वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर क्लॉट ऑकिनलेक व उपाध्यक्ष अमरनाथ झा हे होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धात तीनही सेनाविभागाचे परस्परांशी सहकार्य हे अत्यावश्यक आहे, ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणूनच स्वतंत्र भारतातही अशा प्रकारच्या संयुक्त सैनिकी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ह्या संस्थेचे नाव प्रथम नॅशनल वॉर अकॅडेमी ठेवावे आणि साधारणपणे २,५०० छात्रांसाठी ४ वर्षे मुदतीचा शिक्षणक्रम ठेवावा असे ठरले. या संरक्षण प्रबोधिनी सूदान सरकारने दुसऱ्या महायुद्धात भारतीय सेनेने सूदानमध्ये केलेली महत्त्वाची कामगिरी लक्षात घेऊन एक लाख पाउंड दिले व महाराष्ट्र राज्याने २,८३३ हेक्टर जमीन दिली. तसेच भारताच्या इतर घटक राज्यांनीही प्रत्येकी ५ लाख रु. दिले. खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही व पुण्यात हवाई दलाचा तळ आहे, म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासल्याची निवड करण्यात आली. परंतु बांधकाम होण्यात लागणारा कालावधी लक्षात घेता ४ जानेवारी १९४९ रोजी डेहराडून येथे एक इंटर सर्व्हिसेस विंग स्थापन करण्यात आले. ६ ऑक्टोबर १९४९ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासल्याच्या वास्तूची पायाभरणी झाली. डिसेंबर १९५४ मध्ये वास्तूचे काम जवळजवळ पूर्ण झाले व १६ जानेवारी १९५५ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उद्घाटन केले.या संस्थेतून ५ जून १९५५ रोजी पहिली तुकडी शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर पडली. त्यावेळी शिक्षणक्रम तीन वर्षांचा होता व त्यांपैकी शेवटच्या वर्षांचा अभ्यासक्रम भूसेना, नौसेना व वायुसेना यांनी आपआपल्या शिक्षणसंस्थांमध्ये पूर्ण करून घ्यावा, असे ठरविण्यात आले.
डब्ल्यू. एक्स. मस्कारेन्हस यांनी ह्या वास्तूचे स्थापत्याचे काम केले, आहे. मुख्य इमारतीस ‘सूदान ब्लॉक’ हे नाव दिले असून असून ६० वर्ग, प्रशस्त ग्रंथालय, संग्रहालय, सभागृह हे सूदान ब्लॉकचे मुख्य भाग आहेत. प्रबोधिनीचे प्रमुख कार्यालयही येथेच आहे. प्रबोधिनीत १,८०० छात्र शिक्षण घेतात. सेनेची गरज वाढल्यामुळे घोरपडी येथे आणखी ३०० छात्रांची शिक्षिणाची व्यवस्था करण्यात आली. तथापि १९८७ मध्ये हा विभाग खडकवासल्याला हलविण्यात आला. या प्रबोधिनीत कमांडंट, लेफ्टनंट जनरल अथवा तत्सम हुद्याचे अधिकारी असतात व पाळीपाळीने तीनही सेनाविभागांतून ते निवडले जातात. कमांडंट व डेप्युटी कमांडंट हे वेगवेगळ्या विभागांचे असतात. शालेय शिक्षण प्राचार्याच्या देखरेखीखाली चालते. प्राचार्य व शिक्षक यांची निवड व नेमणूक राज्य लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येते.
येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने अगोदर फक्त एकदाच एम्लॉयमेंट न्यूज वर्तमानपत्रामध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, ‘सचिव, यू. पी. एस. सी., धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, न्यू दिल्ली,’ या पत्त्यावर वेळेवर पाठविणे आवश्यक असते.
१६ ते १८ १/२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षा मे व डिसेंबरमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दर दोन वर्षांनी घेण्यात येतात व त्यांतून निवडलेले विद्यार्थी निवड मंडळापुढे चाचणीला जातात. वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणक्रमांनुसार यादी तयार करण्यात येते व त्यांतील पहिल्या ३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. छात्रांचा शिक्षणाचा आणि भोजन−निवासाचा खर्च सरकारमार्फत करण्यात येतो. शालेय शिक्षणक्रमाव्यतिरिक शिस्त, नेतृत्व व लष्करी शिक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. तीन वर्षांनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे बी. ए. अथवा बी. एस्सी. पदवी देण्यात येते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या बोधचिन्हात भूसेनेच्या दोन क्रूस आकारातील तलवारी, नौसेनेचा लंगर व वायुसेनेचा गरुड आहे व ‘सेवा परमो धर्म:’ हे बोधवाक्य आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते.
भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे.
भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून लष्कराने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे,संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो.
या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.
कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.
माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हल्ली एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते.. जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या स्मार्ट मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले.
काल बऱ्याच दिवसांनी फोर्ट विभागातील ‘काळा घोडा’ इथं जाणं झालं. तिथं गेलो आणि चमकलोच. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारातल्या पार्कींग लांटमधे उंची गाड्याच्या पार्कींगच्या गर्दीत एका उंचं चबुतऱ्यावर चक्क एक काळ्या रंगाचा घोडा ‘पार्क’ केलेला दिसला. मला आश्चर्यच वाटलं.
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
प्रशंसनीय पाणी भाग चार
आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?
हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !
उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !
गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.
पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.
सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.
मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.
हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.
पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
मधे पाणी कशासाठी ?
मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.01.2017
आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते. मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो.
आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्ताी, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्यमप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. अभिजित मुगळीकर,
पाण्याची प्रशंसता भाग दोन
जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते. जसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि आता आपल्याला काम सुरू केले पाहिजे असे वाटून पोटाने आतल्या आत स्वतः भोवती फिरायला सुरवात केलेली आहे. तेवढ्यात प्रचंड पाण्याचा धबधबा वरून आत येतो. काय होईल, जरा कल्पना करून पहा.
(गाडी सुरू झालेली आहे, दोन घंटा दिलेल्या आहेत. आतमध्ये माणसे दाटीदाटीने ठासून भरलेली आहेत, तेवढ्यात आणखी चार पाच माणसे हात दाखवून गाडी थांबवताहेत, तेव्हा जर चालकाने गाडी थांबवली तर बसलेले प्रवासी कसे कलकलाट करतात.)
सारंच बिघडून जातं. फिरणारी यंत्रणा सावकाश होते. मुख्य म्हणजे आतले तापमान बदलते. सुरू झालेली गाडी परत थांबते. कलकलाट सुरू होतो. कोणी का कशासाठी आधी येता येत नव्हतं का, आधीच उशीर झालाय, आणि इथे जागा तरी कुठेय, चला हो तुम्ही पुढे, येतील ती मागच्या गाडीने, या प्रकारचे उदगार गाडीत सुरू होतील. बरोबर आहे ना ?
अगदी तसंच पोटात सुरू होतं.
ऊर्ध्वम आमाशयात कफम् अंते करोति स्थूलत्वम् म्हणजे वरच्या पोटापासूनच चिकट कफाची संचिती म्हणजे साठवणूक सुरू होते. जाडी वाढायला इथेच सुरवात होते.
जेवणानंतर लगेचच पाणी ढोसल्याने हे परिणाम दिसतात. आणि हे पाणी जर फ्रीजमधले गारेगार असेल तर आणखीनच सत्यानाश. म्हणजे जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायले तरी नाही हो चालत. एकदा मिक्सर सुरू केला की आता मधे थांबणे नाही.
आणि पचनाला जेव्हा हवे तेव्हा पाणी देणार नाही, नको तेव्हा ते आत भरणार त्याचा काय उपयोग ?
म्हणजे मरताना उपयोगी पडावी म्हणून काशीहून गंगा आणून ठेवली होती. तहानेने जीव जायची वेळ आली तरी म्हणायचे, मरताना शेवटचा घोट गंगेचा जावा, म्हणून आणली आहे तर आत्ताच कशाला फोडा, नंतर उघडू. आता बाटली फोडली तर नंतर काय उपयोग ? हा विचार करेपर्यंत प्राण गेलेले असतात. आता बाटली फोडली तरी गंगा पोटात काही जात नाही. ज्यावेळी जी गंगा पोटात जायला हवी, त्याचवेळी ती पोटात गेली तर उपयोग.
घोडे नाचवून मजा बघायची असेल तर वराती मधेच घोडे नाचले पाहिजेत.
वराती मागून घोडे नाचवून काय उपयोग ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.01.2017
घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात. त्यामुळे घशाच्या आजारात अनेकदा कानही दुखवतो आहे, अशी रुग्णाला भावना येते. जिवाणू अगर विषाणूजन्य दाह, इजा होणे, ऍलर्जी, घशाचा कॅन्सर, शरीराचे काही अन्य आजार, शस्त्रक्रिया किंवा तपासण्यानंतर घसा दुखतो. तोंड उघडे ठेवून श्वाचस घेतला गेला तर घशाचे अस्तर कोरडे पडते. खूप मोठ्याने बोलण्याने स्वरयंत्रणेवर ताण पडतो. अतिरेकी मद्यपान, नाकाघशातून धूर जाणे किंवा अमोनियासारखा वायू घशात जाणे यामुळेसुद्धा घसा दुखू लागतो. घसा दुखण्याची कारणे अनेक. घसा दुखण्याचे एक नेहमी आढळणारे कारण म्हणजे ऍलर्जिक ऱ्हायनायटिस. हा त्रास विशिष्ट ऋतुमानात अथवा वर्षभर होत राहू शकतो. घसा दुखतो व नाक चोंदते. नाकातून पातळ द्राव वाहतो. नाकाच्या मागून घशात स्राव उतरतो. झटके आल्याप्रमाणे शिंकांच्या एकामागोमाग फैरी येतात. वास येत नाही. कपाळ व कानशिलांच्या वरचा भाग दुखू लागतो. डोळे, नाक व घसा येथे खाज सुटते. डोळे लाल होतात. पापण्या सुजतात. हा आजार फुलांच्या परागांना, बुरशीच्या गोलकांना, धुळीला, प्राण्यांच्या त्वचेवरील खवल्यांना झालेल्या ऍलर्जीमुळे होतो. ऍलर्जीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्यावर उपचार करता येतो; परंतु, यामुळे सर्वांनाच फायदा होईल असे नाही.
काही औषधांत अँटि-ऍलर्जिक रेणू असतात, त्यांनी गॅस्ट्रो इसोफेजियल टीफ्क्ललस डिसीझ या विकारात अन्ननलिका आणि जठर यांतील झडप कमजोर होते. परिणामी जठरातील पाचकरस अन्ननलिकेतून घशापर्यंत येतात. या पाचक रसात हायड्रोक्लोजरिक ऍसिडचे प्रमाण बरेच असते. स्वरयंत्रणेचा दाह होतो. आवाज बसतो. अशा व्यक्तींमध्ये स्वरयंत्रणेवरील कूर्चाही सुजणे आणि रुग्णाला आपल्या घशात "गाठ‘ असण्याची भावना येऊ लागते. ग्लॉसोफॅटिंजियल न्यूरालनिया या आजारात घशाच्या एकाच बाजूला चमक आल्यासारखी किंवा कापल्यासारखी वेदना येते. सहसा गिळताना किंवा जांभई देताना हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. ही वेदना कानापर्यंत जाणवू शकते. हर्पीन सिंप्लेक्सा नावाच्या विषाणूने सहसा नाक व वरचा ओठ येथे फोड येतात (ज्वर उतणे). हा विषाणू कधी कधी घशातही फोड निर्माण करतो. जीभ, घसा, हिरड्या यावर श्वासाला दुर्गंधी सुटते. लाळ खूप येऊ लागते. भूक लागत नाही. अंगात बराच ताप भरतो. इन्फ्लुएंझाच्या आजाराची सुरवात घसा दुखण्याने होते. इन्फेक्शहस मोनोन्यूक्लीीओसिस या आजारात घसा दुखतो. मानेत गाठी येतात. ताप जात-येत राहतो. एपस्टाईत बार नावाच्या विषाणूने तो येतो. आजारी व्यक्तीच्या लाळेतून हा विषाणू परिसरात पसरतो. प्लीहा वाढते. वाढलेली प्लीहा ठिसूळ असते. तुलनेने क्षुल्लक मार लागल्याने ही वाढलेली प्लीहा फुटते व प्राणघातक रक्तस्राव होतो. जिभेच्या, घशाच्या, स्वरयंत्रणेच्या कॅन्सरमुळेदेखील घसा दुखतो. घसा दुखतो अशी तक्रार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक कसोशीने तपासणी होणे आवश्येक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई
Copyright © 2025 | Marathisrushti