(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संगणकीय आजार !

    रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय.

    मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी संगणकासमोर बसण्याची आपली पद्धत कारणीभूत ठरते. अनेकदा संगणकाचा ‘मॉनिटर’ डोळ्यांच्या सरळ रेषेच्या तुलनेत वरच्या किंवा खालच्या पातळीवर ठेवलेला असतो. मॉनिटरकडे पाहण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की तो असा वर किंवा खाली आहे हेही लक्षात येत नाही. मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतच हवा. तो काही मिलिमिटर वर किंवा खाली चालू शकेल, पण मॉनिटरकडे पाहताना वर किंवा खाली पाहावे लागू नये अशी त्याची जागा असावी. संगणकासमोर काम करताना काही जणांना एकदा की- बोर्डकडे आणि एकदा मॉनिटरकडे असे सतत खाली आणि वर पाहावे लागते. सहसा कागदपत्रे वाचून ती टाईप करताना असे होते. हे देखील मानदुखी वाढवणारे ठरते. अनेकदा की- बोर्ड आणि मॉनिटर यांच्या जागांचा काही मेळच नसतो. एकीकडे की- बोर्ड आणि त्याच्या समोर नव्हे तर थोडासा दूर तिरक्या रेषेत मॉनिटर अशी परिस्थिती असते. यात नुसते वर-खालीच नाही तर उजवीकडे- डावीकडे असेही सारखे पाहावे लागते आणि मानेच्या स्नायूंवर वाढीव ताण येतो.

    संगणकासमोर बसल्यावर मॉनिटरवरील मजकूर वाचण्यासाठी खुर्चीतून पुढे वाकावे लागू नये हा पहिला नियम. त्यामुळे खुर्ची सहजपणे पुढे किंवा मागे हलवता यावी. काही खुच्र्याना हाताचे कोपर टेकवायला जागाच नसते. माणसाची उंची अधिक असेल तर की-बोर्ड वापरताना कोपरे सतत हवेत लटकल्यासारखी राहतात. असे करताना खांदे वर उचललेले राहतात आणि मानेच्या बाजूला असलेला स्नायू सतत दाबला जातो. यामुळे काही वेळाने मान दुखायला लागते. त्यामुळे खुर्चीच्या दोन्ही बाजूंना कोपर टेकवायला आधार असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर खुर्चीच्या हातांची उंची कमी-जास्त करण्याची सोय असलेली खुर्ची निवडल्यास उत्तम. की- बोर्डवर टाईप करताना कोपरांना आधार मिळाला तर खांद्यांवर ताण येत नाही. पाठदुखी टाळण्यासाठी खुर्चीला चांगला ‘लंबर सपोर्ट’ असायला हवा. खुर्चीची पाठ सहसा केवळ पाठीला आधार देण्यापुरती असते. पण हा आधार खांद्यांपर्यंत मिळणे गरजेचे असते. खुर्चीची पाठ तुमच्या खांद्यांपर्यंत असेल तर संपूर्ण पाठीला आधार मिळेल. अशी खुर्ची वापरल्यास पाठदुखीबरोबरच मानदुखीलाही प्रतिबंध करता येऊ शकतो. सातत्याने संगणकावर काम करायचे असेल त्यांनी काही वेळ गेल्यावर पाठ आणि मानेच्या स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. हे व्यायाम अगदी साधे, कार्यालयात देखील करण्यासारखे असतात. आपल्या डॉक्टरांकडून ते जरूर शिकून घ्यावेत. या हालचालींमुळे पाठ, कंबर आणि मानेवरचा ताण हलका होतो. काहींना तासा- दोन तासांनी ब्रेक घेतलेला पुरेल तर काहींना दर अध्र्या तासाने ‘विश्राम’ स्थितीत यावे लागेल. ब्रेक घेणे म्हणजे काम थांबवून पुन्हा संगणकावरच फेसबुक किंवा तत्सम काहीतरी करणे नव्हे! ब्रेक घेतल्यावर ती पाच मिनिटे तुम्ही संगणकापासून दूर राहायला हवे. या काळात उभे राहून पाठीचे व्यायाम करा किंवा कार्यालयात या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मारून या.
    चष्म्याचा क्रमांकही तपासून घ्या.

    नेहमी संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला चष्म्याचा नंबर बरोबर आहे ना हे ठराविक काळाने तपासून घेतलेले बरे. चष्म्याचा नंबर बदललेला असला तर डोळ्यांवर वाढीव ताण येतो. मानदुखी आणि डोकेदुखीसाठीही हे कारणीभूत ठरू शकते. चाळिशीनंतर बहुतेक जणांना वाचताना चष्मा लागतो, पण ही मंडळी चष्मा घालायचे टाळतात. त्यामुळे आपल्याला चष्मा असेल तर संगणकावर काम करताना तो घालायचे विसरू नका. चष्मा असताना तो न वापरणे हे देखील मान दुखण्याचे एक कारण ठरू शकते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- संपदा सोवनी / सकाळ

  • शरीराला आवश्यक खनिजं

    आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं तसंच उपविभागाचं कार्य सुरळीत राहावं म्हणून त्यांना खनिजांची गरज असते. कारण शरीरातली प्रत्येक क्रिया मग ती रासायनिक असो किंवा हार्मोनल त्या प्रत्येक क्रियेत खनिजं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
    आपण जे अन्न सेवन करतो त्यात ही खनिजं नैसर्गिकरीत्याच परिपूर्ण असतात. आणि जे पदार्थ किंवा खनिजं शरीराला अनावश्यक आहेत ती मल- मूत्र किंवा घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात. ही सगळी खनिजं निसर्गत:च उपलब्ध असतात.
    तुम्ही कृत्रिमरीत्या शरीराला त्या खनिजांचा साठा पुरवण्याचा प्रयत्न केलात तर शरीर त्या खनिजांचा स्वीकार कजरत नाही परिणामी आपल्याला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. खनिजं ही कार्बनविरहीत रासायनिक तत्त्व असतात जी पाण्यामध्ये अगदी सहज विरघळतात.
    निसर्गात २४ प्रकारची खनिजं असून त्यातली सात खनिजं ही अनिवार्य असतात आणि ती फळं, भाजी, धान्य, दूध आणि पाणी या नैसर्गिक गोष्टींमधून मिळतात.

    आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजं
    कॅल्शिअम
    शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर यात असतं.

    कमतरतेमुळे काय होतं?
    हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
    कार्य काय असतं?
    शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
    लोह
    खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
    कार्य काय असतं?
    शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
    सोडिअम
    मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
    कार्य काय असतं?
    शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
    आयोडिन
    शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
    कार्य काय असतं?
    शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
    पोटॅशिअम
    सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    अॅतसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
    कार्य काय असतं?
    शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
    फॉस्फरस
    दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
    कार्य काय असतं?
    मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
    सिलिकॉन
    गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
    कार्य काय असतं?
    जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
    मॅग्नेशिअम
    बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
    कार्य काय असतं?
    पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
    सल्फर
    दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
    कार्य काय असतं?
    इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
    क्लोरिन
    पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध यात असतं.
    कमतरतेमुळे काय होतं?
    अॅतसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅालर्जी.
    कार्य काय असतं?
    सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- प्रहार

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३८

    पाण्याची प्रशंसता भाग तीन

    जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
    जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
    जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.

    कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.

    नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !

    असेच व्यवहारात देखील दिसते.
    जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.

    पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.

    मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
    हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.

    जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.

    जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.

    पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !

    तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
    जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
    "तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.01.2017

  • वृध्दासाठी आहार

    वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. न्याहरीला रोज काय वेगळे करावे, त्यातही घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोसेल आणि तेवढय़ापुरते पोटही भरेल, असा आहार कुठला, हे प्रश्न जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी पडतातच. फार वेगळे काही न करताही वृद्धांना चालेल अशी हलकी न्याहरी करता येते.

    पोळी आणि तिळाची चटणी.
    पोळी किंवा ब्रेडवर मध आणि चिमूटभर दालचिनीची पूड घालून खाता येईल. *ज्यांना अंडे चालते अशांसाठी ब्रेड आणि उकडलेले अंडे. *ब्रेडला नेहमीचे लोणी लावण्यापेक्षा थोडेसे ‘पीनट बटर’ (शेंगदाण्याचे लोणी) किंवा ‘अल्मंड बटर’ (बदामाचे लोणी) लावून खाता येईल. यातले पीनट बटर आता सहजतेने मिळू लागले आहे. बदामाचे लोणी घरी करता येते. बदाम भिजवून त्याची साले काढावीत आणि थोडेसे पाणी घालून ते गंधासारखे बारीक वाटावेत. ४-५ दिवस टिकणारे हे बदामाचे लोणी ब्रेडवर लावता येईल. साध्या लोण्यात किंवा बाजारात मिळणाऱ्या ‘टेबल बटर’मधून अधिक कोलेस्टेरॉल शरीरात जाण्याची भीती शेंगदाणा व बदामाच्या लोण्यात कमी असते.

    *सकाळच्या न्याहरीला सूपसारखा उत्तम आणि ताजेतवाने करणारा पदार्थ नाही. गाजर, मटार, टोमॅटो, कोबी अशा रोज घरात असलेल्या भाज्या वापरून पटकन आपल्या आवडीच्या चवीची सूप बनवता येतील.

    *जेवणाच्या आधी अकरा वाजताच्या सुमारास अनेक वृद्धांना काही तरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा मधल्या वेळेसाठी फळे किंवा सुकामेवा उत्तम. फळांच्या रसांपेक्षा फळे खाल्ली तर त्यातून तंतुमय पदार्थदेखील मिळतात. दातांनी चावण्यास काही समस्या नसेल तर थोडा सुकामेवा जरूर खावा. *दुपारच्या जेवणात वरण किंवा आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हे सगळे पदार्थ असायला हवेत. पण पोटाला जड होऊ नये म्हणून जेवण प्रमाणातच केलेले बरे. जेवणात पुदिन्याची चटणी वगैरे पदार्थ चव तर आणतातच, पण पोटाला पाचकही ठरतात. * दुपारच्या चहाच्या वेळी लाह्य़ा हे उत्तम अन्न. ज्वारीच्या, साळीच्या किंवा मक्याच्या लाह्य़ा, खाकरा, चुरमुरे हे पदार्थ हलके ठरतील. चावण्यास अडचण नसलेल्यांनी खारे दाणे, फुटाणे खाण्यासही हरकत नसावी. जी मंडळी चहा पीत नसतील त्यांनी त्याऐवजी एखादे फळ खावे किंवा ताक प्यावे.

    *रात्रीच्या वेळी भाजी आणि भाकरी हे जेवण चांगले. भाजी-भाकरी पोटाला हलकी आहेच, शिवाय त्यातूनही तंतुमय पदार्थ मिळतात. दोन्ही वेळच्या जेवणात ताक घेतले तर पोटाला शांत वाटते. *अनेक वृद्धांना डाळी किंवा उसळी अधिक प्रथिने असल्यामुळे पचत नाहीत. अशांसाठी हे पदार्थ करताना त्यात लसूण, आले, जिरे, मिरे आणि दालचिनी पावडर घातली तर पचनासाठी फायदा होऊ शकतो.

    *ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी पोळी किंवा भाकरी करताना त्यात एका पोळी-भाकरीला १ चमचा एरंडेल तेल घालून पाहावे. भाकरीत सहसा तेल घातले जात नाही, परंतु त्यातही एरंडेल तेल घालून चालते.

    *अपचनाचा, आमवात यांचा त्रास टाळण्यासाठी सुंठ आणि साखर यांचे एकास चार या प्रमाणात मिश्रण करून ठेवावे. येता-जाता या मिश्रणाची एक-एक चिमूट तोंडात टाकावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- लोकसत्ता

  • अॅलर्जीपासून कसा बचाव करावा

    सध्या थंडीचा पाठशिवणीचा खेळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा विकारांना सामोरं जावं लागत आहे. अॅीलर्जी किंवा अस्थमा असलेले लोक बेजार झाले आहेत. जरासं हवामान बदललं की कित्येक जणांना सर्दीला सामोरं जावं लागतं. सध्या तर सतत ऊन आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कित्येक जण या त्रासाचे बळी ठरत आहेत. म्हणून या मोसमात आपलं घरदेखील किटाणूमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अॅलर्जीचं मूळ घरातच असतं.

    अॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांना थंडीच्या दिवसांत या त्रासाला सामोरं जावं लागतं. कोणाचं नाक वाहतं, तर कोणाला एका मागून एक शिंका येतात. कोणाला कफ होतो तर कोणाला घशात खवखव. कित्येकांना तर तापही येतो. ताप लवकर जातो म्हणा मात्र अॅलर्जीचा त्रास दीर्घकाळ सतावत राहतो. यात डोळ्यांनाही त्रास होतो. डोळ्यांमध्ये जळजळ, खाज येणे, लाल होणे असेही विकार संभवतात.

    असं का होतं?
    धूळ-माती, जनावरांचे केस, परफ्युम आदी कारणं अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी वर्षभर असतात. मात्र थंडीच्या दिवसांत या गोष्टी डोकं वर काढतात. कारण थंडीत या गोष्टींना वातावण अनुकूल असतं. याचं कारण असं की थंड हवेमुळे कित्येक जण दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवतात. गरम कपडे घालतात. ब्लँकेट किंवा रजाईचा वापर केला जातो. त्यात हिटरचा प्रयोग केला जातो. या सगळ्या कारणांमुळेही अॅलर्जीची समस्या वाढते. थोडक्यात घरातलं वातावरण अॅलर्जीक लोकांसाठी पोषक असतं. म्हणून सर्दी, ताप, खोकला असे त्रास उद्भवातात.

    बचाव कसा कराल?
    घरात हवा खेळती राहील, असं करावं. ब्लँकेट, गरम कपडे, कार्पेट्स किंवा सॉफ्ट टॉयज उन्हात वाळत घाला.
    घरात सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्या. खिडक्या, दरवाजे सताड उघडय़ा ठेवाव्यात. सूर्यप्रकाशामुळे किटाणूंना लपायला वाव मिळत नाही.
    सोफा, कार्पेट्स, स्वेटर, कोट, गाडीचे सीट कव्हर्स, सॉफ्ट टॉईज याची नियमित सफाई करा. ते देखील उन्हात वाळत घाला. म्हणजे त्यात लपलेले किटाणू नष्ट होतील.

    एसीसारख्या घरातल्या उपकरणाची स्वच्छता करा. बरेच दिवस न लावल्याने त्यात घाण किंवा धूळ साचण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या दिवसांत पंख्यांचा वापर होत नाही. त्यावर धूळ साचते. तसंच पडद्याचे कानेकोपरे स्वच्छ कसे राहतील याकडे लक्ष द्या.
    घरात असलेली शोभेची झाडं देखील अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. अशी झाडं ठेवण्यापेक्षा खोटी झाडं ठेवावीत.
    अस्थमा असलेल्या लोकांनी कार्पेट किंवा पाळीव प्राण्यांपासून लांब राहावं.
    घरात धूम्रपान, सुगंधी उदबत्त्या, उग्र वासाचं परफ्युम्स याचा वापर कमीच करावा. छत, बेसमेंट आणि जिन्याचीदेखील नियमित स्वच्छता राखावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • हृदयविकाराचा त्रास जडलेल्या लोकांनी काय खावं ?

    हृदय स्नायूंचं बनलेलं आहे. त्या स्नायूंचं वैद्यकीय नाव आहे ‘मायोकारबीयम’. हे स्नायू सतत आकुंचन पावत असतात. ‘कॉरोनरी आर्टरीज’ नावाच्या दोन शुद्ध रक्तवाहिन्या आणि त्यांच्या असंख्य शाखा तसंच उपशाखा यांच्यामधून हृदयाच्या स्नायूंना भरपूर रक्तपुरवठा सतत होत असतो. हृदयाला चांगला रक्तपुरवठा होण्यासाठी पौष्टिक पण संतुलित आहार रोजच्या खाण्यात आला पाहिजे.

    कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल मेणासारखा मऊ पण रक्तात न मिसळणारा पदार्थ असतो. ७० टक्के कोलेस्टेरॉलची निर्मिती यकृतात होते. तर २५ ते ३० टक्के कोलेस्टेरॉल आहारातून मिळतं. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारच असतं.

    एचडीएल : हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. या कोलेस्टेरॉलचा दर्जा शरीरासाठी चांगला असतो.

    एलडीएल : लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. वाईट प्रकारचं कोलेस्टेरॉल म्हणून ‘एलडीएल’ओळखलं जातं. यामुळे धमनी काठिण्य नावाचा हृदयरोग जडतो. आहारात फायबरचं प्रमाण (तंतुमय भाज्या, फळं तसंच नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्यं) जास्त असल्यास एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि एलडीएल या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण आपसूकच घटतं.

    तेल आहारात वापरात असलेलं तेल हे दोन प्रकारचं असतं. सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅटच्या अतिसेवनाने (लोणी, डालडा, साय इ.) रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. हे प्रमाण हृदयविकाराला आमंत्रण देतं.

    अनसॅच्युरेटेड पुन्हा अनसॅच्युरेटेड तेलात दोन प्रकार असतात. *पीयूएफए *पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅेसिड. म्हणजे पुफ्फा. *एमयूएफए * मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅमसिड. अर्थात मुफ्फा.

    पुफ्फा हे रक्तातील चांगल्या आणि वाईट या दोन्ही कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. ‘पुफ्फा’ असलेल्या ओमगा ३ आणि ओमेगा ६ या फॅटी अॅयसिडच्या सेवनाने हृदयाभिसरण उत्तम होतं. पण शरीरात त्याची निर्मिती होत नसल्यामुळे आहाराद्वारे ते घेणं उत्तम. उदा. भोपळयाच्या बिया, अळशी, मका, सनफ्लॉवर तेल, करडई तेल.

    पीयूएफए या प्रकारातील ते जास्त तापलं तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. नवीन संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, फक्त आणि बराच काळ पुफ्फा असलेलं तेल वापरल्यास वाईट कोलेस्टेरॉलसोबत चांगलं कोलेस्टेरॉलही कमी होतं. म्हणून आहारात फक्त पुफ्फा तेल न वापरता त्यात मुफ्फा असलेलं तेल मिक्स करून वापरावं. मुफ्फा या प्रकारचं तेल हे रक्तातील वाईट आणि हानिकारक असं एलडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. इतकंच नव्हे तर ते रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं.

    उदा. बदाम-आक्रोड, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह तेल, मोहरीचं तेल, राईसब्रॅन तेल, कनोला तेल (मक्याचं तेल)
    ऑलिव्ह ऑईल हे चांगलं असलं तरी त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो. म्हणजे ते जास्त तापलं तर त्यातील पोषण मूल्य कमी होतातं. त्यामुळे या तेलाचा वापर आहारात कच्चाच करावा. म्हणजे पदार्थ तयार झाल्यावर वरून दोन ते तीन थेंब ऑलिव्ह ऑईल वापल्यास हरकत नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट/ प्रहार

  • आरोग्याकडे लक्ष

    नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स...
    दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं.
    साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
    दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
    श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात.
    स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
    व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरुर प्या.
    प्रशिक्षित प्रशिक्षक निवडा. जेणेकरुन भविष्यातील अपव्यय टाळता येईल.
    वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
    सकारात्मक विचारसणीचा अवलंब करा. जे तुम्हाला यश मिळवण्यास उपयोगी ठरेल.
    ताजी फळं आणि सालाड खाण्यावर भर द्या.
    एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. दिवसातून पाच ते सहा वेळा अल्पसा आहार घ्या.
    हळुहळू आणि व्यवस्थित चावून खा. तुम्ही जेवढं हळू खाल तेवढं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
    मानवी शरीराला दररोज अर्धा किंवा एक टिस्पून मीठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
    ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जास्त खाणं हा काही उपाय नाही.
    दररोज ध्यानधारणा आणि प्राणायम करण्याची एक वेळ निश्चित करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.नमिता जैन

  • अॅ निमिया किंवा रक्त्पांढरीवर घरगुती उपाय

    पालक
    पालकामध्ये बी-12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अॅ सिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्ताोची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

    डाळिंब
    डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचे प्रमाण डाळिंबामध्ये खूप जास्त असते. काही प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण झटपट वाढते आणि रक्त प्रवाहही योग्य राहतो. सकाळी अनशापोटी डाळिंब खाल्ल्यास किंवा डाळिंबाचा रस प्यायल्यास अॅरनिमियामध्ये फायदा होतो.

    बीट आणि सफरचंदाचा ज्यूस
    बीटामध्ये फॉलिक अॅासिड मोठ्या प्रमाणात असते तर सफरचंदात लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अॅयनिमियामध्ये त्याचा फायदा होतो. अॅलनिमियाच्या रोगात एका बीटाचे रस आणि एक सफरचंदाचा रस यांच्यामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्यायलाने फायदा होतो.

    टोमॅटो
    शरीरातील लोहाचे जास्त प्रमाण गरजेचे असते; पण ते लोह शरीरात शोषले जाणेही महत्त्वाचे आहे. टोमॅटोमुळे लोह शोषले जाते. रोजच्या रोज दोन टोमॅटो खाणे आणि एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस पिणे हितकारक असते. त्याशिवाय सॅलड आणि स्वयंपाकातही टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात केला पाहिजे.

    खजूर
    खजुरामध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. शंभर ग्रॅम खजुरामध्ये 90 मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असते. दुधात दोन खजूर रात्रभर भिजवून सकाळी अनशापोटी चावूनचावून खाऊन आणि दूधही प्यावे. त्याशिवाय खजूर गरम पाण्यात भिजवूनही खाल्ल्यास फायदा होतो. ज्या व्यक्तींाना लॅक्टोजची अलर्जी आहे त्यांच्यासाठी पाण्यात भिजवलेले खजूर हा उत्तम पर्याय आहे.

    किसमिस
    किसमिसमध्ये लोह, प्रथिने, फायबर आणि सोडियम यांचे अधिक प्रमाण असते त्यामुळे अॅकनिमियामध्ये फायदा होतो. दहा ते बारा किसमिस रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी त्या पाण्यात मध टाकून किसमिस खाऊन टाकावे आणि पाणी पिऊन टाकावे.

    मध
    लोह आणि बी-12 जीवनसत्त्वाचे प्रमाण मधामध्ये जास्त असते त्यामुळे रोज मध खाल्ल्यास त्याचा नक्कीबच फायदा होतो. फळांचे तुकडे, दूध यांच्यात मध मिसळून खाल्ल्यास अॅचनिमियातील रक्ताातली कमतरता पूर्ण होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. रोहिणी भगत

  • घराच्या रंगात आरोग्याचा मंत्र

    घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत.

    गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक असावीत असा आग्रह धरताना दिसतात. या सर्वांचा परिणाम असा झालाय की देशासह जागतिक पातळीवर घराचा पेण्ट आणि कोटिंगशी संबंधित उद्योगही आपली उत्पादनं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असतील असा प्रयत्न करत आहेत. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम थोड्या - फार प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्या घरातल्या अंतर्भागात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. आपण घरात अधिक वेळ घालवत असतो आणि रंगांतली विषारी द्रव्यं, क्षोभकं, अॅलर्जीकारक घटक आणि वायूचा सामना करत असतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी चांगल्या म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला पाहिजे. तसंच खालील गोष्टी केल्या पाहिजे.

    घरात भरपूर मोकळी हवा राहिल, अशी उपाययोजना करा.
    आर्द्रता आणि पाण्यामुळे भिंती किंवा रंगांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
    विषारी द्रव्यांशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी खबरदारी घ्या.
    घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नूतनीकरण व रिमॉडेलिंगमध्ये आपल्या नकळत होणारी हानी टाळण्यासाठी देखरेख पद्धतीत बदल घडवून आणा.
    घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करा. उदा. ओलावा काढून टाकण्यासाठी आणि आर्द्रता कमी करण्यासाठी प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या.
    आरोग्याची हानी टाळण्यासाठी घराची नियमित तपासणी करा.

    घरातल्या हवेचा दर्जा राखणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या हवेचा तुमच्या आरोग्यावर थेट आणि दीर्घ परिणाम होत असतो. बऱ्याच घरांमधली हवा घराबाहेरच्या हवेपेक्षा २२०० पटीने अधिक प्रदूषित असते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे. अशा प्रदूषित हवेमुळेच श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवणं, डोळे आणि त्वचा जळजळणं असे त्रास होतात. म्हणूनच घरातली हवा प्रदूषित असेल तर ती सायलेण्ट किलर असते.

    घरातल्या भिंतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांशी रंगांची निर्मिती ही व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउण्ड्स (व्हीओजीस)पासून केली जाते. पण या घटकांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि ती आरोग्यासाठी धोकादायक बनते. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असं म्हणतात. व्हीओसींमुळे बाळांना फुफ्फुसाशी संबंधित विकार, अॅलर्जी, पाणावलेले आणि लाल डोळे, वाहतं नाक, कफ, घशाचा संसर्ग अशा समस्या जाणवतात. तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
    मुलं दिवसातला भरपूर वेळ घरातच असतात. अशा परिस्थितीत मुलांचा संपर्क हवेतल्या प्रदूषकांशी येत असेल तर त्यामुळे त्यांच्या रक्तातलं शिशाचं प्रमाण वाढणं तसंच दमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. घराच्या रंगांमध्ये व्हीओसीजचं प्रमाण अत्याधिक असेल तर त्याची झळ प्रौढांनाही बसू शकतो. त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.

    आजचे ग्राहक जागरूक असून ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करायला हवा. हे रंग घरात असतील तर डोकं दुखणं, मळमळणं, श्वसनविकार, चक्कर येणं, छातीत दुखणं, फुफ्फुसात जळजळणं, नाक, घसा आणि डोळ्यात जळजळ होणं आदी समस्या सहसा जाणवत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • ऍसिडिटी

    मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरीधंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो.

    आम्लपित्त
    दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट - तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. अशा परिस्थितीत पोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार झाल्याने मळमळते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंड आंबट व कडू वाटणे, आंबट ढेकर येणे अशी आहेत. अन्न घशाशी आल्यासारखे वाटते. कधी-कधी उलट्या होतात. दीर्घकाळ अपचन व आम्लपित्त असल्यास गॅस्ट्रिक अल्सर किंवा जठरव्रण या आजाराचे चिन्ह समजावे.

    गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर
    अल्सर म्हणजेच जखम. जठराच्या आतील आवरणात जखम किंवा व्रण झाल्यास त्याला पेप्टिक अल्सर म्हणतात. हे व्रण साधारणतः अन्ननलिकेच्या खालच्या बाजूस, जठरात किंवा आतड्याच्या सुरवातीच्या भागात आढळतात. जठरामधील अन्नरसातील आम्लाचे प्रमाण जास्त वाढल्याने जठरव्रण होतो. पोटाच्या वरच्या बाजूस ठणकत राहते. याची प्रमुख कारणे म्हणजे मद्य, मिरची, मसाले, तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, सिगारेट, तसेच मानसिक ताणतणाव. याशिवाय दात, हिरड्या, घसा, कान या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला तर त्यातून तयार होणारी दूषित द्रव्ये पोटात गेल्याने त्याचा जर जठराच्या एखाद्या भागावर परिणाम झाला, तर ज्या भागावर परिणाम झालेला आहे तेथे जखमा होतात. त्यामुळेही अल्सर होतात.

    अल्सरचे प्रकार
    ऍक्यु्ट पेप्टिक अल्सर जठराच्या जागेवर खूप दुखते. अन्न घेताच दुखणे वाढते. मळमळते, उलटी होते. उलटी झाल्यावर बरे वाटते. जठरव्रणातून रक्तस्राव होत असेल तर रुग्णाला शौचास काळ्या रंगाची होते. कधी-कधी पोटदुखी जास्त दिवस चालू राहते. नंतर त्रास कमी होतो, पण परत थोड्या दिवसांनी सुरू होतो. जठरव्रणावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर रक्ताची उलटी होते. पोटातील कळ अचानक वाढून पोट ताठ होते व आंतर्त्वचादाह किंवा पेरिटोनायटिसची लक्षणे दिसतात.

    क्रॉनिक गॅस्ट्रिक अल्सर या प्रकारचा अल्सर जठरातील जुनाट जखमेमुळे होतो. या आजाराचे रुग्ण साधारणतः मध्यमवयीन असतात. मानसिक ताणतणाव याचे प्रमुख कारण आहे.

    प्रमुख लक्षणे म्हणजे अपचनाचा सतत त्रास होतो. पोटात वरच्या डाव्या बाजूला दुखते. हे दुखणे जेवल्यानंतर अर्ध्या ते दोन तासांनंतर चालू होते. पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन आग होते. कधी-कधी त्या जागी जडपणा येतो व रुग्णास अशक्तपणा येतो. विश्रांती घेतल्यावर बरे वाटते. हलके अन्न पचते. मसालेदार, तेलकट पदार्थांमुळे पोटात आग होऊन उलटी होते, मळमळते. या रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास अधूनमधून होतो.
    ड्युओडिनल अल्सर लहान आतड्याच्या सुरवातीचा भाग जठराच्या खालच्या टोकाला जोडलेला असतो. या भागात होणाऱ्या जखमेला ड्युओडिनल अल्सर म्हणतात.

    खूप मानसिक ताण, शारीरिक कष्ट आणि पचायला जड आणि तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर त्रास वाढतो. जेवणानंतर पोटात दुखते, विशेषतः रात्री जास्त दुखते. या आजाराची प्रमुख कारणे "हरी‘, "वरी‘ आणि "करी.‘ "हरी‘ म्हणजे गडबड, धांदल, "वरी‘ म्हणजे सतत काळजी, चिंता आणि "करी‘ म्हणजे तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे.

    याची प्रमुख लक्षणे म्हणजे पोट रिकामे असताना वेदना वाढतात. पोटाच्या मध्यावर बेंबीच्या वर तीव्र वेदना होतात. जेवणानंतर तीन-चार तासांनी वेदना सुरू होतात व त्या वेळी रुग्णास भूक लागते त्यालाच "हंगर पेन्स‘ म्हणतात. रुग्णास उलटी होते.

    अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारात गुद्‌द्‌वाराचा दाह होतो. यालाच इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज म्हणतात. यात रुग्णास पातळ चिकट व रक्तमिश्रित शौचास होते. 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळतो.

    याची प्रमुख लक्षणे म्हणजे अशक्तपणा, अंगात बारीक मुरणारा ताप, वजन कमी होते, शौचाला थोडी-थोडी पण पातळ होते, पोटात कळ येऊन लालभडक रंगाचे रक्त शौचातून जाते. जुनाट रुग्णास असे खूप दिवस होत असते.

    अश्या व्यक्तींनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
    मद्ययुक्त पेये, कॉफी, चहा, सिगारेट, मसालेदार पदार्थ, मिरची, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.
    जठरव्रणासाठी दूध हा एक चांगला उपाय आहे. तापवून थंड केलेले दूध थोडे-थोडे प्यायल्यास आराम वाटतो. जेवणाच्या व झोपेच्या वेळा व्यवस्थित पाळाव्यात. शारीरिक व मानसिक संपूर्ण विश्रांती घ्यावी. सात्विक आहार घ्यावा. आहार, विहार, पथ्य पाळल्यास रोगमुक्त होण्यास मदत होते. राग, चिंता, भीती यामुळे जठरव्रण वाढू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवावे. वरील सर्व आजारांवर काही ठिकाणी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ