वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, २३/१२/२०१६ ला कामजोंग जिल्ह्यातील तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कधी - कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला सहनही करू शकत नाही. लोकांना याबद्दल असे वाटते की उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्वासातून घाण दर्प निघण्याची समस्या होते, परंतु हे खरे कारण नाही. कोणताही ऋतु असेल तरी ही समस्या उद्भवू शकते.
श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. जसे - पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, तोंडात किंवा हिरड्यात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्याने.
जर संतुलित आहार असलेले जेवण केले, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ आणि मिनरल्स आदींचे योग्य सेवन केले तर आपल्यासमोर ही दातांची समस्या उद्भवू शकत नाही. योग्य आहाराच्या सेवनाने आपण सहजरीत्या दातांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो.
पाणी खूप प्यावे
जर आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तर कधीही रोग ग्रस्त होणार नाही. पाणी पिण्याने आपल्याला बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाणी आपल्या तोंडाची स्वच्छता करण्यात मदत करतो. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करतो. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या आणि दातांवर प्रहार करीत असतात. आपण कमी पाणी पिण्याने आपल्या तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियाचे प्रमाण खूप वाढते, जे आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधीतून बर्याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.
दह्याचे सेवन करावे
अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की दही खाण्यानेही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यात बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे असे बॅक्टीरिया असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. दह्यामुळे असे कसे होते, याबाबत वैज्ञानिक जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. खरंतर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.
संत्री खावी
संत्री व्हिटॅमिन 'सी'चे मुख्य स्रोत असते. याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर आणि कांतीवानच होत नाही तर याच्या सेवनाने श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आपल्या तोंडात उपस्थित बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी' युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.
बडी शोप खावी
जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शोप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत करते. बडी शोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.
लहान वेलची खावी
हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्याला दुसर्यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.
लवंग सेवन करावे.
लवंगाचे जे ऍरोमेटिक फ्लेवर असते, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचे वापर अवश्य करा.
दालचीनीचे सेवन करा
दालचीनीची गोड चव भाज्यांना चवीष्ट तर करतेच, त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे.
हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिन हे १३.५ ते १७ gms/dL, तर स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन १२ ते १५ gms/dL एवढं हवं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अॅनिमिया म्हणतात (यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही म्हटलं जातं). अॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुली, तरुण मुली, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये याचं प्रमाण खूप आहे. लोहयुक्त पदार्थांची आहारातील कमतरता हे अॅनिमियाचं महत्त्वाचं कारण आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण घटतंय. अॅनिमियाचं दुसरं कारण म्हणजे आहारातून मिळणाऱ्या लोहाचं रक्तातील शोषण रोखणाऱ्या काही घटकांचं सेवन आपल्याकडून कायम केलं जाते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेऊनही त्याचं योग्य प्रमाणात शोषण न झाल्यानंही अॅनिमिया होतो. इतर कारणं म्हणजे अति रक्तस्त्राव, आतड्याचे रोग, इन्फेक्शन, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, बी १२ ची कमतरता, लिव्हरचे काही आजार, किडनीचे काही ठराविक आजार, गरोदरपणात होणारी लोहाची कमतरता अशी बरीच कारणं आहेत. थकवा येणं, अंधारी येणं, कामात लक्ष न लागणं, हातापायातील त्राण कमी झाल्यासारखं वाटणं ही अॅनिमियाची काही मुख्य लक्षणं आहेत. हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोहाच्या गोळ्या सुरू करणं हाच योग्य उपाय आहे. परिस्थिती खालावली, तर शरीराला जास्तीचं रक्तही पुरवावं लागू शकते. बऱ्याचदा रक्तातील लोहाची पातळी अतिरिक्त कमी होईपर्यंत ही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार
बीट, टोमॅटो, गाजर आणि अशा लाल रंगाच्या पदार्थांमधून लोह मिळतं किंवा त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हा निव्वळ गैरसमज आहे. चिकन, अंडी, मासे, इतर मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, उसळी, सुका मेवा, हळीव, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळतं. अन्नावाटे मिळणाऱ्या लोहाचेही दोन प्रकार आहेत. हिम आणि नॉन हिम. हिम प्रकारचे लोह सर्व प्राणिज स्रोतांमधून मिळतं, ज्याचे रक्तातील शोषण सहज होऊ शकतं. नॉन हिम प्रकारचे लोह सर्व वनस्पती स्रोतांमधून मिळतं, ज्याचं शोषण सहजासहजी होत नाही. याचाच परिणाम म्हणजे मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण जास्त आढळतं; कारण शाकाहारातून मिळणाऱ्या लोहाचं शोषण बऱ्याचदा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांना आहारातील लोहाचं शोषण व्हावं यासाठी लोहयुक्त पदार्थ खाताना व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे रक्तातील नॉन हिम प्रकारच्या लोहाचं शोषण होण्यास मदत होते. अन्नावाटे मिळणारे फायटेट आणि टॅनिनयुक्त पदार्थ, कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, अँटासिड्सचे अतिरेकी प्रमाणात सेवन, चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातील लोहाचं शोषण होऊ देत नाहीत. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करत असताना त्याचवेळी वर दिलेल्या या पदार्थांचं सेवन करणं जाणीवपूर्वक टाळलं, तर तुम्ही खाल्लेल्या लोहाचं शोषण योग्य प्रमाणात होऊ शकतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
निषेधार्ह पाणी भाग तीन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.
आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.
आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.
आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः
या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.
जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !
मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.
पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
अ ति
पा णी
पि ऊ
न ये
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (Lower Back Pain), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी ब-याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्या मुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. खरोखरच दुखापत झाली असेल तर ती मात्र मानसिक ताणामुळे नसते.
पाठदुखीची व ताणाची कारणे आणि धोके:
ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. जसे की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि ब-याचदा मानसिक ताणामुळे पाठदुखी सुरू होते.
अशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या वहान अपघातात मार बसल्याने पाठीची वेदना होते, मार बसतो तेव्हा तात्काळ मदत लागते. तसेच अतीताण घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ़्रॅक्चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रुपांतर पाठदुखीत होते. पाठीमधे गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी ही असतेच. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना किंवा फिजिशियनना सांगणे अत्यंत गरजेचे असते.
सर्वसाधारणपणे आढळणारी खालच्या बाजूची पाठदुखी ही २० ते ४० या वयोगटात आढळते. हे दुखणे पाठ, खालची बाजू किंवा मांड्या ह्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे दुखणे बरे व्हायला ४ ते ५ आठवडे लागतात. अशा ठिकाणी जखम झाली तर त्यावरचा अतीताण जायला १२ ते ३६ तास लागतात.
पाठदुखीसाठी घ्यावयाची काळजी
खालच्या बाजूची पाठदुखी (Lower Back Pain) सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे आणि ते नियमित करणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य त-हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारिरीक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने पाळणे आवश्यक असते.
उपचार
पाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून रहातात, पण तसे कधीच करू नये. खरे तर ती सर्वात चुकीची पद्धत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामधे पाठदुखी बद्दलचे प्रशिक्षण आणि सर्वांगिण माहितीसुद्धा अंतर्भूत असते. त्यामधे ही व्याधी वाढू न देण्यासाठी आणि कमी होण्यासाठी काय काय करावे हे डॉक्टर सांगतात. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते; त्यामुळे त्याची गल्लत करू नये. कोल्ड कॉम्प्रेसचा उपभोग दिवसातून अधून मधून २० ते ३० मिनिटे घ्यावा. त्याचा खूपच उपयोग होतो
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
थंडीत खूप वेळा सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. पण यावर काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो.
लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.
चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.
नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.
हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा ऊपाय आहे.
आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो. पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो. १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.
कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासुन तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायलाच हवी अन्यथा त्वचा सुंदर दिसण्याऐवजी भलतेच काही तरी होऊ शकते. साधारणपणे मुली मुले वयात येऊ लागली की अंगावर केस येऊ लागतात. त्यातही मुलींना हाता पायावर अथवा ओठांवर केस येऊ लागले की सौंदर्याला बाधा निर्माण होते व त्यासाठी वॅक्सिंग करून हे नको असलेले केस काढून टाकता येतात. शिवाय उन्हात सतत फिरल्याने त्वचा काळी पडते म्हणजे टॅन होते तो टॅनही वॅक्सिंगच्या सहाय्याने कमी करता येतो. वॅक्सिंग घरच्याघरीही करता येते मात्र प्रथमच वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये ते करावे हे उत्तम. एखाद्या कार्यक्रमासाठी जायचा प्लॅन असेल तर दोन दिवस आधीच वॅक्सिंग करावे कारण अनेकांना त्याची अॅलर्जी येऊ शकते व अॅलर्जी बरी होण्यासाठी दोन दिवस हाताशी असलेले केव्हाही चांगलेच. वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात. घरात वॅक्सिंग करताना त्वचा, हातपाय स्वच्छ करा व मगच वॅक्सिंग करा. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका राहणार नाही. वॅक्स गरम केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही तसेच वॅक्सवर लावण्यासाठी सुती कपड्याच्या ४ इंच रूंदीच्या पट्ट्या वॅक्स स्ट्रीप म्हणून वापरता येतील. वॅक्सिंक करून झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करणे व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. पायावर हातावर लावताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा. ओठावर अथवा हनुवटीवर वॅक्सिंग करताना कटोरी वॅक्सचा प्रयोग करा. या भागातली त्वचा जास्त संवेदनशील असते. त्यामुळे या भागाचे वॅक्सिंग करताना ३-४ छोटे छोटे भाग करून वॅक्सच्या केळ्याच्या सालीएवढा जाड थर द्यावा व ७ -८ सेकंदानंतर तो थर खेचून काढावा. त्या जागी लगोलग अँटीसेप्टीक क्रिम लावण्याची खबरदारी घ्यावी. वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
निषेधार्ह पाणी भाग दोन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.
अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
"पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."
शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.
अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
हृदयाला हितकर असतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.
अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.
एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.
रक्तदाबाचे प्रकार
अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.
साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.
अनुषंगिक अति रक्तदाब (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.
अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)
ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :
कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.
क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.
ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.
ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.
इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
Copyright © 2025 | Marathisrushti