वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
August 12, 2025
पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी ‘ टेलिव्हिजन शाप की वरदान ‘ या विषयावर दहावीला निबंध असायचा. साठीला आलेल्या शिक्षकाकडे पेपर तपासायला गेला की टेलिव्हिजन वरदान नसुन शाप आहे , असे लिहिणार्या निबंधाला जास्त मार्कस पडायचे. तर विशीच्या नवीनच नोकरी लागलेल्या शिक्षकाकडे पेपर गेला तर टेलिव्हिजन शाप नसुन वरदान आहे , असे लिहिणार्या निबंधाला जास्त पडायचे. यात विद्यार्थीवर्गाची चांगलीच गोची व्हायची. हा धोका माझ्या वेळीच लक्षात आला आणि मी या विषयावर निबंध लिहायचे टाळुन ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ या विषयावर निबंध लिहिला. ( माझ्या बर्याच मित्रांनी या विषयात झीनत अमान विषयी लिहिले, पण हा निबंध झीनत अमानवर नसुन गांधीजींवर लिहायचा होता ) असो. हळुहळु टिव्हीमधेही अनेक बदल होत गेले,नवीन नवीन चैनल्स आले , चोवीस तास न्युज चैनल नावाच्या प्रकाराचा जन्म झाला . सुरुवातीला सातच्या बातम्या या प्रकाराला सरावलेल्या आम्ही चोवीस तास बातम्या काय दाखवणार ? याची चर्चा करायचो. हळुहळु या सर्व चर्चा मागे पडल्या आणि न्युज चैनल या प्रकाराने आपला पाय टिव्हीविश्वात भक्कमपणे रोवला .
पुर्वीच्या काळी चैनल्सची सुरुवात ही सकाळी सव्वापाचला होत असे. आजकाल ही सगळी न्युज चैनल चोवीस तास . त्यामुळे चैनलची सुरुवात म्हणजे आपली झोपेतुन उठण्याची वेळ असे आपण ठरवावे. सर्व न्युज चैनलची सुरुवात ही भक्तीरसाने होते . वेगवेगळे महाराज , ज्यांची नावेपण आपण कधी ऐकली नसतात , ती या चैनल्सवर ब्रम्ह , जीवन किंवा अध्यात्मिक प्रतीरोध अशा अत्यंत दुर्बोध विषयावर बोलत असतात . समोर प्रेक्षकगण माना डोलावत असतात . त्यांचे एकसुरी निरुपण ऐकुन आपल्याला झोप येते . त्यामुळे हे कार्यक्रम कदाचित रात्रपाळी करुन आल्यावर लोकांना शांत झोप येण्यासाठी लावत असावेत , अशी एक शंका माझ्या मनात आली. काही चैनल्सवर योगासने चालु असतात . ती मात्र आपण फक्त बघायची असतात . त्याप्रमाणे आपण करायला गेल्यास आपले हातपाय विचित्र अवस्थेमधे अडकुन बसतात , हा माझा स्वानुभव आहे.अत्यंत धोकादायक स्टंट्स केल्यावर ” हे स्टंट्स प्रोफेशनल लोकांनी सुरक्षिततेची सर्व साधने वापरुन केलेले आहेत , लोकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नये ” अशी पट्टी खाली येते , तशी पट्टी योगाच्या कार्यक्रमात दाखवायला हवी असे माझे मत आहे.
या सर्व न्युज चैनलवर बघण्यासारखी कोणती गोष्ट असते , तर ती त्यावरील निवेदिका. या मात्र अत्यंत सुंदर असतात. त्यांचा मेकप अत्यंत व्यवस्थित असतो. मात्र बातम्या सांगताना त्यांच्या चेहेर्यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव नसतात. कुणाला पुरस्कार मिळाल्याची बातमी जितक्या निर्विकारपणे त्या सांगतात , त्याच निर्विकारपणे कुणाचे निधन झाल्याचीपण सांगतात . आदला जन्म संताचा घेतल्यानंतर कदाचित पुढल्या जन्मी त्या निवेदिका बनत असाव्यात . संतांच्या वागण्यात निर्विकारपणा असायचा , यांच्या चेहेर्यात असतो. सहा महिन्यापुर्वीच एकदा एका नविन चालु होणार्या न्युज चैनलच्या निवेदिकेसाठी जाहिरात आली , ती अशी
” अडिचशे कोटी टर्नओव्हर असणारा क्ष ग्रुप न्युज चैनलच्या व्यवसायात पदार्पण करीत आहे . या नवीन चालु होणार्या न्युज चैनलसाठी निवेदिका हव्यात . वय वर्षे वींस ते पंचवीस. दिसायला सुंदर हव्यात . भाषेचे उत्तम ज्ञान हवे. संपर्क करा . “ पुढे एक मोबाइल नंबर दिला होता . आता विचार करा , ही जाहिरात “ मिस इंडीया स्पर्धेसाठी स्पर्धक हवेत “, यासाठीपण चालली असती. जागतिक घडामोडींचे चांगले ज्ञान हवे, अशी त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती .
आजकाल कुठल्याच न्युज या नुसत्या न्युज नसतात , तर त्या ब्रेकींग न्युज असतात. कुठलीही न्युज घ्या , ब्रेकींग न्युज . आता ही ब्रेकींग न्युज म्हणजे काय ? हा प्रश्न मी माझ्या न्युज चैनलमधे काम करणार्या मित्राला विचारला . तेव्हा त्याने ” हार्ट ब्रेक करणारी न्युज म्हणजे ब्रेकींग न्युज” असे उत्तर दिले. मराठीत त्याला ” आतडे पिळवटुन टाकणारी बातमी “असे म्हणतात , हेही त्याने मला सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी ”मुंबईच्या आयएएस अधिकार्याचा कुत्रा गेस्ट्रोने आजारी , रुग्णालयात दाखल , ” अशी ब्रेकींग न्युज ऐकुन आतडे खरोखर पिळवटुन निघाले.
या चैनल्सवर काही नेत्यांच्या सतत मुलाखती चालत असतात . हा मात्र खरोखर विनोदी प्रकार असतो . उदाहरणार्थ , एका न्युज चैनलवर य या नेत्याची मुलाखत चालु आहे . हे चैनल स्वतःला सर्वोतम असे म्हणवुन घेते.
निवेदक - आज आपल्या या वाहिनीवर राज्याचे तरुण तडफदार नेते मिस्टर य आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत बिझी शेड्युलमधुन त्यांनी ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलला दिली आहे. पुन्हा एकदा, ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलवर आहे. कारण आम्ही सर्वोत्तम आहोत.
( साहेबांवर कैमेरा ) सर , राज्याच्या सद्यपरिस्थितीबद्दल आपले मत काय ?
य - सरकार बदल केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. ( मिस्टर य हे विरोधी पक्षात आहेत हे आपल्या लक्षात आले असेलच )
निवेदक - पण सर , यापुर्वी पाच वर्षे आपण सत्तेत होतात ?
य - त्या काळात एकही दंगल झाली नाही .
निवेदक - दंगल करणारे लोकच सत्तेत होते , म्हणुन झाली नाही असे सगळे म्हणतात ?
य - कोण म्हणतो असे ? स्साला हराम - ( आपण टीव्हीवर आहोत हे लगेच जाणवुन ) म्हणजे हे चुक आहे .
निवेदक - राज्याचा विकासपण झाला नाही ?
य - हे चुक आहे , माझे कार्यकर्ते पुर्वी सायकलवर फिरायचे. आजकाल ते टाटा सफारीत फिरतात . आमचे कार्यकर्ते हे सामान्य लोक आहेत . सामान्य लोक सायकलवरुन टाटा सफारीत आले तर तुम्हा लोकांना वाईट का वाटते ? म्हणजे विकास झाला .
निवेदक - तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो ?
य - आम्ही खासदार आहोत , हे खरे आहे . मात्र आमदारपद आम्ही घराणी वेगळी असणार्या आमच्या जावयांना दिली आहेत, त्यामुळे आम्ही घराणे शाही करतो , हा आरोप खोटा आहे …..आम्ही एकाच घराण्यात पदे वाटत नाही .
ही मुलाखत अशीच चालु रहाते. अर्धा तास संपल्यावर एकदाची मुलाखत संपते, आणि तरुण तडफदार नेत्याला शुभेच्छा देउन निवेदक एकदाचा आपला निरोप घेतो. या मुलाखतीतुन आपल्या हाती काहीच लागत नाही. नेत्यांचे चेहेरे बदलतात, वाक्ये मात्र तीच रहातात.
तरीही शेवटी ही चैनल्स आपण का बघतो ? हा प्रश्न उरतोच . त्याचे उत्तर म्हणजे , हल्ली आपल्यालाही असेच आवडते . दिखाउपणा आवडतो , कुठल्याही गोष्टीच्या खोलात जायला आवडत नाही . त्यामुळे दोष शेवटी आपणावरच येतो .त्यामुळे चैनलवाल्यांची सध्या चलती आहे . ’ पिकते ते विकते ‘, या जुन्या म्हणीपेक्षा ‘ जे विकते ते लोक पिकवतात ‘ हेच खरे ! शेवटी काय , तर कालाय तस्मै नमः !
-- निखिल नारायण मुदगलकर
February 24, 2016
आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.
ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.
ह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.
ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.
साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.
ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.
August 11, 2015
निषेधार्ह पाणी भाग तीन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.
आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.
आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.
आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः
या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.
जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !
मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.
पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
अ ति
पा णी
पि ऊ
न ये
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
January 11, 2017
अरे बापरे!(वात्रटिका)
June 23, 2010
या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख.
September 23, 2017
या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे.
March 4, 2025
परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते.
March 23, 2022
रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणांचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||
January 16, 2012
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
January 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti