वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !
दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.
या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !
अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.
दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.
सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.
पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.01.2017
दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे.
काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ सूत्र बाजुलाला पडते. वाग्भटजींना नेमकेपणाने काय सांगायचे आहे, तो मुळ मुद्दा मुळ ग्रंथातून कोणीच वाचलेला नसतो. केवळ राजीवजी दीक्षित सांगतात, म्हणजे ते बरोबरच, असा हेका धरून नाही, चालणार !
सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की, मी आज जे लिहितोय, बोलतोय, विचार करतोय, तो फक्त आणि फक्त राजीवजींच्या प्रभावामुळेच. जर राजीवजी माझ्या आयुष्यात आले नसते तर आजचा मी, असा घडलोच नसतो. मी एवढा भाग्यवान आहे, की प्रत्यक्ष राजीवजींबरोबर मी स्वतः सहा वर्षे काम केले आहे. राजीवजी माझे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक, बौद्धिक गुरू आहेत. वर्ध्यापासून अगदी राजस्थान, गुजराथ, कर्नाटक सर्वत्र त्यांच्याबरोबरीने फिरलोय. आजादी बचाओ आंदोलनाच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे. राजीवजी हे होमियोपॅथीमधले उत्तम निष्णात होते. तशी पदवीसुद्धा त्यांच्याकडे होती. आमच्या चर्चेमधून देशी स्वदेशी विदेशी बद्दल जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा होमियो औषधे परदेशातूनच आयात करावी लागतात, त्यापेक्षा स्वदेशी आयुर्वेदातील सूत्रांचा आपण आपल्या भारतीय पद्धतीने का विचार करू नये, हा विचार राजीवजींना पटला, आणि या चर्चेनंतर त्यांना वाग्भट हा ग्रंथ पुणे येथील जागतिक आयुर्वेद परिषदेच्या वेळी सप्रेम भेट दिला. त्यानंतर आमची दूरध्वनी वरून काही विषयावर चर्चा व्हायची. तेव्हा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा असतो, हे मला शिकायला मिळाले. आम्ही ग्रंथ अभ्यासला तो केवळ परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी. पण राजीवजींनी भारतीय पद्धतीने हेच भारतीय ग्रंथ कसे अभ्यासायचे हे शिकवले.
फक्त या आयुर्वेदीय ग्रंथाची शैली ही केवळ शब्दशः भाषांतर अशी नसल्याने काही वेळा नेमकेपणाने भाषांतर केले तर अर्थ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात. श्लोकांचे इन बिटवीन द लाईन्स अर्थ वेगळे होतात, ते अर्थ अगोदरच्या आणि नंतरच्या श्लोकांच्या आधारे, तर्काने लावायचे असतात, हे पण राजीवजीना पटले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या चेन्नई येथील व्याख्यानानंतर ! तोपर्यंत त्यांच्या आरोग्यावरील वाग्भटजींच्या व्याख्यानांच्या सिडीज प्रसारीत सुद्धा झाल्या होत्या. आणि नंतर, नियतीनेपण ही चुक सांगायला आणि सुधारायला संधीच दिली नाही. आज भारतामधे होत असलेला सकारात्मक बदल पहायला आणि पुढे मार्गदर्शन करायला राजीवजी हवेच होते पण........
या पणपाशी नियतीने आम्हाला थांबायला सांगितले.
.
.
.
.
.
वाग्भटजी पूर्वी देखील अनेक शास्त्रकार होऊन गेले, चरक सुश्रुत यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही सोपी आणि व्यावहारिक सूत्रे वाग्भटजीनी संकलीत केली. त्यातील चरकाचार्यांनी प्रमेह प्रकरणामधे सांगितलेले हे अत्यंत महत्वाचे सूत्र. मधुमेह होऊ नये या करीता सांगितले गेलेले हे सूत्र आता विस्ताराने बघूया. कोणतेही पूर्वग्रहदूषित न ठेवता या सूत्राचा नव्याने अभ्यास करूया. राजीवजींनी जी दृष्टी दिली ती आपल्यामधे उतरवण्याचा प्रयत्न करूया, पुनः एकदा इतिहासातील वैभवशाली भारत अभ्यासूया, आणि भारताला आरोग्यसंपन्न भारत बनवूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
मूळ सूत्र असे,
आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ।।
पय म्हणजे दूध. म्हणजे देशी गाईचे दूध असा अर्थ होतो. जिथे जिथे दूध असा उल्लेख येतो, ते दूध म्हणजे गाईचे. आणि गाय देशी. जिथे घृत असा उल्लेख येतो, तिथे गाईचे तूप, दही, ताक, लोणी, मूत्र, शेण याच्या बाबतीत जाणावे असे एक सूत्र ग्रंथामधे आधी येऊन गेले आहे. परत परत आम्ही सांगणार नाही. असे वाग्भटजी म्हणतात. जिथे बदल अपेक्षित असेल तिथे आमच्याकडून नेमकेपणाने सांगितले जाईल. अन्यथा दुग्धादि सर्व गाईचेच जाणावे.
जसे कोणत्याही कार्यक्रमामधे सुरवातीला जो प्रास्ताविक करतो, त्यानेच व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचे पद आणि नाव यांचा उल्लेख करायचा असतो. अगदी थोडक्यात त्याची प्रतिष्ठा सांभाळायची असते. पण एकदा खुर्चीवर बसलेल्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मा.खासदार आमदार, अमुक बॅकेचे चेअरमन, तमुक गावचे सरपंच, मा. पोलीसपाटील असे सांगून झाले की, नंतर व्यासपीठावर स्वागतासाठी येणाऱ्या, किंवा अन्य प्रमुख वक्ते, अध्यक्ष, चेअरमन, आणि आभार प्रदर्शन करणाऱ्यांनी फक्त आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जनहो, असे म्हणून आपला विषय पुढे सुरू करावयाचा असतो. येणारा प्रत्येक वक्ता जर स्टेजवर बसलेल्या सर्वांची नावे घेऊ लागला तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे होते. तसेच......
म्हणजे इथे जो पय असा उल्लेख केला आहे तो गाईचे दूध असाच होतो. आणि त्याकाळी गाईंचा वर्णसंकर न झाल्याने या सर्व गाई देशीच होत्या. हो आणखी एक गोष्ट. मूळ सूत्रात पय असे न म्हणता पयांसि असा शब्द वापरला आहे, याचा अर्थ केवळ गाईचेच नव्हे तर म्हैस, शेळी, मेंढी, या अन्य सर्व दुधांचे अतिसेवन हे मधुमेहाचे कारण आहे.
ज्याचे अन्न फक्त दूधच आहे असे बालक सोडून अन्य पालक वर्गाने याचा विचार करावा.
आजच्या पुरते खूप झाले. आज एवढे लक्षात ठेवूया,
चहातले दूध चालते, पण दुधाचा चहा नको.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.01.2017
सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफच्या) तेजबहादुर या जवानाने सोशल मिडीयावर टाकलेला एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. सीमेवरील जवानांना मिळणार्या जेवणाचा दर्जा अतिशय सुमार असतो, त्यांना मिळणार्या सोयीसुविधा पुरेशा नसतात, जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यसाठा मिळत असला तरीही काही अधिकारी हे धान्य मधल्या मधे विकतात.
आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या जवळ कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याने असे विचार बऱ्याचदा वाढीला लागतात.
ज्या दोन शास्त्रांचे मूलभूत सिद्धांतच न जुळणारे आहेत त्यांना इंटिग्रेट करण्याचा विचार करणं म्हणजे तेलात पाणी ओतून ‘एकजीव मिश्रण’ तयार केल्याचा दावा करणे होय. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळू शकतील का? नाही. आहारापासून विचारापर्यंत कोणतीच गोष्ट जुळत नाही; किंबहुना अगदी विरुद्ध टोकाची आहे अशा व्यक्तींची लग्न जुळवण्याचा अट्टाहास हा सप्तपदीपासूनच घटस्फोटाच्या दिशेने पावले टाकणारा असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाचे आहे. आयुर्वेदाचा अवघा डोलारा ज्या दोष- धातू- मल आदि संकल्पनांवर आधारित आहे त्यांनाच आधुनिक शास्त्र मानत नाही. पुढे बोलण्याचा प्रश्नच येतो कुठे?! याकरताच MBBS नंतर MD/MS (Ayurved) करायला देण्याच्या आत्मघातकी निर्णयावरील चर्चेला आम्ही वैद्यांनी विरोध दर्शवला होता.ज्यांना आयुर्वेद शिकायचा आहे त्यांनी BAMS करूनच तो शिकावा हे स्वच्छ गणित आहे. काहीजण मात्र उफराटे कारभार करत आयुर्वेदानुसार निदान आणि आधुनिक चिकित्सा वा आधुनिक शास्त्रानुसार निदान आणि आयुर्वेदीय चिकित्सा असे विचार करत असतात. काहीजण तर त्यापलिकडे जाऊन आधुनिक औषधे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कशी कार्य करतात हे ‘ओढून ताणून बसवून’ सांगत असतात. मात्र त्याच वेळेला आयुर्वेदानुसार ही औषधें कोणत्या ‘भैषज्यकल्पनेत’ बसतील यावर मात्र गुळणी धरून (बिटाडीनची?!) गप बसतात.
आयुर्वेदाला कोणाहीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आचार्य चरकांच्या शब्दांत हे शास्त्र ‘शाश्वत’ आहे. पण मग आयुर्वेद स्वतःला फारच ग्रेट समजतो किंवा आयुर्वेदाचे आधुनिक विज्ञानाशी वावडे आहे का; तर मुळीच नाही. आयुर्वेदाला व्यक्त होण्यास आधुनिक वैद्यकाच्या कुबड्यांची गरज नाही इतकेच आमचे मत आहे. पण मग आयुर्वेदीय वैद्यांना तपासणीची प्रयोगशालेय साधने का लागतात? असा प्रश्न कित्येकजण उपस्थित करत असतात. मुळात हा प्रश्नच फसवा आहे. स्टेथोस्कोपपासून ते एमआरआय पर्यंतचे सगळे शोध हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इत्यादि मूलभूत शास्त्रीय शाखांचे आहेत; आधुनिक वैद्यकाचे नाहीत!! त्यामुळे वैद्यांनी त्यांचा गरज पडेल तेथे वापर करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. मात्र पुन्हा हा वापर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हवा. ही परीक्षणे आयुर्वेदानुसार प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. त्यापुढील अनुमान, युक्ति आदि प्रमाणे वापरताना आणि निदान-उपचार ठरवताना ते आयुर्वेदाच्या संकल्पना वा सिद्धांतांनुसार असायला हवे. याला खऱ्या अर्थाने ‘इंटिग्रेटेड’ म्हणता येईल. वैद्यांनी आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिणे बंद करावे असे मला तरी वाटते. काही घ्यायचेच असेल तर आपले शास्त्र सार्वभौम करण्याची आधुनिक वैद्यकाच्या पदवीधरांची वृत्ती आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी हे गुण घ्यावेत. त्यातच शास्त्राचे खरे ‘उपबृंहण’ करण्याची क्षमता आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभिगातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस वभवतालात पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरातजरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..
दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. 'जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले. कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मात्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.
जांभईच्या शास्त्रीय अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक ज्येष्ठांचे निरीक्षण केले. कुटुंबातील सदस्यांमध्ये जांभई ही तुलनेने मित्र किंवा इतर घटकांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे यातून दिसून आले. नातेवाइकांत हे प्रमाण दहामध्ये आठ, तर अनोळखींमध्ये ते दहात केवळ एक असल्याचे आढळून आले. दुसरीकडे जांभई देण्यास उशीर झाला तर ती अधिक लांबण्याची शक्यता असते. हे परिचित व अपरिचित दोन्ही व्यक्तींबाबत घडू शकते. या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली. यात राष्ट्रीयत्व, त्वचेचा रंग, भिन्न सांस्कृतिक सवई, सहभागी व्यक्तीचे वय, लिंग. याशिवाय दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हे ते घटक असल्याचे संशोधन प्रकल्पाच्या प्रोफेसर एलिझाबेटा पालागी यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये जांभईची ही संसर्गजन्य प्रक्रिया पहिल्या पाच वर्षांपर्यंत विकसित होत नाही. त्यामागे भावना हे कारण सांगण्यात आले आहे. इतरांच्या भावना नीटपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते. त्यामुळे मुले या नियमाला अपवाद ठरली असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परिचित व्यक्तीच्या सहवासात जांभई येते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीला जांभई देतानादेखील जांभई येण्याची वृत्ती होते किंवा त्याला टाळण्यात येते. या शास्त्रज्ञ सामाजिक सहानुभूतीची संकल्पना देतात. ही बाबदेखील संशोधनातून आढळून आली आहे. 480 जांभई स्पर्धेतून अभ्यास करण्यात आला. हा संशोधन प्रकल्प एक वर्ष चालला. त्यात 109 ज्येष्ठांना सहभागी करून घेण्यात आले होते. 04 वर्षांपर्यंत मुलांमध्ये मोठ्या माणसांसारखा हा संसर्ग आढळून येत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ :- marathi.webdunia.com
मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे.
आस्यासुखं स्वप्नसुखम्
दधिनी ग्राम्यौदकः पयांसि
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम !
हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे.
काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी 'काय करू नये' ते पहिल्यांदा सांगताना दिसतात.
मनाचे श्लोक सांगताना समर्थ देखील असेच सांगतात,
"नको रे मना........"
हे करू नको, ते करू नको. बाकी सगळं करं, पण हे हे एवढं अजिबात करू नकोस, पुढे धोका आहे."
नकारार्थी गोष्टी आपल्या मनाला पटकन कळतात. हे वेडं मन सारखं तिथेच धाव घेतं. म्हणून अशा बेसावध क्षणांची आठवण सतत व्हायला हवी. कारण आयुष्यात एक क्षण भाळण्याचा आणि उरलेले सर्व सांभाळण्याचे! सावध तो सुखी म्हणून काय नको, ते प्रथम सांगितले जाते.
एकदा का मधुमेहाचे लेबल चिकटले की, आयुष्यभर गोड क्षण नुसते आठवणीतच ठेवायचे, अशी आजची धारणा. आपल्याला ही धारणा बदलवायची आहे. मनाची ताकद प्रचंड आहे. जर मनापासून ठरवले तर मधुमेह हद्दपार होऊ शकतो. अत्यंत कडू असणारा हा गोड विषय जरा वादग्रस्त आहे. पण उर्वरीत आयुष्य जर निरोगी आणि गोड जायला हवे असेल तर थोडे कडू निर्णय घेणे हितकर असते. हे निर्णय घ्यावेत.
मधुमेह होऊ नये याकरीता काय करू नये, या अवतरणातील इथली दुसरी ओळ प्रथम पाहू. कारण विषय दुधाचा सुरू आहे.
पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी देखील. इथे शब्द वापरलाय "पयांसी"
हा 'पाणी' या अर्थी नक्कीच नाही. कारण त्याआधीच्याच शब्दामधे "उदक" असा वेगळा शब्द ग्रंथकारांनी वापरला आहे. म्हणजे मधुमेहामधे पाणी आणि दूध या दोन्ही गोष्टीपासून सावध रहायला हवे, असे शास्त्रकारांना अपेक्षित आहे.
एखाद्या गोष्टीचा अभिमान जरूर असावा. पण गर्व असू नये.
आमची देशी गाय सर्वगुणसंपन्न जरूर आहे. हा अभिमान जरूर बाळगावा, पण तिचे दूध सर्व रोगात चालते, हा वृथा अहंकार मात्र नको. राजयक्ष्म्यासारख्या रोगात गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध, शेळीचा सहवास श्रेष्ठ सांगितला आहे.
आमच्या देशी गाईबद्दल मला पूर्ण आदर आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या गाईचे दूधच औषधी ठरेल असे नाही.
काही ठिकाणी गोदुग्ध, काही वेळा गोदधी म्हणजे दही, काही ठिकाणी गोतक्र म्हणजे ताक, काही ठिकाणी गो नवनीत म्हणजे लोणी, काही ठिकाणी गोघृत म्हणजे तूप, तर काही ठिकाणी गोमूत्र, तर काही ठिकाणी गोमय म्हणजे शेण देखील औषध म्हणून काम करते.
मधुमेह होऊ नये, म्हणून दुध घे -ऊ- च नये असा टोकाचा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. दूध आता लगेच बंदच करायला हवे असेही नक्कीच नाही.
"पिण्याचेही" काही नियम असतात ना.
गैरसमज नको, दुधाबद्दलच बोलतोय मी .......
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
19.01.2017
"तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?'"असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का ? उत्तर पोस्ट च्या तळाशी सापडेल.अहं!आधी पोस्ट पूर्ण वाचा.माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले कि हे पदार्थ करून खातात त्यामुळे व्यर्थ excuse at least मराठी लोकांनी तरी देऊ नयेत.
नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज ,सोपे ,कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ) (लेखिका :वैद्य रुपाली पानसे ,आद्यं आयुर्वेद ,पुणे )
१.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबर /तीळ चटणी बरोबर)
२.मिश्र भाज्यांचा पराठा साजूक तूप
३.मिश्र भाज्यांचे(किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.)थालीपीठ धिरडे ,ताक)
४.अंड्याचे ऑम्लेट अथवा नुसतेच उकडलेले अंडे
५.मटार,मका,घेवडा,खोबरे,डाळ्या,टोमॅटो,इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.
६.फोडणीची ताक भाकरी.
७.ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उब्जे
८.भाकरी गूळ तुपाचा लाडू.
९.दडपे पोहे भरपूर ओले खोबरे,कोथिंबीर ,कांदा तसेच लिंबाचा रस टाकून
१०.क्वचित साजूक तुपाचा कणकेचा केळ घालून शिरा.
११.नाचणीची उकड
१२.नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.
१३.शिजवलेल्या हिरव्या मुगाची कांदा, टोमॅटो शेव खालून मिसळ
१४.ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी
१५.खारीक खोबरे डिंक मेथ्या पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .
१६.मिश्र पिठाचा ढोकळा, पुदिना जवस चटणी
१७.तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)
१८.मिश्र पिठाचे धिरडे व चटणी
१९.मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.
२०.गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी
२१.ओले खोबरे मटार,मका,भाज्या हिरवीमिरचीघालून फोडणीचा गव्हाचा दलिया
२२.खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी
२३.गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर
२४.सालीच्या लाहीचा चिवडा कांदा टोमॅटो शेव घालून भेळेसारखा
२५.फोडणीच्या तिखट शेवया
२६.रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )
२७.रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा
२८.मुगाची डाळ शिजवून त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा
२९.फोडणीची भगर आणि ताक.
३० वा पदार्थ जाहीर नाही कारण जर २९ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने आळीपाळीने खाल्ले तर ३० वा दिवस तुमचा हक्काचा असेल. भरपूर बटर थापून ब्रेड, टोस्ट खा किंवा वैशाली वाडेश्वर ला जाऊन इडली डोसा उडीद वडा चोपा.
वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
(कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )
शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.
सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.
आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.
वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.
सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम् (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.
एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.
१९ जानेवारी १९५६ मध्ये भारतातील आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्यावेळी भारतामध्ये जवळ जवळ १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ अभारतीय कंपन्या आणि ७५ दूरदर्शी कार्यरत होत्या. राष्ट्रीयकरण दोन टप्प्यांमध्ये साध्य करण्यात आले, सुरवातीला कंपन्यांचे व्यवस्थापन अध्यादेशाच्या साधनाने ताब्यात घेण्यात आले, आणि नंतर सर्वसमावेशक विधेयकाच्या साधनाने मालकी सुद्धा.
भारतीय संसदेने १९ जुन १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ अधिनियम पारित केला, आणी भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेषकरून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले एल.आय.सी.ची १९५६ मध्ये तीच्या कार्पोरेट कार्यालयां व्यतिरिक्त ५ प्रादेशिक कार्यालये, ३३ विभागीय कार्यालये आणि २१२ शाखा कार्यालये होती. पॉलिसी चालू असण्याच्या काळात आयुर्विमा करार दीर्घकालीन करार असल्याने तीच्या विविध सेवांच्या गरजा पुढील वर्षांमध्ये कार्यविस्तार करण्यसाठी आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये एक शाखा कार्यालय ठेवण्यासाठी भासू लागल्या. एल.आय.सी.ची पुनर्रचना करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर नविन शाखा कार्यालये उघडण्यात आली. पुनर्रचनेचा एक परिणाम म्हणून सेवा देण्याची कार्ये शाखा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि शाखा या लेखा युनिटस करण्यात आल्या.
महामंडळाच्या कामगिरीने हे अद्भुत कार्य केले. हे फक्त सन १९५७ मध्ये २०० कोटी रूपयांपासून महामंडळाने वर्ष १९६९-७० मध्ये ओलांडलेल्या १००० कोटींच्या नविन व्यवसायावरून लक्षात येते आणि एल.आय.सी.ला नविन व्यवसायाचे २००० कोटींचे उद्दिष्ट पार करावयाला पुढील १० वर्ष लागली. परंतू ऐंशीच्या सुरवातीला घडत असलेल्या पुनर्रचनेमुळे, वर्ष १९८५-८६ पर्यंत एल.आय.सी.ने आधीच नविन पॉलिसींवरील ७०००सम एशुअर्ड चा आकडा पार केला होता.
आज एल.आय.सी.ची २०४८ संपूर्ण संगणकीकरण केलेली शाखा कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, ८ प्रादेशिक कार्यालये, १३८१ उपग्रह कार्यालये आणि कार्पोरेट कार्यालयांसहीत कार्यरत आहे.
एल.आय.सी.च्या वाईड एरीआ नेटवर्कने ११३ विभागीय कार्यालये व्यापली आहेत आणि मेट्रो एरीआ नेटवर्कच्या मार्फत सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत. काही निवडक शहरांमध्ये ऑनलाईन विम्याचे हप्ते गोळाकरण्याची सोय देऊ करण्यासाठी एल.आय.सी.ने काही बॅंका आणि सेवापुरवठादारांशी संधान साधलेले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी एल.आय.सी.ची इसीएस आणि एटीएम मार्फत विमाहप्ता भरणा सोय ही अतिरिक्त आहे.
ऑनलाईन किऑस्क आणि आयव्हीआरएसच्या खेरीज मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, दिल्ली, पुणे आणि इतर अनेक शहरांमध्ये माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. पॉलिसीधारकांना त्यांच्या सहज प्रवेश पुरवण्याच्या हेतूने एल.आय.सी.ने उपग्रह संपर्क कार्यालये सुरू केलेली आहेत. उपग्रह कार्यालये छोटीशी, आटोपशीर आणि ग्राहकाला अधिक जवळची असतात. भारतीय विम्याच्या उदारीकरणाच्या परिस्थीतीत सुद्धा एल.आय.सी. नविन वाढीच्या दिशेने वेगाने स्वत:चीच मागील सर्व रेकॉर्ड मोडत कार्यक्रमण करताना आघाडीवर आहे.
एल.आय.सी.ने ब्रिटन, फिजी, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमध्ये कारभार सुरू केला. तसेच विमा क्षेत्राबरोबरच पेन्शन, गृहकर्जे, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, वित्त उत्पादनांचे वितरण आदी क्षेत्रात एल.आय.सी. काम करीत आहे. आत्तापर्यंत एल.आय.सी.ने अनेक मैलाचे टप्पे ओलांडले आहेत आणि आयुर्विमा उद्योगाच्या दृष्टीकोनातून अभूतपूर्व कामगिरीचे अनेक मानबिंदू प्रस्थापीत केलेले आहेत. हा तोच हेतू ज्याने आमच्या पूर्वजांना विमा या देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्हाला एल.आय.सी.मध्ये हा संरक्षणाचा निरोप घेऊन सुरक्षेचा दिवा शक्यतितक्या घरांमध्ये लावण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी प्रेरणा दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti