वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.
नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.
बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. ‘सायकिक’ झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५ नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नसíगक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो.
पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नसíगकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.
रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ ८५ टक्के स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शरीरातील कुठल्या ना कुठल्या भागात अचानक गरम झाल्यासारखे वा वाफा आल्यासारखे वाटते. विशेषत: चेहऱ्यावर मानेच्या भोवती, गालावर, कानशिलाजवळ हे जास्त प्रमाणात जाणवते. कधी कधी ही गरमागरम संवेदना एका ठिकाणी सुरू होऊन अचानक पूर्ण शरीरात पसरत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही संवदेना हलकीफुलकी व कालांतराने कमी कमी होत जाते. तर काहींच्या बाबतीत पूर्ण शरीरात एखादी ज्वाला भडकते आहे की काय, अशा प्रकारचा अनुभवही असू शकतो आणि तो दीर्घ काळही चालतो.
याच काळात किंवा पाळी जायच्या काही महिने आधीपासूनच रात्री अचानक खूप घाम फुटल्यामुळे काही स्त्रिया घाबऱ्याघुबऱ्या होतात. टॉवेल पूर्ण भिजला आहे, गाऊन, कपडे पूर्ण भिजले आहेत अशा प्रकारचा घाम फुटण्याचा अनुभव भयंकर असतो. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. पूर्ण रात्रभर त्या अस्वस्थ राहतात. त्यांच्यात दिवसा चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो. रात्रीचे हे घाम फुटणे इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.
काही स्त्रियांना पाळी जाण्याच्या दरम्यान विलक्षण अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे व खूप थकवा जाणवतो आहे, अशा तक्रारी त्या करतात. या थकव्याबरोबर त्यांना खूप चिडचिडल्यासारखे वाटते व इतर गोष्टींबद्दल काही आकर्षण वाटत नाही. बऱ्याच वेळा हा थकवा प्रचंड तीव्रतेने येतो आणि अचानक येतो. स्त्रिया आपले नियमित साधे कामसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखे वाटते. हे खरे तर रजोनिवृत्तीमधले खूप महत्त्वाचे लक्षण आहे बरं. पण बऱ्याच वेळा घरच्यांच्या ते लक्षात येत नाही. या काळात बऱ्याच स्त्रियांच्या मुलाचे लग्न झालेले असते. सूनबाई घरी आलेली असते. ती आजकालच्या काळात नोकरीला जात असते. अशा वेळी घरात काम करायचे नाही म्हणून सासूबाई सुनेला छळण्यासाठी थकल्याचे हे सोंग करताहेत असे घरातल्यांना वाटते. यामुळे घरच्यांची आणखी चिडचिड होते. कमी होणाऱ्या इस्ट्रोजनसारख्या हार्मोनबरोबर स्त्रीच्या शरीरातील शक्ती ही कमी होते. अशा तऱ्हेचा दीर्घकालीन थकवा स्त्रीची दमछाक करतोच पण तिचे नातेसंबंध व विधायकतेवरही दुष्परिणाम घडवितो. बराच काळ तिच्यात क्षमता असूनही ती सुप्तावस्थेत जाते आणि काहीच करत नाही.
भावनिक अस्थर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते.
या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते. स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
बऱ्याच स्त्रियांचे रजोनिवृत्तीच्या काळात वजन प्रचंड प्रमाणात वाढू लागते. हे पुन्हा हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होते. हे वजन वाढल्याने स्त्रीला स्वत:विषयीच राग येऊ लागतो. आपण बेढब दिसायला लागलो आहोत, आपले म्हातारपण जवळ आले आहे, आपले सौंदर्य कमी झाले आहे, असे वाटायला लागते. कामाची जबाबदारी घरात किंवा नोकरीवर पूर्वीच्या तुलनेने कमी होते. सुस्तपणा व थकवा आल्याने शारीरिक चापल्य कमी होते. त्यामानाने आहारावरही नियंत्रण राहत नाही. शरीराची हालचाल मंदावली जाते. या काळात हाडांचे दुखणे वाढते. गुडघे दुखू लागल्याने बाहेर जाणे कमी होते आणि वजन जास्त वाढायची प्रक्रिया चालू राहते.
या दरम्यान पोटाला फुगारा येतो वा फुगल्यासारखे वाटते. खूप अस्वस्थ वाटते. पोटात दुखतेही. अन्नपचन होत नाही. गॅस झाल्यासारखे वाटते. अॅ सिडिटी झाल्यासारखे वाटते. हा फुगारा एक प्रकारचा रोगच आहे की काय असे स्त्रियांना वाटते. मग घरगुती औषधे सुरू होतात. बऱ्याच वेळा स्वत:च्याच मनाने किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून इनोसारखं औषध घे, आयुर्वेदिक औषधे घे असे प्रकार सुरू होतात, ज्यामुळे स्त्रियांना आणखी त्रास होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय उपचार डॉक्टरांना सांगूनच करावेत.
काही स्त्रियांचे डोके खूप दुखते आहे किंवा डोक्याभोवती स्नायू आवळल्यासारखे वाटतात. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असेल तर रजोनिवृत्तीच्या काळात ती जास्त प्रमाणात दिसून येते. सांधेदुखी ही दुसरी महत्त्वाची तक्रार स्त्रिया या काळात सतत करतात. मानेच्या, खांद्याच्या, पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला तर त्यांना पूर्वीची जी कामे व्यवस्थित करता येत होती, ती आता करता येत नाहीत. याच्यावर वेळीच लक्ष दिल्यास हाडांची पुढे होणारी झीज लक्षात येऊ शकते व उपचाराने ती रोखताही येऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होणे अपेक्षित आहे. हाडांना ठिसूळपणा येऊन ओस्टिवोपोरोसिस व आर्थायटिससारखा विकार बळावू शकतो. या काळात हाडे नव्याने भरून यायची तरुणपणातली प्रक्रिया चांगलीच मंदावते. म्हणून पुढे येणारी हाडांची व एकंदरीत हालचाल करण्याची दुर्बलता थांबविण्यासाठी कॅल्शियम किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाबाबत डॉक्टरी सल्ला व्यवस्थित घेणे आवश्यक आहे.
याशिवाय आणखी महत्त्वाची तक्रार म्हणजे स्तनांमध्ये थोडे थोडे दुखरेपण जाणवते. एकदम तीव्र नसले तरी ठुसठुसणारी ही वेदना अस्वस्थ वाटायला लागते. आजकाल तर स्त्रियांना आपल्याला कर्करोग झाला आहे, असा संशय पटकन येतो. त्यामुळे त्या घाबरतात व डॉक्टरांकडे जायचे टाळतात. स्तनांमधली ही अशी वेदना जी कधी खुपल्यासारखी, टोचल्यासारखी, थोडय़ाशा दबावाने येणारी असेल तर स्त्रियांनी जरूर तपासून घ्यावी. ज्यायोगे इतर काही कर्करोगासारखे आजार असतील तर तात्काळ ओळखता येतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. शुभांगी पारकर
दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते. साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे. पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते. डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे (subdural nematoms) लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते. दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील "मीडियन' (median) शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम (carpal tunnel syndrome) काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज (nerve conduction studies) या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात. (peripheral neuropethy). लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. (capsacin). काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
या लक्षणांकडे बघा
* त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
* यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
* सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
* पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
* सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे
* दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते
* मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.
जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
* मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
* स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
* अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
* ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
* हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
निरोगी यकृतासाठी योग्य आहार
यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
* शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
* ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
* सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
* कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
* भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
* यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
* मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
* दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
* हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
* काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. रामदास जाधव
मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
कसे बनवाल हे मिश्रण ?
तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा.
कधी कराल हा उपाय ?
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही.
अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.
तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
रक्तदाब स्थिरावल्यानंतर तसेच तुम्हांला सामान्य वाटत असले तरीही डॉक्टरांना त्वरीत भेटा. तसेच नेमके कशामुळे रक्तदाब कमी झाला हे जाणून घ्या. अनेकदा ही समस्या लहान स्वरूपात असताना त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अचानक त्रास वाढल्यास डॉक्टरांचा धावा करतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित ते तपासून घ्या. 110/60 mm Hg पेक्षा कमी झाले तरीही अनेकदा त्याची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास स्वतःची औषाध स्वतः निवडण्यापेक्षा डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आतड्यातील अपेंडिक्स नावाच्या छोट्या शेपटीला सूज आल्यामुळे, पोटात तीव्र दुखणे सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढून टाकावी लागते. असे दुखणे होऊन; पण त्याचे योग्य निदान न झाल्याने किंवा भीतीपोटी काही वेळा ही शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही, तर रुग्णाचा जीव धोक्यानत येतो. जेथे लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तेथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्स अथवा आंत्रपुच्छ म्हणतात. याची लांबी एक ते पाच इंच असू शकते, तसेच हा अवयव जन्मत:च आपल्या पोटात असतो. मात्र माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्सची वाढ होत नाही. हा अवयव उदर-पोकळीत उजवीकडे खाली असतो. अपेंडिक्सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असे म्हणतात व ही सूज नक्कीड कशामुळे येते हे अजूनही समजलेले नाही, त्यामुळे या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. जंतुसंसर्गामुळे संपूर्ण आंत्रपुच्छाला सौम्य सूज येऊ शकते. मात्र ती फार झपाट्याने वाढत नाही व बऱ्याच वेळा औषधोपचारांनी कमी होऊ शकते, तसेच वारंवार सौम्य सूज येऊ शकते. यात आंत्रपुच्छ फुटण्याचा धोका तसा कमी असतो, तसेच वरचेवर अपेंडिक्सचे ऍटॅक येऊ शकतात. भूक न लागणे, कधीतरी पोटात दुखणे, पचनक्रिया नीट न होणे, यालाच अपेंडिक्समुळे होणारे अपचन म्हणतात.
अपेंडिक्सची लक्षणे, उपचार आणि शस्त्रक्रिया
1) अचानक पोटात दुखणे, दुखण्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणे किंवा अनेकांना उलट्या होतात, तसेच भूक न लागणे, अपचन, अन्न खावेसे न वाटणे, मळमळणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे होत.
2) सुरवातीला आलेला थोडा ताप, इलाज न केल्यामुळे गुंतागुंत होऊन वाढू शकतो. साधारणपणे पोटाच्या उजव्या खालच्या भागात दाब दिल्यास वेदना होतात व तो भाग कधीकधी कडक होतो. अशा वेळी पोट अजिबात चोळू नये किंवा जुलाबाचे औषध अजिबात घेऊ नये.
3) रोगनिदानासाठी रक्तय तपासणी (पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढले का बघण्यासाठी) तसेच मूत्र तपासणी - जंतुबाधा किंवा मूतखडा नसल्याची खात्री करण्यासाठी शौच तपासणी - आतड्यास जंतुबाधा झाली आहे का हे पाहण्यासाठी; तसेच पोटाची सोनोग्राफी करावी. जास्त सुजलेले अपेंडिक्स असल्यास किंवा त्या-भोवती पू जमा झाला असल्यास व पोटदुखीची इतर कारणे समजण्यास किंवा पोटाची दुर्बिणीतून तपासणी करून 100 टक्के निदान होऊ शकते.
4) उपचारामध्ये काही वेळा तात्पुरता औषधोपचार केला जातो. यात प्रतिजैविके, सूज व वेदना कमी होणारी औषधे, शिरेतून ग्लुकोज - सलाईन देणे आदी इलाज केले जातात. मात्र शस्त्रक्रिया हाच सर्वमान्य व सर्वोत्तम उपाय आहे. कारण शस्त्रक्रिया जितकी लांबणीवर टाकावी तेवढे गुंतागुंतीचे प्रमाण वाढू शकते, तसेच अपेंडिक्स भोवती आतडी चिकटणे व त्याचा गोळा तयार होणे, आंत्रपुच्छ फुटणे, त्याभोवती गळू तयार होणे किंवा पू पोटात सर्वत्र पसरणे आदी गोष्टी होऊ शकतात.
अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया कशी करतात व त्यानंतर काय काळजी अपेक्षित आहे.
अपेंडिक्सची शस्त्रक्रिया दोन पद्धतीने करता येते
1) पोट उघडून वा 2) दुर्बिणीच्या साहाय्याने.
पोट उघडून शस्त्रक्रिया करताना पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागावर 2 ते 3 इंचाचा तिरका किंवा आडवा छेद घेऊन सुजलेले आंत्रपुच्छ काढले जाते. ही शस्त्रक्रिया अर्धा ते एक तास चालते. इतर गुंतागुंत असल्यास जास्त वेळ लागू शकतो. ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन अथवा फक्ते कंबरेखालील भागाला बधीर करून केली जाते. नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे दुर्बिणीच्या साहाय्याने अपेंडिक्स काढता येतो, यामध्ये पोटावर तीन ठिकाणी लहान छेद घेतात व त्यातून दुर्बिण व शस्त्रक्रियेकरिता लागणारी उपकरणे पोटाच्या पोकळीत घालून शस्त्रक्रिया करतात व त्यातूनच अपेंडिक्स बाहेर काढले जाते. सहसा पूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करतात. दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर दुखण्याचे प्रमाण कमी असते व रुग्ण लवकर बरा होतो. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण 2-3 दिवसांत घरी जाऊ शकतो, तसेच त्यानंतर डॉक्टंरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती व औषधोपचार अत्यंत गरजेचे आहेत; तसेच एकदा काढलेले अपेंडिक्स पुन्हा कधीही वाढत नाही व अन्नपचनावर कायमचा कोणताही परिणाम संभवत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.सकाळ / डॉ. नितीन उनकुले
आमीर खानचा 'दंगल' चित्रपट काल बघीतला.
आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. 'म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?' असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी 'दंगल' करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू महावीर सिग फोगट यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उतरविण्यासाठी आमीर खान यांनी नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलींनी उत्तम असे कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो, व आपल्या दोन्ही मुलींना कसे घडवतो यांचे सुंदर चित्रण आमीर खान यांनी मांडले आहे. हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर सिंह फोगट (आमीर खान) यांची ही कथा आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु, घरच्या हलाखीमुळे कुस्तीचा आखाडा सोडून त्यांना नोकरी करावी लागते. देशासाठी पदक न जिंकता आल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत असते. त्यामुळे आपल्याला एक मुलगा व्हावा आणि त्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. मात्र, त्यांना चौथीही मुलगीच होते. आपलं स्वप्न अधुरंच राहिल्यानं ते काहीसे निराश होतात. अशातच, एक दिवस त्यांच्या दोन मुली - गीता आणि बबिता त्यांची छेड काढणाऱ्या शेजारच्या दोन पोरांची चांगलीच धुलाई करून घरी येतात. त्यांचा हा 'पराक्रम' पाहून महावीर फोगट यांच्या आशा पल्लवित होतात. मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नसल्याची जाणीव त्यांना होते आणि मग सुरू होतो एक जिगरबाज प्रवास. मुलींना कुस्तीपटू म्हणून घडवण्याचा महावीर फोगट यांचा निर्धार पक्का असतो, मुलीही सज्ज असतात, पण समाज - संस्कृतीचा सामना करत त्या सगळ्या आव्हानांना कसं अस्मान दाखवतात, हे पाहणं नक्कीच रंजक आहे.
पटकथा, संवाद आणि चित्रण सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अनेक दृश्यं पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर, आमीर खानने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पणा परत सिध्द केला आहे. आमीर खाननं महावीर फोगट यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ आमीरच साकारू शकतो. मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्स्पॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे सर्व मोठं आव्हान त्यांनी सहज पेललं आहे. तो सिनेमाभर इतका सहज वावरतो की तो अभिनय करतोय असं वाटतंच नाही. त्याशिवाय, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम आणि सुहानी भटनागर या चार मुलींनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्यांना कुस्ती म्हणजे काय हे पण माहित नाही, त्यांनाही हा सिनेमा आवडेल, अशी मांडणी दिग्दर्शकाने केलीय. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही. उलट, कुस्तीचा थरार सिनेप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. पार्श्वसंगीत त्यात अधिकच भर घालतं. तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके यांसारखे चित्रपट देणा-या आमीर खानच्या यशात आता दंगलचा उल्लेख हा कायम उंचावत राहणार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हणता येईल. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
दमा हा शब्द ऐकताच अनेक रुग्ण जरा घाबरतातच. लहान मुलांचे आईवडील तर चिंतेतच पडतात. माझ्या वीसेक वर्षांच्या अनुभवात असे आढळून आले आहे की दमा हे निदान झाल्यावर त्याचा स्वीकार करण्यास रुग्ण नाखूश असतात. बरेचदा डॉक्टर्सही मग त्याला दमा न म्हणता ‘अॅलर्जीक आँगकायटीस’ या नावाचा ‘गोंडस पर्याय’ शोधतात. पण जर खरंच दमा असेल तर अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर ताबा मिळवणे कष्टप्रद असले तरी प्रयत्न साध्य आहे. मात्र पूर्वअट अशी की निदान स्वीकारणे अपरिहार्य आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊ की दमा म्हणजे नक्की काय?
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. या कणांमध्ये परागकण, विविध प्राणी वा सूक्ष्म कीटकांच्या अंगाचे कण, वायू प्रदूषणाचे कण असे अनंत प्रकार असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होते. या अॅलर्जीमुळे त्यांच्या श्वासनलिका एकाएकी अरुंद होतात आणि हवा आत तर येते पण बाहेर जायला अडथळा येतो. श्वास सुई सुई वाजतो. खोकला येतो. छाती भरते. उठून बसावंसं वाटतं. कपडे सैल करावेसे वाटतात. बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हणता येईल.
असे झाले तर यावर तात्पुरता उपाय म्हणजे श्वासनलिका उघडतील असे औषध घेणे. अस्थालीन, लेव्हीलीन सारखी औषधे (इनहेलर्स) हे काम चटकन करतात आणि स्वस्त असल्यामुळे या औषधांचा रुग्णांमध्ये खूपदा अतिवापर केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वासनलिकांना प्रत्येक आकुंचनानंतर एक विशिष्ट अॅलर्जीक सूज येते आणि कालमानाने ही सूज वाढतच जाते. ज्यांना हंगामी (Seasonal) दमा असतो त्यांना त्या काळात (उदाहरणार्थ काँग्रेस गवताला फुलोरा आल्यानंतर) ही सूज खूपच तीव्र होते आणि मग अॅटॅक्स वारंवार आणि जास्त जोराचे येतात. साहजिकच आहे की तात्पुरत्या औषधांनी (वर उल्लेख केलेल्या) ते बरेही होत नाहीत.
थोडक्यात म्हणजे अॅलर्जीक सूज कमी करणे हा दम्यावर ताबा मिळवण्याचा खराखुरा उपचार आहे. स्टेरॉईडसच्या गोळय़ा किंवा इंजेक्शने हे काम उत्तम करतात. वाय सोलोन, डेक्सोना अशी औषधे वापरल्यास अॅटॅक चटकन आटोक्यात येतो. जीव वाचवण्यासाठी ही औषधे डॉक्टर्स ‘शॉर्ट कोर्स’ (काही दिवस उपचार) म्हणून रुग्णांना देतात. पण आपण जाणतो की पोटात जाणारी स्टेरॉईडची गोळी ही आयुष्यभर घेणे नक्कीच असुरक्षित किंवा धोकादायक आहे. पण मग असे औषध फक्त श्वासनलिकेत सोडले तर? दम्यावरील उपचारांमध्ये आज सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजे श्वासावाटे जाणारे स्टेरॉईड. ज्याला इनहेल्ड स्टिरॉईड्स (Inhaled steroid) म्हणतात. मंडळी हे औषध शंभर टक्के सुरक्षित तर आहेच पण नियमित वापराने ते श्वासनलिकांची सूज कमी करते आणि अॅटॅक्स पूर्णपणे थांबवते. इनहेलर स्टेरॉईड आणि श्वासनलिका उघडून धरणारी अशी दुहेरी औषधे एकाच इनहेलर पंपामध्येही मिळतात आणि या औषधांचा योग्य आणि नियमित वापर ही दम्याच्या रुग्णाला नवसंजीवनीच आहे.
या वेळी प्रश्न असतो, कुठल्या रुग्णाला किती डोस द्यायचा? हे कसे ठरवायचे यासाठी आज मेडिकल तंत्रज्ञानाचा एक छोटेखानी चमत्कार उपलब्ध आहे. त्याला म्हणतात स्मायरोमेही अर्थात फुप्फुस क्षमता चाचणी. डॉक्टराच्या क्लिनिकवर वीस मिनिटांत आणि काही वेळा जोराने फुंकर मारून आपली फुप्फुस क्षमता आणि दम्याचा पक्का पुरावा मिळतो, तीव्रतेचा पूर्ण अंदाज येतो आणि श्वासावाटे घेतले जाणारे औषध श्वासनलिका उघडते की नाही (reversibility) यांचाही पूर्ण पडताळा मिळतो. जसे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह मोजून उपचार करतात तसेच आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे दमा मोजून उपचार करू शकते. त्याचप्रमाणे कालांतराने परिस्थिती सुधारली किंवा बिघडली तर पुन: पुन्हा मोजून डॉक्टरांना डोस अॅडजस्टही करण्याची सोय उपलब्ध होते.
या पलीकडे जाऊन श्वासावाटे घेण्याच्या औषधांचे कुठले उपकरण वापरावे याचे काही संकेत आहेत. सौम्य दमा असेल तर रोटाकॅप्स जरूर वापरता येतात. पण मध्यम ते तीव्र आजार, लहान मुले, म्हातारी माणसे यांना स्पेसर वाटे आणि एम.डी.आय. (पंप) असे औषधे देणे सोपे आणि योग्य आहे. खूपच छोटे बाळ असेल तर बेबी मास्क स्पेसर आणि एम.डी.आय. इनहेलरचा वापर करता येतो. आपण जर दमेकरी असाल किंवा आपल्या बाळाला दमा असेल तर पुढील काळजी घ्या.
१) वातावरणातील बदल- घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्या वेळी धूळ उडणार नाही अशा पद्धतीने साफसफाई करा.
२) कुठलाही धूर निर्माण करताना विचार करा. उदबत्ती, कासव छाप यांमुळेही दमा बळावू शकतो.
३) कुठलीही फवारणी पेस्ट कंट्रोल, बेगॉन स्प्रे अगदी सुगंधी परफ्युम्स वापरतानाही विचार करा. शक्यतो दमेकरी माणसाने त्यावेळी तिथून दूर असले पाहिजे.
४) रंगकाम-फर्निचर काम सुरू असताना दमेकऱ्यास दूर ठेवा.
५) अनेकदा आपल्याला बेड माईट्सची अॅलर्जी असू शकते. याचा संपर्क टाळण्यास गाद्या व उशांना प्लास्टिक कव्हर घाला. आपल्या चादरी व पांघरुणे सुती कपडय़ांचीच वापरा.
६) घरामध्ये कुत्रा, मांजर असेल तर त्याची अॅलर्जी निर्माण होऊ शकते. डॉक्टरांशी बोला व निर्णय घ्या.
७) सर्वात महत्त्वाचे दम्याच्या आजाराचे निदान होत असेल तर त्याला सामोरे जा.
८) फुप्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा.
९) डॉक्टरांनी दिलेलेऔषध नियमित वापरा.
१०) उपकरण वापरण्याचे तंत्र समजून घ्या. डॉक्टरांना फॉलो अप देताना आपण औषध कसे वापरतो आहोत ते दाखवा.
११) कुठल्याही परिस्थितीत नियमित वापराचे औषध बंद करू नका. नेहमी परिस्थिती आणीबाणीची असल्यासारखे वागा.
१२) अनेकदा दम्याबरोबर अॅलर्जीक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टर देऊ शकतात. याचाही वापर नियमित करा.
दमेकऱ्यांसाठी सूचना-
*बदलत्या हवामानात, ढगाळ वातावरणात दमा बळावू शकतो. या काळात डॉक्टरांना भेटून डोस वाढवण्याची गरज लागू शकते.
* धूम्रपान आणि दमा म्हणजे आगीत तेल ओतणे आहे हे नक्कीच टाळा.
* अन्नपदार्थाची अॅलर्जी ही खूपच कमी वेळा दम्याशी संबंधित असते. आपल्याला जाणवल्यास हे डॉक्टरांशी बोला. विविध वातावरणात जर पुन:पुन्हा आणि तीव्र रिअॅक्शन आली तरच अन्नपदार्थाची अॅलर्जी आहे असे माना.
* आहारामध्ये विनाकारण बंधने घालू नका. लिंबू नाही, ताक नाही, दही नाही, फळे नाहीत असा नन्नाचा पाढा या गोष्टींची खरीखुरी अॅलर्जी नसताना आपल्या मुलांवर लादू नका.
*अन्नपदार्थाची अॅलर्जी लिस्ट- तशी मोठी आहे, पण ही अॅलर्जी दुर्मीळ असते. त्यामुळे मुद्दामच लिस्ट देत नाही. त्यातल्या त्यात विविध नट्स आणि समुद्री (sea food) खाद्यपदार्थ लक्षात ठेवायला हरकत नाही.
* बाल दमा आपोआप नाहीसा होईलच हे सत्य नाही. रुग्णाचा अॅलर्जीकारक वस्तूंशी संपर्क आणि त्याला मिळणाऱ्या औषधांचा प्रभाव यातून आजार कितपत ताब्यात येतो, यानुसार त्याचे भवितव्य ठरते.
* हंगामी दमा (seasonal asthma) हा ठरावीक कालावधीत (ऑगस्ट-सप्टेंबर) बळावू शकतो आणि उन्हाळय़ात रुग्ण एकदम नॉर्मल राहू शकतो.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य उपचार न मिळाल्याने दमा बळावतो, जुनाट होतो आणि हळूहळू श्वासनलिकांत कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. मग हा आजार सा.ओ.पी.डी. या जास्त दुर्धर आजारात रुग्णांतरित होतो. ज्यामुळे आयुष्यमान कमी होण्याचा धोका वाढतो.
* व्यायामाचा योग्य उपयोग जरूर करावा काही व्यक्तींना exercise induced asthma म्हणजे व्यायामाने बळावणारा दमा असतो. या माणसांनीसुद्धा व्यायाम सोडणे योग्य नाही. योग्य उपचारांनंतर व्यायाम पूर्ववत करता येतो. फ्लोरेन्स ग्रिफिथ जॅकजॉयनर हिने पाच ऑलिंपिक मेडल्स जिंकली ती दमेकरी होती. यावरून सत्य लक्षात येईल.
* अॅस्थिरिन, ब्रुफेन यांसारख्या वेदनाशामक औषधांनी दमा बळावू शकतो. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. नीतिन अभ्यंकर
आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे.
तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया.
तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून तीळ उष्ण असतात.ते स्निग्ध,पचायला जड असून वातनाशक व कफ पित्त वाढविंणारे असतात.
तीळ हे दातांना बळकट करतात,बाळंतीण स्त्रीचे दुध वाढवतात व शुक्रवर्धक,बुद्धिवर्धक,केसांचे व हाडांची बळकटी वाढविणारे असतात.
आता तीळापासून तयार केल्या जाणाऱ्या व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)चिक्की,तीळगुळ,तिळाचे लाडू:
चवीलागोड,पचायलाजड,स्निग्ध,बल्य,
बुद्धिवर्धक,वातनाशक,पित्तनाशक,कफकर,उष्ण,धातुपोषक आहे.
२)तिळाची चटणी:
तिखट,गोड,स्निग्ध,पचायलाजड,बलकारक,
उष्ण,भुक वाढविणारी,रूचकर,पाचक,जखम भरायला मदत करणारे,पित्तकर,वात कफनाशक,लघ्वीचे प्रमाण कमी करणारी,मल बांधून ठेवणारी आहे.
३)गुळपोळी:
चवीला गोड,तुरट,पचायला जड,वात पित्तनाशक,
कफकर,स्निग्ध,बाळंतीणीचे दुध वाढविणारी,शुक्रधातू वाढविणारी,बुद्धि व कांती वाढविणारी आहे.
४)तिळ तेल:
चवीला गोड,तुरट,कडू,उष्ण,वातकफनाशक,पित्तकर,मेदकमी करायला सहाय्यक,केस व दातांना हितकर,
बलकारक,जड,त्वचेची कांती वाढविते.
तिळ अति मात्रेत सेवन केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti