वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो.
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली.
मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.
हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.
पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.
पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.
या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे - - -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.
ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.
(यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)
(हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)
-- मकरंद करंदीकर
मथुरेच्या आजूबाजूच्या भागाला “व्रज” भूमी म्हणतात. “व्रजन्ति गावो यस्मिन्निति व्रज: ! अर्थात जिथे गायी चरतात, फिरतात तो व्रज प्रदेश होय. याच्या आसपासच्या प्रदेशातल्या काही लोकांची आडनावे पाहिलीत तर “कुशवाहा”, “चरवाहा” म्हणजे गायींना चारणारे अशी आडनावे आहे. लालूप्रसाद किंवा रामविलास पासवान यांच्या पक्षातील लोकांची आडनावे पहा म्हणजे लक्षात येईल मित्रांनो.
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.
समर्थ रामदास स्वामींची ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.
अतीकोपता कार्य जाते लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
-- समर्थ रामदास स्वामी
हिंदूंचा एक प्रमुख सण असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव,गण इत्यादीं वर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti