झाल्याने त्या सौंदर्याने क्षमता प्राप्त झालेल्या स्वर्गीच्या रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरा संपूर्ण त्रिभुवनाला मोहित करतात.
त्यांच्या नजरेतील ती मोहन शक्ती मूलतः आदिशक्तीची आहे.
तिच्या भक्तीने इतरांना ती शक्ती प्राप्त होते हे आईचे खरे वैभव आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः ।
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥
आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात.
अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले.
जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत दुसरे काहीही निर्माण होणार नाही अशी आकाशवाणी झाली. त्यामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान शंकरांनी ते विषप्राशन केले. वास्तविक त्याने त्यांचा विनाश झाला असता. पण !
या पण चे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानः
क्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः- पूर्वी ज्यावेळी भगवान शंकरांनी समुद्रमंथनात निर्माण झालेले हालाहल नावाचे विषप्राशन केले त्यावेळी त्या भयानक विषाचा आवेग त्यांना का मारू शकला नाही?
आरंभीच्या दोन चरणात असा प्रश्न निर्माण करून पुढील दोन चरणात आचार्यश्री त्याचे उत्तर देतात. ते म्हणतात,
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य - हे आई जगदंबे ! कायम अमृताने भरलेल्या तुझ्या शीतल शरीराच्या अर्ध्या अंगाचा आश्वासक संगच नसता .
भगवान शंकरांचे स्वरुप अर्धनारीनटेश्वर आहे. श्रीशंकर आणि आदिशक्ती अभिन्न आहेत.
भगवान शंकर त्या विषाने संपले नाही कारण त्यांच्यासोबत अमृतमय असलेला आई जगदंबेचा अर्धा देह आहे.
त्या विश्वविनाशक विषाचा परिणाम आईच्या अमृतमय स्पर्शांनी नष्ट झाला.
हे आचार्य श्रींचे कथन कमालीचे मनमोहक आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
कस्तूरीतिलकाञ्चितेन्दुविलसत्प्रोद्भासिफालस्थलींकर्पूरद्रवमिश्रचूर्णखदिरामोदोल्ल सद्वीटिकाम्।
लोलापाङ्गतरङ्गितैरधिकृपासारैर्नतानन्दिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।२।।
आई ललितांबेच्या मुख कमलाचे सौंदर्य वर्णन करताना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कस्तूरीतिलकाञ्चित- कस्तुरी मिश्रित तिलकाद्वारे विलोभनीय असणारे.
सोळा शृंगारात शेवटचा शृंगार आहे तिलक धारण. त्या तिलका मधील सर्वश्रेष्ठ तिलक कस्तुरीचा. त्याचे वर्णन, अर्थात परिपूर्ण शृंगार केलेली.
इन्दुविलसत्- इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे, विलसत् म्हणजे सुंदर दिसणारे. मुखकमल.
प्रोद्भासि- चमकदार असणारी
फालस्थलीं- भांग पाडलेली जागा. केसांमध्ये भांग पाडतांना जेथे ते दोन भागात विभागल्या जातात त्या स्थानाला फालस्थली म्हणतात.
कर्पूरद्रव म्हणजे कापूर.मिश्रचूर्ण त्याचे चूर्ण ज्या मध्ये मिसळले आहे असे.
विडा अर्थात पान तयार करताना त्यामध्ये भीमसेनी कापराचे चूर्ण घातले जाते. त्याचा येथे संदर्भ आहे.
खदिर- म्हणजे खैर. त्या झाडापासून काथ निर्माण करतात. येथे विड्याचा संबंध असल्याने खैर शब्दात काथ अपेक्षित आहे.
आमोदोल्लसद्- त्याचा सुगंध दरवळणारे,
विटिकाम्- पान, विडा.
आई जगदंबेच्या अत्यंत आवडत्या नैवेद्या मध्ये विडा सम्मिलित आहे. यांनी आईचे मुख, लालबुंद, रसपूर्ण आणि सुगंधी झाले आहे.
लोलापाङ्ग- हलणाऱ्या डोळ्याच्या कडा,
तरङ्गितै:- त्यांचा तरंगांनी
अधिकृपासारै:- वर्षाव करीत असणाऱ्या कृपेच्या द्वारे.
नतानन्दिनीं - विनम्र असणाऱ्यांना आनंद देणारी. अर्थात भक्तांना परिपूर्ण आनंद प्रदान करणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्।
राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।।
राजन्- शोभासंपन्न असलेली,
मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस.
मन्दगमनां - त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली.
राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी.
राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान श्रीविष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून भगवान ब्रह्मदेव प्रगटले आहेत. त्यामुळे ज्यांना राजीवप्रभव असे म्हटले आहे. ते ज्यांच्या अग्रभागी आहेत असा सर्व देवांचा समुदाय म्हणजे राजीवप्रभवादि.
देवमकुटै- अशा सर्व देवांच्या मुकुटांनी राजत्पदाम्भोरुहाम्- पद म्हणजे पाय, अंभोरूह म्हणजे कमळ. राजत् म्हणजे शोभून दिसणारी. अशा सर्व देवांच्या मुकुटांनी जिचे चरणकमल शोभून दिसत आहेत अशी. या सर्व देवता चरणावर मस्तक ठेवत असल्याने, आईचे पाय दिसतच नाही तर या देवांचे मुकुटच दिसतात अशी सुंदर कल्पना आचार्यश्री करीत आहेत.
राजीवायतमन्दमण्डितकुचां- राजीव म्हणजे कमळ, आयत म्हणजे फुललेले, मंद म्हणजे हळुवार हलणारे, मंडितकुचा अर्थात वक्षस्थल शोभून दिसणारी.
आई जगदंबेने गळ्यात फुललेल्या कमळाची माळ घातली आहे. आईच्या मंद श्वासाने आणि हृदयाच्या हळुवार हालचालीने, ती माळ मंद हलत आहे. तिने शोभून दिसणारी.
राजाधिराजेश्वरीं- सर्व राजांचीही महाराणी असणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा ,श्री भ्रमराम्बेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
षट्तारां गणदीपिकां शिवसतीं षड्वैरिवर्गापहांषट्चक्रान्तरसंस्थितां वरसुधां षड्योगिनीवेष्टिताम्।
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां ष़ड्भावगां षोडशीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।४।।
षट्तारां - हा शब्द समजून घेण्यासाठी थोडी कसरत करणे आवश्यक आहे.
षट्तारा म्हणजे सहा ताऱ्यांचा समुदाय. असा समुदायास असतो कृतिका नक्षत्राचा. त्या सहा कृतिका देवसेनापती कार्तिकेयाच्या माता. श्री कार्तिकेय म्हणजे स्कंद हे देवी पार्वतीचे पुत्र. ती देवी पार्वतीच सर्व रूपात नटली असल्याने, कृत्तिका रूपातील सहा ताऱ्यांच्या रूपात नटलेली ती षट्तारा.
या सहापैकी सगळ्यात मोठ्या ताऱ्याचे नाव अंबा आहे हे विशेष.
गणदीपिकां- विश्वातील सर्व जीव हेच जणू जगदंबेचे गण आहेत. त्यांना चैतन्य प्रदान करणारी.
शिवसतीं- भगवान शंकरांची प्रियतमा. षड्वैरिवर्गापहां- काम, क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर यांना षड्वैरी म्हणतात. त्यांच्या वर्ग म्हणजे समुदायाला, अपहा म्हणजे दूर करणारी.
षट्चक्रान्तरसंस्थितां- मूलत: सहस्त्रारचक्रात निवास करणारी आदिशक्ती, शरीरातील मूलाधारा पासून आज्ञाचक्रा पर्यंत सहा चक्रांच्या ठिकाणी निवास करते.
वरसुधां- श्रेष्ठ अमृत स्वरूपिणी.
षड्योगिनीवेष्टिताम्- सेवा करण्यासाठी सहा योगिनींनी वेढलेली.
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां- नाभी कमलस्थित कुंडलिनी शक्ती सहा चक्रांवर आपली पावले उमटवत शेवटी सहस्त्रार चक्रात स्थिर होते. त्या चक्रांना पार करत जाण्याला, त्याद्वारे चरण सुशोभित असणाऱ्या जगदंबेला षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदा म्हणतात.
ष़ड्भावगां - शास्त्रात वर्णिलेल्या अस्ति, भाति इ. सहा भाव अर्थात अवस्थांची अधिष्ठात्री.
षोडशीं- कायम सोळा वर्षांच्या युवती प्रमाणे सौंदर्यवती.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
श्रीनाथादृतपालितत्रिभुवनां श्रीचक्रसंचारिणीं।दीनानामतिवेलभाग्यजननीं दिव्याम्बरालंकृतां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।५।।
श्रीनाथादृत- श्री म्हणजे देवी लक्ष्मी.तिचे नाथ म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्याद्वारे आदृत म्हणजे आदर व्यक्त केला आहे अशी.
पालितत्रिभुवनां- स्वर्ग, मृत्यु ,पाताळ अशा तीनही भुवनांची पालन कर्ती. श्रीचक्रसंचारिणीं- शाक्त उपासनेत श्री यंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्या यंत्रात विद्यमान समस्त देवतांच्या ठिकाणी विद्यमान चैतन्यशक्ती.
यानंतरचे विशेषण शांतपणे समजून घ्यावे लागेल.
ज्ञानासक्त- ज्ञान मिळवण्याची इच्छा असलेल्या,
मनोज- कामदेव व त्यांच्या शक्ती,
यौवनलसद्- यौवनाने मुसमुसलेल्या.
गन्धर्वकन्यादृताम्- गंधर्वकन्यांनी आदर दिलेली.
गंधर्वकन्या या मदन गुणांनी आणि यौवनाने परिपूर्ण आहेत. मात्र त्यांना अपेक्षा ज्ञानाची आहे. यातच आचार्य सांगताहेत की त्यांना माहिती आहे हे यौवनादिक टिकणारे नाहीत. शाश्वत सुखाचा आधार नाहीत. जर गंधर्वकन्यांचे सौंदर्य शाश्वत नसेल तर आपले कसे असेल? शाश्वत आहे केवळ ज्ञान. आई जगदंबा त्या ज्ञानाला प्रदान करते. त्यामुळे गंधर्वकन्या तिला आदर देत आहेत. तिची सेवा करीत आहेत.
दीनानाम् - हीन,दीन भक्तांचे,
अतिवेलभाग्य- अत्यंत श्रेष्ठ सौभाग्य,
जननीं- निर्माण करणारी.
अर्थात त्यांना श्रेष्ठ भाग्य प्रदान करणारी.
दिव्याम्बरालंकृतां- दिव्य वस्त्र धारण केलेल्या,
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी ध्यान करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti