(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • शरीराचा आकार आणि आहार

    काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या असतात.

    अॅपल शेप (सफरचंदाचा आकार)

    या आकाराचे शरीर चारही बाजूंनी गोलाकारात पसरलेले असते. हा आकार अनुवांशिक असतो आणि यामध्ये छाती आणि खांदे रुंद असतात. याउलट कमरेच्या खालच्या भागात म्हणजेच पायांमध्ये कमी चरबी असते. तज्ज्ञांच्या मते, या शरीराच्या आकारात बॅली फॅट कमी करण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागते; परंतु खाली दिलेल्या टिप्सच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

    • जर तुमचे आतडे अधिक संवेदनशील असतील तर अल्कोहोलचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्हाला ही सवय सोडून द्यावी लागेल. अशा स्थितीत झोपेशी संबंधित समस्या वाढायला लागतात.

    • या आकारासाठी प्रोबायोटिक फूड अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फॅट कमी असतात पोषक द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटही साफ होते.

    • भरपूर पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहील. तसेच शरीरात भरपूर पाणीही राहील. डायट, सोडा यासारख्या काबरेनेटयुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कारण यामुळे पोट फुगते.

    बनाना शेप (केळीचा आकार)
    केळीच्या आकाराचे शरीर असलेले लोक हडकुळे आणि उंच असतात. या लोकांनी काहीही खाल्ले तरी त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम होत नाही. तसेच या लोकांचे स्नायूही अत्यंत कमी असतात. या लोकांनी योग्य आहार घेतला नाही तर त्यांना लवकर थकवा येतो. त्यामुळे त्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.

    • स्नायू वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. ग्रिल्ड चिकन, उकडलेली अंडी यांचा आहारात समावेश करावा.

    • या आकाराच्या लोकांनी आपल्या भोजन पद्धतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. रक्तात साखरेचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, अशा लोकांचे वजनही लवकर वाढत नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.

    • आरोग्यदायी मेद/ प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पॉपकॉर्न, बदाम, दही आणि अँव्होकॅडो यासारख्या फळांचे सेवन करावे.

    पीअर शेप (नाशपाती फळासारखा आकार)
    पेरूसारखे दिसणार्‍या नाशपाती या फळासारखा आकार असणार्‍या लोकांचे शरीर वरच्या बाजूने अरुंद आणि कमरेच्या खालच्या बाजूने रुंद असते. अशा लोकांचे जेव्हा वजन वाढते तेव्हा पोटाच्या खालचा भाग, कंबर आणि मांड्या जड व्हायला लागतात. मेदयुक्त दुग्धजन्य उत्पादने आणि गोड पदार्थ ही या लोकांची कमकुवत बाजू आहे. अशावेळी या लोकांना खालील उपाय करायला पाहिजेत.

    • आइस्क्रीममध्ये मेद आणि साखर जास्त असते, त्यामुळे याऐवजी कमी गोड असलेल्या फ्रोजन योगर्ट यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

    • दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. एक औंस चीजमध्ये 100 कॅलरी आणि आठ ग्रॅम फॅट असते.

    त्यामुळे याचे सेवन कमी फॅट असलेल्या क्रॅकर्ससोबत केले जाऊ शकते.

    • अपचन होईल अशा पदार्थांपासून दूरच राहावे. दिवसातून किती वेळा जेवण करता, याकडेही लक्ष ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

    ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.

    जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.

    हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.

    पित्त प्रकृती
    ‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

    पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.

    काय टाळावं-
    यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.

    वात प्रकृती
    ‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.

    कफ प्रकृती
    ‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.

    कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.

    काय टाळावं-
    पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- वैद्य राहुल सराफ

  • सारी दुनिया का बोझ हम उठाते है

    ओझ्याच्या प्रेशर कुकरला घाबरु नका. होऊ द्या पाहिजे तेवढ्या शिट्या. तेव्हाच तर तुमची डाळ शिजेल..

  • अल्झायमर जागरुकता दिन (२१ सप्टेंबर)

    २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो . अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अ‍ॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.

    संपूर्ण जीवशास्त्रामध्ये मान्य झालेला ‘युज इट ऑर लूझ इट’ हा अलिखित कायदाही सर्वसामान्यांनानाही चांगलाच ज्ञात आहे. त्यानुसार आपल्या शरीरातील अवयवबाह्य तसेच अंतर्गतही पुरेपूर वापरात गेला नाही तर हळूहळू दुर्बल होऊ लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊन तो विकृत होऊ लागतो. या कारणानेच व आपली संपूर्ण शरीर प्रकृती उत्तम, निकोप राहावी यासाठी नित्य नियमित व्यायामाचे महत्त्व वैद्यकीय, आरोग्यतज्ज्ञ आपणास विशद करतात त्याबद्दल आग्रह करतात. योग्य व नियमित व्यायाम, योगासने, प्राणायामाने आपण खूपच निरोगी राहातो इतकेच नाही तर विकृत झालेले अवयव पण पुन्हा प्राकृत होऊ लागतात असा अनुभव येऊ लागतो. स्थूलता, मधुमेह, हृद्रोग यासारख्या दुर्धर कष्टसाध्य आजारातपण हाच अनुभव घेता येतो. आपला मेंदू हा पण एक अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत अवयवच आहे. ‘युज इट ऑर लूझ इट’ हा सिद्घांत याबाबत लागू होतो. योग्य, अचूक व्यायामाच्या अभावामुळे मेंदूमधील चेतापेशींची कार्यक्षमता कालांतराने कमी होते व अंतिमत: त्या अकार्यक्षम, निकामी होतात. हे आता शास्त्रसंगत आहे.

    अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती:
    अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो. स्थितिज्ञान जाते. हळूहळू भूतकाळ हरवतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्‍हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. प्रतिकारशक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो.

    अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत: रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात ए-६८/टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅंपस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यांत चेतापेशींचा र्‍हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात, तसेच अ‍ॅसेटिल कोलीन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या र्‍हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणार्‍या अक्षतंतूंभोवती पिष्ठाभर्‍हास (अ‍ॅमिलॉइडर्‍हास) दिसतो. या र्‍हासात बीटा-अ‍ॅमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांत ही अ‍ॅमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत.

    अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात. स्नायूंचा ताठरपणा इतर हालचालींत अडथळा आणतो. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्.आर्.आय्. - मॅग्नेटिक रेझोनन्स इमेंजिंग) व सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटरराइज्ड टोमोग्राफी) या तपासण्यांमध्ये मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्‍हास दिसतो. पी.ई.टी. (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) चाचणीत मेंदूच्या दोन्ही बाजूंचा र्‍हास दिसतो.

    लक्षणे:
    आत्यंतिक भोळेपणा, सहज गोंधळून जाणे, अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहाणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नाविन्याबद्दल अनास्था वाटणे, ताज्या घटनांची विस्मृती होणे, स्वत:च्या विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने वारंवार अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते. अशा अवस्थेमधील रुग्णाची शुश्रुषा करणे किती कठीण असेल याची कल्पनाही येत नाही! एकदा जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि अजून तरी हा रोग असाध्य आहे.

    या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणे आवश्यक असते. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठिण व धीराचे असते. सध्या तरी टॅक्रीन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात.

    या सर्व क्लेषकारक वर्णनास एक आश्वासक, सुखद किनार अशी आहे की प्रतिबंधक उपचारांनी या आजारापासून बचाव करून राहाणे शक्य आहे व ते उपाय पूर्णत: निर्धोक, सहज अवलंबनीय व विनामूल्य आहेत. म्हणून ते सर्वानी म्हणजे किमान वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींनी आचरणांत आणावेत असे वाटते. नित्य नवे विषय, मुद्दे समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसऱ्यास समजावून देणे, पाठांतर करणे- याविषयी माझा विशेष, व्यक्तीगत आग्रह आहे कारण भगवत्गीता, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी हे जगमान्य ग्रंथ सहज घरोघरी उपलब्ध असतातच, त्यांचा वापर करता येतो- मित्र परिवारांत गप्पा-टप्पा मारण्यासाठी अवश्य सहभागी होणे. हास्यक्लबमध्ये जाणे, सहलीस जाणे, कोडी सोडविणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे असे विविध उपचार करण्याने आपल्या मेंदूमधील संबंधित चेता पेशींना चांगला व्यायाम घडून त्या कार्यक्षम राहतात.

    सध्या जगभर माणसाची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८५ वर्षांवरील सु. ५० % वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : शशिकांत प्रधान kumar vishvkosh, डॉ. रमाकांत गोवंडे - लोकप्रभा

  • दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

    निर्भिड पत्रकारिता’ या शब्दाला बट्टा लावण्याचं पातक अगदी गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या एका मराठी संपादकाकडून घडलं आणि बाळशास्त्री, टिळक, गांधी आदिंलारख्या निर्भिड आद्य पत्रकारांची मान शरमेने वर स्वर्गात खाली गेली असावी या बाबत निदान माझ्या मनात तरी काही शंका नाही..बाळशास्त्रींना तर ‘याचसाठी केला होता का अट्टाहास’ असही वाटलं असण्याची शक्यता आहे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३०

    पाणी शुद्धीकरण भाग दहा

    ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे.
    या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते.

    पाणी आटवत असताना त्या फेस आला तर समजावे त्यात अशुद्धी आहेत. त्या अशुद्धी जाईपर्यंत म्हणजे फेस नष्ट होईपर्यंत पाणी उकळावे.

    पाणी उकळून गाळून लगेच गरम गरम प्यायल्याने पचनशक्ती लगेचच सुधारते. आम नाहीसा होतो. म्हणून असे पाणी पिणे, हे कफामुळे होणारे अजीर्ण आणि वाता मुळे होणाऱ्या अजीर्णावरील मुख्य औषध आहे.

    केवळ याच दोन आजारात तहान लागली नसेल तरीदेखील असे गरम पाणी सांगितले आहे. पण ते देखील एवढेच प्यावे की खाल्लेल्या अन्नाचा पोटात ओलसर गोळा होईल. त्यापेक्षा जास्ती पाणी क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करते.

    दगड, लाख, कोळसा, गारगोटी, सोन्या चांदीचा गोळा, ( किंवा असेल बिस्कीट पण चालेल.) लाल होईपर्यंत तापवून त्या पाण्यात विझवली तरी देखील पाणी शुद्ध तर होतेच पण या द्रव्यांचे गुणधर्म पण पाण्यात येतात.

    गर्भिणीला डोहाळे काळातील उलटी थांबत नसेल तर मातीचे घट्ट ढेकुळ किंवा मातीचा गोळा, लाल होईपर्यंत तापवून पाण्यात विझवावा. ते पाणी गाळून तिला चमचा चमचा द्यावे. खूप फायदा होतो.

    लहानपणी लोखंडी पळीत फोडणी करून ती ताकावर ओततानाचा आणि नंतर ती पळी ताकात बुडवतानाचा चुर्रऽऽऽऽ हा आवाज ऐकायला किती मज्जा यायची नं ! धावत स्वयंपाकघरात यायचो.

    या लोखंडी पळीतील लोखंडाचा औषधी अंश फोडणीतून ताकात कधी आणि कसा उतरायचा, हे आजीला आणि आईला पण कधी कळलेच नसेल.....

    "फोडणी" ही फक्त भारतातच ! पाश्चात्य तंत्रात फोडणी कुठली नि कुठलं काय. त्यांचे मुख्य अन्न काय तर शिळा पाव त्यात मासाचा तुकडा किंवा शिळ्या मासाचा तुकडा आणि त्याच्याबाहेर पाव ! आत्ता आत्ता त्यांना समजतंय कोशिंबीर वगैरे खावी ते ! रोजच्या रोज जेवण बनवणं, विविध चविष्ट प्रकार बनवणं, आणि मुख्य म्हणजे सर्व आरोग्यदायी बनवणं हे फक्त आजी नि आईच करू शकते. मम्मी नाही. जाऊदे, मोठा विषय नंतर येईल चर्चेला....

    उकळून गार झालेले पाणी (शृतशीत जल ) परतपरत गरम करू नये. ते नीट झाकून ठेऊन, दिवसभरात संपवावे. परत गरम केले तर त्यातील औषधी गुण संपतात. तसेच हे पाणी रात्र उलटून गेली तर हे पाणी नंतर पित्तासह अन्य दोषांना वाढवणारे होते. अजिबात वापरू नये.

    पाण्याच्या शुद्धिकरणाचे एवढे सखोल आणि शास्त्रीय ज्ञान देणारा आयुर्वेद शासन स्तरावर मात्र दुर्लक्षिला जातोय, आणि सामान्यापर्यंत पोचतोय तो विकृत पाश्चात्य स्वरूपात.

    भगिरथाने तप करून पृथ्वीवर आणलेली ही "गंगा" ही शुद्ध होती, तिला आम्ही वैद्यच शुद्ध करणार, त्यात मिसळलेली पाश्चात्य तंत्राची भेसळ, आम्हीच भगिरथाचे वंशज, काढून टाकणार !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    06.01.2017

  • अनंत अमुची ध्येयासक्ती

    आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेची.

    अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप बाऊ करतो ... हा पठ्या तर सरळ समुद्रालाच सांगतो,
    "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

    मुश्किलोंकी लहरोंको चिरकर मंजील हम पा लेंगे.. ऐ जिंदगी तु बस देखती जा....!

    Anyone can swim with the waves ...but a real person is someone who can tear apart the waves and move ahead.

  • ताप का येतो?

    शरीराचं तापमान वाढतं ते या यंत्रणेला विविध मार्गांनी संदेश मिळतात म्हणून. जंतूजन्य आजारात शरीरात जंतूंच्या अस्तित्वामुळं आणि लढाईमुळं जे काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे या संस्थेला तापमान वाढवण्याचे संदेश मिळतात व तपमान वाढवलं जाते.

    या वाढवलेल्या तापमान जंतूंच्या शरीरातल्या अनेक रासायनिक क्रिया बंद पडतात व त्याचा परिणाम म्हणून ते अर्धमेले होतात किंवा वाढू शकत नाहीत.
    यासाठी शरीराला येणारा ताप हा उपयुक्तच समजला पाहिजे. मात्र हे तापमान असंच वाढत गेलं तर आपल्याच शरीराला त्याचा त्रास होऊ लागतो आणि कधी कधी मेंदूला हे तापमान सहन न झाल्यानं झटके येतात. यालाच ‘तापातले झटके’ असे म्हणतात. काही मुलांमध्ये एखाद्या आजारात पटकन् ताप वाढण्याची ठेवण असते तर काही मुलांची तापमान योग्य राखण्याची यंत्रणा चांगली काम करत रहाते, म्हणून ताप वाढत नाही. दोन्ही गोष्टी फारशा चांगल्या नाहीत. पहिल्या बाबतीत मुलाला तापाचा प्रत्यक्ष त्रास होतो. तर दुसऱ्यात, आजार नक्की कोणता हे चटकन् समजून न आल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे त्रासच होतो. म्हणूनच माफक प्रमाणात ताप येणं दोन्ही दृष्टीनं चांगलं असतं असं समजायला हरकत नाही. तापाच्या तीव्रतेवर आजाराची तिव्रता ठरत नसते. मला खूप रडल्यानं ताप येतो ही चूकीची समजूत आहे. बाळ ताप आल्यामुळं खूप रडतं आणि नंतर ते आपल्या लक्षात येतं.

    ताप हा आपल्या शरीराचा मित्रच आहे.

    ताप हे अनेक आजारांचं प्राथमिक लक्षण असतं. याउलट कितीतरी गंभीर आजारांत ताप फार चढलेला दिसत नाही, तरीही ते प्राणघातक असू शकतात. मात्र जास्त ताप चढलेलं मूल ताप असतांना तरी जास्त गंभीर रीतीनं आजारी असल्यासारखं दिसतं. म्हणून आजाराचं खरं स्वरूप मुलाचा ताप उतरवल्यानंतरच पहावं.

    ताप येणा-या मुलाचा हा ताप कशामुळं येतोय हे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रत्येक अवयव संस्थेचं काम व्यवस्थित होतंय ना हे पहावं. तसंच तापाच्या जोडीला काही अवयव किंवा संस्थेच्या बिघाडाची लक्षणं दिसताहेत का हे पहावं. उदा. सर्दी खोकला - श्वास मार्ग, फुफ्फुसं यांचा बिघाड दाखवतात. तर उलटी जुलाब पोट, आतडी लिव्हर यांच्यातला बिघाड सुचवतात आणि लघवीचा त्रास मुत्रमार्गाचा बिघाड. बाळाचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे त्यावरून म्हणजे, त्याचं खाणं, पिणं, शू चं प्रमाण, उलटी इ. गोष्टींवरूनही आजाराचा गंभीरपणा दिसतो.

    ताप कसा मोजावा?

    हातानं कपाळ किंवा पोटाचं तापमान पाहणं हे अगदी प्राथमिक तपासणं झालं. पण याने आपण तापाचा एक साधा अंदाज मांडू शकतो. ताप खरं तर शरीराच्या आतल्या भागातला मोजायला हवा. शी च्या जागी थर्मामीटर घालून किंवा तोंडात जिभेखाली धरून. मुलं खूप कपडयात गुंडाळल्यानं गरम लागतात, तर उघडी ठेवल्यास गार पडलेली असतात म्हणून आतून तपमान मोजणंच योग्य.

    जी मुलं थर्मामीटर चावण्याची शक्यता असते त्यांच्यात शक्यतो शीच्या जागेचं तापमान मोजावं. सर्वच मुलांचा ताप अशा तऱ्हेने मोजायची जरूरी नाही पण वरून ताप लागत नाही तरीही मूल मलूल वाटतंय अशी अवस्था असेल तर मुलाला ताप आहे की नाही हे नक्की करण्यासाठी असा ताप पहाणं आवश्यक आहे. इतर वेळी काखेत घाम नसल्यास काखेतलं किंवा मोठया मुलांचं काही गार किंवा गरम न खाता पिता तोंडातलं तापमान मोजावं. थर्मामीटर १ पूर्ण मिनिट जागेवर धरून ठेवावा लागतो. तो त्वचेला निट लागून राहिला नाही तर तापमान नोंदीत चूक होते आणि १ पूर्ण मिनिट मुलांच्या काखेत थर्मामीटर धरून ठेवणं अवघड जातं म्हणून मुलांचा ताप मोजणं अवघड वाटतं. म्हणून मुलांचा ताप मोजणं हे कौशल्याचं काम आहे.

    त्वचेपेक्षा काखेतलं आणि काखेपेक्षा आतल्या भागाचं तापमान १-१ डिग्रीनं जास्त असतं.

    तापातले झटके:
    मेंदूला एकदम वाढणारा जास्त ताप सहन न झाल्यानं झटके येतात. पूढे हळू हळू मेंदू जस जसा वाढतो तसतशी त्यात हे तपमानाचे बदल पचवायची शक्ती येऊन मग असे तापातले झटके येणं बंद होतं. हे झटके येण्याचं नेहमीचं वय म्हणजे ६ महिन्यापासून ते ६ वर्षांपर्यंत. एखाद्या कुटुंबांत हे प्रमाण अनुवंशिकही दिसतं या झटक्यांनंतर मुलाला मोठेपणी फिटस् किंवा एपिलेप्सी असा आजार राहू शकेल का, याची काळजी पालकांना लागलेली असते. मुलाला फक्त तापातच झटके आले असतील आणि घरात फिटस् मुळं त्याच्या बुध्दीवर किंवा वाढीवर कोणताच विपरित परिणाम होणार नसतो हे समजावून घेतलं तर आई वडिलांच्या मनातली भीती आणि काळजी आपोआप कमी होईल.

    मुलाला तापात झटका आला तर काय करावं?

    सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी निजवून शरीराला इजा होत नाही ना बघवं. लाळ येत असेल तर पुसावी. थोडयाच सेकंदात किंवा मिनिटात झटका थांबतो. त्याची वाट पहावी. झटका थांबत असतांना श्वास नीट होतोय ना हे पहावं. मूल काळं निळं पडलं असेल तर आता रंग झपाटयानं बदलून गुलाबी होतोय ना हे पहावं. शुध्दीवर येतोय ना, हे पहावं, आणि मग अंग पाण्यानं पुसत ताप उररवायला सुरूवात करावी.

    थोडयाच वेळात मूल हालचाल करू लागतं. कण्हू लागतं किंवा रडू लागतं. हीच तो शुध्दीवर येत असल्याची खूण आहे. अशावेळी त्याला चिमटा काढला तर ते दुखल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणजेच त्याला आता समजू लागलंय असं आपल्याला समजतं. हा वेळ मोजायचा प्रयत्न करावा. या सर्वाची नीट नोंद घेऊन सर्व अचूक माहिती डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करावा. या माहितीचा डॉक्टरांना उपचारांसाठी उपयोग होतो.

    अशा मुलांना ताप न उतरवल्यास पुन्हा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून ताप औषधांनी, इंजेक्शननी , अंग पुसून कसाही पण जलद उतरवावा. स्पजिंग करतांना शरीराचा जेवढा भाग मिळेल तितका कोमट काटामोड पाण्यानं पुसून आपोआप कोरडा होवून द्यावा. त्यामुळं शरीरातील उष्णता हे पाणी वाळवायला वापरली गेल्यानं तपमान उतरायला मदत होते.

    ताप उतरवण्यासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. कोमट पाणी वापरावे.

    या कामासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. त्याचा उपयोग कमी होतो आणि त्याचा त्रास झाल्यानं मूलही पुसू देत नाही. तसंच नुसत्या कपाळावर घडया ठेवण्यापेक्षा सर्व अंगाचा पृष्ठभाग वापरला तर ताप झटकन् उतरतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुसत रहाण्याचं काम १५ ते २० मिनिटं केलं म्हणजेच ताप उतरतो. म्हणून एकदा पुसून थांबू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चिकुनगुनिया

    चिकुनगुनियाचा ताप हा डेंगीच्या तापाप्रमाणे असला तरीही त्याची मुदत मात्र काही महिन्यांची असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या तापाने अनेकांना जेरीस आणले. गर्भवती महिलांमध्येही या तापाची लागण होण्याची शक्यता असते. हा ताप बरा झाला तरी त्याचे दुष्परिणाम काही काळाने पुन्हा दिसू शकतात..
    चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. हा आजार जडला की दिवस आणि आठवडेच नव्हे तर काही महिन्यांपर्यंत तो रुग्णाची पाठ सोडत नाही. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात जवळजवळ कधीच दिसत नाही.

    लक्षणे:
    ताप येणे, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखण्याची लक्षणेही आढळून येतात. चिकुनगुनियाचा डास चावला की सुमारे १२ दिवस त्याची सर्वसाधारण लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अनेकदा सांधेदुखी जाणवते. याचबरोबर पहिल्या १२ दिवसांत डोळ्यात लाली आणि प्रखर उजेडाकडे बघण्यास त्रास जाणवू शकतो.
    हात-पायांवर रॅशेस येतात. मात्र, चिकनगुनियाचे निदान करण्याचा खात्रीदायक मार्ग म्हणजे रक्ताच्या नमुन्याची चाचणी. सर्वसाधारण तीव्र ताप आणि सांधेदुखी एकत्र आली की तात्काळ ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. आरटी-पीसीआर नेस्टेड प्राईम ही रक्तचाचणी यासाठी घेतली जाते. यामध्ये या विषाणूमुळे रक्तातील काही घटकांचे विघटन होऊन त्याच्या गुठळ्या बनल्याचे आढळतात आणि चिकुनगुनियाचे निदान होते.

    आजाराचे परिणाम
    तरुण रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने ५ ते ८ दिवसात हा आजार बरा होतो मध्यमवयीन रुग्णांमध्ये २-३ महिने या आजाराचा त्रास होऊ शकतो तर वृद्धत्वाकडे झुकलेल्यांना वर्षभर या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.

    तातडीने रक्तनिदान करुन घेणे.

    डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पथ्यांसह पूर्ण करणे

    आजाराची लागण पुन्हा होऊ नये म्हणून पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रक्ततपासणी करणे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लठ्ठपणा

    साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
    सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
    फक्‍त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
    खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
    वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्‍तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
    रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.

    "उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
    अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
    अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत्‌ ।।
    श्‍लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम्‌ ।
    कासश्‍वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।...शांरगधरसंहिता

    अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
    लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.

    अध्यशन न करणे - एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे - स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्‍तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्‍यक.मात्रानिश्‍चिती - प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्‍त भाताची पेज, रात्री फक्‍त सूप तर वजन कमी होण्यास निश्‍चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733